सैराट - रिव्यु (रीडः कौतूक)

Submitted by वैद्यबुवा on 10 June, 2016 - 16:29

पाहिला बॉ एकदाचा! अंमळ उशिरच झाला म्हणायचा बघायला. खरं तर बघायचा प्लन पण नव्हता आजिबात, असच टिपिकल स्टोरी असेल जरा चांगली गाणी असलेली म्हणून फार लक्ष नाही दिलं. पुढे थेट्रात पुढे जाऊन पबलिक नाचतय वगैरेचे व्हॉट्स अ‍ॅप विडियो यायला लागले आणि मसालाच आयटम दिसतोय असं मनोमन अधोरेखित झालं आणि नाद सोडून दिला.
मग आत्ता काही दिवसांपुर्वी माझे बेकरी फ्रेंड फारएण्ड ह्यांनी टिपापा ह्या ठिकानी येऊन नव्यानं एकदा सैराटच्या कौतूकाचं खातं उघडलं तेव्हा माझे कान परत वर गेले. मग पुढे बाकी इतर फ्रेंडांनी पण तीच री ओढली आणि ते टाकत असलेल्या पोस्टींमुळे माझ्या डोक्यात वातावरण तयार होऊ लागलं. निव्वळ ह्या पोस्टींमुळे मी सैराटची गाणी एकायला आणि पिकचर बघायला घेतला!
२-३ दिवसांपुर्वी सुरवातीची फक्त २० मिनिटं हा सिनेमा बघितला आणि मला त्या सिनेमानी खिशात घातलं! कित्येक दिवसांनी किंवा वर्षांनी एखाद्या पिकचरची झिंगं चढली असं झालं!!!
कुठल्या शॉट बद्दल अन कुठल्या गाण्याबद्दल किंवा कुठल्या एक्स्प्रेशननांबद्दल बोलावं अन किती बोलावं हेच समजेनासं झालय. लोकं आपापल्या अँगलनी सिनेमे बघतात, त्यांना त्यातून बरच वेगळं काही काही सापडतं आणि वेगवेगळ्या कारणांमुळे एखादा सिनेमा त्यांना आवडतो.
एक सिनेमा म्हणून स्वतंत्रपणे तो पिकचर छान असला तरी माझ्याकरता तरी ह्या पिकचरनी काही केलं असेल तर कॉलेजच्या दिवसांपासूनचा पुढचा काही काळ मला अक्षरशः परत जगवून आणलय!

सुरवातीच्या मंजुळेंच्या कॉमेंट्री पासून जी काही एकेक प्रसंगांना सुरवात होते, माणूस त्यात हरवूनच जातो!
काय त्यांची ती कॉमेंट्री अन ते रखरखलेल्या उन्हातलं मैदान अन ते पॅविलियन, ते ढोल तडम ताशे वाले अन सरवात महत्वाचं म्हणजे मॅच सुरु असलेल्या दरम्यान त्या प्लेयरांचं एकेक बोलणं!
लंगड्याच्या "हे हलगथ कोन पाठवलं रे ." " मंग्या मंग्या आरं नीट खेळ मंग्या नीट खेळ!अरं बॉल बघाय आधी बॅट नगं न फिरवू" पासून पुढे परत मंगेश मोहिते पाटलांनी बॉल हुकवल्यवर त्याच्या संतापाचा अक्षरशः अंत होतो तेव्हा " मला खेळायचच नै जा..." म्हणून बॅट सोडून ऑल्मोस्ट तो चालायलाच लागतो हा प्रसंग त्यातली लंगड्याची तळमळ किती लोकांनी अनुभवलेली आहे? Lol कधी आपण लंगड्याच्या बोटीत शिव्या घालत असतो तर कधी कधी मंग्याच्या सुद्धा बोटीत कारण "अर किती फाष्टाक्तोय बघ्तोन तू?" असाही प्रसंग येऊन गेला असेलच (तुम्ही अगदी स्टार बॅट्समन नसाल तर नक्कीच येउन गेला असेल).
मधल्यामध्ये बिली बाऊडींग अन शकुना आत्याचा सीन पण खल्लास आहे! किती वेळा पोरं आया, आज्या बोंबल्त आल्याकी बॉल बॅट हातात जे असेल ते टाकून पळायचे. फोर सिक्सच्या अ‍ॅक्शन पण कहर आहेत! एकदम किडमिडीत अंगकाठी अन त्यावर बनियन, डोक्याला आधी फडकं अन मग त्यावर कॅप! पुर्वी अंपायर लोकं खुप वेळा तसं करायचे! निरिक्षण सॉलिड आहे मंजुळेंचं किंवा ज्यानी कोणी डिटेलिंग केल्य त्याचं.
पर्श्यानी आधी फोर सिक्स मारल्यावर लंगड्याच्या एकेक शिवीसुचक हातवारे (काही न बोलता नेमकी काय शिवी दिली हे लगेच कळतं Lol ) अन पुढे म्याच जिंकून दिल्यावर आडम तिडम मुद्दाम हारलेल्या टीम समोर केलेला नाच!
इतकं बारिक आणि चोख निरिक्षण म्हणजे काय चेष्टाय का राव? अन त्यापेक्षाही ते बरोबर शॉट मध्ये उतरवणं म्हणजे फार भारी! नागराज मंजुळेकी जय!

पुढे तात्यासाहेबांचं भाषण ज्यात खरं एक पुढे होऊ घातलेल्या काही गोष्टींना किती महत्व आहे हे अधोरेखित करणारं वाक्य आहे. "अहो तालुक्याचं राहुद्या आधी आपल्या बायका संभाळा म्हना ह्यांना..." असं ते म्हणतात.
थोडक्यात घरातल्या बाया/मुली ह्यांच्याशी स्वतःची अन घराण्याची इज्जत बांधलेली आहे ह्या टाईपची विचारसरणी असलेलं घर आहे. आणि हे बोलताना त्या सोनलताई का कोण असतात त्या शेजारीच बसलेल्या असतात. Happy
(ह्याच संदर्भात अजून एक गंमत म्हणजे तात्यासाहेबांच्या बंगल्याचे नाव अर्चना असतं))

नंतर विहिरीचा सीन. तिथे आर्चीची हापिशियल एंट्री होते अन क्या बॉस एंट्री बोले तो एंट्री आहे पोरीची! अर काय एक्स्प्रेशन अन काय तो कान्फिडन्स अन काय तो हेल बोलण्याचा! झन्नाट! ती ज्या पद्ध्तीनी येऊन विहिरीवर एक पाय ठेवून वाकून खाली बघते त्यातच सगळं येतं! पाटलाची पोरगी असल्याचा शुद्ध माज!
अय रत्ताळ्या निग्ग्कीरं भैर... आत्तागंबया भैरा बिराएकाकाय.... अय अय खुळखुळ्या उभाssssर!!!!

खलाssssस... अरे लेडी गब्बर वाटते ती इथे!!! (थांबा अजून! पुढे मी अजून तिचे अन तिच्या अ‍ॅक्टिंगच्या तारिफांचा पूल बांधणारच आहे. ही नुसती सुरवात आहे! Happy )

त्यानंतरची होते ती लंगड्याची होलपट तर निव्वळ कमाल आहे! त्याचे ते तसं चालणं असल्यामुळे ते आण्खिनच विनोदी झालय सगळं. ह्याउपर काय दिसतं ते म्हणजे मैत्री. येवढा पायानी अधू असून सुद्धा लगबगीनी (साबण अंगावर असताना) जाऊन आधी परश्याला सांगतो. (ते कसं सांगतो ते वाचण्यापेक्षा बघण्यातच मजा आहे). पण मी पवायला गेल्तो तिकडं आर्चिनं मला हाकल्ला हे सांगताना मला हाकल्ला ह्याचं तुसभर सुद्धा दु:ख किंवा लाज नाहीचे कुठे! नसतेच. सगळ्यात महत्वाचं काम त्यावेळी असतं ते मित्राला त्याचं सामान (आवडणारी मुलगी) कुठेतरी येऊन उभी आहे हा मेसेज जाणं! त्यात आपली इज्जत गेली तरी बेहत्तर पण मित्राचं झ्यंगाट हे जमवून दिलच पाहिजे, ते परम कर्तव्य असतय लगा!!

परश्याला स्वप्न पडतं तो प्रसंग आणि त्या भोवतीचे डायलॉग तर हसून हसून पुरेवाट आहेत. "कुठं दिवस भर कुत्री मारत हिंडत असतं कै म्हाईत" इति पशाचा बाप. ते नगं घरचे उठतीन आर्चे म्हणताना परश्याचा आवाज अशक्य दबलेला, चिरका अन लाडिक होतो! (स्वप्नात किस सुरु असतो ना?) Lol स्वप्न पडतात त्यात सुद्धा घरच्यांची भिती असतेच हे टीनेजर असताना काही आजिबात नवीन नसावं!

आता परशाची एंट्री!! म्हणजे सैराट एंट्री ह्या अर्थानं. फायन्ली लंगड्याची तगमग एकदाची "तिथं आर्चि आली आर्चि....." म्हणत कानावर पडल्यावर मग खरी जादू सुरु होते. याड लागलं! भन्नाट म्युजिक, बॅकड्रॉप अन सिनेमॅटोग्राफी! खरं डोळे मिटले आणि फक्त म्युजिक एकलं तर असं वाटेल की एखादा हॉलिवूडमधल्या जबरी म्युजिकलच सुरु असावं. मागची सीनरी जब्बरदस्त जमलीये. डिस्नी म्युजिकल सारखं ग्रँड वाटावं असं म्युजिक पण त्यात आपली माती, गवत, पक्षी अन आपला गावरान परश्या पण अगदी लिलया फिट्टं बसतात! कशाला बॉलिवूडवाले उगच झकमारी करत स्विझरलंडला जाऊन त्या हिरोंना गरम कपड्यात अन हिरवणींना स्लीव्लेस ब्लाऊजांमध्ये बरफात नाचायला लावतात देव जाणे!
पुढे आवरुन सावरुन भांगपट्टी करुन आलेला परशा कपडे अन सँडलांसकट जी उडी मारतो आगा ना पिच्छा बघत व्हिरीत त्यावर मी तर थेट्रात पैशे फेकले असते! ह्याला मंतेत जिगर! आधी उडी मारली, बघून घेतलं आर्चिला आता पुढचं पुढं बघू!
आत्तगंबया हे कुठून पड्लं व्हिरीत यून!
अssय निघ भायेर..
सॉरी सॉरी,
हss सॉरी सॉरीच्या लाडक्या.. आधी निघ भायेर..
मला मैतीच नवतं, बघितलच न्हाईमी..
बरं डोळं झाकून पडला रं हिरीत... आता बघितलं ना? हो भाएर..

आता खरं सीन बाय सीन कौतूक करत बसलो तर तो पर्यंत मंजुळेंचा दुसरा पिच्चर यायचा एखादा! त्यापेक्षा जरा फॉरमॅट बदलून, ज्या गोष्टी मला जास्त आवडल्या त्या बद्दलच लिहितो.

सैराट झालं जी:
ह्या गाण्यानी नुसतं वेड लावलय. खरं खुप सारे फॅक्टर्स आहेत ते गाणे आवडण्यामागे. एक तर आर्ची, परशा आणि त्यांचं एकेक प्रसंगातून फुलणारं प्रेम ह्या गाण्यात एकदम tempo धरतं (मालवहातुक वाला टेंपो नाही, गाण्यातला टेंपो असतो तो!).
अप्रतिम सिनेमॅटोग्राफी आणि त्याला साजेसं तेवढच अत्यंत ग्रँड ग्रँड पण थोडा गावाकडला टच असलेलं म्युजिक! (ढोलांचा वापर आणि ग्रामिण बाज असलेली भाषा)
खरंही वाटत नाही की हे करमाळ्याचं वगैरे शुटिंग आहे! काय एकसे एक अ‍ॅंगल घेतले आहेत!
गाण्यातले काही मोमेंट्स पण मस्त टिपले आहेत.

अगं झन्नानलं काळंजामंदी
अन हत्तामंदी हात आलं जी....
सैराट झालं जीssss
सैराट झालं जीssss

ह्या शॉट मध्ये आधी परशा आर्चिला गोल फिरवतो आणि नंतर आर्चि खाली वाकून खळाळून हसताना दाखवलीये.
ही हसतानाची आर्चि माझ्या करता कायमची स्मरणात गेलीये. Happy

नंतर गाण्यातच आर्चि परशाच्या बहिणीला स्कुटरवरुन घेऊन जाताना दाखवलीये आणि पुढे आर्चि मंदिरातून बाहेर गाभार्‍यात येते आणि तिथे तिच्या रंगीत चपलांमध्ये गुलाबाची फुलं ठेवलेली असतात. ती इकडे तिकडे बघते शोधत कोणी ठेवले असतील आणि तिला दोन खांबांमधून बसलेला परशा दिसतो, तो पाया पडल्या सारखं करुन मग हाथ जोडतो, मी ठेवले आहेत हे सांगत. मग आर्चि ती फुलं उचलून त्याचा वास घेते आणि मग छातीशी कवटाळते. पुढे आर्चि आणि सपनी, परशा, सल्या अन लंगड्या बसलेले असतात त्यांच्या शेजारून जातात तेव्हा लंगड्या सपनीवर फुल फेकल्याची अ‍ॅक्शन करतो! आणि त्या पुढे गेल्या की मग आल्या अन लंगड्या दोघंही बाबा प्रेमीपरशांच्या पाया पडतात की काय बॉ आय्ड्या काढली लगा बाबांनी!!! पोरगी फिदाssss...
(हा शॉट सुरु असताना मला वाटतं मागे आधी वायोलिन आणि नंतर बासरी आणि सॅक्सोफोन आहे. अप्रतिम जमून आलाय शॉट, म्युजिक, चित्रिकरण, सगळ्यांचे एक्स्प्रेशन्स सगळ्याच दृष्टिनी!! टोटल गुंडाळून खिशात जाणार हे असले शॉट दाखवले की आशिक दिलाचा प्रेक्षक!) Happy

नंतर घोडेस्वारीच्या शॉट मध्ये लंगड्या, सल्या आणि आनी असतातच. बघताना गंमत वाटते पण आपल्याकडे तरुण मुलं मुलींना घोडेस्वारीच काय एकांतात कुलफ्या पण खाऊ देतील कोणी तर शपत. आपल्याला नेमून दिलेली कामं सोडून तरुण मुलं मुलींच्या एकांतात व्यत्यय आणण्यात पोलिस, गावातली इतर लोकं वगैरे अशी सगळी बिन प्रेम करताच कुटुंबवत्सल झालेली मंडळी अगदी तरबेज असतात. सतत बिचार्‍या प्रेमींना आपलं लक्ष ठेवावं लागतं, कोणी पाहतय का, किंवा मग असं मित्रांना तरी राखणाला ठेवावं लागतं.
(असं कसं? असं आडनिड्या वयातल्या मुलं मुलींना एकांतात कसं काय सोडायचं, नाही? उद्या काही वेडंवाकडं झालं तर? आपल्या इज्जतीचं काय होईल? अहो आम्ही पण बरीच वेडीवाकडी कामं करतोओ पण ते बंद दरवाज्या आड, तिथे कोणाला कळतय?) Proud

कवळ्या पानात ह्या
सावल्या उन्हात ह्या
पवळ्या मनात ह्या भरलं… भरलं च्या वेळेस जेव्हा परशा हवेत किस सोडतो तेव्हा लंगड्याचा "आयो.." वासताना स्लो मोशन मध्ये स्पष्ट दिसतो!! Lol

पुढच्या कडव्यात रंगा खेळतात तो प्रसंग आहे आणि त्याच्या बॅकग्राऊंड मध्ये काय आहे खरं? आपल्या इथे ग्रामिण परिसरात असतात तशी दगड मातीच्या भिंती असलेली घरं, आजूबाजूला उगवलेलं कोरडं गवत, त्या दगडमातीच्या घरांमधून असलेल्या धुळीच्या वाटा! ह्या असल्या बॅकग्राऊंड असताना सुद्धा आधी बिल्ड केलेल्या वातावरणामुळे आणि म्युजिक, सिनेमॅटोग्राफी मुळे काय जब्बरदस्त भाव खाल्लाय ह्या प्रसंगानी?!

गाणं संपत असतानाचे शॉट्स (त्या कळसाच्या छोट्या गच्चीवर वगैरे) मला वाटतं ड्रोन वापरुन शॉट्स घेतले आहेत. सिंपली (अ‍ॅज इन सिंपल) इन्क्रेडिबल! Happy

आर्चि:
आर्चि मला वाटतं एका पिकचर मधलं एक पात्र नसून एक फिनोमेनॉन होऊन गेली आहे. ह्यात खरं तिच्या अ‍ॅक्टिंगला दाद द्यावी की मंजुळेंच्या परफेक्ट कास्टिंगला हे समजत नाही कारण ती अ‍ॅक्टिंग करते असं मला वाटतच नाही इतकी ती फिट बसली आहे त्या रोल करता. ह्याच अर्थ इथे मी झुकतं माप मंजुळेंच्या कास्टिंग ला देइन, पण ते देत असताना तिनी ज्या प्रकारे रोल पेलला आहे त्याला जवाब नाही. हे मान्य की रिंकु राजगुरु रियल लाईफ मध्ये बरीचशी तशीच चालते बोलते पण पिकचर मध्ये फक्त तिचं चालणं आणि बोलणं नाहीये ना ? खुप ठिकाणी तिला स्ट्राँग इमोशन्स दाखवावे लागले आहेत, एका अल्लड पाटल्याच्या पोरी पासून पुढे हलाखीत दिवस काढून नंतर एकदम मचुअर, आत्मविश्वासानी संसार करणारी तरीही आई वडीलांच्या आठवणीनी झुरणारी आर्चि हे ट्रान्सफॉर्मेशन तिला पेलावं लागलेलं आहे and oh my god has she done it well!!!

आता खरं खुप काही लिहिता येइल पण एक शेवटचा माझ्या कायमचा लक्षात राहिल असा प्रसंग आहे त्या बद्दल लिहून आवरतं घेतो. हा प्रसंग खरं मंजुळेंचं डायरेक्शन, परशा आणि आर्चिच्या अ‍ॅक्टिंगमुळे अत्यंत रियलिस्टिक होऊन आपल्या अंगावर येतो अगदी.
त्या फोनच्या पासवर्ड वरुन आधीच परशा जरा उखडलेला असतो, दुसर्या दिवशी कामावर जायच्या आधी पण त्यावरुन खटका उडतो आणि आर्चि निघत असे पर्यंत सुरुच असतं भांडण.
"तिथं कामावर कोणी फोन बघू नये म्हनून बदल्लाय" इथे खरं परशा थोडा शरमल्या सारखा होतो, कारण त्याला स्वतःची चूक लक्षात येते बहुतेक पण तो पर्यंत डॅमेज झालेलं असतं.आर्चिचा संयम संपलेला असतो.
"कुडं चालली?"
"चालली मसनात! कुटं जाती रोज मी?" "तुझ्या ह्या असल्या सबावाचा लै वैताग आला मला"
"काय यवडा वैटे का मी?"
"मंग मी वाईटे का?"
"मी आसकुडं म्हनलं?"
"म्हनायची काय गरजे?"
"कामावर जावच लागल का?"
"लोडय कामाचा, सर वोरड्त्याल"

काम संपवून आर्ची परशाच्या डोसा टपरीवर येते.
परश्या अजून घुसाट्यातच असतो.
"परश्या..... ओ साह्येब... पिकचरला जायचं का?"
"कामय मला.."
"मी इचारतीकी सुमनताईला"
"दुसरं कामेमला"
"चल ना..."
"तुला एकदा सांगितलेलं कळतय का?"
"हळू बोल की मग येवडं वरडतो कशाला?"'
"लै गाजलेला पिच्चरय, तुझ्या आवडत्या हिरोचा"
"...."
"मी एकटी जाईना?"
"जां..."
"खरच एकटी जाईन"
"निग्की मग कशाला थामली!"
"लै इगोए तुला, बस तसाच..."
असं म्हणून आर्चि एकटी पिकचर ला जाते....

त्या प्रेमानी म्हणलेल्या ओ सायेबाला पुढे जी अत्यंत तुसडी वागणूक मिळते ती बघून आणि एस्पशली विहिरीवरची ७-८ पोरांना दमात घेऊन हाकलणारी आर्चि आठवून ह्रदयाला खिंडारं पडतात!
पाटलाची पोरगी म्हणून येवढा माज केलेली, तेवढच ह्या परशावर प्रेम करणारी अन त्याला वाचवताना स्वतःच्या वडिलांकडून मार खाणारी, आबावर गोळी झाडणारी पण नंतर परिस्थितीशी दोन हात करत पण प्रेमानी राहू बघणार्या आर्चिची वाताहत बघवत नाही. पुढे प्रकरण आण्खिन थोडं विकोपाला जाऊन नंतर शेवटी परत ती दोघं आपल्याला एक मेकांशिवाय कोणी नाही हे समजून परत एकत्र येतात.
परशा तसा चांगला दाखवलाय आणि पिकचर मध्ये आर्चिच्या घरचे खुप जास्त कडक दाखवले आहेत पण एकंदरितच हे सगळं आपल्याकडच्या बर्‍याच मुलीं/स्त्रियांबद्दलचं खुप बोलकं असं उदाहरण आहे.
पळून जाऊन लग्न केलेलं नसलं आणि घरच्यांनी करुन दिलेलं असलं तरी एकदा लग्न करुन दिलं की आपली जबाबदारी संपली आणि माहेरपणाला आनंदानी ये असं म्हणाले तरी टेकनिकली घरी परत जायचे दरवाजे बंद असतात. सो उद्या काही अनबन झाली तरी एक तर तुम्ही ते निभावून न्यायचं किंवा मग आपला आपण मार्ग बघायचा येवढच उरतं.
असो..... Happy

अकरित घडलया
सपान हे पडलया
गळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं
साता जन्माच नात रूजलया काळजात
तुला र देवागत पुजलं
रूजल बीज पिरतीच सजणी रुजलं
भिजलं मन पिरमान पुरत भिजलं
सरल मन मारून जगण सरलं
हरलं ह्या पीरमाला समद हरलं
कडाडलं पावसामंदी
अन आभाळाला याट आल जी
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…
सैराट झालं जी…….

_/\_

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटच्या सीन मध्ये त्या बाळाला दुकानात घेवून जाणारी बाईच त्या बाळाची खरी आई आहे म्हणे . खरंय का हे?

हैदराबादमध्ये आर्ची परश्याच्या भांडणानंतर ती ट्रेनमध्ये बसून परत जायला निघते. एका स्टेशनवर एक भिकारी जोडपे भीक मागत तिच्या खिडकीशी येते. नवरा आंधळा असतो आणि तरी बायकोने त्याची साथ सोडलेली नसते. त्यांना भीक घालता-घालता तिला जाणीव होते का की आपला जोडीदारही सध्या संशयाने, रागाने, फुकाच्या इगोपायी आंधळा झाला आहे पण त्याला वार्‍यावर सोडून चालणार नाही, त्याला आपल्या साथीची गरज आहे. त्याला क्षमा करुन, नव्या ओढीने ( त्याला क्षमेची, प्रेमाची भीक घालून असं नाही म्हणत !!! ) आर्ची घरी परतते. >>>>>>>>>>>>>>>

धन्यवाद. हा संदर्भ लक्षातच नव्हता आला. अस वाटलेले कि त्या दोघांमधील प्रेम पाहुन आपल्या प्रेमाची जाणीव होऊन आर्ची परतते.

धन्यवाद. हा संदर्भ लक्षातच नव्हता आला.>> अगदी अगदी... सिनेमा पहिल्यापासून जाणवत होता कि दाखवल्यापेक्षा खूप मोठा संदर्भ असणार आहे या सीनला … पण लक्षात नव्हता आला ...

शेवटी जेव्हा परशा घरी येतो पिशवी घेऊन तेव्हा दारातुन आत येताना या सगळ्यांना पाहुन दाराला किंचित थडकतो.

आणि आर्ची चहा ठेवायला आत येते तेव्हा थोडी साखर खाऊन तोंड गोड करून घेते, माहेरची माणस भेटायला
आली म्हणुन

हे बारकावे मला आवडले.

शेवटच्या सीन मध्ये त्या बाळाला दुकानात घेवून जाणारी बाईच त्या बाळाची खरी आई आहे म्हणे . खरंय का हे? >>>>>>> हो, अगदी पाहतानाच जाणवते ते.

ती चाळ बहुतेक वारजे कि बाणेर परिसरातील आहे.

मायबोलीवर लिहीलेले जर मंजुळेंनी वाचले, तर खुद्द त्यांनाच विश्वास बसणार नाही की " मी खरच एवढ डिटेलिंग करुन पिक्चर बनवला होता का?"

प्रेमात असतोच पण आर्चिने भाव दिला नसता तर त्याने प्रेम मिळवण्यासाठी अजिबात प्रयत्न केला नसता. आपण तिच्यापर्यंत पोचू शकत नाही हे त्याला माहित असते. खोखो च्या सिन मध्ये तो बाळ्याला उगीच तुझे काहीतरी म्हणून उडवतो. चिट्ठी पाठवायची आयडिया पण बाळ्याचीच. आर्चि आय लव यू म्हणते तेव्हा त्याचे तोंड उघडे पडते इतका त्याला शॉक बसतो. भांडे फुटल्यावर तो आरचीला एकदा तरी भेटायला मिळावे म्हणून धडपडतो पण याचे परिणाम कुटुंबावर होतील हे सल्याकडून ऐकल्यावर तो पाय मागे घेतो. जर आर्चि पळून आली नसती तर ती प्रेम कहाणी तिथेच संपली असती. प्रेमात तो एकटा मरायला तयार असतो पण कुटुंबाला मारणे त्याला जमणारे नसते. आर्चि मात्र बिंदास्त आणि खंबीर. पिक्चरची स्टोरी तिच्यामुळे पुढे जाते. परश्या काही करेल म्हणनून थांबली असती तिचे लग्न दुसर्याशी होऊन पिक्चर इंटरवललाच संपला असता.

पण आर्चिने लग्न व्हायला दिलेच नसते. परत पळायची संधी इतक्या लवकर मिळाली नसती तर तिने काहीतरी हिकमत करून संधी शोधलीच असती. भारीच डेरिंगवाली पोरगी.

प्रेमात असतोच पण आर्चिने भाव दिला नसता तर त्याने प्रेम मिळवण्यासाठी अजिबात प्रयत्न केला नसता. आपण तिच्यापर्यंत पोचू शकत नाही हे त्याला माहित असते. खोखो च्या सिन मध्ये तो बाळ्याला उगीच तुझे काहीतरी म्हणून उडवतो. चिट्ठी पाठवायची आयडिया पण बाळ्याचीच. आर्चि आय लव यू म्हणते तेव्हा त्याचे तोंड उघडे पडते इतका त्याला शॉक बसतो. भांडे फुटल्यावर तो आरचीला एकदा तरी भेटायला मिळावे म्हणून धडपडतो पण याचे परिणाम कुटुंबावर होतील हे सल्याकडून ऐकल्यावर तो पाय मागे घेतो. जर आर्चि पळून आली नसती तर ती प्रेम कहाणी तिथेच संपली असती. प्रेमात तो एकटा मरायला तयार असतो पण कुटुंबाला मारणे त्याला जमणारे नसते. आर्चि मात्र बिंदास्त आणि खंबीर. पिक्चरची स्टोरी तिच्यामुळे पुढे जाते. परश्या काही करेल म्हणनून थांबली असती तिचे लग्न दुसर्याशी होऊन पिक्चर इंटरवललाच संपला असता.>>>
पवाॅंईट आहे मुद्द्यात Happy

बारिक सारिक डिटेल्स त्यांनी लक्षात ठेवून मांडले आहेत हे खरं पण एकदा पिकचर आवडला की ओवरइंटरप्रेटेशन होतच. अ‍ॅज फार अ‍ॅज चांगल्या बाबतीत होत असेल तर ठीक आहे, फक्त त्यांच्या नावावर भलतेच संदेश वगैरे द्यायची कामं नाही केली लोकांनी तर बरय.

गमभन | 15 June, 2016 - 14:34
तो चार तासांचा विदाऊट कट सिनेमा पुन्हा रिलीज करता येईल का?
अशी विनंती नागराज मंजुळे आणि झी ला करायला हवी
हिंदीत एखादे गाणे अॅड करुन परत रिलीज करायाचे प्रयोग झाले आहेतच.
प्रेक्षक नक्कीच पुन्हा एकदा पाहतील. निदान मी तरी

>>>> + १११११

मी पण, निदान तशी official DVD जरी रिलीज केली तरी हवे तेवढे पैसे देउन घेइन...!!!

गमभन | 15 June, 2016 - 14:34
तो चार तासांचा विदाऊट कट सिनेमा पुन्हा रिलीज करता येईल का?
अशी विनंती नागराज मंजुळे आणि झी ला करायला हवी
हिंदीत एखादे गाणे अॅड करुन परत रिलीज करायाचे प्रयोग झाले आहेतच.
प्रेक्षक नक्कीच पुन्हा एकदा पाहतील. निदान मी तरी

>>>> + १११११

मलाही आवडेल पहायला !!!!

सल्याचं पात्र पण खूप छान आहे.कमी बोलतो पण तो मुद्देसूद आहे.
परश्याला त्या रानातून (आर्चीला लोक बघायला आलेले असताना) तो ज्या तळमळीने ओढून मागे नेतो ती बघण्यासारखी आहे.मित्राचं प्रेम सफल व्हावं असं वाटतं पण परीणामांची, मित्राच्या घरच्यांवर होणार्‍या नंतरच्या अत्याचारांची पूर्ण जाणीव आहे.तो ज्या प्रकारे अस्वस्थ होऊन त्याला मागे ओढत असतो आणि परश्या तरी ऐकत नसतो, आपल्या मित्राची काळजी, अगतिकता, काही करुन याला कंट्रोल आता या क्षणी करायलाच हवं वाली अर्जन्सी सगळी छान दाखवतो.

नागराजच्या कमेंटरीचे डॉय्लॉग्जही जबरी आहेत , हलो हलो माईक टेस्टिंग १-२-३-६ , १-२-३-६ , अय नरसाळ्या बाजुला हु की रं , अय हुंडगुळ्या >> अन हे सगळं माईकवर Lol

मी संध्याकाळी टाकणार होतो ती सगळी कॉमेंटरी, एस्पेशली चित्र दिसायच्या आधीची.
अय कोणाचं कापडय रे ते? ममद्याचय का?
अय हुंडुळ्या. हुर्र्रं तिकडे इथं काय तुझ्या बापाचं गठुडं पुरलय व्ह्य!!! Lol

आता बुवा, श्री अन इतरांनी मिळून "सैराट ची पटकथाच" लिहून काढावी.

वाटनी करून घ्या. पहिले १० मिनिटे बुवा, नंतर श्री, नंतर कुणी तरी वगैरे वगैरे.

क्रिकेज चा बक्षिस समारंभ झाल्यावर, तात्या भाषण करत असतात तेव्हा सल्या म्हणतो परशाला.. ट्रॉफी नको पोरगी द्या म्हणावं.. परशा हसतो. आणि मंग्या म्हणतो.. काय बोलला रे हा.?परशा आहे म्हणतो.. काय नायं काय नायं तू पुडं बघं

अरेच्या.

हे तुम्ही सांगितलेले किती सीन्स मी बघितलेच नाहीत. उदा: सल्या बाल्या भाकरी खात असलेल्या माणसाला उठवतो, केळीच्या बागेत परश्या आणि आर्ची, होडी आणि पट्टी बांधलेले सीन्स. आणि मी नक्की सांगते की हे थियेटर मधल्या पिक्चर मधे नक्कीच नाही आहेत.

मग तुनळी वरची सेन्सर कॉपी बघायला घेतली, अजुन फक्त क्रिकेट मॅच चा सीन बघितला आणि ऑलरेडी १० नवीन संवाद मिळाले - लंगड्या ची बॅटिंग, बिली बाउनडिंग चे शकुन आत्याला चुकवून परत ग्राउंड वर पदार्पण.

ज्याना ४ तासाच्या डाइरेक्टर कट ची वाट बघायची नसेल तर ही कॉपी पण बघा (आधी थियेटर मधे किमान १-२ बघून घ्या मात्र आधी)

कुणी हे नोटिस केलय का...की सल्या काही ठिकाणी परश्या चे शर्ट्स वापरतो/ घालतो.. किन्वा परश्या सल्या चे ...

एकदम..college चे काहि दिवस आठवले...मित्राची एकादी आवडलेली वस्तु त्यच्या कडुन घेणे,
गडबडीत मित्रा ची चप्पल नेसुन जाने.. etc.. Happy

जणु काही मित्राच जे आहे ते आपलच असत आणि जे आपल आहे ते मित्राच.. Happy

Whats app वर आलेला एक मेसेज देतेय खाली, आर्ची च्या तात्यांनी तिच्याशी कहिसा असा संवाद साधला असता.

प्रिय आर्ची,

बाळा मी बोलतोय ,
माझ्या बाळा तु जरी
चीरडुन गेली आमच आयुष्य
तरी,
प्रींन्स न तुमच्या सोबत जे केल ते
लय वाइट....

बाळा त्याला काय माहीत माझ्या या काळजाच्या तुकड्याला
मी कीती जपल होत.,

तु तुझ्या आईला म्हनाली होती ना डोळ्यात
पाणी आनुन तात्या बोलतील का ??

हा मी बोलतोय!

बाळा मला विचारायचय तुला काय कमी पडलो
आम्ही तूला वाढवीण्यात??

बाळा जातीपाती च्या चीखलातला
मी नाही .....

प्रतेक हौस,मोज हात जोडून उभी होती
तुझ्या समोर
अशा वेळी
मी
काहीच न कमवणारय पोरा सोबत लग्न... कस मान्य
करु.??

कोणता गुण होता परशात म्हणून मी तुझा हात त्याच्या
हातात द्यायचा होता..??

किशोर वयात मन हळव

शरिराची भुक तिव्र असते हे
मान्य आहे मला,
पण तेवढ्या एकाच कामा साठी जन्म
नाही झाला आपला......

या वयात उज्वल करियर करायचे ,
सोडून तुम्ही
आजकालची पिढी प्रेमातच करियर करत
आहात...

बाळा तुला जिवापाड जपनारी तुझी आई,
तुझ्या केसालाही धक्का लागु नये याची
काळजी घेनारा भाऊ ,
आजी
आजोबा
मामा
मावशी
काका
काकी
आत्या
या सगळ्यांचा
एकदाही विचार आला नाही का तुला...

एका मुला साठी एका झटक्यात आम्हाला लाथाडून
गेलीस.....

अग लहान पणी तुला झोपवाण्या साठी
तासंतास खांद्यावर घेऊन फीरायचो तेंव्हा
झोपेतही कोनाकडे जात नव्हतीस मला
सोडुन....

आम्हा सर्वांपेक्षा काल परवा भेटलेला तो एक पोरगा जास्त
महत्वाचा वाटला का तुला...

आर्चे हे आकर्षक फक्त तुलाच वाटत होत अस
नाही ,
ते प्रत्येकालाच असत या वयात.

काही जगावेगळ सैराट कराव आस प्रतेकालाच वाटत
असत.

कधी तरी बोलायच आसत,
माझ्याशी
नायतर आईशी...

अग सैराट व्हायला का हा यवढाच मार्ग नाही...

राणीलक्ष्मी बाई सारख
देशासाठी,
मेधा पाटकर समाजा साठी,

मदर
तेरेसा रंजल्या गांजल्यांसाठी सैराट झाल्या होत्या....

तुला माहीत आहे का तु गेल्या नंतर आपल्या तालुक्यात
पोरींना शाळा कॉलेजात पाठीवन जवाळपास बंदच
केल,
आन बर्याच कवळ्या पोरींचे लग्न
उरकीले मायबापांनी.

अशा सैराट होन्याच्या
भीतीन.....

तु वासनांध लांडग्यांची शिकार होन्या पासून
वाचली
मात्र सगळ्याच वाचतात आस नाही...

अन मग बाटले पणाची जाणीव
दोघांनाही सतावते.

तु गेल्या पासुन
तुझी आई कधीच हासली
नाही,
अन आमदारकीचा
उमीदवार मी
स्वतःला बुडवुन घेतल दारुत

हे
सगळ विसरण्या साठी.

पोरीचे बाप नसलेले काहीजन मला बुरसटेल
विचाराचा म्हनतेलही
पण

बाळ आर्चे व परशा मला विचारायचय

आम्हा सगळ्यांना उध्वस्त
करुन
खरच तुमच सैराट होन जरुरी होत का ?????

तुझा तात्या.

कुणी हे नोटिस केलय का...की सल्या काही ठिकाणी परश्या चे शर्ट्स वापरतो/ घालतो.. किन्वा परश्या सल्या चे ...

एकदम..college चे काहि दिवस आठवले...मित्राची एकादी आवडलेली वस्तु त्यच्या कडुन घेणे,
गडबडीत मित्रा ची चप्पल नेसुन जाने.. etc.. Happy

जणु काही मित्राच जे आहे ते आपलच असत आणि जे आपल आहे ते मित्राच.. Happy

धन्यवाद. हा संदर्भ लक्षातच नव्हता आला. अस वाटलेले कि त्या दोघांमधील प्रेम पाहुन आपल्या प्रेमाची जाणीव होऊन आर्ची परतते. >>> आबासाहेब., आर्ची हे पात्र असं प्रेमाची जाणीव होऊनच परतलेलं असणार. ती कुठे एवढे इंटरप्रिटेशन काढत बसणार पण मंजुळेंचा काहीतरी विचार आहेच हा प्रसंग लिहिण्यामागे. मला वाटलं तसं त्यांच्या मनात असेलही वा नसेलही Happy

वर कुणीतरी लिहिलंय की मंजुळेंनीही इतका विचार केला नसेल सिनेमा बनवताना. काही काही पोस्ट्स उगाच अति कीस पाडल्यासारख्या वाटल्या खर्‍या पण ह्या किंवा अशा बर्‍याच प्रसंगांत लेखक-दिग्दर्शक म्हणून त्यांचा काही एक विचार आहेच आहे, ते काही योगायोगाने लिहिलं गेलेलं नाही.

Pages