कालचक्र आणि भावावस्था

Submitted by सामो on 25 September, 2019 - 10:34


.
"Mindfulness And Money" हे "Kulanand & Domnic Houlde" या लेखकद्वयीचे पुस्तक वाचले. नावावरुन लक्षात आलेच असेल "पैसा" या विषयाची बुद्ध धर्माच्या शिकवणीशी सांगड घालणारे हे पुस्तक आहे. बुद्धधर्मात भवचक्र अर्थात संसारचक्र किंवा कालचक्र महत्त्वपूर्ण मानले आहे. या कालचक्राच्या ६ भागांची आणि एक लहानसा आर्थिक निर्णय घेताना, अनिता नामक एका काँप्युटर प्रोग्रॅमरच्या मनोकायीक स्थित्यंतराची घातलेली रोचक सांगड या पुस्तकात वाचावयास मिळते. ती मांडण्याचा प्रयत्न करते. पुस्तकाचा पूर्ण गाभा मला कळला आहे असा माझा दावा नाही. हे पुस्तक परीक्षण अथवा खरं तर ओळखही नाही. हा या पुस्तकातील मला कळलेला आणि आवडलेला भाग आहे.

वरती आकृतीत दाखविल्याप्रमाणे एका अजस्त्र प्राण्याच्या मुखामध्ये हे चक्र दिसते. हा प्राणी अन्य कोणी नसून प्रत्यक्ष "यम" आहे.यमाने गिळंकृत केलेले हे चक्र ४ भागात (Concentric वर्तुळांमध्ये) विभागले आहे. पैकी सर्वात बाहेरचे वर्तुळ आर्‍यांनी ६ भागात विभागलेले दिसते. एका भागात देवयोनीतील जीव गायन-वादनादि कलांचा आस्वाद घेण्यात रममाण झालेले दिसत आहेत. तर त्यालगतच्या भागात राक्षस योनीतील लोक हिंसा व लढाई करण्यात मष्गुल झालेले दिसतात. एक भाग पशूयोनीतील जीवांच्या क्रीडा दाखवितो ज्यात नाना प्रकारचे पशूपक्षी ऊन खात पहुडले आहेत तर काही भक्ष्याच्या शोधार्थ रानावनात भटकत आहेत. काही शिकार करत आहेत तर काही निद्राधीन झाले आहेत. सर्वात खालच्या भागात नरकयोनीतील जीव व त्यांच्या यातना पहावयास मिळतात ज्यात यमदूत काहीजणांना उकळत्या तेलामध्ये फेकत आहेत तर काही जणांना तापलेल्या सळईचे डाग देत आहेत. नंतर येते पिशाच्च्योनीचे जग.यामध्ये अतृप्त वासना राहीलेले जीव भटकताना दिसत आहेत. व शेवटी मानवांचे जग आहे ज्यात कोणी कामावर जात आहे तर कोणी अभ्यास करत आहे, कोणी विश्रांती घेत आहे तर कोणी खेळ खेळत आहे.

लेखकाने पुढे अनिताचे उदाहरण देऊन हे मांडले आहे की या सहाही सृष्टी बाह्य जगतात अस्तित्वात नसून आपण मनोव्यापारांच्या पातळीवर सतत यापैकी कोणती ना कोणती सृष्टी अनुभवत असतो. कधीकधी तर एका दुपारीत या साही जगातून आपण फेरफटका मारून येतो. कसे ते अनिताच्या उदाहरणातून लेखक स्पष्ट करतो.

अनिताची कहाणी पाहू.
अनिता एक काँप्युटर प्रोग्रॅमर ती रोज ऑफिस मधून, थेट जिममध्ये जाते. ८ तास बैठे काम करून करून आखडलेल्या स्नायूंना पूर्ववत करण्यासाठी अनिता व्यायाम करते. ती आत्ता नुकतीच जिममधून घरी परतली आहे. आज वर्कआऊट चांगले झाल्याने ती स्वतःवरच बरीच खूष आहे. व्यायाम हा तिचा आवडता छंद आहे. खरं तर तिचा बॉयफ्रेंड आज कामानिमित्त दुसर्‍या गावी गेल्याने अनिता एकटी आहे आज ती फक्त पिझ्झा-कोक चापून झोपू शकते. अरे हे काय अनिताला आठवले की तिने आजच एक नवीन सँडल्सचा जोड घेतला आहे. ती पिशवीतून तो जोड बाहेर काढून निरखू लागते. पण ती खूष का दिसत नाही? या महीन्यातला तिचा तीसरा जोड आणि एकूण संग्रहातला ३२ वा. बाप रे! तिला स्वतःलाच शंका येते की तिला खरेदीची कंपल्सिव्ह डिसॉर्डर आहे की काय? दर वेळेला हे असेच होते नवीन जोड ती विकत घेते खरी पण घरी आल्यानंतर त्या जोडाचे आकर्षण, नावीन्य ओसरून गेलेले असते. कधी तिला टाच फार ऊंच वाटते तर कधी रंग अनाकर्षक वाटू लागतो. गंमत म्हणजे या तृटी दुकानात तिच्या लक्षात येत नाहीत. आजही तेच घडलं आहे. साधारण अशाच फॅशनचा जोड तिच्याकडे आहे असे तिचे दुसरे मन सांगू लागले आहे. हेच $९५ तिने जर एखाद्या गरजू व्यक्तीला दिले असते तर? तिचे मन तिला खात आहे. रोज तर कोपर्‍यावर अनवाणी भिकारी तिला दिसतो. गुन्हेगारी भावनेने घेरलेली अनिता उठून कपडे वॉशींग मशीनमध्ये टाकते व परत कॉप्युटर उघडून ईमेल्स पाहू लागते. कमी पगाराची ही नोकरी तिने केवळ फ्लेक्झिबल तासांकरता स्वीकारली आहे. पण सध्या कंपनीत कामाचा ताण इतका आहे की तिला दिवसाचे ८ तासही कमी पडत आहेत वर पगार कमी तो कमीच व पगारी रजाही कमी आहेत. कालच तिने तिच्या टीम लीडरला म्हणजे विशालला पगारवाढीसंदर्भात विनंतीवजा मेल पाठवलेली आहे. अनिताच्या हाताची बोटी, मनगटही आजकाल दुखते. नक्की कार्पेल टनेलची लक्षणे. अरे हे काय ... विशालने तिच्या ईमेलला उत्तर तर पाठविले आहे परंतु पगारवाढ तर सोडाच त्याने तिला कामात चूका टाळण्याबद्दल ताकीद दिली आहे. नालायक आहे विशाल. लायकी नसताना लीडर झाला आहे. कंपनीदेखील बकवास आहे. काम करणार्‍या लोकांची शोषण करणारी ही कंपनी खरं तर तोट्यात गेली तर बरं होईल. आता अनिताच्या रागाचा पारा वाढू लागला आहे. ती या पिळवणूकीविरुद्ध कंपनीला कोर्टात खेचणार आहे, नाही नको त्यापेक्षा असे शोषण होणार्‍या पीडीतांची वेबसाईटच ती सुरु करेल. मग कंपनीची लक्तरे काढून पैसे मिळवेल. छे छे काहीतरी केलेच पाहीजे. अनिता रागाच्या तीरमीरीत घराबाहेर पडते व नेहमीच्या बागेच्या दिशेने निघते. पण थंडगार वार्‍याने तिचा संताप हळूहळू निवळत चालला आहे. हिरवी झाडे, पक्षी, बागेत खेळणारी लहान मुले तिला प्रसन्न करु लागली आहेत. कदाचित मगासचा राग अनाठायी होता. घरी गेल्यावर मैत्रिणीला फोन करण्याचे अनिता ठरवते. या मैत्रिणीची साईट आहे. अनिता स्वतः काढलेली चित्रे या साईटवर प्रदर्शित करु शकेल. तिच्या चित्रकलेच्या छंदातून वरकमाईही होईल व समाधानही मिळेल. वा काय सुरेख बेत आहे. अनिता आशावादी मनस्थितीत परत घराकडे वळते.

वरील उदाहरणात अनिताचा प्रवास सहा लोकातून कसाकसा होत गेला ते आता पाहू.

८ तास काम करून मेंदू आणि शरीर बधीर झालेली अनिता थकून गेलेली होती. तिला इतकी मरगळ आलेली होती की पिझ्झा खाणे व झोपणे यापलीकडे विचारही ती करू शकत नव्हती. ही तिची मनस्थिती "पशूलोकाचे" प्रतिनिधीत्व करते. पशूंना आहार, मैथुन, निद्रा यपलीकडे गरजा नसतात. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणे व नंतर खाऊन पीऊन निवांत झोपणे यापलिकडचा विचार अनितास शिवत नव्हता.
नीट निरीक्षण केलेत तर आपला पशूलोकात वावर असण्याची काही चिन्हे आढळून येतील-
दिवस दिवस कामाचा रगाडा उपसण्यात जीवनातील आनंदास मुकणे
सुट्टीच्या दिवशी बधीरपणे बाजारहाट करून उरलेला काळ खाणे व झोपणे यात घालविणे
घाण्याला जुंपलेल्या बैलासारखे राबणे

पिशाच्चलोक - ३१ सँडल्स असतानाही दुपारी अनिताने अजून एक जोड खरेदी केला व नंतर पस्तावली ही तिची मानसिक अवस्था पिशाच्चलोकाचे प्रतीकच आहे. "वखवख" हा पिशाच्चांचा स्थायीभाव असतो. थुलथुलीत पोटाची व बारीक मानेची, भकास डोळ्यांची पिशाच्चे जे काही खातात पीतात त्याचे राखेत अथवा घाणीत रुपांतर होते. कधीही तृप्ती न मिळणारे हे जीव समाधानाच्या शोधात भटकत राहतात.
आपला पिशाच्च्लोकात वावर असण्याची चिन्हे अशीही असू शकतात -
गरज नसताना केवळ सेल लागला आहे म्हणून किंवा साठवायच्या हेतूने वस्तू जमवित बसणे
उधळपट्टीवर संयम ठेवायचा तर आहे पण काही केल्या जमत नाही.
कोणत्याही प्लॅनींगशिवाय अचानक आपण मोठे खर्च काढतो, हुक्की आली खर्च केला असे वारंवार होते.
बचत करण्याचा रोज निश्चय तर करतो पण तो पूर्ण कधीच होत नाही.

नरकलोक - अनिता भिकार्‍याचा विचार करीत जेव्हा स्वतःला दूषणे देते, स्वताडन करते, गुन्हेगार वाटून घेते तेव्हा तिचे मनोव्यापार हे नरकलोकाचे प्रतिनिधीत्व करतात. तिला खूप यातना होत असतात पण ती काहीच करू शकत नाही.
आपला नरकलोकात वावर असण्याची चिन्हे म्हणाल तर-
मानसिक छळ होणार्‍या प्रकल्पावर आपण काम करत असतो.
कामापासून सुटका मिळावी अशी तीव्र इच्छा आपल्याला सतत होते
केवळ दारीद्र्याच्या काल्पनिक भीतीपोटी आपण काम करत राहतो.
छळवादी बॉस/सहकार्‍यांना रोज तोंड द्यावे लागते, कामावर असमाधान असते.

असुरलोक - जेव्हा अनितामध्ये सूडबुद्धीचा प्रदुर्भाव झाला व सूडभावनेने तिचे मन पोखरुन निघाले तेव्हाची अनिताची मनस्थिती असुरलोकाचे प्रतिनिधीत्व करते. राक्षस हे देवांचे स्पर्धी. अमृतातील वाटेकरी पण जिथे देवे हे प्रयत्नांनी अमृत मिळवू पाहतात तिथे राक्षस नुसतेच इर्ष्येने व हिंसक वृत्तीने विरोध करतात्.स्पर्धा, मत्सर, सूड, हिंसा आदि नकारात्मक भावनांनी पछाडलेले जीव फक्त देवांचे अमृत हिसकवू इच्छितात.
आपण राक्षसलोकात भ्रमण करत असल्याची चिन्हे-
नोकरीचे ठीकाणी अन्य सहकार्‍यांचे पाय खेचत बढती मिळवण्याचे प्रयत्न आपण करतो
आपल्याला इतरांची प्रगती बघवत नाही
भीतीचा बडगा दाखवत व्यवस्थापन करण्याकडे आपला कल असतो
आपल्याला प्रतिष्ठेचा बडेजाव करणार्‍या वस्तू वापरायला आवडते.

देवलोक - फिरता फिरता अनिता परत शांत झाली , तिला पक्ष्यांचा, मुलांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला, ती निसर्गाचा आस्वाद घेऊ शकली. ही तिची क्षणभंगुर पण आनंदी मनस्थिती देवलोकाचे प्रतिनिधीत्व करते. देवयोनीतील लोक हे पॅसिव्ह गायनवादनादि कलांचा उपभोग घेण्यात मग्न असतात. पण ही स्थिती फार काळ टिकू शकत नाही.
आपण देवलोकात भ्रमण करत असल्याची चिन्हे-
केवळ आकर्षक वाटली म्हणून सौंदर्यासक्त होऊन आपण एखादी वस्तू विकत घेतो
आपले काम(व्यवसाय)आपल्याला निरंतर आनंद देते
काम करून आपल्याला एक प्रकारची तृप्ती, आनंद मिळतो

मनुष्यलोक-मनुष्यलोकाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे सुख-दु:ख यांचे संतुलन असते. या मिश्र भावना आपल्याला अनुभवण्यास मिळतात. विवेक आणि निर्णयाचे स्वातंत्र्य आपल्याला असते. अनिता जेव्हा मैत्रिणीच्या साईटवर स्वतःची चित्रे टाकण्याचा "निर्णय" घेते तेव्हा ती मनुष्यलोकात भ्रमण करत असते.
आपण आपल्या आर्थिक व्यवहारासंबंधी मनुष्यलोकात भ्रमण करत असल्याची चिन्हे-
आपली आर्थिक स्थिती आनंद व दु:ख अशा मिश्र भावनांना जन्म देते
ना आपण सुखाने भ्रमित होतो ना दु:खाने बावरून जातो
काम आणि फावला वेळ दोहोंचा समन्वयाने उपभोग आपल्याला घेता येतो
आपले सहकार्‍यांशी मित्रत्वाचे संबंध असतात. आपल्या व्यवसायातून आपली क्षितीजे विस्तारतात
आपल्या पैशाचा विनियोग आप्त, स्नेही, समाज सार्‍यांसाठी केला जातो

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर परिचय.
मागं मी एक अध्यात्मिक पुस्तक वाचलं होतं. त्यात मनुष्य चोविस तासांत सात्त्विक, राजस, तमोगुण या चक्रातून कळत/ नकळत जात असतो. तो कधीच एका गुणात नसतो. म्हणून जाणीवपुर्वक सत्वगुण अंगिकारला पाहिजे.

>>मागं मी एक अध्यात्मिक पुस्तक वाचलं होतं. त्यात मनुष्य चोविस तासांत सात्त्विक, राजस, तमोगुण या चक्रातून कळत/ नकळत जात असतो. तो कधीच एका गुणात नसतो. >> पटण्याजोगे आहे.
माझी एक ज्योतिषी मैत्रिण आहे तिचा नक्षत्रांची ओळख सांगीतलेला, व्हिडिओ आहे - https://www.youtube.com/channel/UCIamOKg4sDUp3v0it0MHs2g
त्यात एकात ती म्हणते की अमक्या अमक्या नक्षत्रजातकांना एखादी गोष्ट ठरवली ना की ती अगदी तडीस नेणे जमते. मग त्यात धरसोड नाही. निश्चय म्हणजे निश्चय. पण ती म्हणते - हा तामसिक गुण आहे. उदा - कधीकधी कोणी प्रिय व्यक्ती स्वर्गवासी झाली की आपण त्या व्यक्तीस आवडणारे एखादे खाण्याचे जिन्नस सोडतो म्हणा. आपण आपल्या निश्चयावर ठाम रहाणे, हे तमो गुणाने जमते.
ते ऐकून मला खूप आश्चर्य वाटले कारण तोवर मी समजत होते की - तम गुण हा टाकाउच आहे.

स्वामी विवेकानंदांना राजस गुण आवडायचा. सात्त्विक मनुष्य अन्यायाला बळी पडतो म्हणून रजोगुण हवा असं त्यांना अपेक्षित होते.

>> स्वामी विवेकानंदांना राजस गुण आवडायचा. सात्त्विक मनुष्य अन्यायाला बळी पडतो म्हणून रजोगुण हवा असं त्यांना अपेक्षित होते.>> वाह!!! हे माहीतच नव्हते.

सामो जी एकदा स्वामी विवेकानंदांचे समग्र साहित्य नक्की वाचा. खूप स्फुर्ती देणारं आहे.

>>सामो जी एकदा स्वामी विवेकानंदांचे समग्र साहित्य नक्की वाचा. खूप स्फुर्ती देणारं आहे.>>नक्कीच आमच्या गावच्या ग्रंथालयात २ पुस्तके आहेत -
Awakening India
Letters of Swami Vivekanand
लवकरच घेते.

च्रप्स धन्यवाद.
>> तुमचे बाकिचे नेप्च्युन प्लुटो वगैरे माझ्या दोक्यावरुन जातात.>>
नो वरीज! नेप्चुन प्लुटो चे चाहते फार कमी आहेत कारण ज्योतिष हा फार फार कमी लोकांचा छंद असतो.

मी सात जन्मांकाचा आहे व जुलै महिन्यात जन्मलेलो आहे. बऱ्यापैकी केतूच्या अंमलाखाली आहे असे वाटते.

स्वप्नील इथे येउन आपल्याला १ आठवडा आणि १ च दिवस झाला आहे. आपण वाचनमात्र होता काय? नसल्यास, आपल्याला माहीत नसेल, परंतु इथे ज्योतिष ग्रुप आहे. तिथे या प्रश्नाचे उत्तर मिळू शकेलसे वाटते.

रोचक!
पण तू खूप कमी कालावधीत खूप जास्त लेख टाकलेत. सगळे वाचता आले नाहीत. आठवड्याला एक लेख टाकला असता तर बरं झालं असतं...

दिवसाला कमीत कमी एक लेख टाकाच. खूप छान लिहिता आहात. इथल्या शिळ्या लेखकांपेक्षा खूप वेगळं वाचायला मिळते आहे. धन्यवाद.

कालचक्र हे समाजातल्या संसारी लोकांसाठी आहे. माया मोक्ष लोभ वगैरे सर्व स्थितीतून जाणे निसर्गनियमाने सर्व प्राणी मात्रांकडून अपेक्षित आहे. म्हणजे ते सृष्टीनियमांत बसते. धार्मिक सल्ला देणारे सन्यासी लोक उगाचच हे वाईट ते वाईट हा उपदेश देतात पण त्यांचेही जीवन संसारी लोकांवरच अवलंबून असते हे विसरतात.
(माझे मत आहे.)
पुस्तक परिचय संपूर्णच थोडक्यात करून दिला आहे.

थोडक्यात म्हणजे आण्ना नाईक, नेने वकील, रघु काका, दत्ता गणेश , चोंगट्या, माधव , पांडू, आर्चिस, पाटणकरा असा हा प्रवास आहे जीवनाचा.