" आणि म्हणून हिंदी राष्ट्राचा मूळ पाया , आधारस्तंभ , निर्वाणीचे त्राते असे हिंदू [सावरकरी व्याख्या] लोकच आहेत. एवढ्याकरिता हिंदी राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने देखील, हे हिंदूंनो ! तुम्ही हिंदु राष्ट्रीयत्वाला दृढमूल आणि समर्थ बनवा. हिंदुस्थानातील आपल्या कोणत्याही अहिंदू बंधूला, वास्तविक म्हटले म्हणजे जगातील कोणालाही, उगाच अपमान करून दुखवू नका. परंतु , न्याय्य आणि निकडीच्या, आपल्या जातीच्या [म्हणजे हिंदुजातीच्या] आणि देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असा, कि ज्यामुळे खंडाखंडामधून जे विशिष्ट संघ (आशियात पॅन इस्लामिक, युरोपीय राष्ट्रांमध्ये राजकीय , अमेरिका-आफ्रिका येथील वर्णाधारीत संघटना इ.) धिंगाणा घालीत आहेत त्यांच्याकडून विनाकारण हल्ले होणे बंद होईल व कोणालाही बेइमानपणाने तिला ठकविता येणार नाही.
हिंदुस्थानातील इतर जाती [सावरकरी हिंदुत्वात अंतर्भुत नसणारे धर्म या अर्थी] जोवर ' हिंदुस्थान आधी' असे म्हणत नाहीत किंवा जगातील इतर लोक ' मनुष्यजाती आधी' असे तत्वज्ञान आचरीत नाहीत, परंतु , जोपर्यंत हे लोक चढावाची व स्वसंरक्षणाचीच तयारी करण्यासाठी, केवळ जातीच्या वा धर्माच्या संकुचित दृष्टीने संघटना आणि जूट करण्याचा विश्वप्रयत्न करीत आहेत, तोपर्यंत हिंदूंनो! तोपर्यंत तरी तुम्ही शक्य तर तुमच्या जातीच्या जीवनाच्या व सामाजिक जीवनाला , ज्ञानततूंच्या जाळ्यांप्रमाणे एकजीव करणारी सर्व बंधने दृढीभूत करा. जे कोणी 'हिंदू' हे नाव आत्मघातकीपणाने नाकारतील त्यांना पुढे असा विषमय अनुभव येईल की आपल्या जातीच्या जीवनाच्या व सामर्थ्याच्या झर्यापासूनच त्यांनी स्वतःला तोडून घेतले आहे."
- वि. दा. सावरकर ( 'हिंदुत्व' मधून)
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 'हिंदुत्व' संकल्पनेबद्दल कमालीचे विपर्यस्त लिखाण कसे केले जाते त्याचे विवेचन प्रा शेषराव मोर्यांच्या मूळ ग्रंथांमध्ये खूप विस्ताराने केले आहे ते मुळातूनच वाचण्यासारखे आहे.
'हिंदुत्व' चे मूळ इंग्रजी हस्तलिखित सावरकरांच्या स्थानबद्धतेआधी रत्नागिरीच्या तुरुंगात असतांना सिद्ध झाले. ते त्यांनी गुप्तपणे कारागृहाबाहेर पाठवले. अभिनव भारत या संघटनेचे एक सदस्य विश्वनाथ विनायक केळकर [नागपूर] यांनी ते 'मराठा' या टोपण नावाने १९२४ मध्ये प्रकाशित केले. सावरकरांचे धाकटे भाऊ डॉ नारायण दामोदर सावरकर यांनी इंग्रजी ग्रंथाचे मराठी मध्ये भाषांतर केले. त्याची पहिली आवृत्ती चैत्र वद्य पंचमी शके १८४७ मध्ये [ सन १९२५ मध्ये ] प्रकाशित झाली. त्यानंतर त्याचे हिंदी भाषांतरही प्रसिद्ध झाले. मला उपलब्ध झालेली प्रत नारायणराव सावरकरांनी केलेले भाषांतर आहे [ तिसरी आवृत्ती , १४० पाने, किं. रु ६ ] .
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे त्यातील अनेक विचार बहुतांशी आजही सुसंगत [relevent] आहेत. हे विचार मांडले त्याकाळात सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते आणि त्यांना राजकारणात येण्यास प्रतिबंध होता आणि तो १० मे १९३७ पर्यंत होता. हिंदूंचे नेतृत्व बव्हंशी महात्माजींकडे होते पण आपण सर्वांचेच नेते आहोत हा त्यांचा दावा बहुसंख्य मुसलमानांना मान्य नव्हता. त्यांना आपल्याकडे वळविण्यासाठी महात्माजींनी 'खिलापती'सारख्या भारताशी असंबधित धार्मिक चळवळीला स्वातंत्र्यलढ्याचा एक भाग केले असूनही. मुसलमात्र मात्र आम्ही गांधिजींच्या मागे नाही तर गांधीच आमच्या या चळवळीच्या मागे उभे आहेत असे सांगत होते. गांधिजींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या स्वातंत्र्य चळवळीला मुसलमानांचा पाठिंबा मिळावा म्हणून गांधिजी मुसलमानांच्या अधिकाधिक मागण्या मान्य करीत होते. हिंदूंच्या [येथे 'हिंदू'ची सावरकरी व्याख्या अभिप्रेत आहे] न्याय्य हक्कांचा या पायात बळी जाऊ नये ही सावरकरांना काळजी होती. या ग्रंथाला अशी तत्कालीन पार्श्वभूमी देखील होती. मुसलमानांच्या मागण्या नंतर वाढतच गेल्या, त्यांची पूर्तता करून घेण्यासाठी 'डायरेक्ट अॅक्शन' करून यशही मिळवले गेले आणि जीनांना पंतप्रधान करण्याची तयारी दर्शवूनही गांधिजींना फाळणी टाळता आली नाही. उपोषण करून डॉ. आंबेडकरांवर जसे नैतिक दडपण त्यांनी आणले तसा प्रयोग त्यांनी जीना, नेहरू, पटेल आदींवर नैतिक दडपण आणायला त्यावेळी का केला नाही हे समजत नाही. जीनांच्या 'डायरेक्ट अॅक्शन'च्या यशस्वी प्रयोगानंतर धार्मिक दंगली पुन्हा होण्याची १०० टक्के खात्री [ तसे नेहरूंनीच बोलून दाखविले आहे ] असूनही, त्या उसळल्यावर उपोषण करण्याऐव़जी फाळणी टळण्यासाठी किवा अटळच असेल तर निदान दोन्हीकडील हिंदु आणि मुसलमानांच्या जीव आणि वित्त यांचे संरक्षणाची पूर्ण तरतूद करण्यास भाग पाडण्यासाठी तरी उपोषणाचा विचार का केला नाही याचे उत्तर सापडत नाही. जे होऊन गेले त्यावर आता उपाय हाच कि आता तरी तशा चुका होऊ नयेत. काश्मिरी पंडितांच्या प्रश्नाकडे पाहिल्यावर आपण कांही शिकलो आहोत का असा प्रश्न पडतो.
.
आपल्या आसपास आणि जगात जे कांही चाललेले असते व आपणही वागतो त्याकडे करडी नजर ठेवून तपासले तर असे दिसते की उर्वरीत जग आपल्याला सावरकरांनी सांगितलेल्या मार्गावरून जायला भागच पाडत आहे. फरक इतकाच कि जबरदस्त किंमत मोजल्यावरच आपले एक पाऊल त्या दिशेने पडते. सावरकरांनी दाखवलेल्या 'लाल दिव्यां'कडे कायम दुर्लक्ष करण्यामुळे तशी वेळ आपल्यावर आली आहे.
पुन्हा अशी जबरदस्त किंमत आताच्या भारतातील नागरिकांना देण्याची वेळ येऊ नये म्हणून या ग्रंथात मांडलेले विचार सर्वांनीच मूळातूनच वाचावेत. त्यावर विचार करावा. घडून गेलेल्या घटना आणि घडत असलेल्य घटना यांकडे भाबडेपणाने न पाहाता डोळसपणे तपासाव्या, योग्य आचरण करावे.
वाचाल तर वाचाल आणि पुढील पिढ्यांनाही वाचवाल !
सावरकरांचे साहित्य आता इ-बुक स्वरुपात विनामूल्य उपलब्ध असल्याची माहिती श्री जोग यांनी अलिकडे दिली आहेच. त्यामुळे जिज्ञासूंना मूळचे लिखाण वाचण्यास कोणतीही अडचण उरलेली नाही.
हा लेख वाचणार्या सर्वांनाच मनापासून धन्यवाद !
या लेखावर फक्त'विचारपूस' मधून आलेल्या प्रतिसादांना येथे प्रतिसाद देण्याचे माझ्यापुरते मी ठरविले आहे.
दामोदरसुत, >> आपण मायबोलीवरचे
दामोदरसुत,
>> आपण मायबोलीवरचे खरोखरच गामा पैलवान! तरीही विपु ची लिंक का द्यावी लागते आहे ते समजले नाही.
>> कारण आतापर्यंत तरी ज्यांनी मला विपुत लिहिले त्यांना अशी लिन्क पाठवावी लागलि नव्हती.
>> ही लिन्क कशी द्यायची हे मला कोणीतरी कृपया सांगावे.
अहो, आता तुमच्या विपूवर जायचं झालं की कायकाय करावं लागतं ते बघा :
१. तुमच्या नावावर टिचकी मारणे.
२. 'दामोदरसुत यांची विचारपूस' यावर टिचकी मारणे.
विपुचा थेट दुवा मिळाला की एक टिचकी मारण्याचे घोर काबाडकष्ट कमी होतात.
असा द्यायचा थेट दुवा : http://www.maayboli.com/user/36426/guestbook
आ.न.,
-गा.पै.
एक माहिती: मायबोलीवरच रणजित
एक माहिती:
मायबोलीवरच रणजित चितळे म्हणून एक गृहस्थ आहेत. ते सैन्यात आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो
माझा एक आंतरजालीय मित्र श्री. कुलकर्णी सैन्यात आहे. त्यालाही उदंड आयुष्य लाभो
जाती शब्दावरून गोंधळ सुरू आहे
जाती शब्दावरून गोंधळ सुरू आहे का हा?
>> न्याय्य आणि निकडीच्या, आपल्या जातीच्या [म्हणजे हिंदुजातीच्या] आणि देशाच्या संरक्षणासाठी सज्ज असा
>> हिंदुस्थानातील इतर जाती [सावरकरी हिंदुत्वात अंतर्भुत नसणारे धर्म या अर्थी] जोवर ' हिंदुस्थान आधी' असे म्हणत नाहीत किंवा जगातील इतर लोक ' मनुष्यजाती आधी' असे तत्वज्ञान आचरीत नाहीत
या उतार्यांवरून 'जाती' हा शब्द 'एका धर्मातील पोटशाखा ' या अर्थी आलेला नाही हे उघड आहे की. (हिदू हीसुद्धा जाती म्हटली आहे आणि मनुष्य हीसुद्धा.)
संदर्भानुसार अर्थ लावले तर गोंधळ कमी होईल. गांधी काय आणि सावरकर काय, स्थलकालाच्या चौकटीतच त्यांच्या विचारांचा आणि विधानांचा उहापोह करायला हवा. कोणाचेच विचार त्रिकालाबाधित नाहीत. तसे असणं शक्यही नाही आणि आवश्यकही नाही. They were products of their times.
आजच्या काळात त्यातलं जे समर्पक (relevant) तेवढंच घ्यावं. त्यामुळे कोणाचीच थोरवी कमीजास्त होत नाही. या बाकी मारामार्या कशाला?
स्वाती, सहमत. मी पहिल्यांदा
स्वाती, सहमत. मी पहिल्यांदा हा लेख वाचला तेव्हा तशाच अर्थाने वाचला होता. तो आता व्यापक अर्थाने भारताचे राष्ट्रीयत्व याला लागू पडतो. हिंदूधर्मीयांना सुद्धा लागू पडेल. "दुसर्यांना त्रास देऊ नका, पण दुसर्याने आपल्याला देऊ नये म्हणून आपल्यात एकी करा" इतका सोपा आणि ज्याबद्दल माझ्या मते काही वाद होऊ शकत नाही असा संदेश आहे तो.
सावरकरांबद्दलच बोला. विषय
सावरकरांबद्दलच बोला. विषय सोडून तिसरंच काहीतरी चाललंय.
स्वातीने परफेक्ट अर्थ सांगितला आहे.
स्वाती, अनुमोदन,
स्वाती, अनुमोदन,
>>संदर्भानुसार अर्थ लावले तर
>>संदर्भानुसार अर्थ लावले तर गोंधळ कमी होईल. गांधी काय आणि सावरकर काय, स्थलकालाच्या चौकटीतच त्यांच्या विचारांचा आणि विधानांचा उहापोह करायला हवा. कोणाचेच विचार त्रिकालाबाधित नाहीत. तसे असणं शक्यही नाही आणि आवश्यकही नाही. They were products of their times.
आजच्या काळात त्यातलं जे समर्पक (relevant) तेवढंच घ्यावं. त्यामुळे कोणाचीच थोरवी कमीजास्त होत नाही. या बाकी मारामार्या कशाला?<<
* स्वाती_आंबोळेजी आणी फारएण्ड जी,
मला लेखातून नेमके हेच सांगायचे होते. त्यासाठीच लेखाच्या शेवटी म्हटले आहे :
या ग्रंथात मांडलेले विचार सर्वांनीच मूळातूनच वाचावेत. त्यावर विचार करावा. घडून गेलेल्या घटना आणि घडत असलेल्य घटना यांकडे भाबडेपणाने न पाहाता डोळसपणे तपासाव्या, योग्य आचरण करावे.
वाचाल तर वाचाल आणि पुढील पिढ्यांनाही वाचवाल !
निदान कांहीजणांनी तरी हा लेख योग्य दृष्टिकोन ठेऊन वाचला याचे मला समाधान वाटले.
स्वातीजी, तुमच्या प्रतिसादातील कांही भाग मी ठळक करून इथे टाकला आहे त्याचे कारण तो सावरकरी विचारांचा गाभाच आहे. आता हा छोटा लेख देखील नीट वाचला जात नाही तर त्यांचे मूळ लिखाण वाचण्याचे कष्ट कोण घेतो?
पण आहे असा एकजण कि ज्याने सावरकरांच्या मूळ लिखाणाच्या महासागरातून नेमकी रत्ने शोधून दोन सुटसुटित पुस्तकांमधून आपल्याला उपलब्ध करून दिली आहेत. ती वाचून पुढे जाणे मात्र शक्य आहे. त्या पुस्तकांची नावे मी अनेकदा उल्लेखिलेली आहेत त्यामुळे पुनरावृत्ती करीत नाही.
कांहीच अजरामर नाही तर हा लेख तरी त्याला अपवाद कसा असेल? त्याचा अंत जवळ आल्याचे अनेकांना जाणवलेले दिसते.
** गा.पै. जी,
आपल्या रोजच्या व्यायामामध्ये एक टिचकी म्हणजे 'किस झाडकी पत्ती'.
असे असले तरी आम्ही आपल्या येथील प्रतिसादास प्रतिसाद देऊ. टिचकी सारखा नगण्य व्यायाम आपल्यासारख्यांना नकोसा वाटणार हे आमच्या ध्यानात आले आहे.
सावरकरांची पुस्तके इथे
सावरकरांची पुस्तके इथे विनामुल्य आहेत.. http://www.savarkarsmarak.com/downloadbooks.php
>>तुमच्या कोणत्याही लेखात
>>तुमच्या कोणत्याही लेखात अजून एक लेख लपलेला असतो, ज्यात तुमचा हिंदुत्ववादी- गांधीविरोधी अजेंडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न स्पष्ट्च असतो. ही कसरत कशासाठी? तुम्हाला सावरकरांचे कर्तुत्व सांगयचे आहे ही उत्तम बाब आहे पण त्याआडून चालवलेले तिरकस शरसंधान नको त्या प्रतिक्रिया आणि भांडणे यांना आमंत्रण देतात. आणि यासगळ्यात तुमचा 'सावरकर विचार' पोचवण्याचा मूळ उद्देश बाजूला पडतो. मग शंका ही येते की हा मूळ उद्देश आहे की सावरकर केवळ एक निमित्त आहेत?
माझाच लेख भरकटवला जातो म्हणून मी फक्त विपूतच चर्चेला उत्तर देईन, ही वेळ का आली याचा थोडा विचार करा.<<
आगाऊ जी,
प्रतिसादास उशीर झाल्याबद्दल दिलगीर आहे.
सावरकर आणि महात्माजी हे दोघे स्वातंत्र्याचा लढा सशस्त्र कि अहिंसक मार्गाने लढवायचा या दोन टोकांच्या विचारांचे पाईक होते. समकालीन होते. तत्कालीन राजकारणातील विरोधक होते. सावरकर १९१० ते १९३७ पर्यंत राजकारणात बंदिवास व स्थानबद्धता यामुळे राजकारण करू शकत नव्हते तोवर देशाचे नेतृत्व बव्हंशी महात्माजींकडे गेलेले होते. १० मे १९३७ नंतर सावरकरांचे सनदशीर राजकारण सुरु झाले. त्यांची भूमिका तत्कालीन राजकारणात गांधीजींच्या राजकीय विचारांच्या बव्हंशी विरोधात होती. सावरकरांनी दिलेले सर्व इशारे त्याकाळात तरी अरण्यरूदन ठरले असले तरी खरे ठरले. आता हे दाखवून देतांना महात्माजींचे धोरणाशी तुलना होणे अपरिहार्य आहे. त्यात कसलेही तिरकस शरसंधान करायचे नसते. फक्त वस्तुथिति मांडलेली असते. माझा मूळ उद्देश सावरकरांनी मांडलेल्या विचारांवर लोकांनी स्वतः विचार करावा, परिसरातील घटना डोळसपणे पाहाव्यात आणि घटनांबद्दलचे मत बनवावे. सावरकर हे निमित्त वगैरे कांही नाही.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
साठ वर्षे तुम्हीही अरण्यरुदनच
साठ वर्षे तुम्हीही अरण्यरुदनच करताय.. कोण ऐकतय तुमचं?
Pages