श्रीखंड मिळतं, पण माणसं मिळत नाहीत

Submitted by रुपाली अलबुर on 30 March, 2010 - 05:37

परवाच माझी लेक अमेरिकेला गेली. जाताना आनंदात होती. खूप जास्त !!! जणू काही तेच तिचे आभाळ होते आणि आता तिला तिथे मुक्तपणे उडायला मिळणार होते.

आम्ही मध्यमवर्गीयच तसे !! तिचा जन्म झाला तेव्हा घरात २ लोखंडी खुर्च्या आणि ह्यांच्या बाबांची लोखंडी कॉट होती. माहेरून आलेले डिंकाचे लाडू संपेपर्यंत काय तो मला आराम मिळाला होता. पण तिचा जन्म हा जणू आमच्यासाठी सुख घेऊन आला. मामंजी म्हणाले तसे तिच्या रूपाने लक्ष्मी आली घरात.

ह्यांची प्रगती झाली. हा बंगला झाला आणि मग दृष्ट लागेल असे सुख घरात आले. म्हणून हिचं नाव 'संपदा' ठेवले ते सार्थच असे मामंजी नेहमी म्हणायचे. मामंजी गेले आणि आमचा त्रिकोणी संसार सुरु झाला.

संपदाची स्वप्नं मोठी होती नेहमीच !! तिला तिच्या बाबांसारखे business करायचा , मोठे व्हायचे, self identity मिळवायची हेच वाटत राहायचे. अभ्यासात तर जात्याच हुशार होती ती.

कधी कधी वाटायचे कि या दोघांपुढे माझे विचार किती खुजे आहेत. नवीन फ्रीज आणला तेव्हा तो खराब होऊ नये म्हणून मी त्यात पेपर अंथरला होता.' कित्ती टिंगल केली त्या दोघांनी मिळून माझी ! ' ...पण माझ्या माहेरचे साधे आयुष्य पण ते दोघे तितकेच enjoy करायचे !! म्हणून मग मलाच माझा हेवा वाटायचा. ' किती नशीबवान आहे मी !! सोन्याचा नाही हिऱ्या माणकाचा संसार वाट्याला आला आहे माझ्या ! ' असे उगाच वाटून जायचे .

ती शिकायला दिल्ली ला जाणार म्हणाली तेव्हा मी अगदी घर डोक्यावर घेतलेले . मग पुण्यातच शिकायचे पण MS साठी तिला जाण्याची परवानगी द्यायची या अटीवर माझे रडे थांबले होते. एकट्या पोरीला पाठवायचे कसे? बरे हिला अक्कल तरी पुरती आहे का ? असे भलते जग झाले आहे .हल्ली काय काय ऐकायला मिळते ! दिल्ली तर नकोच नको.

वाटलेले... विसरून जाईल MS चे खूळ हळू हळू. पण महत्वाकांक्षा काय तिला गप्पा बसू देते थोडीच ? आणि नाही नाही म्हणत अमेरिकेला जाण्याच्या परीक्षा , scholarship सगळे तिला हवे तसे घडत गेले. मी हरले नेहमीप्रमाणे !!

'तिचे यश तिला दूर घेऊन जाईल .दूर माझ्यापासून ..... माझ्या संस्कारांपासून !!' हि भीती मला कायमच होती.

' तिथे जाऊन ती तोकडे विचार , तोकडे कपडे, यांच्यात हरवून जाईल ....मला विसरून जाईल . एखाद्या भारतीय मुलाशीच लग्न करेल न ? कि कोणी गोरा माझा जावई होईल ? ' हे विचार कायमच मनात घर करून होते.

जेवताना तिचा फोन आला कि घास गळ्यातच अडकायचा . गळा दाटून यायचा आणि मग तेच पाणी पिऊन पोट भरायचे . असे करत वर्ष गेले आता !!!

शेजारच्या नेने काकू गेल्या मुलाकडे तेव्हा संपदा साठी म्हणून मुद्दाम श्रीखंड पाठवले मी . वाटले कि हसेल ती !! फ्रीज च्या वेळी हसली अगदी तशी . मला वेडी म्हणेल .तिचा बाबा म्हणतो मला तसे.

पण वाटले गोरी माणसे पाहून विटली नसेल . पण ते अन्न खाऊन तर कंटाळा आला असेल ना ? म्हणून उगाच काहीतरी खाऊ!!! नेने काकुनी काचकूच करून पाव किलो चा डब्बा नेला फक्त !! त्यांना पण मुलासाठी काय काय न्यायचे होते म्हणा !! नाहीतर नेले असते त्यांनी . अशी मीच मला समजावत राहिले.

इतक्यात फोन खणाणला . पलीकडून संपदाचा आवाज आला " आई ग कशी आहेस ? " आवाज ओला होता का ? रडत होती का माझी पोर ?

" काय गं? रडतेस बाळा ? " माझाही आवाज कापरा झाला होता

" नाही गं !! जराशी आठवण आली सगळ्यांची !! श्रीखंड मिळतं, पण माणसं मिळत नाहीत गं आई !! " आता मात्र ती माझी लेक वाटत होती. तिच्यातला खंबीरपणा अचानक कुठे हरवला होता कोण जाणे ?

संवाद संपला पण वाक्य मनात घोळत राहिले " श्रीखंड मिळतं, पण माणसं मिळत नाहीत"

माझी मुलगी तीच होती . तिचे विचार , संस्कार तोकडे नाही झाले. फक्त देश बदलला . भावना नाही . मी हरले नव्हते . माझे संस्कार जिंकले होते. मला तोकड्या वाटणाऱ्या दूरच्या देशातही!!!!

गुलमोहर: 

छान Happy

..

मस्त! एकदम खरंय...श्रीखंडच काय चितळेची बाकरवडी पण अगदी नाक्यावरच्या दुकानात मिळेल, पण आई नाही भेटत इकडे....!

छान!!!

मस्त विषय, चान्गला हाताळलाय Happy

[फक्त शीर्षकामुळे शेवट काय असेल ते आधीच कळतय, शिवाय शेवटचा "पन्च" अधिक अचूक, अधीक वर्मी घाव बसल्यागत यायला हवा होता असे वाटते, अर्थात हे माझे मत! पण गोष्ट जमलीये छानच, विचार करायला लावणारी]

Pages