मसान: एक आधुनिक शोकात्मिका
‘मसान’ या अनुराग कश्यप स्कूलमधून निघालेल्या नव्या चित्रपटाचं आंतरराष्ट्रीय नाव आहे ‘फ्लाय अवे सोलो’. आणि हेच शीर्षक अधिक समर्पक आहे असं ‘मसान’ बघितल्यावर वाटलं. मसान नावावरून या चित्रपटात काहीतरी स्मशानासंबंधी, भुताखेताचं , अतर्क्य, गूढ कथानक असेल असा समज होण्याची शक्यता आहे. पण ही कहाणी तशी नाही. ती एकाच वेळी समाजातील वर्गघर्षणाची (संघर्ष हा शब्द जरा कठोर होईल) आणि पात्रांच्या वैयक्तिक संघर्षाचीही आहे.
जेव्हा मी चित्रपटाचं कथानक म्हणतो, तेव्हा प्रत्यक्षात पडद्यावर मात्र एकाच वेळी दोन कथानकं घडत असतात. एक आहे ते म्हणजे बनारससारख्या प्रातिनिधिक भारतीय शहरात एका निम्न मध्यमवर्गीय ब्राह्मण घरात आपल्या वडीलांसोबत (संजय मिश्रा) राहणार्या देवी पाठक (रिचा चड्ढा) या तरूण मुलीचं. आणि दुसरं आहे ते याच बनारसच्या घाटावर राहणार्या डोंब समाजातल्या दीपक चौधरी ( विकी कौशल) या सिविल इंजिनियरींग शिकणार्या तरूणाचं. हिंदू समाजाच्या उतरंडीत सर्वांत उंचावर आणि सर्वांत तळाशी समजल्या जाणार्या या ‘तरूण भारता’चा आपापल्या आयुष्याशी चाललेला संघर्ष ‘मसान’ अतिशय संवेदनशीलतेने आपल्याला दाखवतो.
प्रथम देवी पाठकची गोष्ट आपल्यापुढे उलगडायला सुरूवात होते. आपल्या प्रियकरासोबत एका नाजूक क्षणी , नको त्या अवस्थेत पोलिसांच्या हाती सापडल्यावर या धक्क्याने तिच्या प्रियकराचा झालेला मृत्यू; त्यातच भ्रष्ट पोलिस अधिकार्यांकडून त्यांचा ‘तो’ व्हीडीओ ‘व्हायरल’ करण्याची धमकी देऊन करण्यात येणारी आर्थिक पिळवणूक; परिस्थितिने आधीच गांजलेल्या बापाशी होणारी सततची चिडचिड, कटकट; छोट्या शहरातील कोत्या मनोवृत्तीने आणलेला उबग आणि या सगळ्या गुंताड्यातून पाय मोकळा करून घेऊन सुटका करून घेण्याची, ‘फ्लाय अवे’ करण्याची देवीची धडपड इत्यादी रिचा चढ्ढा ही गुणी अभिनेत्री दिग्दर्शक नीरज घेवनच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत परिणामकारकतेने आपल्यासमोर सादर करते. आणि त्याला माध्यम ठरते ते अविनाश अरूण (‘किल्ला’चा दिग्दर्शक) याचे अप्रतिम कॅमेराकाम. दिग्दर्शकाने रिचाच्या चेहर्यावर मुळातच असलेल्या एक नैसर्गिक अ-सुंदरतेचा, नॉन-गुडी अशा थोडयाश्या ‘आगाऊ’ लूकचा चतुर वापर करून घेतलेला आहे. संजय मिश्रा याने साकारलेला एक सर्वसामान्य ,पापभीरू , कुटुंबवत्सल बाप लक्षात राहतो. अत्यंत गुंतागुंतीची, अनेक छटांची आणि बदलत्या मनोवृत्तीची ही भूमिका समर्थरित्या साकारून संजय मिश्राने अभिनयाचं एक अजून शिखर सर केलं आहे.
अविनाशचाच कॅमेरा आपल्याला दीपकची दुसरी गोष्टही दाखवतो. स्मशानातला परंपरागत व्यवसाय सोडण्याची मनोमन इच्छा असलेला दीपक विकी कौशलने अगदी नैसर्गिकपणे उभा केला आहे. व्यवसायाने डोंब असला , अशिक्षित असला तरी मुलाच्या आकांक्षा जाणणारा दीपकचा ‘पुरोगामी’ पिता विनीत कुमार या कसलेल्या नटाने मोठ्या ताकदीने साकारला आहे. त्यानंतर मग अमोल पालेकरांच्या मध्यमवर्गपटातल्या प्रेमकथांची आठवण करून देणारी दीपक व शालू गुप्ता( श्वेता त्रिपाठी) यांची ठराविक वळणं घेत जाणारी उत्फुल्ल, रोमॅण्टीक प्रेमकहाणी हळुहळू प्रेक्षकाचा ताबा घेऊ लागते. दुसरीकडे समांतर चाललेल्या देवी आणि तिच्या गोष्टीतला तणाव हलका करण्यास दीपक- शालूची प्रेमकथा मदत करते.
शालूचा तथाकथित उच्चवर्णीयपणा आणि दीपकचा तथाकथित मागासवर्गीयपणा या दोघांच्या प्रेमाआड येतो का अशी धाकधूक आपल्याला वाटत राहते. कारण अशा प्रकरणात खराखुरा समाज आणि सिनेमातला समाज कसा वागतो हे आपण अनेकवेळा पडद्यावर आणि पडदयाबाहेरही अनुभवलेलं असतं. चित्रपटातील पात्रांबद्दल अशी भावना होणं हीच चित्रपटाच्या यशाची पावती आहे. त्यामानाने देवीच्या कथेतील ‘पुढे काय?’ हा फॅक्टर तितकासा परिणामकारित्या उतरलेला नाही. तरीही इतकी बांधेसूद, संवेदनशील पटकथा लिहिल्याबद्दल लेखक- पटकथाकार आणि ती तेवढ्याच तीव्रतेने आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी संकलक- दिग्दर्शक निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत.
समांतर चालणार्या एकापेक्षा अधिक कथानकप्रवाह असलेल्या चित्रपटाचं संकलन हे आव्हानात्मक आणि जोखमीचं काम आहे आणि ते नितीन बैद याने पेललं आहे. असली समांतर कथानक पडद्यावर दाखवताना समतोल सांभाळणं ही खरोखरंच तारेवरची कसरत असते. लंबक कुठल्याही एकाच बाजूला वाजवीपेक्षा जास्त वेळ झुकलेला राहिला तर चित्रपट अयशस्वी होऊ शकतो.
तसं पाहिलं तर हे भारतात कुठेही घडू शकणारं कथानक. परंतु बनारसच निवडण्यामागे इतर काही कारण असावीत असं वाटतं. लेखक- दिग्दर्शकाचा त्यांच्या ‘अप ब्रिंगिंग’च्या दृष्टीने असलेला एक ‘कम्फर्ट झोन’ हे एक कारण असतंच. हा काही कमीपणा नसून एक क्रिएटीव्ह आणि प्रॅक्टिकल सोय असते. उदा. यूपीत वाढलेल्या दिग्दर्शकाला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातली गोष्ट सांगणारा वास्तववादी चित्रपट बनवणे कठीणच जाणार. दुसरी गोष्ट म्हणजे मसान हा भारत आणि फ्रान्स यांची संयुक्त निर्मिती आहे आणि त्याचा मुख्य संभाव्य प्रेक्षकही जागतिक, स्थानिक बुद्धिजीवी आणि फिल्म फेस्टीव्हलला जाणारा अशा प्रकारचा असावा. जागतिक स्तरावर मार्केटींग करताना भारतीय सिनेमाला स्थानिक परंपरा, संस्कृती, गरिबी, सामाजिक भेद वगैरे दाखवणं फायदेशीर ठरतं. त्यामुळे बनारस, गंगा, साधू, गंगेचे घाट, तिथे चालणारं अंतिम क्रियाकर्म वगैरे दाखवलं की तिहेरी फायदा होतो; एक म्हणजे जागतिक स्तरावर मार्केटिंग करायची सोय तर होतेच. दुसरं म्हणजे थोडी आध्यात्मिकता, तत्वज्ञानाची फोडणीही देता येते आणि तिसरं म्हणजे जाताजाता भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवल्यामुळे संस्कृतीप्रेमींकडून स्तुती मिळण्याची शक्यता राहते. अर्थात हा आक्षेप नसून एक निरीक्षण आहे. असो.
कथेत मुळातच अंगभूत नाट्य असलं तरी अतिरंजितता, मेलोड्रामा टाळून आधुनिक आणि समकालीन भारताचं इतकं नेमकं चित्रण इतक्याततरी कुठल्या चित्रपटात पाहिल्याचं स्मरत नाही. सामाजिक प्रश्न याआधी हिंदी चित्रपटात दाखवले गेले नाही असं नाही. पण हिंदी सिनेमात असणारी नेहमीची मेलोड्रॅमेटीक हाताळणी, स्मशान आणि तदअनुषंगिक बाबी दाखवताना येऊ शकणारा बीभत्सपणा टाळला आहे. आणि मुख्य म्हणजे सरसकटीकरण टाळलं आहे. आपलं आंतरजातीय प्रेमप्रकरण , त्याचे नेमके संभाव्य परिणाम माहीत असलेला आणि त्यामुळे व्यथित असलेला, निराश झालेला हळवा नायक बरेच दिवसांनी मोठ्या पडद्याने पाहिला आहे. नाहीतर मुख्यधारेतल्या हिंदी सिनेमातल्या नायकाचा हळवेपणा बाप-मुलगी, आई-मुलगा आणि प्रेयसीविरह याच्यापुढे कधी गेला नाही. तीच गोष्ट स्त्रीव्यक्तिरेखांची.
स्वत:च्या अटींवर जगू इच्छिणारी आधुनिक स्त्री (देवी), तिची महत्वाकांक्षा समजू शकणारा परंतु परिस्थितीने अखडलेला तिचा बाप, तथाकथित खालच्या जातीच्या किळसवाण्या आयुष्यातून मुक्त व्हावयाला आतुर तरूण (दीपक), त्याच्या या स्वप्नाला जाणणारा त्याला पाठिंबा देणारा त्याचा बाप , प्रियकराच्या खालच्या जातीचं वास्तव जाणल्यावर हादरलेली पण नंतर विचारपूर्वक आपल्या प्रेमासाठी घरून पळून जाण्याची देखील तयारी दाखवणारी खंबीर तरुणी (शालू) अशी अनेक समजूतदार पात्र कदाचित अ-वास्तव वाटण्याची शक्यता आहे. याला कारण म्हणजे आंतरजातीय- आंतरधर्मीय विवाह, हॉनर किलिंग, स्त्रियांवरचे अत्याचार असे विषय आले की काहीतरी बटबटीत मांडणी, भाषणबाज पात्रे, हिंसाचार, अतिआदर्शवाद वगैरे पाहण्याची आपल्याला सवय झाली आहे. आपापल्या परिस्थितीत अत्यंत प्रॅक्टीकल वागणार्या व्यक्तिरेखा हिंदी चित्रपटात विरळच दिसतात. याबाबतीत मसान जरी गंभीर प्रकारचा चित्रपट असला तरी फ्रेश आहे. काहीतरी नवी, भावजाणिवा समृद्ध करणारी कलाकृती पाहिल्याचं समाधान देणारा आहे.
तुम्ही जर अतिआशावादी मनोवृत्तीचे असाल; जग फारच छान आहे; आयुष्य फारच सुंदर आहे; अंतिमत: सगळ्यांचं सगळं चांगलंच होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही सोशल मीडीयावर फिरणारे ‘गुडी गुडी’ संदेश ‘संपूर्ण’ वाचून फॉरवर्ड करणारे असाल तर कदाचित ‘मसान’ हा चित्रपट तुम्हाला न आवडण्याची शक्यता आहे. ‘मसान’ ही तुमच्याआमच्या आजच्या आधुनिक पण सर्वसामान्य आयुष्यात कधीही येऊ शकणार्या दु:खाची वास्तववादी कहाणी आहे. चित्रपटाचा शेवट एक अंधुक आशा सोडून जातो पण स्पष्ट काही सांगत नाही. त्यामुळे ती एक शोकात्मिका असली तरी शोकांतिका नाही.
मात्र तरीही एक दु;खाची किनार मात्र चित्रपटभर दिसणार्या गंगेच्या संथ अस्तित्वासारखी सतत आपली सोबत करते. या दु:खाच्या महानदीत न बुडता किनार्याकिनार्याने पोहतच आपल्याला हा प्रवास पूर्ण करायचा आहे असं तर चित्रपटाला सांगायचं नाही ना ?
माझा ब्लॉग: http://aawaghmare.blogspot.com/
Hotstar वर का पाहताय लोक्स?
Hotstar वर का पाहताय लोक्स? मी तर तुनळीवर पहिला आणि कुठेही कापाकापी नसलेला. बाकी चित्रपट अफाट आहे , तेव्हापासूनच विकीची फॅन झालीये, आता तर तो मोठा स्टार झालाय.
जिओ वर पहा.
जिओ वर पहा.
चित्रपटाची सुरवात देवी व पियुष हॉटेलात येतात व कपडे काढून पुढचा बेडसिन ही असल्यामुळे तो सगळा भाग कापला असावा. ते बेडमध्ये असतानाच लॉजवर पोलीस धाड पडते.
श्रद्धांजलीचा फोटो कॉलेजमध्ये असतो, देवी तो फोटो गुपचूप काढून घेते. नंतर ती फेसबुकवर त्याला बघते तेव्हा पियुष नीट दिसतो. पहिल्या सीनमध्ये तो नीट दिसत नाही. दीपक अंगठी फेकायचा सिन तर खूप मोठा आहे, निशब्द आहे पूर्ण पण भरपूर मोठा आहे.
खूप मुले वाला संवाद घाटावर आहे. सगळे डोम एकत्र गप्पा मारत असताना दीपकचा बाबा एकाला उद्देशून म्हणतो हे. दारूत पूर्ण बुडालेल्या त्या माणसाचा बाप पण डोंब असतो. 10 मुले असतील तर दहापट उत्पन्न घरात येईल असे त्याला वाटलेले असते पण प्रत्यक्षात मुले वाटणी करून घेतात आणि प्रत्येकाचा 10 वर्षांनी उत्पन्न मिळायचा टर्न येतो. त्याच्या तोंडी प्रमाण हिंदी भाषा नाही, जी आहे ती समजून घ्यायला थोडे कष्ट पडतात.
दीपक शालूचे प्रसंग इतके सुंदर आहेत!! मी त्या दोघांसाठोही परत पाहीन
शालू विचारते नीरज की गालिब वाचलायेस का?? दीपक म्हणतो, कोण नीरज??... मी तिच्या जागी असते तर ह्या मुद्द्यावर ब्रेकअप केला असता
तिने फोनवर बोलून दाखवलेली कविता तो फोनवर रेकॉर्ड करून तिला बड्डे गिफ्ट देतो. ती नंतर फोन उचलत नाही तेव्हा निराश होऊन परत संगमावर गेला असताना तिचा फोन येतो त्यानंतर नाववाल्याला ओरडून सांगतो नाव जलदी वापस लेके चलो, मुझे घर जाके बहोत पढाई करनी है, नोकरी पकडनी है... खूप हसायला येते तेव्हा..
तेव्हापासूनच विकीची फॅन
तेव्हापासूनच विकीची फॅन झालीये, आता तर तो मोठा स्टार झालाय.>>>>
येस, तेव्हा त्याला कोणीही ओळखत नव्हते. पण त्याची वेशभूषा अशी केलीय की तो तिथलाच वाटतो. मीही त्याची फॅन आहे. त्याला प्रथम पाहिले ते लव पर स्क्वेअर फूटमध्ये आणि काम आवडले.
Hotstar वर का पाहताय लोक्स?
Hotstar वर का पाहताय लोक्स? मी तर तुनळीवर पहिला आणि कुठेही कापाकापी नसलेला.
>> सवयीने तिकडे पाहिला गेला. आता तुनळीवर एकदा फाफॉ करत बघेन कधीतरी वेळ मिळाला की.
बरेच लोकांकडून छान असे ऐकून
वा वा मसान...
बरेच लोकांकडून छान असे ऐकून पिक्चर पाहिला. पण ठिकठाकच निघाला. नसता बघितला तरी आयुष्यात काही मिसलं नसतं. ओल्ड फ्याशन कलात्मक समांतर काय म्हणतात तसे आशयघन पण त्याचवेळी फार काही मालमसाला नसलेला एखाद्या समाजावर डोक्युमेंटरी बनवावी तसा चित्रपट आहे. यापेक्षा मस्त ड्रामा क्राईम पेट्रोलच्या रिअल स्टोरीत असतो. शेवटाने तर फारच निराश केले. काही शेवट झालाय असे वाटलेच नाही. कॉलेजातल्या पिरीअडची वेळ संपली अन प्राध्यापकांचा लेक्चर संपला तसे वाटले. दोन वेगळे कथानकांची शेवटपर्यंत कुठेच सांगड घातली नाही हे आणखी डोक्यात गेले. सैराटच्या वळणाने जाणारया लव्हस्टोरीला तर उगाचच असे संपवले की जसे डेलीसोपमधील एखादा कलाकार सोडून गेला तर जसे कथानकच बदलून त्याचा रोल कापून टाकतात. पैसा वापस दे दो भाई फिलींग आली...
असो, उद्या आणखी लिहेन. वेळ वाया गेल्याचा त्रास म्हणून मुद्दाम मायबोलीवर मसान सर्च मारून हा धागा शोधून हलका झालो. आता हिच पोस्ट आणखी एका धाग्यावरही कॉपीपेस्ट करतो म्हणजे हलके होणे द्विगुणित होईल.
तुर्तास शुभरात्री ....
खूप दिवसांपासून पहायचा असलेला
खूप दिवसांपासून पहायचा असलेला मसान लॉक डाऊन सुट्टीत पाहायचा योग आला.
सुंदर आहे सिनेमा. आवडला. देवीची घुसमट अंतर्मुख करून गेली.
शालू दिपकची प्रेमकहाणी चटका लावून गेली !
Pages