एका विद्यार्थिनीसाठी तातडीने माहिती हवी आहे.
एका ठिकाणी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स / रोबोटिक्स / काँप्युटर इंजिनियरिंग अशा तीन शाखांपैकी एकीची निवड करायची आहे. आर्टिफिशिअल इंजिनिअरिंग अशी स्पेशलायझेशन असलेली पहिलीच बॅच असणार आहे. तिकडे प्रवेश घ्यावा कि रेग्युलर कंप्युटर इंजिनिअरिंग करून आर्टिफिशिअल इंजिनिअरिंगचे कोर्सेस करावेत किंवा पीजी करावे ? आर्टिफिशिअल इंजिनिअरिंग करून ज्या संधी मिळणार आहेत त्या कंप्युटर इंजिनिअरिंग करूनही मिळू शकतात का ? मी या क्षेत्राशी संबंधित नाही . त्यामुळे प्रश्न विचारताना चूक झाली असेल तर समजून घ्यावे.
कि रोबोटिक्सला प्रवेश घ्यावा. मुलींसाठी हे क्षेत्र कसे आहे ?
गरीबीतून आलेले कुटुंब आहे. आईने कष्ट करून मुलांना शिकवले आहे. एक्स्पोजर नसल्याने काय करावे याची माहिती नाही. खासगी कॉलेजच्या सीईटीत पास झाल्याने कॉलेजेस मागे लागले आहेत. एआय चांगले आहे असे त्यांना सांगण्यात आले आहे. जेईई नंतर प्रवेश मिळेलच असे नाही. तोपर्यंत थांबलात आणि इथे जागा संपल्या तर असा पेच पडला आहे. ( ही शंका इथे विचारायची नाही). पण जर या कॉलेज मधे प्रवेश घ्यायचा झाला तर कोणते क्षेत्र निवडले पाहीजे ?
मायबोलीवर या विषयातले जाणकार असल्याने इथे विचारल्यास फायदा होईल म्हणून हा प्रपंच. कृपया या विद्यार्थिनीला योग्य सल्ला द्यावा ही नम्र विनंती.
( आपण देणार असलेली माहिती नंतर कदाचित इतरांनाही उपयोगी पडू शकेल).
आर्टिफिशिअल इंजिनिअरिंग
आर्टिफिशिअल इंजिनिअरिंग पहिल्यांदाच ऐकतो आहे. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स हे क्षेत्र सध्या तेजीत आहे. पण तरी तिन्ही क्षेत्रांतील विषयांची नीट माहिती काढून ' क्या बिकता है ' यापेक्षा काय कळेल आणि काय करायला आवडेल याला महत्त्व देऊन निवडावे एवढे सुचवू शकतो.
इथे कोणी 'एआय' मध्ये
इथे कोणी 'एआय' मध्ये अंडरग्रॅड केलेलं असण्याची शक्यता नाही वाटत. किंबहुना असं काही असतं हेच मला नव्याने समजलं तुमची पोस्ट वाचुन.
कुठलं कॉलेज आहे, कुठलं विद्यापीठ आहे, फॅकल्टी काय आहे, सुविधा काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं नक्की काय शिकवणार आहेत याची माहिती घ्या आणि ठरवा. याची माहिती मिळाली नाही तर माहिती असलेलं शिक्षण घ्या.
पुढे एआय मध्ये जरी समजा काम करायचं असेल तर त्यात अंडरग्रॅड शिक्षण घ्यायची काहीच गरज नाही. कम्प्युटर सायन्स मध्ये इंजि. केलं तरी वरील कुठल्याही क्षेत्रात काम करता येईल.
रच्याकने: स्वानुभावरुन डबल-ई मध्ये केलं तरीही करता येईल.
मला स्वत:ला हे असे कोर्सेस रॅबिट होल वाटतात. इतकं स्पेसिफिक इतक्या लवकर शिकू नये असं वाटतं. झापडबंद वृत्ती बनेल असं ही वाटतं. पण तुम्ही ठरवा.
आमच्या वेळची क्षेत्रं आता
आमच्या वेळची क्षेत्रं आता बहुधा कालबाह्य झाली आहेत असे वाटते. माझ्यासारखे लोक तर बावचळून जातात कोर्सेसची नावे वाचून सुद्धा. काहीही ओळखीचे नाही.
पूर्वी फक्त संगणक अभियांत्रिकी अशी शाखा होती. त्या आधी मेकॅनिकल / इल्क्ट्रिकल / सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स एव्हढेच कोर्सेस जास्त संख्येने असत. मरीन / इन्स्ट्रुमेण्टेशन / माईन अशा शाखा काही ठिकाणीच होत्या. (माईन इंजिनिअरिंग साठी देशभरात ७० जागा होत्या).
ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग नावाचे क्षेत्र नुकतेच सुरू झाले होते. ऑटोमोबाईलला जाऊ पाहणार्यांची संख्या लक्षणीय होती. त्या वेळी कॉलेजच्या प्राचार्यांनी खूप छान सल्ला दिला होता. सर म्हणाले ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग नंतर त्या क्षेत्रात चांगली संधी आहे. सर्वात जास्त पगार देणारे क्षेत्र आहे. पण मेकॅनिकल इंजिनरिंग नंतर तुम्हाला अनेक ठिकाणी संधी उपलब्ध आहेत. जर ऑटोमोबाईल इंजिनरिंग करून नंतर त्या क्षेत्रात नोकरी मिळाली नाही आणि स्वयंरोजगाराचा विचार नसेल तर पुढे काय याचा विचार केला आहे का ?
@ हपा - माफ करा नाव चुकले
@ हपा - माफ करा नाव चुकले होते.
@ अमितव - धन्यवाद. तुमच्या म्हणण्याप्रमाणे कंप्युटर इंजिनिअरिंग करूनही पुढे ए आय या क्षेत्राकडे वळता येईल असेच ना ?
मला यातली माहिती नाही.
>>>>
>>>>
इंजिनिअरिंग करूनही पुढे ए आय या क्षेत्राकडे वळता येईल असेच ना ?
>>>>
अमित त्यांचे मत सांगतीलच
मी स्वतः गेली 20_22 वर्ष सॉफ्टवेअर क्षेत्रात काम करतेय, त्यावरून माझं असं मत झाले आहे की, अशा वेगवेगळ्या स्पेशलायझेशन येतच राहणार आहेत. सध्या कम्प्युटर सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन करून मग नंतर AI सारखं क्षेत्र निवडणं त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इतर काही कोर्सेस करणं जास्त असेल असं मला देखील वाटतं
हो.
हो.
स्वगतः हे वाचू नका.
कुठेही घ्या. एखाद दोन कोर्सेस बदलतील बाकी सगळे कोर्सेस चारही वर्षे सारखेच असतील.
बेसिक कोडिंग, ओएस, ऊप्स, डेटाबेस, मेमरी मॅनेजमेंट, सिस्टिम्स, डेटा टाईप्स, कचराव्यवस्थापन, डिझाईन पॅटर्न्स, आयपी कम्युनिकेशन इ शिकवेस्तोवर चौथं वर्षं उजाडेल. मग एखाद एआय मॉडेल, प्रोजेक्ट करतील की झालं.
रोबॉटिक्स केलंत तर आरटॉसचा प्रोजेक्ट करवतील.
आणि कुठलं स्पेशलायझेशन करुन कोणाला युआय, युएक्स करवतील.
इतकं सगळं करुन इंटरव्हू घेताना बिग ओ च्या पुढे जाणार नाहीत. :डोक्याला हात:
कोर क्षेत्रात (CS/Mech/Civil
कोर क्षेत्रात (CS/Mech/Civil/elect/chemical) पदवी घेवुन नंतर आपल्या आवडीप्र्माणे Specialization मधे PG करावे असे मला वाटते.
आता विषय निघालाय म्हणुन - मुंबईत केमिकल इंजिनिअरिंग साठी चांगली कॉलेजेस सुचवा. (IIT & ICT सोडुन)
अमितच्या अख्ख्या पोस्ट ला +१
अमितच्या अख्ख्या पोस्ट ला +१
विशेषत: हे वाक्य
>> इतकं स्पेसिफिक इतक्या लवकर शिकू नये असं वाटतं.
>> मुंबईत केमिकल इंजिनिअरिंग
>> मुंबईत केमिकल इंजिनिअरिंग साठी चांगली कॉलेजेस सुचवा. (IIT & ICT सोडुन)
आमच्या काळात UDCT होतं केमिकल साठी. आता नाव बदललंय बहुतेक.
ताक: ओके आता UDCT लाच ICT म्हणतात तर. आता सल्ले देण्याऐवजी मुलांसाठी सल्ले मागायची वेळ आलीय
UDCT is now ICT (institute of
UDCT is now ICT (institute of Chemical Technology)
जेईई नंतर प्रवेश मिळेलच असे
जेईई नंतर प्रवेश मिळेलच असे नाही>>Take provisional admission & wait for JEE and MH-CET result. चांगल्या सरकारी कॉलेजात मिळाल तर चांगभलं. यावेळी JEE & MH-CET उगाच खुपच लांबवल्यात. शक्य असल्यास हे कुठले कॉलेज आहे सांगाल का?
अमितच्या सर्व पोष्टींना,
अमितच्या सर्व पोष्टींना, स्वगतासकट +१
इतकं स्पेसिफिक इतक्या लवकर शिकू नये असं वाटतं >> अगदी खरं आहे. शिक्षणाचं क्षेत्र जितकं विस्तृत, तितके पुढे जास्त पर्याय उपलब्ध राहतात. त्यामुळे वरील तीन पर्यायांपैकी संगणक अभियांत्रिकी हा पर्याय त्यातल्या त्यात बरा वाटतो.
<< खासगी कॉलेजच्या सीईटीत पास
<< खासगी कॉलेजच्या सीईटीत पास झाल्याने कॉलेजेस मागे लागले आहेत. एआय चांगले आहे असे त्यांना सांगण्यात आले आहे. >>
------- AI चांगले आहे असे कुणी सांगितले आहे? माझ्या मते प्रत्येकच विषय " चांगला " असतो... तुम्हाला तुमचे ज्ञान/स्किल विकण्याची कला अवगत नसेल तर AI च्या डिग्रीने फार काही फरक पडत नाही.
तिन अगदी भिन्न विषय आहेत ( किंवा थोडा ओव्हरलॅप असेलही...). प्रत्येक विषयाची माहिती करुन घ्यायला थोडा वेळ घ्या ( १-२ दिवस आणि चार सहा जणांशी चर्चा ठिक राहिल). exposure नाही आहे / नव्हते हा मार्गातला अडथळा बनत नाही (सर्व माहिती आंतरजालावर सहजपणे मिळते). कुठल्या विषयांत आवड आहे हे स्वत: ला विचारा.
Engineering (तसेच विज्ञान शाखेत) मधे विद्द्यार्थी मिळत नाहीत म्हणून कॉलेजेस मागे लागली आहेत अशी परिस्थिती आहे का? घाई करण्यात अर्थ नाही. ३-४ वर्षे शिकायचे आहे, अमुल्य असा वेळ आणि पैसा खर्च होणार आहे तर निर्णय घेण्याअगोदर प्रत्येक विषयाचा थोडा अभ्यास करुन मगच स्वत: निर्णय घ्या.
शुभेच्छा.
स्नेहमयी आणि अमितव धन्यवाद.
स्नेहमयी आणि अमितव धन्यवाद. अमितव तुमची दुसरी पोस्ट आवडली.
मंदारडी, हपा, शांमा आभार.
उदयजी, तुमच्या शुभेच्छा पोहोचवीन नक्की. आमच्या कडे पूर्वी कामाला असलेल्या मावशींच्या मुलीसाठी विचारणा केली होती. त्यांना नक्की उपयोगी पडेल अशी माहिती मिळतेय.
गुगल करण्यापेक्षा या क्षेत्रात कार्यरत असणारे जास्त उत्तम मार्गदर्शन करू शकतील हा विश्वास वाटतो.
__/\__
आमच्या वेळी बरं होतं. आमच्या
आमच्या वेळी बरं होतं. आमच्या वेळच्या इंजिनियरिंगच्या ब्रांचेस बद्दल सर्वांना माहिती असायचं. मुंबईत तर प्रश्नच यायचा नाही. पण ग्रामीण भागातल्या शहरात आणि गावातल्या मुलांना प्रॉब्लेम असायचे. कंपन्यात काय चालतं , कुठले कुठले डिपार्टमेण्ट्स असतात याची माहिती नसायची. एमएनसी मधे ही मुलं बुजायची. माझ्यासारखे थोडेच एमएनसीच्या चकचकीत वातावरणात टक टक बूट वाजवत लिपस्टीक लावलेल्या मुलींचे लक्ष वेधून घ्यायचे.
आत्ताच्या कोर्सेस ची नावं ऐकली तरी हे हॅरी पॉटरचं जग वाटतंय. त्यातल्या त्यात सी आणि सी ++ इतकंच कानावरून गेलं आहे. मुलगी मोठी होईल तेव्हां एक धागा निघणार ही कादरेआ.
चांगला धागा. चांगली चर्चा.
चांगला धागा. चांगली चर्चा.
Engineering (तसेच विज्ञान शाखेत) मधे विद्द्यार्थी मिळत नाहीत म्हणून कॉलेजेस मागे लागली आहेत अशी परिस्थिती आहे का? घाई करण्यात अर्थ नाही. ३-४ वर्षे शिकायचे आहे, अमुल्य असा वेळ आणि पैसा खर्च होणार आहे तर निर्णय घेण्याअगोदर प्रत्येक विषयाचा थोडा अभ्यास करुन मगच स्वत: निर्णय घ्या. >>>>> उदय यांच्या प्रतिसादातला हा विचार करण्यासारखा भाग आहे. पण विद्यार्थी मिळत नाहीत किंवा जाग भरल्या जातात हे दर वर्षी एण्ट्रस एक्झॅमच्या निकालानंतरच समजत असणार. आत्ताच्या प्रवेश परीक्षेत सरकारी कोटा किती असतो ? खासगी कॉलेजेसना स्वतःच्या एण्ट्र्स घ्यायची परवानगी का आहे ? तशी परवानगी दिली असेल तर सीईटीचा निकाल लागण्याआधी ते घाई करणार. भीती दाखवणार. आपले मूल असेल तर आपण तटस्थपणे विचार नाही करू शकत. चांगले कॉलेज असेल तर अॅडमिशन घेणारच.
exposure नाही आहे / नव्हते हा मार्गातला अडथळा बनत नाही (सर्व माहिती आंतरजालावर सहजपणे मिळते) >> त्यांच्या प्रतिसादातले हे वाक्य आणि अजून एक वाक्य पटले नाही. समजा धुणी भांडी करणारी एकटी बाई आहे, मुलाला तिने कर्ज काढून शिकवलेय तर ती कशी काय गुगल करेल ? मुलाला तरी अशी कितीशी माहिती असेल ? वातावरणाचा फरक पडतो.
खूप वर्षापूर्वी नात्यातला एक जण गेल्यावर त्याच्या बायकोने मुलाला कमी मार्क्स पडले असताना पण इंजिनियरिंगला घालायचा हट्टीपणा केला होता. तिला समजावून पण सांगितले होते. पण नवर्याची इच्छा पूर्ण करायची या जिद्दीने बाईने मिळेला तिथून कर्ज काढले, घर , जमीन गहाण टाकली. मुलाला जरी बारावीला कमी होते तरी इंजिनियरिंगला चांगले मार्क्स पडले. पण तो पास होताना मंदी आल्याने नोकरी मिळाली नाही. सगळेच विषय चांगले असतात हे पटत नाही. ज्याच्याकडे पैसा आहे, उत्तम चालले आहे त्याने काहीही शिकावे. ज्याचावर जबाबदार्या आहेत त्याला इतिहास विषय घेऊन चालेल का ? उपाशी पोटी संशोधन करून त्याला कुणी नोकरी देईल का ? शिक्षण म्हणजे पोटापाण्याला लागण्याचे साधन असाच अर्थ आहे सध्याचा.
रानभुली, पण “ त्या“
अमितवच्या पोस्टला दुजोरा.
>>अमुल्य असा वेळ आणि पैसा
>>अमुल्य असा वेळ आणि पैसा खर्च होणार आहे तर निर्णय घेण्याअगोदर प्रत्येक विषयाचा थोडा अभ्यास करुन मगच स्वत: निर्णय घ्या. <<
याचबरोबर त्या मुलीची आवड काय आहे, कशात गती आहे याचा पडताळा घ्या. एआय मधे कोर्स सुरु झाला यात नवल काहिहि नाहि. आमच्या वेळेला एम्सिए कोर्स सुरु झाला तेंव्हा देखील नाकं मुरडली गेली होती. असो. शिवाय शेवटि कोडिंगच करायचं असेल तर त्याकरता कुठल्याहि डिग्रीची गरज नाहि. इंग्लिश लिटरेचरचा पदवीधर निव्वळ पाय्थन शिकुन पिएचडिंना लीड करताना बघतोय...
कंप्युटर सायन्स करून
कंप्युटर सायन्स करून रोबोटिक्स, AI मध्ये जाता येते. बरेचदा सेम कोर्सेस असतात आणि जस्ट फॅन्सी नाव दिलेले असते. (जस आमच्या वेळी इलेक्ट्रॉनिकस ला इंडस्ट्रिअल इले. अस नाव होत. इंटरव्ह्यु देताना प्रश्न विचारायचे आमच्या बॅच मधील लोकांना ही कसली डिग्री म्हणुन. )
सध्या कम्प्युटर सायन्स मध्ये
सध्या कम्प्युटर सायन्स मध्ये ग्रॅज्युएशन करून मग नंतर AI सारखं क्षेत्र निवडणं त्यात पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा इतर काही कोर्सेस करणं जास्त असेल असं मला देखील वाटतं >>> याला, आणि अमितच्या
पुढे एआय मध्ये जरी समजा काम करायचं असेल तर त्यात अंडरग्रॅड शिक्षण घ्यायची काहीच गरज नाही. कम्प्युटर सायन्स मध्ये इंजि. केलं तरी वरील कुठल्याही क्षेत्रात काम करता येईल. >>> याला +१
कोर्सचे नाव एआय असेल पण ३-४ वर्षाचा कोर्स असून सुरूवातीला Fundamentals पासून शिकवून मग शेवटी एआय किंवा इतर स्पेशलायझेशन शिकवणार असतील तर चालेल.
शिवाय ते ए आय वाले कॉलेज कुठे
शिवाय ते ए आय वाले कॉलेज कुठे आहे हेही महत्वाचे ! पुणे मुंबई असेल तर ठीक पण आडगावी असेल तर ए आय चे चांगले प्रोफेसर्स तिथे शिकवणार नसतील, इंडस्ट्री शी संबंध नसेल हेही आहे. अमीत व फा +१
८० व ९० च्या दशकात
८० व ९० च्या दशकात कॉम्प्युटर्स व सॉफ्टवेअर मधे ज्या लोकांनी मोठी कामगिरी केली ते बहुतांश इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मधून पदव्या घेतलेले होते. फिजिक्स, मॅथेमॅटिक्स वगैरे मधलेही होते. कॉम्प सायन्स जरी लेट ८०ज मधे सुरू झाले तरी त्यात नोकर्या थोड्या नंतर आल्या - किमान भारतात. अजूनही मूळ सायन्स किंवा इंजिनियरिंग असेल तर सहसा ती व्यक्ती संगणक क्षेत्रात पुढे जाउ शकते नंतर. दुसरे म्हणजे अनेक कंपन्या त्या विषयातील कौशल्यापेक्षा जनरल Aptitude बघत आधी. सध्याचे माहीत नाही.
याबद्दल नक्की काय निवडा याबद्दल कोणालाही सल्ला देताना मलाच प्रश्न पडतो:
- कॉम्प्युटर क्षेत्रात चलती असलेल्या विषयात पदवी घेतली व बाकी हुषारी असेल तर लगेच चांगली नोकरी, भरघोस पगार व परदेशी संधी वगैरेचे चान्सेस असतात. पण आता शिक्षण पूर्ण करण्याच्या बेतात असलेल्यांना पुढची ३०-४० वर्षे विचार केला तर तीच स्पेशलायझेशन्स तितकीच डिमाण्ड मधे राहतील का असा प्रश्न पडतो. ती तशी राहिली नाहीत तर मग असे लोक दुसरे काय करीयर करणार? जर त्यांनी जनरल सायन्स, बिझिनेस किंवा इंजिनियरिंग केले नसेल तर त्यांना इतक्या सहजी इतर क्षेत्रात जाता येइल का?
- जनरल सायन्स, बिझिनेस किंवा इंजिनियरिंग मधे पदवी घेतली तर कदाचित सुरूवातीला नोकरी इतक्या सहजी मिळणार नाही व पगारही (वरच्या) तुलनेने कमी मिळू शकतात. पण ३०-४० वर्षांच्या करीयर मधे हातात पर्याय राहतात असे वाटते. पण समाजात "नेटवर्क" नसलेल्या सामाजिक गटातून वर येणार्या, व ओळखी, आत्मविश्वास, इंग्रजी व एकूण प्रोफेशनल वागण्यातील सफाई ई. नसलेल्या विद्यार्थ्यांना यातून पहिली संधी मिळण्यात खूप अडथळे असतात. त्यामानाने चलती असलेल्या क्षेत्रात तुलनेने लौकर संधी मिळू शकते, त्यातील प्रचंड डिमाण्ड मुळे.
या दोन्हीची कल्पना आपण देउन मग त्यांना निर्णय घेउ द्या.
(हे मी मुख्यतः संगणक क्षेत्रातील माहितीतून लिहीलेले आहे. बायोटेक वगैरे इतर संलग्न क्षेत्रे आहेत जेथे सुद्धा भरपूर वाव आहे. पण मला त्यातली माहिती नाही)
फारएण्ड +१
फारएण्ड +१
फा +१
फा +१
शेवटी प्रॉब्लेम सॉल्विंग, पर्झविअरंस इ. इ. स्किल्स सगळ्यात जास्त पोर्टेबल असतात. बेसिक शिकलेलं असलं की नवं शिकायला फार वेळ लागत नाही. जी काही स्क्लिल्स असतील ती पोर्टेबल असली, किंवा बरोबर पोर्टेबल काही असलं की मरण नाही.
विचार करणे, गूगल करुन उत्तर शोधणे ही पोर्टेबलची सुरुवात आहे.
कितीही अनुभव असला तरी नोकरी
कितीही अनुभव असला तरी नोकरी बदलताना तंतोंतंत (हा शब्द शब्दखूळ चाराक्षरी मध्ये येईल तेव्हा जाम मजा येईल ) स्किल्स मॅच होण शक्य नसते आणि एकच काम करुन कंटाळा आला की आपल्याला दुसर्या क्षेत्रात काम करावसं वाटतं. तेव्हा हे असे पोर्टेबल स्किल्स असले की तुम्ही कुठेही सामावले जाऊ शकता.
Hello... Amitav aani Snehmayi
Hello... Amitav aani Snehmayi hyanchya shi sahmat.
Last year eka family chya mulilaa diploma to degree admission la help keli. Teva asa lakshaat aale ki ajunahi general preference is for well established branches.
AI, IOT, Electronic and computer science, few more branches are relatively new. Most of the seats are going empty. College usually try to fill up seats externally. College need certain headcount to branch running. Some colleges may also merge/transfer branches in future if headcount not achieved.
Tarihi subjects check kele tar details jast kalu shaktat.
New branches la study material, teacher availability issue yetat.
Parat past year che paper reference sathi milana shakya nasta.
So neat vichar karun nirnay ghyava....
अजूनही मूळ सायन्स किंवा
अजूनही मूळ सायन्स किंवा इंजिनियरिंग असेल तर सहसा ती व्यक्ती संगणक क्षेत्रात पुढे जाउ शकते नंतर. >> अगदी सहमत (स्वानुभव )
अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अंडरग्रॅडची मुले ( USमधील अनुभव, भारतात कसे असते याची कल्पना नाही ) पहिल्या-दुसऱ्या वर्षापासूनच (पेड) रिसर्च, fall/summer internships, co-op करतात. त्यांमुळे आपल्याला काय आवडतंय (undergrad majors & minors बदलणे) आणि काय जमतंय याचा त्यांना अंदाज येतो. त्याशिवाय, बरोबरची मित्रमंडळी, प्रोफेसर्स, university advisors,TA यांच्याशी वेळोवेळी बोलून अंडरग्रॅडनंतर पुढे मास्टर्स, जॉब, study abroad किंवा मग अगदी world travel वा community service projects वर काम करायचे याचादेखील त्यांचा जुनियर इयरलाच पक्का निर्णय झाला असतो.
प्रतिसादांत इतरही अनेक महत्वाचे मुद्दे आले आहेत, सर्वतोपरी विचार करून योग्य निर्णय घ्या.
सगळ्याचे चांगले प्रतिसाद.
सगळ्याचे चांगले प्रतिसाद.
हल्ली खासगी कॉलेज (जे स्वताची डीग्री देतात ते) स्वताची प्रवेश परिक्षा घेतात . ही काही सीईटी (Common Entrance Test) नसते आणि त्या कॉलेज किंवा त्याचा शाखेपर्यन्त मर्यादित असते. ज्याचे रॅकिंग कमी तो प्रवेश परिक्षा लवकर घेतो. उदा SRM University नी जानेवारीपासुन परिक्षा घेण्यास सुरवात केली. ज्यानी जानेवारीत परिक्षा दिली की दोन दिवसात रिझल्ट येतो आणि त्यानी मग लगेच प्रवेश घ्यायचा. मणिपाल नी मे मध्ये तर वेल्लुर ने जुन मध्ये त्यानंतर BITS मग JEE. आधी अॅडमिशन घेउन ठेवली आणि नंतर रद्द केली तर बर्यापैकी पैसे वाया जातात. काही मुले रिस्क कमी करण्यासाठी आधी एक प्रवेश घेतात मग चांगल्या कॉलेज मध्ये मिळाली की आधीची अॅडमिशन रद्द करतात मग आजुन चांगल्या कॉलेज मध्ये मिळाली की दुसर्या कॉलेज ची अॅडमिशन पण रद्द करतात. ह्या मध्ये कॉलेज चा खुप फायदा होतो.
आणखी एक, काही खाजगी कॉलेज अॅडमिशन परिक्षा दिली की अॅडमिशन घेण्यासाठी बायजु सारखे मागे लागतात. त्यामुळे काय पाहिजे ते विचार करुन निवडणे.
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार.
या चर्चेतून एक गोष्ट समजली ती म्हणजे जर कॉम्प्युटर सायन्स / इंजिनिअरिंग केलं तर पुढे स्पेशलायझेशनला वाव राहतो. तसेच काही वर्षांनी नवीन क्षेत्रात बूम असेल तर तिकडे शिफ्ट होता येईल असा बेस पक्का हवा. याबद्दल आभार सर्वांचे.
अवांतर : सर्वांना वेगवेगळे उत्तर देत नाही. इतर सर्वांनी चांगलेच सल्ले दिले आहेत. ते ही त्यांना वाचून दाखवीनच. शेवटी त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. पुढे चांगले होईल/ व्हावे या सदिच्छा ! कॉलेजच्या स्टाफने त्यांची परिस्थिती पाहून सध्या १००० रूपये भरा आणि प्रवेश निश्चित करा, जर दुसरीकडे चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळाला तर घेऊन टाका अशी ऑफर दिली आहे. तसेच एका महिला प्राध्यापिकेने कोणत्या तरी संस्थेतून फीस साठी मदत मिळवून देईन असे आश्वासन दिले आहे. मुलगी मेहनती आहे त्यांची लाडकी आहे. इथे प्रवेश घेतला तर आम्ही लक्ष देऊ शकतो असे ते म्हणाले आहेत.
( मुलीची आवड - तिला स्वतःला कसलाची लांबचा विचार नाही. काहीही समजत नाही. घरी कुत्र्याचे पिल्लू आणलेय म्हणून व्हेटर्नरी व्हायचेय असे म्हणतेय. व्हेटर्नरी करून पुढे काय हे तिला माहिती नाही. पिल्लाची सेवा हे उत्तर आह)).
लोक तिची परिस्थिती जाणून मदत
लोक तिची परिस्थिती जाणून मदत करत आहेत हे वाचून छान वाटलं. बाकी आयुष्याबद्दल म्हणाल, तर काय करायचं ते सगळ्यांनाच आधीपासून माहीत असतं असं नाही. शिवाय वरीलपैकी कुठलाही निर्णय घेतला, तरी त्यावर यश अपयश ठरत नाही. बाकी बऱ्याच गोष्टी असतात आयुष्यात. कळेल तिलाही हळूहळू. त्या मुलीला मनापासून शुभेच्छा.
Pages