कोहं

कोहं कोहं
अंतराळी हुंकार
परावर्तित ध्वनी
रुकार ना नकार

प्रश्नांचे भोवरे
भोवर्‍यांचे प्रश्न
अणुच्या कणात
अस्तित्व चिन्ह

रहाट गाडगे
जीवाचे नियोजन
चक चक्रव्युहात
अज्ञात प्रयोजन

असे आसाभवती
तसे ध्यासाभवती
गती अगतिक
परिघाची भीती

शुक्ल ते कृष्ण
परिमाण हाती
कोहंच्या शोधी
अहं गच्छंती


ह्म्म... चांगली आहे.
शेवटच्या ओळीत अहम् ठेवायचे असेल तर बरोबर रूपे - अहम् गच्छति (अहम् चा तृतीय पुरूषी वापर) / अहम् गच्छामि (अहम् चा प्रथम पुरूषी वापर).
गच्छन्ति ठेवायचे असेल तर वयम् गच्छन्ति / ते गच्छन्ति.

    ***
    Skating away on the thin ice of the new day...



    छान!



    सुरेख कविता, कौतुक.

    चक चक्रव्युहात
    इथे मी चक वाचतेय की चक्र आहे पण 'चक' दिसतय की 'चक'च म्हणायचय?
    चक असेल तर चकवा ह्या अर्थाने आहे का?



    कविता कळली नाही ... अरेरे



    स्लार्टी संस्कृतचं ज्ञान तस फार नाहीच. अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्याचा प्रकार हा. दुरुस्तीसाठी धन्यवाद.
    दाद, चक्र हवं. टंकलेखनाचा दोष. पण 'चक' ही चकवा म्हणुन चपखल बसेल.
    दक्षिणा, दुर्बोध लिहील्याबद्द्ल क्षमस्व. काही फोटो पाहण्यात आले. यात ठराविक पटीत फोटो होते. झाड, मग गाव, शहर, देश, पृथ्वी, अंतराळ, आकाशगंगा, नवी आकाशगंगा... त्यानंतर उलट प्रवास पुन्हा झाड, मग पान, पेशी, पृथक्करण. ही झाली कवितेच्या प्रेरणेची पार्श्वभुमी.
    कोण मी ? हा टाहो अंतराळात केवळ हुंकार. त्याचा एको येइल ना येइल पण त्यात नकार वा रुकार असेलच असे नाही. कारण या विश्वाच्या पसार्‍यात आपलं नेमकं स्थान कोणतं हे सांगणार कोण ?? आपल्याशिवाय अजुन कोणी आहे हा प्रश्न अनुत्तरीत आहे. या एका प्रश्नातुन दुसर्‍या प्रश्नाची निर्मिती. या भोवर्‍यात गटांगळ्या खात असतानाच आणखी नवे प्रश्न पडतात. अणुचा कण म्हणजे शेवट. यापेक्षा सुक्ष्म ते काय ? त्यात ही आढळते जीवाश्म्याचे अस्तित्व. सुक्ष्मदर्शिकेने पाहील्यास शरीरावर अनंत जीव हिंडताना दिसतील जे डोळ्यांना सहज दिसत नाही. रहाट पाणी घेऊन वर येते व पाणी ओतुन पुन्हा नव्याने आणण्यास पाण्यात उतरते. प्रत्येक सजीवाला हा नियम लागु आहेच. हे चक्र एका चक्रव्युहात असल्यासारखे अविरत फिरत आहे.पण या सार्‍याचे नियोजन करणारा अज्ञात आहे. रहाट गाडगे चालवणार्‍या बैलांसारखा दृष्टीस पडत नाही. सारे ग्रह तारे स्वतःच्या आसाभवती फिरतात व त्याचवेळेस ध्यासाभवती म्हणजे चंद पृथ्वीभवती, पृथ्वी सुर्याभवती फिरत असतात. यांची गती ठरलेली आहे. ती कमी जास्त होणे त्याच्या हाती नाही तसेच फिरण्याची कक्षाही ठरलेली. परिघ ते ओलांडत नाही. या कडव्याचा दुसरा अर्थ आता तुम्हाला काढता येईलच. शुक्ल पक्ष ते कृष्ण पक्ष असे पंधरवड्याचे मोजमाप आपल्याकडे आहे. शेवटी तेच आपण करतो. आलेले दिवस ढकलतो. कोण मी ?? या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. मग एक दिवस आपण विलीन होतो.
    हे जरा जास्तच झाल म्हणा. पण तांत्रिक अर्थ समजला असेल. नसेल तर कळवा.
    आभारी.



    कविता छान आहे. "परिघाची भीती" - हा विचार सूक्ष्म आहे. अभिनंदन!!

    "प्रश्नांचे भोवरे, भोवर्‍यांचे प्रश्न", "चक्र चक्रव्युहात", "आस-ध्यास" या कल्पना नीट कळल्या नाहीत; आणि म्हणून जरा शब्दिक खेळ वाटले. असे मोह होणे फार स्वाभाविक आहे; मलाही बर्‍याचदा होतात! पण ते टाळण्यचा प्रयत्न करत राहिला पाहिजे. चू .भू. द्या. घ्या.