माझ्या वाईट सवयी ५ - मारामारी

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 January, 2016 - 12:17

चोरी, जुगार, शिवीगाळ .. या वाईट सवयींच्या गटात बसणारा शब्द म्हटले की पटकन आठवावा असा शब्द, मारामारी!

हक्कासाठी जी करावीच लागते ती मारामारी! रोजच्या जगण्यासाठी जी करावी लागते ती मारामारी!
माझ्या आयुष्यातील पहिली मारामारी, जी मी वयाच्या ५व्या वर्षी केली.
बस्स ही मारामारीच माझी वाईट सवय क्रमांक ५ आहे.

म्हटलं तर ९० टक्के मुलांनी जी आपल्या लहानपणी कधीतरी केलीच असते, ४० टक्के मस्तीखोर मुलांनी बरेचदा केली असते, तर १० टक्के मुले यासाठीच प्रसिद्ध असतात.
मी या दहा टक्क्यांच्याही आत कुठेतरी होतो.
डोके, रक्त, हात. सारे काही चटकन गरम व्हायचे. कोणालातरी ठेवून दिल्याशिवाय आयुष्यातील कुठलाच प्रॉब्लेम सुटू शकत नाही हा विश्वास. मग जिथे प्रॉब्लेम तिथे मारामारी.

तर पहिली मारामारी. पहिले शैक्षणिक वर्ष. ईयत्ता ज्युनिअर केजी. बालवाडी.

त्या वयात शत्रू आपला कोणीच नसतो. असतात ते सारे मित्रच. बालमित्र, वर्गमित्र. अश्याच एका वर्गमित्राने कसल्याश्या कारणाने माझे डोके फिरवले असावे, जे मी त्याचे डोके फिरवत बाकावर आपटले. तपशीलवार आता फारसे आठवून सांगता येणार नाही, पण पहिल्याच मारामारीत समोरच्याच्या डोक्यातून रक्त काढले होते एवढे मात्र आठवते. कायद्याच्या भाषेत सांगायचे झाल्यास, हाल्फ मर्डर.

पुढे रीतसर मला शिक्षा झाली. बाईंनी दुपारी जेवणाचा डबा खाऊ दिला नाही. संध्याकाळपर्यंत मला उपाशी ठेवले गेले. दुसर्‍या दिवशी माझ्या पालकांना बोलावले. त्या पोराचे पालक तर त्याचे डोके फुटल्याफुटल्याच हजेरी लाऊन गेले. मलाही कदाचित त्यांनी खुन्नस दिली असावी. पण मी त्याला जुमानणारा नव्हतो. कारण आपले आईबाप वगळता ईतरांच्या आईबापाला घाबरायचे कारण नाही, कारण आपण त्यांचे खात नाही, या असल्या समजा मला बरेच लहान वयात आलेल्या. पण माझ्या घरी मात्र मार पडायचा. मी एकुलता एक दिवटा असल्याने जरा कमी पडायचा, पण पडायचा. त्यामुळे एक मर्यादीत कोडगेपणा अंगी आला होता. जो पुढच्या मारामारीच्या वेळी कामी यायचा.

पुढे अश्याच काही मारामार्‍या करत आणि पालकसभेला आपल्या पालकांना लाजवायला लावत माझी शैक्षणिक कारकिर्द सुरू झाली. तब्येतीने मी यथातथाच होतो, किंबहुना आज मला पाहिले तर एकेकाळी मी असला डेंजर होतो हे कोणाला शपथेवर सांगूनही विश्वास बसू नये. पण पहिल्यापासूनच तयार झालेली एक इमेज आणि दुसरे म्हणजे ती जपण्यासाठी अंगी असलेली डेअरींग, या दोन गोष्टी कामी यायच्या. मूळ स्वभाव शीघ्रकोपी, ज्यावर सध्या नियंत्रण मिळवायचे यशस्वी प्रयत्न चालू आहेत, मात्र तेव्हा यालाच हत्यार बनवून वापरत असल्याने या स्वभावाला आणखी खतपाणी घालायचो. चारचौघांमध्ये बोलीबच्चन बनत वावरायचो. कराटे वगैरे येतात म्हणत ज्याला कराटेचा ‘क’ देखील माहीत नाही त्याच्या खांद्यावर एखादा र्रपटा कच्चकन मारायचो. पण प्रत्यक्षात पाचवीनंतर जेव्हा माझ्या लक्षात आले की निव्वळ हातापायी करून आपण एखाद्याला लोळवू शकत नाही तेव्हा मी कंपास, करकटक, वॉटरबॅग जे पहिला हाताला लागेल त्याने मारामारी करायला सुरुवात केली. म्हटले तर या वस्तू सर्वांकडेच असतात, पण म्हणतात ना, एखाद्यावर त्या उगारायला जी जिगर लागते ती सर्वांकडे नसते. याऊपर मारामारीत माझा एक स्वत:चाच बनवलेला उसूल होता. जो पहिला हात उचलतो तो सरस. त्यामुळे आजवर कुठली अशी मारामारी झाली नाही ज्यात समोरच्याने सुरुवात केली आहे. सर्वांचा श्रीगणेशा माझ्याच हस्ते झाला आहे. त्यामुळे समोरचा हुज्जत घालतानाही वचकून राहायचा.

मग काय, एक सिंपल फंडा असतो. ज्याला चार चौघे वचकून असतात त्याची दहाबारा जणांची गॅंग बनते आणि मग आणखी चाळीस पोरे दचकून राहतात. तशी माझी काही गॅंग वगैरे नव्हती, पण ज्यांची होती ते देखील मला इज्जत द्यायचे. कारण काही अफवा माझ्या नावावर उठल्या होत्या. माझे एक दूरचे काका होते. ज्या कंपनीत ते कामाला होते तेथील ते युनियन लीडर होते. पक्के राडेबाज होते. सोबत हत्यार बाळगायचे. प्रत्यक्षात माझी भेट त्यांच्याशी कधीतरीच व्हायची. ते देखील माझी नाही तर माझ्या वडीलांचीच व्हायची. पण माझ्याशी पंगा म्हणजे रुनम्याचे काका नंगी गुप्ती नाचवत आपल्या घरी येतील आणि आपले साधेसरळ पांढरपेशे बाबा देखील आपल्याला वाचवू शकणार नाही असे काही पोरांचे समज झाले होते. तसेच माझ्या आधीच्या भागांमध्ये उल्लेखलेल्या वाईट सवयी - चोरी, जुगार, शिवीगाळ पाहता मी एक पुरेसा वाह्यात इमेज असलेला मुलगा होतो हे वेगळे सांगायला नको. तर या सर्वांचा एकत्रित परीणाम म्हणून माझी ‘चालायची’..

तर आता काही आठवणीतले किस्से बघूया, सर्वच छोट्यामोठ्या मारामार्‍या आणि धटिंगगिरी सांगत नाही पण मजेशीर तेवढे ऐकूया.

शाळेतील घटना - ज्या घटनेने ‘हा रुनम्या लय डेंजर आहे’ अशी माझी इमेज बनवली तिथून सुरुवात करूया.
पहिली ते चौथी जेमतेम हुशारी दाखवत हुशार मुलांच्या ‘अ’ तुकडीत जागा मिळवून होतो. चौथीला अभ्यास कमी आणि मस्ती जास्त झाली तसे पाचवीला ‘ब’ तुकडीत घसरण झाली. वर्ग बदलला तसे बरेचसे वर्गमित्र बदलले. आम्हीही टवाळ होतो, ते देखील टवाळ होते. पण अजून त्यांच्यात मी तितकासा मिसळलो नव्हतो. काही जुने मित्र जे माझ्यासारखे ‘चौथी अ’ मधून ‘पाचवी ब’ मध्ये घसरून आलेले त्यांनाच पकडून राहायचो. अश्यातच एक फारशी ओळखपाळख नसलेला कार्टा माझ्या नादाला लागला.

सकाळी नेहमीच्या वेळेस शाळा भरली. पण वर्गशिक्षिका बाई अजून आल्या नव्हत्या. लाऊडस्पीकरवर प्रार्थनेला सुरुवात झाली आणि सारे जण उभे राहिले. तो माझ्या मागच्या बाकावर होता. प्रार्थना संपल्यावर बसायच्या आधी त्याने कंपासपेटी उभी करत माझ्या बाकावर ठेवली. मी खाली बसलो तसे गचकन नाजूक जागी घुसली आणि थोडासा कळवळतच मी जमिनीवर आडवा झालो. आजूबाजुचे चारचौघे हसायला लागले. हा मानसिक आघात शारीरीक जखमेपेक्षा जास्तीचा वाटला. कारण ते हसणारे दात माझ्या मित्रांचे नव्हते. सगळ्यांचे थोबाड एकाच फटक्यात फोडून टाकावेसे वाटले पण ते शक्य नव्हते. मग काय, सारा राग त्या कंपासपेटी ठेवणार्‍यावर निघाला. अंगापिंडाने तो माझ्यापेक्षा मजबूत होता, पण हा विचार करायच्या मनस्थितीत मी नव्हतो. त्याची कंपासपेटी तोडून टाकायच्या उद्देशाने मी धाडकन बाकावर आदळली, तसे त्यातील सारे अवजार खळकन बाहेर आले. पुढे तो चिडून माझ्या अंगावर आला तसे त्यातील करकटक उचलून ते सप्पकन त्याच्या दिशेने फिरवले. त्यात त्याचा बचावासाठी पुढे आलेला हात शहीद झाला. त्याच्या तळहातापासून मनगटाच्या कोपरापर्यंत उमटलेली लाल लकेर ‘ऋन्मेषरेषा’ बनत माझ्या नावाची कायमस्वरुपी दहशत पसरवण्यास पुरेशी ठरली. मला ती रेषा त्यापुढे कधी ओलांडण्याची गरज पडली नाही. करकटक हातात घेणे किंवा हवेत फिरवणे पुरेसे ठरू लागले.

"एवरी अ‍ॅकशन इज इक्वल अ‍ॅन्ड ओपोजिट रिअ‍ॅक्शन" या न्यूटनच्या नियमाला मी तिथपासून (त्यातील ‘इक्वल’ या शब्दाला फाट्यावर मारत) पाळू लागलो. ‘तुम एक मारोगे, तो हम चार मारेंगे’ वगैरे फिल्मी डायलॉग ऐकायच्या आधीपासून मी असे करायला लागलो हे विशेष.

आता असाच एक बिल्डींगमधील किस्सा ऐकूया. तिथल्या पोरांमध्ये ‘रुनम्या म्हणजे राडा झाला की मागे पुढे न बघणारा’ हा समज केव्हा रूढ झाला हे बघूया.

बिल्डींगमधील सारीच पोरे तशी अतरंग होती. आपापसात आमच्या खूप मारामार्‍या चालायच्या, पण कोणी कोणाच्या घरी तक्रार घेऊन जायचे नाही हे तत्व कसोशीने पाळले जायचे. ज्याच्यात ताकद जास्त तो समोरच्याला मारायचा, ज्याच्यात धटींगपणा जास्त तो हूल द्यायचा. पण डेअरींग प्रत्येकाची तेव्हा पाण्याबाहेर आली जेव्हा बिल्डींग बाहेरच्या पोरांशी लफडा झाला.

खुल्या मैदानावर क्रिकेटचा सामना चालू होता. हा योग तेव्हा क्वचितच यायचा अन्यथा बरेचसे क्रिकेट गल्लीतच खेळले जायचे. तर आम्हा सर्वांची वयवर्षे १० ते १४ च्या दरम्यान असावीत, समोरच्या टीममधील मुलांचाही तोच वयोगट असावा, आणि माझे वय असावे साधारण बारा. फरक ईतकाच की समोरची मुले फुल्ल टू झोपडपट्टीछाप होती. मॅच घेण्याअगोदर आम्हाला याची कल्पना नव्हती, अन्यथा घेतलीच नसती. आधी त्यांची आपापसात शिवीगाळ, मग खेळताना आमच्याशी नियमांवरून चिडाचीड, अर्वाच्य भाषेचा वापर, एकंदरीत आम्ही वैतागलो होतो. कुठून या मुलांशी सामना घेतला असे झाले होते. तरी जिंकत होतो म्हणून सामना सोडून जात नव्हतो. पण ते जसे हरत होते तसे त्यांचा त्रागा आणखी वाढत होता. अखेर आमच्या कर्णधाराचा संयम सुटला. जेव्हा तो फलंदाजी करत होता तेव्हा त्याची आणि त्यांच्या विकेटकीपरची बाचाबाची झाली. लगोलग त्यांच्या सर्व क्षेत्ररक्षकांनी त्याला घेरला. मी जवळच्याच टाकीवर स्कोअर लिहित बसलो होतो. तडक उडी मारून निघालो पण तिथे पोहोचेपर्यंत आमच्या कर्णधाराचे शर्ट पकडून त्याला धक्काबुक्की चालू होती. बॅट होती त्याच्या हातात, पण त्याच्यामते अजून ती वापरायची वेळ आली नव्हती. पण मी काही समझौता एक्स्प्रेस घेऊन आलो नव्हतो. उचलला स्टंप आणि फिरवला. सामना तसाही केव्हाच संपला होता.

नशीबाने कोणाचे डोके मध्ये आले नाही. पण जिथे त्यांची अक्कल होती तिथे मार बसलाच. गुडघा फुटला एकाचा. पांगापांग झाली. आम्हीही लागलीच पळ काढला. त्यांच्या हातात लागण्यात कुठलाही शहाणपणा नव्हता. काही बिल्डींगच्या दिशेने पळाले. तर काही वाट फुटेल तिथे. पळतापळता मला आयडीया सुचली. माझ्याबरोबर एकजण पळत होता, त्याला घेऊन सरळ चौकी गाठली. तेथील मामांना क्रिकेट खेळताना राडा झालाय आणि झोपडपट्टीतील काही पोरे आम्हाला मारायला आमच्या मागे लागलीत असे सांगितले. त्यांनी आम्हा दोघांना सुरक्षितपणे घरी आणून सोडले. पुढे ती पोरे बदला घ्यायला कधी आली नाहीत आणि काही दिवस आम्हीदेखील आमच्या गल्लीतच क्रिकेट खेळणे पसंद केले.

असो, किस्से बाय किस्से म्हटले तर बरेच आहेत. लेखाच्या शब्दमर्यादेत सारेच नाही सांगता येणार,

तरी शाळेत असताना जवळच्या एका कॉलेजच्या ग्रूपशी पंगा घ्यायची हिम्मत दाखवली होती. अर्थात, आम्हीच बराच मार खाल्ला होता. पण तरीही, एकहीच मारा पर सॉलिड मारा स्टाईल त्यातही माझे नाव झाले होते.

ज्युनिअर कॉलेज पहिलेच वर्ष. दोन सिनिअर स्टुडंटना त्यांच्या दुर्दैवाने नेमके माझीच रॅगिंग घ्यायची हुक्की आली. तोपर्यंत कॉलेजमध्ये माझाही ग्रूप बनला होता. संध्याकाळी कट्ट्यावर गाठले त्यांना. आधी सहज विचारपूस केली. पण त्यांच्यात सिनिअर असल्याचा माज जाणवला. मग काय, गालावर राम-लक्ष्मण-सीता उमटवले. आणि चेहर्‍याचा हनुमान केला. तसेही आपण अन्यायाविरुद्ध लढतोय असे जेव्हा माझ्या मनाला वाटायचे तेव्हा माझा आवेश भलताच असायचा.

ईंजिनीअरींग कॉलेजात असताना वॅलेंटाईन डे ला आमच्या ग्रूपमधील एक मुलगा एका जुन्या मैत्रीणीला प्रपोज करायला म्हणून दुसर्‍या कॉलेजला गेलेला. तिथे त्याची काही चुकी नसताना तिथल्या पोरांचा मार खाऊन आलेला. त्याचा बदला घ्यायला म्हणून दुसर्‍या दिवशी त्या कॉलेजच्या बाहेर आम्ही फिल्डींग लावली आणि त्या ग्रूपच्या चारचौघांना पकडून चोप दिला होता. त्यावेळी ईंजिनीअरींगच्या वर्कशॉपच्या टूल्समधील एक अवजार मी माझ्याबरोबर बाळगले होते. "जर ते संख्येने खूप जमले आणि त्यांनी आपल्याला घेरले तर मी टाकतो एकाच्या डोक्यात, ते सगळे त्याला सांभाळत बसतील आणि आपण पळ काढूया", असा प्लान मी बनवला होता. पण सुदैवाने ती वेळ आली नाही. आता विचार करता असे वाटते की आलीच असती तशी वेळ, तर नक्कीच माझ्या हातून काहीतरी अनर्थ घडला असता. कदाचित ते हत्यार आणि त्याने मारलेला फटका जीवघेणाही ठरला असता.

त्यानंतर एका थर्टीफर्स्ट नाईटला फार मोठा राडा झालेला. त्यात माझी फार महत्वाची भुमिका होती. पण ते प्रकरण दूरगावी झाले, तिथेच मिटले आणि त्याचा कुठलाही पोलिस रेकॉर्ड बनला नाही हे माझे नशीब.

पण मग शेवटची उल्लेखनीय मारामारी म्हणावी अशी तीच होती. त्यानंतर त्या मारामारीचे होऊ शकणारे परीणाम लक्षात घेता तौबा केली म्हणा, किंवा ते कॉलेजचे शेवटचे वर्ष असल्याने मस्तीचे दिवस संपले म्हणा, पण माझ्या जीवनगाथेतील युद्धाचा अध्याय तिथेच संपला!

लेखही ईथेच संपायला हवा.
पण जाता जाता अहिंसेचा धडा द्यायचा मोह आवरत नाही, जो मी स्वानुभवातून शिकलोय.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपले गरम रक्त जरी समोरच्याला जाळायला कामी येत असले, तरी त्याचे चटके आपल्यालाही सोसावे लागतात. ते देखील आयुष्यभरासाठी..
- ऋन्मेष

माझ्या आधीच्या वाईटसाईट सवयी वाचण्यासाठी खालील लिंकांवर टिचक्या मारू शकता.

माझ्या वाईट सवयी १ - चोरी http://www.maayboli.com/node/56756
माझ्या वाईट सवयी २ - जुगार http://www.maayboli.com/node/56890
माझ्या वाईट सवयी ३ - शिवीगाळ http://www.maayboli.com/node/56984
माझ्या वाईट सवयी ४ - निष्पाप जीवांची हत्या http://www.maayboli.com/node/57095

अवांतर - यावेळची शब्दखूण - लेखन मारामारी - मारतोय माझे लेखन तुमच्या माथी, झेला Happy

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा!
>>
खालील लिंकांवर टिचक्या मारू शकता.
<<
हा ऑनलाईन सत्याचे प्रयोग पब्लिश करणारे का आता? :प्रचण्ड घाबरलेला भावला:

बोलाऽ म्हात्मा ॠण्मेश कीऽऽऽऽऽऽऽ!

Cmon runmesh...maramari hi savay kashi asu shakel ..tumi ky gunda ahat ka nehmi marayla ....tas asel tar mg gundagiri theva name Lol

रीया,
आपल्यासारख्यांना लेख काल्पनिक वाटणे हे मी माझे यश समजतो
मात्र पुढे जेव्हा चांगल्या सवयींची मालिका लिहायला घेईन तेव्हा हा आरोप खपवून घेतला जाणार नाही Happy

<<मात्र पुढे जेव्हा चांगल्या सवयींची मालिका लिहायला घेईन>>
----- अशी मालिका येणार आहे... ? कित्ती छान. पुढिल लेखनास शुभेच्छा.

छान अनुभव (कल्पना) मान्डले (मान्डली) आहे....

या शृन्खलेतला शेवटचा धागा "माझ्या वाईट सवयी क्ष - मायबोलीवर थापा मारणे" असा आल्यास नवल वाटायला नको. Happy

मला असं स्ट्राँगली वाटतय की ह्या सर्व सवयी ह्या लेखकाच्या फँटसीज आहेत. प्रत्यक्षात पळपुटा, ** स्वभाव असल्याने अश्या सवयी असणार्या लोकांबद्दल ह्याला आकर्षण आहे. म्हणूनच ह्या जिलब्या पडत आहेत इकडे Wink

चांगले लिहिले आहे. थोडक्यात काय तर...रुन्मेष्च्या एक से एक वाईट सवयींमुळे मराठी साहित्यात मात्र चांगली भर पडून ते अधिक खुसखुशीत व खुमासदार होते आहे. ग.फ्रे. टिकून राहिल अश्याच सवयी इथे लिही रे मुला. Happy

एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपले गरम रक्त जरी समोरच्याला जाळायला कामी येत असले, तरी त्याचे चटके आपल्यालाही सोसावे लागतात. ते देखील आयुष्यभरासाठी..>>>>सही बोला रे बबड्या!

छान रे ऋन्मेष.
मस्तं लिहीलंयस.
पण मजा नाही आली कारण हे तर अगदीच ओळखीचं आहे. सतत अश्या चिरकुट मारामार्‍या पाहिल्या आहेत.
Happy

>>>>> सतत अश्या चिरकुट मारामार्‍या पाहिल्या आहेत. <<<<< Lol चिरकुट.....

"न धरी शस्त्र करी मी" या उक्तिप्रमाणे मला स्वतःला कधीच मारामार्‍या कराव्या लागल्या नाहीत, वा कुणी मला मारायचे धाडस केले नाही (अपवाद वगळता). दरवर्षादोनवर्षाने बदलते शहर/गाव व बदलत्या शाळा यामुळेही बराच फरक पडत होता. शिवाय कुंडलीमधिल ग्रहगुण असतील की काय पण विनाकारणच एक प्रकारचा दबदबा निर्माण होऊन कुणी सहसा वाटेलाच जायचे नाही. एक कारण असेही असु शकते की थोरले बंधु माझेपुढच्याच वर्गात असायचे व ते जरा तब्येतीने हट्टेकट्टेच होते.
इतके उपद्व्याप केल्याचे सांगतोय ते खरे असेल, तर ऋन्मेषच्या कुंडलीत काही योग-करणाचे कुयोग नक्कीच सापडतील असा विश्वास वाटतो.

लिंबूटिंबूजी,
याबाबतीतले आपले विचार वाचून अंमळ आश्चर्य वाटले. कारण आपल्या प्रत्येक देवाने हिंसेचे समर्थन केले आहे. राक्षसाचा नाश हा नेहमीच त्याचा वध करून झाला आहे, न की त्याला उपदेशाचे डोस पाजून..

साती,
हो. म्हटले तर चिरकूटच अनुभव आहेत. ज्या दक्षिण मुंबईने समाजाला एक सो एक गॅंगस्टर आणि भाई दिले तिथे मी लहानाचा मोठा झालोय. जेव्हा ईतर आजीआजोबा आपल्या नातवंडांना रामकृष्णाच्या कथा सांगायच्या तेव्हा आमचे आजोबा त्यांच्यावेळच्या राड्याच्या सुरस कथा सांगायचे. आमची पिढी उगवता उगवता ती भाईगिरीची संस्कृती आमच्याईथून लोप पावली आणि मग अश्या फुटकळ किश्श्यांवरच मिरवायचे नशिबी उरले.
असो, पण हे देखील काही जणांना जास्तीचे वाटते यातच समाधान की लिखाण अगदीच फुकट नाही गेले.

ग.फ्रे. टिकून राहिल अश्याच सवयी इथे लिही रे मुला.
>>>
मेधाजी,
भारतीय स्त्री चा हाच तर मोठेपणा असतो की ती गुणदोषांसह जोडीदार स्विकारते. याऊलट तिने आपला भूतकाळ उलगडायला सुरुवात केली तर मीच टेंशनमध्ये यायचो Happy

दीड मायबोलीकर | 21 January, 2016 - 02:45 नवीन

माझे एक दूरचे काका होते.
<<
बस कर पगले.
रुलायेगा क्या? हसून हसून गडबडा लोळण

म्हणजे या प्रतिसादाचा अर्थ उलगडून सांगाल का?
{मला लागलेला अर्थ - तुम्हीच तर धागालेखकाचे ते दूरचे काका नव्हे?}

>>>>> कारण आपल्या प्रत्येक देवाने हिंसेचे समर्थन केले आहे. राक्षसाचा नाश हा नेहमीच त्याचा वध करून झाला आहे, न की त्याला उपदेशाचे डोस पाजून.. <<<< ओह, म्हणजे ल्हानपणी तू ज्यांच्याबरोबर मांरामार्‍या केल्यास ते राक्षस होते तर... Lol मग आता काय झालय? सगळे राक्षस तुझ्या आयुष्यातुन अदृष्य झालेत का?

आपले आईबाप वगळता ईतरांच्या आईबापाला घाबरायचे कारण नाही, कारण आपण त्यांचे खात नाही, या असल्या समजा मला बरेच लहान वयात आलेल्या.
Happy Happy Happy Happy Happy

लिंबूटिंबूजी,
त्यांच्या राक्षस असण्याबद्दल नक्की कल्पना नाही. पण नक्कीच त्यांची काही पापे असावीत जे माझ्या हस्ते मार खावा लागला. मी बस निमित्तमात्र. आता छोट्यामोठ्या शिक्षांसाठी देव अकरावा अवतार तर नाही ना घेऊ शकत Happy

बिपीन चंद्र,
येथील प्रतिसादांत त्याचा संदर्भ आहे - http://www.maayboli.com/node/56976

त्याल्या कसे खुलविणार ?
>>>>
मुक्तेश्वरजी खुलवणे एक कला आहे, त्याची वेगळी मालिका येतेय.

अजिबात काल्पनिक वाटलं नाहीये ऋन्मेष. हे सगळ अगदी जवळुन पाहिलंय आणि अनुभवलय.

@ साती, चिरकुट... +१ Lol

<<<<<<<<<<एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपले गरम रक्त जरी समोरच्याला जाळायला कामी येत असले, तरी त्याचे चटके आपल्यालाही सोसावे लागतात. ते देखील आयुष्यभरासाठी..>>>> हे सगळं करुन भागल्यावर येणारं शहाणपण आहे रे बाबा. जोशाचे (म्हणजे जोश. म्हणजे जवानीका जोश वै. कुणाचे आडनाव नाही.) दिवस असतात तेव्हा सुचत नाही हे.

हा हा, मी काय पसारा आहे का आवरायला..
तरी पुढच्या वेळी आपल्याला अपेक्षित असणारे लिहिण्याचा प्रयत्न राहील Happy

ऋन्मेऽऽष तुम्ही दिलेल्या लिंकवर तुमचा एक गुप्ती व काकांच्या संदर्भाने एक प्रतिसाद दिसला आणि दीड मायबोलीकर यांचे हे प्रतिसाद दिसलेत.

दीड मायबोलीकर | 30 December, 2015 - 17:17

छर्र्याच्या बंदुकीने डुकराची शिकार?????????????????????????????????????????????????????? तब्येत बरी आहे ना?

दीड मायबोलीकर | 30 December, 2015 - 17:31

डुक्कर मरता मरत नाही हे बरोबर आहे.

परवा गाडीखाली डुक्कर आले. कूलण्ट लीक झाले. कंपनीवाल्यांनी फक्त शोरूमला सर्विसिंग होईल म्हणून सांगत गाडी टो करून नाशिकला नेली आहे. कितीचा बांबू बसेल ठाऊक नाही.

दरम्यान, डुक्कर उठून पळून गेले.<<<<<

छर्‍याच्या बंदुकीने डुकरे मरत नाहीत हे माहीत होतेच पण डुकरामुळे गाडीचे कूलण्ट ली़क झाले हे कळले. तरीही रुलायेगा क्या चा संदर्भ लक्षात आला नाही. असो. बायदवे ही असली कोणती गाडी जिचे कुलण्ट डुकरामुळे लिक होते?

बिपीनचंद्र अहो हे काय काय आणलेत, माझी तेथील दुसरीच पोस्ट. काकांच्या गुप्तीचा उल्लेख तिथेही आधी केला होता. फक्त काही लोकांना ते खोटे वाटले होते ईतकेच. बाकी विशेष संबंध नाही.

फक्त काही लोकांना ते खोटे वाटले होते ईतकेच. बाकी विशेष संबंध नाही. <<<<<

इतकेच होय! इथे (आणि तुमच्या इतरही अनेक लेखांवर) अनेकांना संपूर्ण लेखच काल्पनिक असल्याचे वाटतेय.

हे सगळं करुन भागल्यावर येणारं शहाणपण आहे रे बाबा. जोशाचे (म्हणजे जोश. म्हणजे जवानीका जोश वै. कुणाचे आडनाव नाही.) दिवस असतात तेव्हा सुचत नाही हे.

अगदी खरे बोललात... आयुष्याचे सार्वकालिक सत्य...
मानवी स्वभावच असा आहे त्याला कुणी काही करु शकत नाही...
सगळं घडून गेल्यावर मग पश्चात्ताप... हीच मानवी स्वभावाची कमजोरी... अगदी दारुण सत्य...

पण एक सांगतो, त्या प्रक्रियेतून गेल्यावर येणारे शहाणपण हे चिरकालीन असते. हातून चुका घडल्यावर मगच माणूस या सर्व कोड्याचा अर्थ सोडवण्यास प्रवृत्त होतो... त्या अगोदर नाही...

पण एक सांगतो, त्या प्रक्रियेतून गेल्यावर येणारे शहाणपण हे चिरकालीन असते. हातून चुका घडल्यावर मगच माणूस या सर्व कोड्याचा अर्थ सोडवण्यास प्रवृत्त होतो... त्या अगोदर नाही...

>>अजिबात काल्पनिक वाटलं नाहीये ऋन्मेष. हे सगळ अगदी जवळुन पाहिलंय आणि अनुभवलय

अगदी अगदी....
चुनभट्टीतला सेवंटीजचा काळ डोळ्यासमोर आला. अमक्याने तमक्याचा कसा कोथळा काढला आणि तो हाताने आतडी सांभाळत कसा हॉस्पिटलात पोचला ह्या मोठ्यांच्या गोष्टी आम्ही मनोभावे ऐकायचो.

Pages