......................ओढणी ...................

Submitted by ashishcrane on 16 December, 2012 - 02:13

......................ओढणी ...................

ट्रेनची चौथी सीट पकडून प्रवास केल्यावर चेहऱ्यावर 'एक गड' जिंकून 'एक योद्धा' आल्याच्या
अविर्भावात मी चाळीत प्रवेश केला....
चाळीच्या दाराशी लोकांची गर्दी दिसली."मी 'चौथ्या सीटची लढाई' जिंकली हि खबर चाळीत पण पोहोचली कि काय?".
हे लोक माझी आता आरती ओवाळणार..."यावे यावे राजे....आप आई बहार आई....."
पण मी चाळीत प्रवेश केला तरीही कुणी ढुंकूनही पाहिले नाही माझ्याकडे....मग मात्र मला थोडा संशयच आला....

आम्हा चाळीतल्या लोकांना जरा सवयच असते गर्दी करायची.
'स्वत:च्या घरात काय चालू आहे' या ज्ञानाबरोबर 'इतर शेजारांच्या घरात काय चालू आहे' हे माहित असणं आमच्यासाठी अतिमहत्त्वाचं असतं...जसे ते तसा मी...मग मी हि मागच्या एकाला हळूच कानात विचारले,
"काय झालं रे मंग्या? अन्याच्या घरात काही झालंय काय? कुणी गचकला कि काय?"...मी अशीच मस्करी केली.
"गचकला नाही....गचकावला...अन्याने स्वत:च्या बायकोला गळा घोटून मारले"...

ऐकल्याच क्षणी माझा हात माझ्याच गळ्याशी गेला....थोडा भूकंप झाल्यासारखे वाटले...योद्धा थोडा हडबडला होता....
अनिकेत अशी काही हरकत करेल हे माझ्याच काय तर इतर कुणाच्या हि बुद्धीला पटणारे नव्हते.
कारण अनिकेत म्हणजे तसा सुजाण माणूस होता.सगळ्यांत मिळून मिसळून राहणारा.माझा यार....
दिसायलाही राजबिंडा.नोकरी चांगली होती.स्वत:चे राहते घर होते....आई बाबांचा लाडका नसला तरी दोडका पण नव्हता.
जशी इतर घरात होतात तशी त्यांच्या हि घरात भांडणं व्हायची....शेवटी काय...?
दोन पिढ्या एकत्र वावरताना दोनच गोष्टी गरजेच्या असतात....एकतर 'संवाद' नाहीतर 'शांतता'...
दोन्ही नसेल तेव्हा फक्त युद्धं होतात....रक्त नाही सांडली तरी भांडी पडतात....त्यांना पोकं येतात....

अनिकेतची बायको म्हणजे 'काव्या'...काव्या नावासारखीच होती...कवितेसारखी....रेंगाळणा
री....
दिसायला नक्षत्र....वागायला नम्र..... नजर लागायची १००% शक्यता होती.....आणि लागलीच....
डोळ्यांत खूप स्वप्न घेऊन अनिकेतसोबत एका वर्षापूर्वीच तिने 'थोरातांची सून' म्हणून घरात प्रवेश केला होता.
मोठ्या कौतुकाने अनिकेतने बायकोचे नाव 'काव्या' ठेवले होते.तेव्हापासून 'पूजा शिंदे' ची 'काव्या थोरात' झाली होती.
माझी काही जास्त ओळख नव्हती तिच्याशी पण बोलून चालून ओळख होती.

तिचे प्रेत बाहेर आणले गेले.तिचा चेहरा अजूनही हसरा होता.
'सुंदर लोक कोणत्याही क्षणी कोणत्याही वेशात सुंदरच दिसतात' याची खात्री पटली.
मागून अनिकेतला आणले गेले.त्याच्या चेहऱ्यावर भाव विचित्र होते.कळत नव्हते...
छोटासा का होईना लेखक मी.....पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला शब्दात पकडता येत नव्हते.
पोलीस आले आणि अनिकेतला घेऊन गेले.....आणि काव्याचा देह सुद्धा....
गुन्हा अनिकेतने कबूल केल्याने पोस्ट-मार्टम करण्यास जास्त वेळ लागणार नव्हता....

गर्दीची सर्व कारणं गेल्यावर गर्दी करण्यात अर्थ नव्हता....बाकी सगळे गेले...
माझी आई अनिकेतच्या आईची समजूत काढत होती....
"असा नाही आहे हो आमचा अनिकेत.आम्हाला वाटलं दोघांचा संसार सुरळीत चालू आहे....कुणाची नजर लागली हो..?"

बाहेरून अनिकेतच्या आईचे रडणे आणि डोळ्यांसमोर काव्याच्या देहाकडे बघणारा अनिकेत....
श्या....जेवण जात नव्हते...झोप हि उडाली होती....
"का रे अनिकेत असे का केलेस मित्रा?....मित्रा ???? तुला मित्र म्हणू की नको हा विचार करावासा वाटतोय..
इतका नाजूक गळा दाबताना तुला अजिबात कीव नाही आली का रे?...का?? का केलेस?
श्या....प्रश्न प्रश्न....आणि प्रश्न.....
पण उत्तरं नाहीत....उत्तरं देणारा कुठेय???....हे करून तो खुश असेल का?..
हे घडल्यावर ती खुश असेल का? गळा घोटताना तिला किती दुखले असेल...?
पण तरीही तिचा चेहरा हसरा कसा होता....?....अनिकेत...अन्या....सांग मला....असे का केलेस?"

माणसाला आयुष्यात काय काय हवे असते?...मान्य आहे कि मागितलेले सगळेच मिळत नाही...
नाही मिळणारा माणूस रडत राहतो....
पण मिळाले कि असे स्वतःच्या कर्माने घालवून बसतो....

कधी कधी स्वत:च्या संसाराला स्वतःचीच नजर लागते.....
हा 'आरंभ' आहे कि 'शेवट' आहे हें सांगणं कठीण होतं...

उद्या जाऊन सकाळी सकाळी अनिकेतला भेटल्याशिवाय मला राहवणार नव्हते.....
उद्याच सकाळी अग्नी दिल्यावर त्याला न्यायालयात सादर करणार होते.त्या आधी मला त्याला भेटायचे होते.
पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर माझ्या ओळखीचा होता..आमच्या ऑफिसच्या जोश्याचा चुलत भाऊ....
म्हणून बोलायला वेळ मिळाला.नाहीतर पाच मिनिटात उरकायला लागणार होते....

मी लॉक-अप जवळ गेलो.अनिकेत शांत बसला होता.....गुन्हा केलाय असे वाटतच नव्हते....
मला पाहून तो धावत धावत लॉक-अपच्या दाराशी आला....

लॉक-अपच्या दाराशी येऊन लोखंडी सळयांमधून अनिकेतने माझा हात धरला....
आणि म्हणाला...."संपवलं...संपवलं मी सगळं.बघ आता कुणालाच त्रास नाही.
श्री....शांत झालंय बघ सगळं...ती आनंदात आहे बघ आता."
"अन्या....अन्या...काय बोलतोयस हे...कोण आनंदात असेल?..वेडा झालायस का?काय करून ठेवलंस हे?..काय बिनसलं होतं रे तुझं?
काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं रे मित्रा...गमावून बसलास सगळं.."
"गमावलं.????कोण बोलतं असं...?मी तिला गमावून....कमावलंय...श्री....
'काव्यासारखी बायको मिळायला नशीब लागतं' खरं बोललास.तो नशीबवान मी...पण आंधळा होतो मी...
नक्षत्र होती माझी काव्या....हिऱ्यासारखी होती...पण कोंदण चुकलं होतं.इतकं तेज सांभाळायची लायकी नव्हती रे श्री माझी.
काय काय भोगलं रे तिने माझ्यासाठी?
तिचं हसणं वेड लावणारं होतं...पण मी तिचं वेड होतो...खूप उशिरा कळले मला ते.

काल हि भांडून झोपलो मी.जाग आली तेव्हा काव्याही झोपली होती...तिचा ओला गाल पाहिला मी...
रडली होती ती...खूप खूप रडली होती...रोजच्या सारखीच...मग बसलो आणि विचार केला....
सगळं सगळं उलघडत होतं....मी दोषी ठरत होतो....
स्वतःच्याच विचारात स्वतःला दोष आला कि स्वतःच्याच विचारांचा राग येतो...मलाही येत होता स्वतःचा राग..

मनाच्या जवळचं माणूस जवळ असलं कि गर्दीची भीती वाटत नाही...पण...
तेच माणूस जवळ नसलं कि स्वत:च्या सावलीचीही भीती वाटते.
मित्र मला 'बायकोचा बैल' म्हणतील म्हणून कधी गर्दीत कुणासमोर हात नाही धरला मी तिचा.
नेहमी एकट सोडलं...तिची नजर शोध्याची मला...पण यातच 'पुरुषार्थ' वाटायचा मला...
पुरुषार्थ....मोठा शब्द आहे ना?अर्थ तरी कळतो का रे आपल्याला त्याचा?घरातली बायको हवी तशी राबवता आली म्हणजे पुरुषार्थ मिळतो का?
संसार फुलवायला जे लागते ना त्याला म्हणतात 'पुरुषार्थ'.विस्कटता सगळ्यांना येतं.आवरायला हिंमत असावी लागते."

अनिकेतच्या डोक्यातली भूतकाळाची पानं पटापट पटापट पलटत होती...मी प्रयत्न करत होतो.
पण त्यांच्या पलटण्याचा वेग खूप जास्त होता...माझी घाई होत होती...त्या पानांवरचं सगळं वाचता येत नव्हतं
"श्री...'नांदा सौख्यभरे' असा आशीर्वाद घेऊन संसार फुलत नसतो रे.साथीदाराचं सौख्य कळायला मनात डोकवावं लागतं.
पण मला कधीच नाही जमलं ते.'वेळ'...खूप मोठी गोष्ट आहे रे श्री....नात्यासाठी....
माझ्याकडे वेळ होता....पण तो तिच्यासाठी नव्हता...तो माझ्या मित्रांसाठी होता...
मित्रांसोबत दारूच्या बाटल्या फोडून Get Together करताना घरातली सर्वात जवळची मैत्रीण एकटी पडलीय हे विसरलो होतो मी.
आपल्या निर्णयात आपल्या जोडीदाराची साथ असली कि हुरूप येतो..पण मी नेहमी ग्राह्य धरलं तिला.
पण तिने तोंडातून 'ब्र' नाही काढला श्री....दुनियेला एक शब्द नाही कळला.तिने कळूच नाही दिला.

आपण हसलं कि जग फसतं...
तिनेही हेच केलं..नेहमी हसऱ्या चेहऱ्याने जगाला फसवलं.स्वतःचा त्रास कधी नाही दाखवला कुणाला?
का राहावं तिनं माझ्यासोबत?लायकी तरी आहे का माझी?...
कोणत्या विश्वासाने माझ्या हातात तिचा हात दिला होता त्या बापानं?"सांभाळ माझ्या पोरीला" असे म्हणाले होते ते.काय तोंड दाखवू त्यांना आता?
मी ओळखतो स्वतःला....दोन दिवस सुधारीन आणि पुन्हा माज चढेल मला...पुन्हा तीच सहन करणार...

घटस्फोट दिला तर जग मला सोडून तिलाच दोष देईल...एकच उपाय...मरण...
माझं नाही....तिचं...मी आत्महत्या केली तर जग तिलाच टोचून टोचून मारेल.."
तशीच ओढणी उचलली मी तिची....
तिचीच ओढणी हातात घेऊन तिच्या गळ्याभोवती गुंडाळली.गच्च खेचत गेलो ती.
तिच्या ओढणीतून तिचा सुंदर चेहरा चंद्रासारखा दिसत होता.चांदणं पडलं होतं.पण फक्त माझ्यावरच.
दोन क्षण वाटले कि, इतका निर्दयी कसा होऊ मी?इतकी नाजूक...इतकी गोड काव्या माझी...
नाही...नाही...नाही जमणार हे मला...
पण श्री.....पण पुढच्याच क्षणी मला रोज रात्री रडणारी, गालावर सुकेलेलं पाणी घेऊन तशीच झोपनारी
काव्या दिसली.तिच्या मनातलं ऐकू येत होत मला..ती म्हणत होती,
"फक्त जेवलं,पाणी पिलं,पोट भरलं इतकीच असते का रे माणसाची भूक?
मनाचं काय?त्याला काय हवं असतं रे...दोन सोबतीचे क्षण,जिव्हाळ्याची एक हाक,मायेचा एका स्पर्श....
आणि तितकं द्यायला हि आपल्या माणसांकडे वेळ नसावा.
असण्याला 'असणं' कसं म्हणावं?इथे शांती मागितली कि एकांत मिळतो...एकांतात आणि अंतात फक्त एकाचाच फरक...
आम्ही जगासाठी दोन नसून 'एक' आहोत...आम्ही खरंच 'एक' आहोत...पण आमचा 'एक' आणि जगाचा 'एक' वेगळा आहे.
आम्ही एक-एकटे आहोत."

गळा आवळला ना तसा तिला थोडा त्रास झाला.पण माझ्या डोळ्यांत पाणी होतं तिच्यासाठी.
प्रेम होतं तिच्यासाठी.तिने ते पाहिलं माझ्या डोळ्यांत आणि गोड हसली.हसतच राहिली.
माझा हात गच्च होत होता.ओढणी ताणली जात होती आणि ती सुंदर हसत होती....
तिच्या प्रत्येक हसऱ्या क्षणासोबत माझा हुंदका वाढत होता....मी आजवर काय काय त्रास दिला,किती छळलं हे आठवत होतं...
नाही...नाही....या पुढे नाही द्यायचा त्रास....
माणूस आहे रे ती...सहन तरी किती करावं?...ओढणी ताणली...गळयाजवळचा माझा धरलेला हात तिने घट्ट केला.
खूप ओढ होती रे त्या स्पर्शात...पण मी म्हणालो तिला,"नको लावूस इतकी ओढ...मी नाहीयेय या ओढीच्या लायकीचा..तू छान आहेस काव्या.चुकलो मी माफ कर मला."

गोड हसली रे ती....
पुढच्या क्षणी बोटं तिची सैल पडली.डोळे झाकले तिने सुखाने.पण चेहऱ्यावर तेच हास्य होतं...तेच वेड लावणारं हास्य.
तिच्या जिवंतपणी जे पाहून नाही शकलो ते सुख होतं तिथं तिच्या डोळ्यांत,चेहऱ्यात,स्पर्शात.."
पोलिसांनी जीपमध्ये बसवून आम्हा दोघांना स्मशान भूमीवर आणलं.काव्याच्या बाबांनीच अग्नी दिला होता..
अनिकेत वेड्यासारखा पुन्हा पुन्हा धावत धावत जात होता त्या आगीतल्या काव्याजवळ....
आणि अडवत होतो आम्ही त्याला...तो किंकाळत होता...
"बघ बघ....श्री....मी जळतोय आणि ती विझतेय....."

--आशिष राणे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन सोबतीचे क्षण,जिव्हाळ्याची एक हाक,मायेचा एका स्पर्श....
आणि तितकं द्यायला हि आपल्या माणसांकडे वेळ नसावा.
>>> हे वाच की,

कल्ट कथा म्हनजे काय? Wink

तिला काय त्रास होत होता ?
>> ह्याने मित्रा सोबत दारु पिली की बायकोला त्रास होणार ..
>>घटस्फोट दिला तर जग मला सोडून तिलाच दोष देईल...
>>ह्यानं आत्महत्या केली तर जग तिलाच टोचून टोचून मारेल..

ह्याने ह्या सगळ्या असह्य दु:खतुन त्याच्या बायकोची सुटका केली ...अन आता स्वतः पश्चातापाच्या अग्नीत होरपळत राहणे स्विकारले ...
अहाहा ...काय हे प्रेम ! केवढी परम्ओच्च ही प्रेमाची अवस्था ..
.
तेथे कर माझे जुळती _/\_

.

एक मिनिट...

मान्य आहे की कल्पना अतिशय विकृत आहे. पण कथेचा प्लॉट म्हणून काहीही विषय चालू शकतो ना! कथेचा प्लॉट एका विकृत मनुष्याभोवती फिरतो म्हणून 'किळसवाणी विकृत मेंदूतून निघालेली कथा ..' अश्या लेखकाच्या बुद्धीचे धिंडवडे काढणार्‍या पोस्टी जरा अति वाटत नाहीयेत का?
मागे चमन का चंपक अश्या कुठल्याश्या आयडीने एका लहान (मला वाटते -६ वर्षाच्या मुलाने) स्वतःच्या तान्ह्या भावा/बहिणीला उशी तोंडावर दाबून ठार मारल्याची कथा लिहिली होती. तेव्हा त्या आयडीला कुणी विकृत, किळसवाणा मेंदू इ. ताशेरे ओढल्याचे आठवत नाही मला. तान्ह्या नव्या बाळाला आपल्यापेक्षा जास्त मिळणारे आई-बाबांचे अटेंशन ह्यामुळे सिनेमा/ सीरीयल्स इ. माध्यमांतून कळलेली उशी दाबून एखाद्याला ठार मारण्याची आयडीया तो लहानगा कसा अमलात आणतो असा प्लॉट असणारी थी कथा होती.

आता ह्या कथेची मांडणी नक्कीच गंडलीये, कारण त्या विकृत माणसाच्या मित्राच्या तोंडचे संवाद व त्याचे विचार अश्या पद्धतीने कथेत मांडलेत की त्या खुन्याने केलेल्या कृत्याचे कुठेतरी समर्थन करायचा व त्या मागचे कारण व परिस्थिती मांडायचा लेखक प्रयत्न करतोय असा भाव निर्माण होतोय. कथा सुधारता आली तर मला वाटते नीट होऊ शकेल.

तसेच ते तिच्या चेहर्‍यावरचे मरतानाचे हास्य वै. कल्पना अशक्य हास्यास्पद आहे हे ही खरेच! त्यामुळे लोक इथे सुटलेत! Wink

(तीन कैद्यांची एक रहस्यकथा कुणीतरी लिहिली होती ना! बहुदा चाफा! स्वतःच्याच पत्नीचा खुन त्याने केला असतो हे कथेत नंतर उघड होते. थोडक्यात कथेच्या मांडणीवर सर्व काही अवलंबून असते!)

अग निंबू पण त्या कथांची या कथेशी बरोबरीच होऊ शकत नाही
जी कथा तू म्हणतेयेस ती कथा बघ ना
लहान मुलाच्या हातून अजाणतेपणाने गैरसमजुतीतून झालेली कृती असा प्लॉट होता
यात काहीही आहे हे
की तिला सुखी ठेवू शकत नाही म्हणून तो मारून टाकतो
आणी तरीही ती हसत असते का तर तिला कळतं की तो हे आपल्यावरच्या प्रेमापोटी करत आहे
यक!
काहीही

कथेचा प्लॉट एका विकृत मनुष्याभोवती फिरतो म्हणून 'किळसवाणी विकृत मेंदूतून निघालेली कथा ..' अश्या लेखकाच्या बुद्धीचे धिंडवडे काढणार्‍या पोस्टी जरा अति वाटत नाहीयेत का?

हेच म्हणणार होते ...मायबोलीकर अजुनही तसेच ....कथेवर कॉमेन्ट नाही... लेखकावर कॉमेन्ट ...:राग:

की तिला सुखी ठेवू शकत नाही म्हणून तो मारून टाकतो
आणी तरीही ती हसत असते का तर तिला कळतं की तो हे आपल्यावरच्या प्रेमापोटी करत आहे
यक!
काहीही

आता प्रेमाच्य अनेक अवस्थांपैकी ही एक ... काहीना पटेल काहीन्ना नाही ... उगाच नायकावर का बरे ताशेरे ओढता ?.... पुढच्या कथावाचुन तुम्हाला त्रास होवु नये म्हणु कथेचा नायक तुमचाच साहित्यिक मर्डर करेल ...काही सांगता येत नाही हो Biggrin

मायबोलीकर अजुनही तसेच ....कथेवर कॉमेन्ट नाही... लेखकावर कॉमेन्ट >>>> आणि तुम्ही कॉमेंटवर कॉमेंट??? ते माझ मत आहे आणि मी ते मांडले. वाद घालण्यात मला रस नाही, हेमाशेपो...
अश्या लेखकाच्या बुद्धीचे धिंडवडे काढणार्‍या पोस्टी जरा अति वाटत नाहीयेत का? >>>> प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते,,, अगदी धिंडवडे वगैरे काय.. काहीही Uhoh . पुन्हा... वाद घालण्यात मला रस नाही, हेमाशेपो...

आता प्रेमाच्य अनेक अवस्थांपैकी ही एक ... काहीना पटेल काहीन्ना नाही ... उगाच नायकावर का बरे ताशेरे ओढता ?.... पुढच्या कथावाचुन तुम्हाला त्रास होवु नये म्हणु कथेचा नायक तुमचाच साहित्यिक मर्डर करेल ...काही सांगता येत नाही हो
>>
तीन वेळा तीन कथेत (नुसत्या वाचूनही) माझा साहित्यिक मर्डर होऊन पुर्नजन्म होऊन परत साहित्यिक मर्डर झाला

निंबुडाशी मीपण सहमत आहे... कथेचा प्लॉट म्हणुन जर एखाद्याला हा विषय आवड्ला अन त्यानी तो त्याच्या शैलीने मांड्ला तर त्यात लेखक का म्हणुन सायको??

सनसनाटी अन विक्रुत यात खुप बारीक रेष आहे... तो फरक न कळाल्यानी कथा पटली नाही.. अस मला वाटत...

अन कुठ्लीही गोष्ट, मग ती प्रेमच का असेना, अतीरेक वाईट्ट्च... हे कदाचित लेखक सांगू इछित असेल तर?? :ड

मी सुरुवातीलाच टिंबांच्या संख्येवरून पास सांगितलं होतं.
न ऐकता वाचलीत नं कथा?
मग घालत बसा वाद आता नक्की कोण विकृत त्याबद्दल Wink

पण कथेचा प्लॉट म्हणून काहीही विषय चालू शकतो ना! कथेचा प्लॉट एका विकृत मनुष्याभोवती फिरतो म्हणून 'किळसवाणी विकृत मेंदूतून निघालेली कथा ..' अश्या लेखकाच्या बुद्धीचे धिंडवडे काढणार्‍या पोस्टी जरा अति वाटत नाहीयेत का?
>>मग ती कथा त्या प्लॉटला अनुसरून त्या शैलीमधे लिहावी लागते. या कथेची सुरूवात अगदीच मिश्किल आणि हसतखेळत झालेली आहे. त्यामुळे वाचकाचा प्रत्येक पॅरामधे नुसता मूड बदलत राहतो. सुरूवात ते शेवट कुठेच सलग धागा दिसत नाही. कुठलंच कॅरेक्टर स्पष्टपणे उभं राहत नाही. लेखक कॅरेक्टर एस्टॅब्लिश करताना फक्त आणि फक्त "दिसायला कसे" याचे वर्णन करून थांबतो. त्यापुढची मानसिक अथवा वागणूक कुठेच नीट उभी करताना दिसत नाही. अनिकेत नावाचे कॅरेक्टर विकृत का आहे आणि तो बायकोला का मारतो (मी पहिल्याच प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे) याचे कारण इतके तकलादू आणि अक्कलशून्य आहे की पूर्ण कथा निर्बुद्ध झालेली आहे. जर नायक विकृत असेल तर त्याचे तसे स्पष्टीकरण द्यावे लागणार अथवा वाचकांचा मूड सुरूवातीपासून त्यासंदर्भात बनवायला हवा.

असो.

माझी एक साधी शंका आहे कथे बद्दलचः
अगदी बारका प्राणी झुरळ, उंदीर कुत्रा मांजर पक्षी असले तरी जिवावर बेतले तर जीव वाचवायचा नक्की आटोकाट प्रयत्न करतात. इथे एक जिवंत थिंकिंग ह्युमन बीइन्ग असे हसत मरण कसे स्वीकारेल? ती काहीच प्रयत्न करत नाही हे बरोबर वाट्त नाही.
प्रेमापेक्षा सेल्फ प्रिजर्वेशन मोटिव जास्त असतो माणसात. हसत मरण स्वीकारण्याचा संदर्भ रंग दे बसंती सिनेमात आहे पण ते अगदीच वेगळे आहे. अर्थात कथेतील मुलगी पात्र तसे असेल धीराचे.

मग ती कथा त्या प्लॉटला अनुसरून त्या शैलीमधे लिहावी लागते. या कथेची सुरूवात अगदीच मिश्किल आणि हसतखेळत झालेली आहे. त्यामुळे वाचकाचा प्रत्येक पॅरामधे नुसता मूड बदलत राहतो. सुरूवात ते शेवट कुठेच सलग धागा दिसत नाही. कुठलंच कॅरेक्टर स्पष्टपणे उभं राहत नाही. लेखक कॅरेक्टर एस्टॅब्लिश करताना फक्त आणि फक्त "दिसायला कसे" याचे वर्णन करून थांबतो. त्यापुढची मानसिक अथवा वागणूक कुठेच नीट उभी करताना दिसत नाही. अनिकेत नावाचे कॅरेक्टर विकृत का आहे आणि तो बायकोला का मारतो (मी पहिल्याच प्रतिसादात लिहिल्याप्रमाणे) याचे कारण इतके तकलादू आणि अक्कलशून्य आहे की पूर्ण कथा निर्बुद्ध झालेली आहे. जर नायक विकृत असेल तर त्याचे तसे स्पष्टीकरण द्यावे लागणार अथवा वाचकांचा मूड सुरूवातीपासून त्यासंदर्भात बनवायला हवा.
>>>
नंदिनीच्या ह्या पोस्टशी पूर्णपणे सहमत. तेच मी म्हणतेय कथा (मांडणी व लेखनशैली इ. सर्वच बाबतीत) पूर्णपणे गंडली आहे. हीच कथा कदाचित चाफ्याने किंवा इथे कथाविभागात जे कोण तगडे लोक आहेत त्यांपैकी एकाने लिहिली असती तर योग्य न्याय मिळू शकला असता.

इथे लोक लेखकाचा मेंदू कसा विकृत, प्लॉट कसा तद्दन फालतु इत्यादी कमेंट्स पास करत आहेत, जे मला योग्य वाटले नाही ते मी मांडले. अर्थात माझे मत म्हणूनच. वादाचा प्रश्न कुठे आला?

लिखाणापेक्षा लेखकावर जास्त फोकस होतोय अस नाही का वाटत?? good or bad- publicity is publicity!!!!!! या न्यायाने आपणच न आवड्लेली गोष्ट जास्त प्रसिद्ध करतोय अस मला वाट्त... हे अर्थात माझ मत!!!!

इथे लोक लेखकाचा मेंदू कसा विकृत, प्लॉट कसा तद्दन फालतु इत्यादी कमेंट्स पास करत आहेत, जे मला योग्य वाटले नाही ते मी मांडले. अर्थात माझे मत म्हणूनच. वादाचा प्रश्न कुठे आला?
<<

कथेतली पात्रे ही एक हज्जार टक्के लेखकाच्या डोक्याची उपज असतात. लेखकाच्या अनुभव/विचार-विश्वाच्या बाहेरचे ती पात्रे कधीही वागू/बोलू/थिंकू शकत नाहीत.

सर्व पात्रांच्या सर्व अ‍ॅक्शन्सबद्दल शेवटी लेखकच जबाबदार असतो. कारण त्याने कितीही म्हटले, की "कथेतील पात्रे स्वतःच डीक्टेट करतात" तरीही उदा. लेखकाला रशियन भाषा येत नसेल तर पात्र कधीच रशियन बडबड करू शकत नाही.

खलनायक हा खलनायकी वृत्तीने वागणारा दाखवून जर खलनायकाबद्दल वाचकाच्या डोक्यात खुन्नस तयार झाली तर ती लेखकाची 'अचिव्हमेंट'च आहे. एकाद्या कथानायकाच्या उदात्त देशप्रेमाने भारून जाऊन आपणही तसे वागलोत, तर तीही लेखकाची अचिव्हमेंट आहे.

अन नफा तुमचा, तसेच तोटाही तुमचा च या न्यायाने,

ओव्हरॉल कथेतून जर बहुतांश वाचकांना किळस येत असेल, तर ती 'लेखकाची चूक म्हणावी लागेल .'

मी कुणी मोठा लेखक नाही.( कथा वाचल्यावर तुम्हा सर्वांना अंदाज त्याचा आला असेलच )
कथा लिहिण्यासाठी जेव्हा मी सुरुवात केली, तेव्हा सर्व कथा मला विचित्र स्वभावावरच लिहायच्या होत्या.
त्यामुळे कथेतल्या ह्या व्यक्तिरेखा तुम्हाला विचित्र वाटणे साहजिकच आहे.

खरंतर कथा मायबोली वर पोस्ट केल्यावर त्यावर इतक्या कमेंट आल्या हे मी पाहिलेच नव्हते.
आज पाहिल्या तर ५४ कमेंट्स आल्या आहेत.... कमेंट्स माझ्या बाजूने नाही हि बाब निराळी.....
पण असो. बऱ्याच जणांना शिर्षकातल्या टिंबांमुळे जो काही त्रास झाला त्याबद्दल मी माफी मागतो.

आता कथेबद्दल थोडे सांगतो.
आजूबाजूला पहिले तर अनिकेतसारखे कित्येक नवरे आपल्याला दिसतील. कुणी खून ई. करत नाही हि गोष्ट वेगळी.पण आपल्या बायकोला त्रास देणारे नवरे आहेत हे एक निर्विवाद सत्य आहे.(याला तरी तुमचा विरोध नसेल असे मला वाटते.)
अनिकेतने खून करायला नको होता, हे जसे तुम्हाला वाटते तसे मलाही पटते.पण त्याने तो केला कारण तो स्वार्थी होता.स्वतःला बदलने नाही जमले त्याला.त्याने सोप्पा मार्ग निवडला.खरेच प्रेम (असे जगात काही आहे कि नाही हि शंका आहे) असते तर स्वत:लाच बदलण्याचा खटाटोप त्याने केला हि असता पण त्याने तो नाही केला.
आपण करतोय ती गोष्ट चुकीची आहे याची जाणीव त्याला हि होती.पण निर्णय घेण्यात तो चुकला.
विक्षिप्त स्वभावाचा हे एक नमुना.

जे कथेत घडले तसे खऱ्या आयुष्यात घडूच शकत नाही असा दावा तुमच्या पैकी कोण करू शकेल?

प्रश्न उरला तो मरतानाच्या हस्याबद्द्लचा.इथे कथेत फिल्मीपणा आलाय हे जरूर मान्य करतो.खरंतर मला तिथे दाखवायचे होते कि, मरतानाच्या शेवटच्या क्षणी का होईना क्षणभर तरी अनिकेतच्या डोळ्यांत पश्चाताप पाहून काव्याला क्षणभर सुख मिळाले.
कथा काल्पनिक आहेच, पण त्यातले एकुनएक स्वभाव मी स्वत: आजूबाजूला पाहिले आहेत

विशेष टिपण्णी:
माझ्या बुद्धीचे विश्लेषण करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी जो वेळ दिलात त्याबद्दल मी आभारी आहे.

मी अजुन हि काही कथा, काही परीच्छेद लिहिल्या आहेत. (ज्या तुम्हाला सहजिकच निरर्थक,तुच्छ वाटू शकतात.)
त्या वाचायच्या असतील तर माझी website वाचू शकता.

www.kshanaapule.com

आशिष,
माझे तुमच्यावर नितांत प्रेम आहे,
इकडे या.
मी गळा दाबतो तुमचा, मरताना क्षणभरका होईना माझ्या डोळ्यातला पश्चात्ताप पहा.. फाऽर बरे वाटेल पहा तुम्हाला. सुख मिळेल Wink (हे काल्पनिक आहेच, तरीही जरा कल्पून पहा.)

(खर्‍या रियल लाईफमधे, हजार मरणे अन हजार जन्म स्वतःच्या हातात झेलून पाहिलेला) डॉ. इब्लिस.

आशिष, तुमच्याकडे एखादं कथाबीज "फुलवण्याचं" कसब आहे. पण, आपल्याला कथेतून नक्की काय सांगायचं अन ते परिणामकारकरित्या कसं वाचकांपर्यंत पोचेल त्यावर नक्कीच काम करायला हवं.
अनिकेत नक्कीच विकृत मनाचा आहे. बायकोवरचं प्रेम अन स्वतःवरचा अविश्वास केवळ इतक्यावर तुमच्या कथेतला अनिकेत बायकोला ठार मारतोय. तो किती विकृत आहे त्याचं जराही चित्रण आलेलं नाही. एकदिवस उठून बायकोला ठार मारतो इतकच आम्हाला दिसतय. कथेचा निवेदक या निवेदनाला विरोध, पुरेसा विरोध करताना दिसत नाही.
मांडणी निंबुडा म्हणतेय तशी गंडलीये. इथे आलेल्या सुचना (तुमच्या बुद्धी-बिद्धीवरचे ताशेरे सोडून द्या... ) ध्यानात घेऊन पुन्हा लिहिणार का कथा?

तुम्ही कुणी मोठे लेखक नाही असं म्हणताय... ठीकय. पण त्या दिशेनं प्रवास व्हायला हरकतच नाही.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

Pages