पाहुणचार

Submitted by वाट्टेल ते on 9 November, 2017 - 14:54

अतिथी ही कल्पना भारतीय संस्कृतीतून उगम पावली आहे असे म्हणतात. ज्याला तिथी नाही, जो कधीही दत्त म्हणून उभा राहतो तो अतिथी. बदलत्या जीवनशैलीत किरकोळ अपवाद, जसे अधेमध्ये माझ्याकडे अंडी मागायला येणारी माझी गोरी शेजारीण वगळता, अतिथी असे कोणी उरले नाहिये. माणूस जन्माला येण्याची तिथीसुद्धा आता बऱ्यापैकी निश्चित करता येते. आमच्या माहितीतील एका डॉक्टरिणीला हे वेळेचे तंत्र अचूक अवगत आहे. दिवस भरून टेकीस आलेल्या बाईला ती रात्री १२ च्या सुमारास हॉस्पिटलमध्ये यायला सांगते. Epidural वगैरे सगळे सोपस्कार पार पडून बाईची प्रसूत होण्याची आणि या डॉक्टरिणीचा सकाळचा नाश्ता, आन्हिके वगैरे आटपून कामाला जाण्याची वेळ अचूक साधते. त्यामुळे डॉक्टरिणीचे वेळापत्रक अगदी ९ ते ५ ऑफिससारखे. वेळीअवेळी किंवा शनिवारी - रविवारी delivery करायला जाण्याची दगदग नाही. पेशंटना गैरसोय झाली तरी नऊ महिन्यांचे हे ओझे कधी एकदा उतरते असे त्यांना झाले असल्याने रात्री १२ वाजता हॉस्पिटलला जाणे, त्यानंतरचे सोपस्कार करता करता रात्रीच्या झोपेचे खोबरे होणे, delivery च्या आधीच थकणे वगैरे गोष्टींचे त्यांना काही वाटत नाही. एकेकाळी देवाच्या इच्छेच्या वगैरे अधीन असणारी गोष्ट अशा प्रकारे या डॉक्टरिणीच्या दिनक्रमाच्या अधीन झाली आहे. जन्म वगळता मृत्यू ही अजून एक गोष्ट त्यातल्या त्यात म्हणावी तर अतिथीसारखी, म्हणजे अगदीच अवेळी, न बोलावता येणारी. पण मरणारे तुम्ही स्वत: नसाल तर त्यात सुद्धा थोडे पुढे पाठी करता येते. झाले असे, आमच्या ओळखीतले एक आजोबा भारतात मागच्या क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलच्या मुहूर्तावर वारले. आजारी आणि वयस्कर असल्याने फारसे अनपेक्षित नव्हते, आजी स्वत: 'त्यांचे सोने झाले' म्हणाल्या आणि विकेट गेली काय हे बघायला गेल्या. मॅच भलत्या रंगात आलेली, आजोबासुद्धा क्रिकेटवेडे तेव्हा भारत जिंकतो का हरतो या प्रत्येक क्षणाचे ओझे असह्य होऊनच बहुदा वारले. शेवटच्या ७-८ overs रहिलेल्या. त्या क्षणी कुणालाही फोन करावा तरी अडचण. सर्वांना ताबडतोब कळवले तरी लोक मॅच संपण्याआधी निघण्याची शक्यता कमीच. अशावेळी सर्वांना रिक्षा वाहन मिळणेही अशक्यच. घरच्यांनी विचार केला, झालेली गोष्ट घडून गेली. तेव्हा मॅच पार पडेपर्यंत थांबलेले बरे. दुसरे काही करायला नाही म्हणून स्वत:ही मॅच बघत बसले. पुढे भारत जिंकल्याने जो तो आपल्या घरी जल्लोष करत असताना हे कळवून आनंदात विरजण टाकणे त्यांना औचित्याचे वाटले नाही आणि रात्र फार झालेली. तेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सगळ्यांस कळवले. सगळे जमले, सुरुवातीचा धक्का ओसरल्यावर आणि स्मशानातसुद्धा लोकांना कालची मॅच हा बोलायला चांगला विषय मिळाला. दहाव्याला गुपचूप थोडीशी champagne पिंडावर शिंपडली आणि कावळा पिंडाला शिवला. म्हातारा काहीतरी चांगले खाऊन आणि पिऊन स्वर्गात गेला याचे सर्वांना समाधानही वाटले. अशा प्रकारे अतिथी म्हणून आलेल्या यमाला सर्वांच्या सोयीच्या वेळेपर्यंत ताटकळावे लागले.

सुरुवातीला हे जरासे विषयांतर झाले पण सांगण्याचा मुद्दा असा की अतिथी हा प्रकार आताशा भारतातही कमीच उरलाय आणि अमेरिकत जवळ जवळ नाहीच. येणारे बहुतेकजण वार, वेळ कळवून येतात. अर्थात येण्याच्या वेळेला, डॉक्टरच्या अपॉइंटमेंट सारखाच फारसा अर्थ नसतो. संध्याकाळी येतो या वाक्यामध्ये ५ ते ९ पर्यंत कोणतीही वेळ अंतर्भूत असू शकते. दुपारी जेवायला येतो म्हणजे ११ ते ३ मध्ये कधीतरी येतो हे असते. निश्चित कोणत्या वेळी पाहुणे हजर होणार यात एक अनिश्चितता असल्याने या 'अवेळी' येणाऱ्या पाहुण्यांना अतिथी म्हणायला हरकत नसावी. अर्थात अतिथी स्वतः होऊन आला किंवा बोलावण्यावरून आला तरी त्या संदर्भात यजमानाने करण्याची एक आवश्यक गोष्ट म्हणजे पाहुणचार.
या ओढवून घेतलेलया पाहुणचाराची सुरुवात अशी होते की यजमान काहीही कारण नसताना असेच ७ ८ १० कुटुंबांना गोळा करून जेवायला बोलावतात. या वेळी कोणाकोणाला जेवायला बोलवायचे याचा निर्णय बहुदा पाहुण्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढून करण्यात येतो. कॉम्पुटर मधील उत्साही मंडळी यासाठी random number generation नावाचे app वापरतात. त्यामुळे नेहमीच्या बैठकीतले पासून एकही कुटुंब ओळखीचे नाही अशा कोणत्याही ठिकाणी तुम्ही जाण्याची शक्यता निर्माण होते. काही नेहमीचे यशस्वी पार्टी कलाकार उर्फ पाहुणे हटकून सर्व ठिकाणी बारमाही केळ्यांप्रमाणे असतात. काही seasonal आंबे काही ठराविक ठिकाणीच सापडतात. या random selection मुळे क्वचित काही विळ्या आणि भोपळे एकत्र आढळतात. या सर्व धामधुमीत उन्हाळ्यात तळलेले आणि मसालेदार पदार्थ करावेत का, बोंबील आणि श्रीखंड एकत्र चालेल का वगैरे प्रश्न गौण असतात. ४-५ स्टार्टर, २ कोशिम्बिरी, ४ भाज्या, लोणची ,पापड ते तोंडात विरघळणाऱ्या पोळ्या, भात आणि किमान २ गोडाचे पदार्थ वगैरे भरभक्कम जेवण आणि “काही केलं नाहीये किंवा अगदी साधं केलंय “ हे एक अत्युच्य दर्जाचे वैश्विक असत्य पाहुण्यावर फेकण्यास यजमान सिद्ध होत असतो. या पाहुणचाराच्या सिद्धतेसाठी अगदीच कारण नाही असेही म्हणायचे कारण नाही कारण याला पुढील कारणे असू शकतात:
१. आपण अनेक ठिकाणी पुख्खा झोडून आल्यावर रिटर्न केले नाही तर वाळीत पडण्याची शक्यता निर्माण होणे
२. स्वतः:ची मिरवायची आणि कौतुक करून घ्यायची हौस पुरवणे
३. वेळ घालवयाचे साधन
४. खूप दिवसात ( म्हणजे सुमारे २ ते ९०) भेटलो नाही
५. घर आवरायला निमित्त
६. खूप स्वंयपाक करण्याची हुक्की
७. पूजा, वाढदिवस, सण, केळवण वगैरे नैमित्तिक.
थोडक्यात कारणांची कमी नाही. एकदा सगळे ठरले की मेनू ठरवणे, सर्व तयारी करून ठेवणे वगैरे गोष्टी युद्धपातळीवर पार पडल्या जातात. परीक्षेत सोपे आणि आपल्याला चांगले येतात ते प्रश्न सर्वांत आधी सोडवले जातात त्याप्रमाणे मेनू मधले आपले हुकुमी एक्के यजमानीण बाई तयार ठेवते. सर्व पूर्वतयारीत नवरा नामक प्राणी बाहेरून पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षासारखा असतो म्हणजे असून अडचण नसून खोळंबा. मेनू आणि quantity ठरवण्यात नवऱ्याचा सर्व पवित्रा, जेवण उरल्यास ते किती दिवस आपल्याला खावे लागणार आहे या एकाच सावध दिशेने चाललेला असतो. ”कोणत्या मुहूर्तावर हा घाट घातला” असे यजमान बाईच्या मनात येण्याचा आणि पहिल्या पाहुण्यांचे आगमन होण्याचा मुहूर्त साधारण एकच असतो.
बेल वाजते आणि पाहुणे येऊ लागतात. काही यजमानांचे आल्या आल्या सुरु होते - पाणी आणू? juice आणू? चहा घेणार? अमका तमका पदार्थ घेणार? तोवर जेमतेम पाहुण्यांच्या चपला काढून झालेल्या असतात. प्रश्नांच्या सरबत्तीने पाहुणे गारद होता होता जवळच्या सोफ्यावर टेकतात. इतका वेळ प्रश्नांनी गारद करणाऱ्या यजमान बाई किचनमध्ये सटकतात. सर्व स्वैपाक तयार असतो, आवरूनही झालेले असते तरी किचनमध्ये काही न काही दुष्काळी कामे काढून तिथून त्या काही बाहेर पडत नाहीत. स्त्रियांचे वजन वाढण्याचे एक मुख्य कारण म्हणजे त्यांचा घरातला ७०% वेळ किचनमध्ये जातो, त्यातला ३०% वेळ फ्रीज उघडणे आणि बंद करण्यात जातो. प्रत्येक वेळी फ्रीज उघडल्यावर आतल्या वस्तूंची चव आहे तशीच आहे याची खात्री करण्यासाठी सर्व चाखून बघावे लागते, असे करता करता वजन वाढते. आलेल्या पाहुण्या स्त्रीला तिच्या किचनचा विरह व्याकूळ करत असल्याने ती यजमानांच्या किचनमध्ये घुसते. गेल्या वेळी आलो होतो त्यापेक्षा आता काय काय बदल आहेत याचा कानोसा घेणे चालू असते. सासूही बघणार नाही इतक्या तीक्ष्ण नजरेने ती ते kitchen आणि यजमान बाईला बघत असते. घरात कितीही जागा असली तरी दाटीवाटीने island च्या आसपासच सर्व गर्दी जमते.
एकेक करत सगळे पाहुणे जमतात. सर्व समानतेच्या काळात सौदी अरेबियामध्ये वगैरे आल्याचे वाटावे याप्रमाणे एका खोलीत पुरुष आणि दुसऱ्यात बायका हा भेद कटाक्षाने पाळला जातो. एकीकडे रिपब्लिकन, डेमोक्रॅटिक, अर्थव्यवस्था, फुटबॉल, टॅक्स, इन्शुरन्स कंपन्यांची चलाखी, टेक्नॉलॉजी वगैरे वगैरे. दुसरीकडे साड्या, दागिने, खादाडी, सेल, कुपन, मुले, शाळा आणि स्थानिक hot topics. वर्षानुवर्षे यात काही फरक पडत नाही. सगळे जमले की यजमानीण starters या नावाने अगणित गोष्टी खायला आणतात. Starters या नावाने, जेवण आहे का किंवा हेच जेवण असावे असा संभ्रम निर्माण करणारे हे never ending पदार्थ असतात. बहुतेक यजमान, पाहुण्यांसाठी बकासुराचा आहार हे प्रमाण धरतात. पदार्थ रुचकर करण्याबरोबरच तो पौष्टिक, कालानुरूप आणि योग्य त्याच प्रमाणात करणे हा सुगरण असण्याचा दाखला आता कालबाह्य झाला आहे. तसेच फ्रीजमधून काढलेले पदार्थ मायक्रोवेव्ह, अवन किंवा स्टोव्हवर गरम केले की ते ताजे होतात असे समजण्याची प्रथा रूढ झाली आहे. भारतात लोक जेवायला बोलावतात आणि सगळे बाहेरून आणतात यावरून त्यांना तुच्छ लेखले जाते. भारतातून काही काळाकरता आलेले लोक, इथे रोजच शिळासप्तमी साजरी होते म्हणून नाक मुरडतात. साधारण हाता -पायाच्या बोटांवर मोजता येतील त्यापेक्षा जास्त पदार्थ जेवणात असणे गरजेचे आहे. त्यामुळे सगळे पदार्थ जरा जरा चाखून बघेपर्यंत जेवण संपते. एकवेळ गणपतीला मोदक नसले तरी चालतील पण पाहुणे आले की टोमॅटो कांद्याच्या चिखलात अगम्य मसाले, क्रीम, पनीर आणि असतील-नसतील त्या भाज्या असा एखादा पदार्थ असणे अनिवार्य आहे. पाहुणे ताटात जागा सापडेल तसे पदार्थ घेतात आणि शांतपणे जेवायला बसतात तितक्यात, कोशिंबीर वाढू? पनीर वाढू ? पोळी वाढू? ची सरबत्ती सुरु होते. घेतलेला पहिला घासच घशात अडकतो. असेच एके ठिकाणी जेवायला गेलो होतो. सर्व खाऊन झाल्याने ताट रिकामे होत आलेले यजमान बाईला बघवले नाही. तिचे सुरु झाले. मी काही घेत नाही म्हटल्यावर 'थोडी बटाट्याची भाजी तरी घे' असे म्हणत चपळाईने तिने भाजीचा डोंगर माझ्या ताटात रचला. वर आमच्याकडे बटाटा कुणी खात नाही हे ऐकवले. म्हणजे थोडे दिवस फ्रीजमध्ये काढून ट्रॅशची भर करण्याऐवजी माझ्या ताटात ढकलून आजच भाजीची विल्हेवाट तिने तिच्या पद्धतीने लाऊन टाकली. खाल्ल्या अन्नाला जागावे म्हणून मग मी दुष्काळातून आल्याप्रमाणे भासवत ती भाजी माझ्या पोटात ढकलली. बटाट्यात starch फार म्हणून हल्ली बटाट्याच्या भाजीची जागा, protein म्हणून खपवायला सोपे असणाऱ्या उसळीनी घेतली आहे. एकदा ५० माणसांची उसळ केली की २-३ वेळा उसळ, मग ४ -५ वेळा मिसळ, मग पीठ मिसळून मुलांना पराठे, pattice या प्रकारे ५-६ महिने ती पुरते. पदार्थ करताना असंख्य वेळा खाल्लेला असतो आणि पुढचा आठवडा त्याच जेवणावर काढण्याचा बेतही पक्का असतो त्यामुळे या जेवणाच्या वेळी यजमान बाईने जेवण्याची पद्धत साधारण नसते. जेवण झाल्यावर तोंडात पाणी घेण्याइतकीपण जागा शिल्लक नसल्याने चूळ भरण्याची सक्ती आणि सोयही पाहुण्यांना नसते.

पाहुणे येताना बहुतेक वेळा काहीतरी भेटवस्तू आणतात. त्या निमित्ताने त्यांच्या गराजमधली अडचण जरा कमी होऊन आपल्या ठिकाणी वाढते. काही बिनडोक बायका ( अत्यंत दुर्मिळ असणारा प्रकार आहे हा ) मुळात ती वस्तू आपल्याला जिथून मिळाली त्यांच्याकडेच परत घेऊन जातात, फक्त नवीन पिशवीतून. पण बहुतेक सर्व बायका, ती गोष्ट आपल्याला कोणी दिली याची नोंद ठेवतात आणि इतकेच नाही तर ती दुसऱ्याला देताना, यजमान आणि आपण अशा दोघांना ओळखणाऱ्या घरातून ती भेट आपल्याकडे आली नाहीये याची खात्री झाल्यावरच ती पुढे सरकवतात. जाता जाता माहितीकरता म्हणून - पुण्यात अशा पुढे pass on करता येण्याजोग्या गोष्टींचेच एक दुकानसुद्धा आहे.

आता बहुतेक सर्व जीव जेवून तंडावलेले असतात पण शांत बसण्याची सोय नसते. कारण यजमानाने बेतलेल्या खेळांत, कार्यक्रमात भाग घेऊन खाल्ल्या मीठाला जागावेच लागते. त्यात, काही विमाने आल्यापासून पोटात इंधने भरत असतात ती उडण्यायोग्य होऊन भराऱ्या घेऊ लागलेली असतात. पार्टीत मुले असतील तर घराच्या त्या भागात एखादा भूकंप येऊन गेल्याच्या खुणा एव्हाना दिसू लागलेल्या असतात. प्रत्येकाच्या हातात आपापले स्मार्ट उपकरण जोवर काही विघन न येता चालू असते तोवर सर्व काही आलबेल असते. पार्टीच्या वेळी मुलांनी फार दंगामस्ती न करता, आपापल्या उपकरणाशी न खेळता एकमेकांशी खेळावे, तुम्हाला मध्ये मध्ये येऊन त्रास देऊ नये आणि शक्यतो आपले आपण लवकर झोपावे (आणि दुसऱ्या दिवशी सावकाश उठावे) अशी तुमची अशक्य कोटीतील अवास्तव अपेक्षा असेल तर….तर काही नाही आता त्याला फार फार उशीर झालाय. You know you have already missed that bus. आता फक्त मुले शिक्षण-नोकरीसाठी घराबाहेर पडण्याची वाट बघत बसणे तुमच्या हाती आहे.
मध्ये मध्ये सतत फोनवर फोटो काढणे, whatsapp वरचे आधीच माहित असलेले विनोद एकमेकांना सांगणे, काहीतरी conspiracy theory चा धुरळा उडवून देणे, रेसिपी, शाळा, लोकांची लफडी, अध्यात्म, शेअर्स, डिल्स, स्वतःच्या व्यस्त आयुष्याचे तुणतुणे, मुलांची भांडणे सोडवणे वगैरे आगा ना पिछा अशा पीचवर एकाच वेळी सर्वजण बॅटिंग करत राहतात.
पार्टी चालू राहते. यजमान विमानांना इंधन आणि इतरांना साखरेचा पुरवठा करीत राहतो. जरा सर्व शांत होत असते तर ते सुखासुखी बघता न येण्याऱ्या काही बायका यजमानिणीची दया येऊन अचानक किचन आवरायला उठतात. मग सर्वानाच नाईलाजाने उठावे लागते. सर्वांच्या एकत्रित वावरामुळे किचनमध्ये पुन्हा एकदा वादळ येते. पार्टीच्या आधीचे किचनमधले वादळ बाईने नवऱ्याला हाताशी घेऊन कसेबसे सावरलेले असते ते तिच्या हाताबाहेर जाते. यजमानीण बाईला भीक नको पण कुत्रा यावर या म्हणीचा पुरेपूर अनुभव येतो. आपल्या घरात भांडी धुण्याचे काम रोज नवऱ्याचेच असते असे बिनदिक्कत खोटे बोलण्याचा हाच तो क्षण. त्या निमित्ताने कधी नव्हे ते २ कौतुकाचे बोल या गृहकृत्यदक्ष नवऱ्याच्या कानी पडतात. या note वर पाहुणचार संपणे गरजेचे असते, नवऱ्याचा मूड चांगला आहे तोवर अजून बरीच कामे बाईला त्याच्याकरवी उरकून घ्यायची असतात.

लोक पांगतात, काही बायका नेहमीप्रमाणे “चालते पुढे सरते फिरते” मोड मध्ये असतात. हा उभा खो खो टाळण्यासाठी त्यांचे हुशार नवरे बायका गाडीत बसल्याशिवाय जागचे हलतसुद्धा नाहीत. काही नवरे सर्व ओझी गाडीत घालून शेवटच्या ओझ्याची वाट बघत असतात. शेवटी एकदाचे सर्व अतिथी तृप्त होऊन आपापल्या घरचा रस्ता धरतात. नंतर आयुष्यात या एकाच वेळी एकमेकांना अति प्रश्न ना करता नवरा बायको एकदिलाने काम करून घर पूर्वपदावर आणतात. ते करता करता पार्टीत चघळलेल्या गोष्टी व एकूण पाहुणचाराचा पंचनामा केला जातो. Light बंद करून झोपण्यापूवी यजमानीण पाहुणचाराची पोचपावती घेण्यासाठी एकवार Whatsapp वर सगळे फोटो बघते, thanks ची देवाण घेवाण होते आणि मगच पार्टीची खरीखुरी सांगता होते.
आठवडा नेहमीप्रमाणे चालू होतो, वीकेंडचा कानोसा घेतला जातो. यजमान, बाकीचे भिडू, जागा, कारणे, खाणे, पिणे ,चर्चेचे विषय, खेळ, activity पुन्हा एकदा ठरवले जाते - पाहुणचाराचा खेळ अव्याहतपणे चालू ठेवण्यासाठी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाहुणे ताटात जागा सापडेल तसे पदार्थ घेतात आणि शांतपणे जेवायला बसतात तितक्यात, कोशिंबीर वाढू? पनीर वाढू ? पोळी वाढू? ची सरबत्ती सुरु होते. >>> हे सोडुन बाकी बरचस रिलेट झाल, इथे कुणिही आग्रह करत नाहित.

Biggrin मस्त खुसखुशीत लिहिले आहे. मजा आली वाचायला. मला पण वेगवेगळ्या पॉटलक मेनुची (नकोशी) आठवण झाली Proud

मै आणि सुमुक्ताला अनुमोदन. धा कुटुंब जमा करून त्यांना पोळी-भाजी केंद्र किंवा वडा-पाव सेंटरला पार्टीसाठी नेलं तर गम्मत येइल Biggrin

बापरे मेनु बघुन कॉम्प्लेक्स आला. आमच्याकडे असा मेनु फक्त पॉट लक मधेच असतो. अशी पाहुन्चाराची पार्टी दर आठवड्याला परवडणार नाही... पण समर मधे एक /दोन बार्बेक्युज, दिवाळी दरम्यान एक जी टोटली भारतीय पद्धतीने, हॉलीडे सिझन मधे एक आणि ४/५ वेळा काही निमित्त्य काढुन अश्या पार्ट्या होत असतात आमच्या सर्कल मधे...

टोमॅटो कांद्याच्या चिखलात अगम्य मसाले, क्रीम, पनीर आणि असतील-नसतील त्या भाज्या असा एखादा पदार्थ असणे अनिवार्य आहे.>>>>> Lol

Lol
अगदी अगदी!!!
उरलेल्या पदार्थांचे टेक अवे करतात त्याबद्दलही लिहायला पाहिजे Lol

गेली अनेक वर्षे मी स्टार्टर्स करणे बंद केले आहे! त्याच दिवशी शांत चित्ताने बनवलेले साधे सकस अन्न लोकांना खाऊ घालते. 5 ते 30 कितीही लोकं असले तरी स्वयंपाक ताजाच असतो. अपवाद फक्त गोड पदार्थाचा. तो आदल्या दिवशी बनवून ठेवते. पनीर यंव टँव अजिबात करत नाही.
हल्ली आमच्या जवळच्या कॉल्समध्ये ताज्या गरम गरम पोळ्या मिळतात त्यामुळे तर अशा जेवणावळी घालणे फार सोपे जाते.
सुरुवातीला असा साग्रसंगीत स्वयंपाक, पार्ट्या यांची मजा वाटली पण तेच तेच व्हायला लागल्यावर आवरत घेतलं.
आपण अनेक ठिकाणी पुख्खा झोडून आल्यावर रिटर्न केले नाही तर वाळीत पडण्याची शक्यता निर्माण होणे >>>>>>अश्या पार्टिचे आमंत्रण आले तर आम्ही 'पेरलेले जेवण उगवले' असे म्हणतो Wink

बापरे
अतिशयोक्ती असला तरी लेख मस्त आहे.बराचसा पटला.
'काही केले नाहीय' मध्ये अतिशय हेवी पदार्थ हे तर अगदी अगदी!!

Pages