एक किरण....आशेचा !

Submitted by pradip rane on 30 August, 2008 - 14:03

आज दुपारी ऑफिसमधून निघाल्यावर बेलापुर स्टेशनवरून छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणार्‍या गाडीत बसलो.गर्दी तशी कमीच होती.शेजारच्या बाकावर कॉलेजमधल्या मुलांनी पत्यांचा डाव मांडला होता. हल्ली बरीच कॉलेजस् नव्या मुंबईत असल्यामुळे अनेक ग्रुप्स प्रवास करताना दिसतात.काहीजण या प्रवासाच्या वेळेचा सदुपयोग करतात. एखाद्या महत्वाच्या विषयावर चर्चा अथवा वाचन,लिखाणही बर्‍याचदा चालू असते.काहीजण मात्र पिकनिकला निघाल्यासारखे वागत असतात.जोरात ओरडणे,किंचाळणे,मोबाईलवर मोठ्याने गाणी लावणे अशा अनेक गोष्टी ही मंडळी करत असतात.या मागे इतरांना त्रास देण्याचा हेतू नक्कीच नसतो,पण अनावधाने तो होतोच ना! प्रवासादरम्यान अशा अनेक घटना नेहमीच घडत असतात.कधी गाडीतील भजन मंडळ किंवा दोन बाकांच्या मधे बॅग आडवी ठेवून मांडलेला रमीचा डाव असो! एकत्रितपणे इतरांना त्रास देणे आता नेहमीचेच झाले आहे. आताही माझ्या शेजार्‍यांचा गोंगाट वाढला होता.रमीचा डाव रंगात आला होता.
पंधरा दिवसांपूर्वीचा असाच एक प्रसंग आठवला.शनिवारचाच दिवस होता. दुपारची वेळ होती.आजच्याप्रमाणे तेव्हाही गाडी सुटण्याची वाट पाहत होतो.इतक्यात एक आजोबा त्या डब्यात आले,माझ्यासमोरच बसले.उन्हातून आल्याने अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या,धाप लागली होती.रूमालाने घाम पुसून झाल्यावर त्यांनी मला, "पाणी आहे का?" असे विचारले.मी त्यांना पाणी दिले.विचारपुस करताना मला कळले की ,ते ऑफिसेस् मध्ये जाऊन चिवडा,लाडू,चिक्की असे पदार्थ विकतात.दम्याचा त्रास असला तरी पोटासाठी धावपळही चालुच असते.इतक्यात ४-५ मुलांचा ग्रुप डब्यात आला व आमच्याच शेजारी बसला.सिगरेट ओढता-ओढता थट्टामस्करी चालू झाली.त्यांच्या स्मोकिंगचा त्रास आम्हाला होऊ लागला. हातातल्या मेडिकल सायन्सच्या पुस्तकांमुळे तरी ती सुशिक्षित वाटत होती.आजोबांनी त्यांना बाहेर जाऊन सिगरेट ओढण्याची विनंती केली.त्यांनी,"छोड यार!" करत दुर्लक्ष केले. एकाने तर आजोबांनाच दुसरीकडे बसायला सांगितले.आता मात्र माझा संयम सुटला.मी पोलिसांना बोलावण्याची धमकी दिल्यावर ते टोळक तो डबा सोडून दुसर्‍या डब्यात गेली.वाईट वाटले!
आजची पिढी खरोखर एवढी स्वार्थी आणि बेफिकिर आहे का?खरतर आजची तरूण पिढी अत्यंत हुशार आहे,त्यांचा उत्साह दांडगा आहे.अनेक समाजोपयोगी कार्यात ही धडाडीने भाग घेतात.अनेकदा मात्र यांचा संयम जाताना दिसतो.थोड्याशा अपयशाने नैराश्य येते. मग त्यांवर मात करण्यासाठी व्यसनांना जवळ केले जाते. काहीवेळा सर्वांचा शेवट आत्महत्येत होतो.ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवाव्यात त्यांनाच असे ढासळताना बघून फार वाईट वाटते.त्यांक्षणी मला ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांचे 'अग्निपंख' या आत्मचरित्रातील शब्द आठवले,"माझ्या मते भारतीय तरूणांपुढची सर्वात मोठी समस्या म्हणजे स्पष्ट दृष्टीचा अभाव,नक्की दिशेचा अभाव ही आहे.कुणी माणूस कितीही छोटा असेल,गरीब असेल,अभावाच्या परिस्थितीत असेल तरी त्याने हिंमत हारण्याची गरज नाही.समस्या ही जीवनाचा एक भाग आहे,दु:ख हे यशाचे सार आहे."
खरच केवढा प्रचंड आशावाद कलामसाहेबांनी वरील वाक्यातून दिला आणि परत कुठेतरी एक आशेचा किरण डोकावू लागला.

प्रदिप राणे.

गुलमोहर: 

प्रदिप,

एरवी संयमी, समतोल वाटणारी व्यक्ती जेव्हा जमावाचा एक भाग होते तेव्हा बर्‍याचदा ती स्वैर, बेजबाबदार तर प्रसंगी हिंसकही वागू शकते. दंगलीच्या काळात बस फोडणारी, जाळणारी माणसं प्रत्यक्षात भित्री असू शकतात. सिगरेट पिणारा तो मुलगा जर एकटा असता तर कदाचित तुम्हाला पोलिसांना बोलवीन अशी धमकी द्यायची वेळही नसती आली.

माझी अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

दुर्दैवाने, सार्वजनिक ठिकाणी सिगारेट ओढणे, हे केवळ एक छोटे उदाहरण झाले!
प्रत्यक्षात परिस्थिती फार बिकट हे!
"स्पष्ट दृष्टीचा अभाव" हे सगळ्यात महत्वाचे कारण वाटते
शाळा कॉलेजात सन्स्कार राहिले नाहीत, (उलट इथे देखिल कदाचित "सन्स्कार सन्स्कार म्हणजे तरी नेमके काय हो?" असे विचारणारेच जास्त भेटतील) व सिनेमा टीव्ही सारख्या दृष्य माध्यमातून जे "सन्स्कार होताहेत" तशा दृष्ट्या बनताहेत
भरीसभर आईबाप करिअर (थोडक्यात पैशाच्या मागे) लागलेले असतील, तर तिकडूनही नन्नाचा पाढाच
दहावि करुन अकरावित गेल की शिन्गे फुटल्याप्रमाणे ही पुढची पिढी काय काय उपद्व्याप करते ते इमॅजिन करणे देखिल अशक्य होते
जर नीट रस्त्यावर राहिली नाही तर खड्ड्यात त्यान्चे तेच जाणारेत पण बरोबर अजुन कुणाकुणाला घेवुन जाणार याची काळजी मला जास्त वाटते
...;
आपला, लिम्बुटिम्बु

प्रदीप, खूप छान असतं तुमचं लिखाण. विचार करायला लावतं. लिहित रहा..