आनंदाची वाट-भाग१

Submitted by रेव्यु on 21 March, 2011 - 14:14

अनेक वर्षांपूर्वीचा एक रिकामा आळसावलेला रविवार हातातून निसटत जाणारी चपळ दुपार.अस्मादिकांच्या मनात आलं की अनेक दिवसांपासून साठत गेलेली अडगळ काढून आपल्या सामानाचा कप्पा व्यवस्थित करावा,तेवढेच हिला बरे वाटेल.याव्यतिरिक्त आणखी ही संदिग्धतेत लपेटलेले एक कारण होते.माझ्या कपड्यांच्या कप्प्यात हुरूपाने विकत घेतलेली व तितक्याच हुरूपाने विसरलेली कांही पुस्तके सापडतात का हेही शोधायचे होते.या मोहिमेपोटी खण उघडला अन खरच तिथे पुस्तकांसारखा दिसणारा एक गठ्ठा तिथे आढळला.तो उचलला अन नजिकच्या पलंगावर ठेवला.परंतु त्यात नवीन अथवा वाट पहाणारी कुठलीही पुस्तके नव्हती.
त्या गठ्ठ्यात होते जाड कागद्,एक प्लॅस्टिकची फ्रेम्,काही दाभणा सारख्या सुया अन काही कागदांवर नक्षी केल्यासारखी लहान लहान छिद्रे.मी याचा छडा लावण्यासाठी स्मृतीला खूप ताण दिला अन लक्षात आले की माझ्या खणात हा पठ्ठ्या अनेक आठवड्यांपासून -किंबहुना महिन्यांपासून -जुनी पुस्तके-अशा पत्त्याखाली माझ्या मनात वास्तव्य करून होता.खरं सांगू माझं सर्व वेंधळ्या नवर्‍यांप्रमाणे लक्षही नव्हतं.आता मात्र खरे स्वरूप पाहून धारणाभंग झाला होता.पण अर्थबोधही होईना की हा काय प्रकार आहे!!
मग सवयीनुसार हिला हाक मारली.वरकरणी ही देखील त्या गठ्ठ्याचा उगम काही सांगत नव्हती.पण तिच्या एकंदर अविर्भावावरून माझी मनोमन खात्री पटत चालली होती की हा सर्व खटाटोप तिचाच असून या गौडबंगालाचे उत्तर तिच्या कडे नक्की असावेच.
"राहू दे रे -खरच काही नाही" ने सुरुवात होवून "हा माझा वेडीचा उपद्व्याप्-महत्त्वाचा नाही----किरकोळ विरन्गुळा आहे---" पर्यंत गाडी हळू हळू पुढे सरकली होती.या कूर्म गतीने मिळणार्‍या सारवासारवीने माझे समाधान होईना. शेवटी खनपटीस बसल्यावर मोठ्या नाईलाजाने,आग्रहा पोटी तिने सांगावयास सुरुवात केली.
"दीड दोन वर्षापूर्वी आपण इथे हल्द्वानी-काठगोदाम (उत्तरांचल प्रदेश) ला तुमच्या हाँडातील नोकरीखातर आलो तेंव्हा काही महिन्यातच मला बेचैन वाटू लागले.अपूर्ततेची अन स्वतःच्या ध्येयहीन अन निरुपयोगी जीवनाची जाणीव तीव्र होवू लागली.मला मुले अन माझा संसार,तुम्ही सर्वच प्रिय व आनंद दायी ,लौकिकार्थाने सुरळित होते पण तरीही ही घालमेल--- असह्य होवू लागली.तुम्ही तुमच्या व्यवसायात दिवसातील सोळा तास गुरफटलेले,इतक्या वर्षाचं तुमच कॉर्पोरेट जिण पाहिल्यावर तक्रार करणं हे ही गुन्हा केल्यागत वाटायचं.
एके दिवशी आपल्या बंसाल दिदीकडे गेले असता त्यांच्या कडे असलेच जाड कागद्,मुलांच्या गोष्टीची पुस्तके अन ही फ्रेम व दाभणा सारख्या दिसणार्‍या सुया दिसल्या.माझं कुतुहल जागृत झालं.तुम्हाला माहित आहे की मला पहिल्यापासूनच कशिदा,विणकाम,पेंटिंग इ. ची आवड आहे;त्याचाच हा काही प्रकार तर नाही?
बन्साल दिदी म्हणाल्या- ""हे सर्व साहित्य दृष्टीहीन शाळकरू मुलांच्या पुस्तकांच्या निर्मिती साठी आहे.फरिदाबादला अंध मुलांची शाळा आहे.सरकारच्या अन समाजाच्या अनास्थेमुळे या शाळांत पुस्तकांची चणचण आहे.आपण जी पुस्तके सह्ज प्राप्य म्हणून गृहित धरतो,जी पुस्तके दुकानोदुकानी,पदपथावर देखील स्वस्त दरात दृष्टी असणार्र्‍यासाठी सहज मिळतात ती या अंध मुलांना मिळत नाहीत्.बालकथा,बडबडगीते,कविता या ब्रेल मध्ये लिहून तयार असणार्‍या पुस्तकांची नितांत गरज आहे.या पुस्तकांची तीव्र टंचाई आहे.या मुलांचे शालेय जीवन अन बाल्य या टंचाईने बर्‍याच अंशी हरपले आहे.ही पुस्तके हाताने लिहून्(म्हणजे दाभणाने त्या जाड कागदावर छिद्रे पाडून्-त्या लिपीत) तयार करावी लागतात्.या प्रकारे ही पुस्तके स्वतः तयार करून भरमसाठ भावात विकणे हा काही स्वार्थी लोकांचा व्यवसाय झाला आहे.याची मुद्रणाची मशिने आहेत पण महाग अन भारतात अजून आली नाहीत.एव्ढेच नाही,शुध्दलेखन अन व्याकरणाचा गंधही नसलेले अर्धशिक्षित लोक ही पुस्तके बनवतात/लिहितात अन दुसरा पर्याय नसल्याने या सेवाभावी संस्था ही पुस्तके आपल्या अनुदानाचा मोठा भाग स्वाहा करून विकत घेतात्.या सर्वां वर एक पर्याय व माझी जबाबदारी व खारीचा वाटा म्हणून मी ब्रेल शिकले.मी ही पुस्तके लिहून त्या मुलाना हा आनंदाचा ठेवा दर महिन्यात देते""
दिदींचे मनोगत ऐकून आनंदाचे कोंदण उघडल्याचा भास मला झाला.मुली शाळेत अन हे फॅक्टरीत गेल्यावर रोज मी दिदींकदे जाऊ लागले.सर्व औजारे मागविली अन प्रथमिक शाळेत जाणार्‍या वियार्थ्यांसारखी मी अ,आ ,इ,ई--- अन ए बी सी डी--- ब्रेलमध्ये शिकू लागले.सुरुवातीला खूप कठीण वाटले,बोटे दुखायची,अन मला कुणाला गाजावाजा करून सांगयचे नव्हते -हा माझा एकटीचा -माझ्या निखळ आनंदासाठी आक्रमलेला मार्ग होता.माझ्या साठी हे नुसते शिक्षण नसून नेत्रहीनांच्या दुनियेतील अनुभवांची प्रथमरूपी अनुभूती होती.मी जसजशी या लिपीत पारंगत होवू लागले तसतशी मला बालसुलभ आनंदाची जाणिव व पुनःप्रत्यय होवू लागला.त्या खडबडीत अक्षरावर्,उंचवट्यावर डोळे मिटून स्पर्श करताना अन त्या स्पर्शातून त्या लिखाणातील आशय समजून घेण्याचा आनंद वेगळा होता् हळू हळू एक अक्षर मग एक ओळ ,एक वाक्य्,एक पान अन शेवटी एक अख्खी कविता-बालगीत मी ब्रेलमध्ये बिनचूक लिहून काढल्यावर मला माझ्या पहिली च्या वर्गात पहिली आल्याचा भास झाला.मग हळू हळू पहिले पुस्तक तयार झाले अन फरिदाबादच्या शाळेत मी पाठवले.ज्या मोगर्‍याचे मी बीज रोपले त्याला आता एकच का होईना फूल आले होते.त्याना ते आवडले व बिनचूक असल्याचे त्यांनी कळवीले.वर्षाभरात मी नऊ पुस्तके पाठविली आहेत्.या प्रकारे माझ्या अल्पश्या प्रयत्नाने मी त्या मुलांच्या भावविश्वात प्रवेश केला आहे.माझा मूक प्रवास मला माझ्याजवळच ठेवायचा होता.कालच मी आणखी एक पुस्तक तयार केले आहे .पहाल का? अन हो उद्या जाता जाता ते पोस्टात पार्सल कराल का? आता तुम्हाला सगळं सांगितलेच आहे!! मुलींना मात्र या सर्वाची माहिती आहे बरं"
पुढील प्रवास क्रमशः
टीपः हा प्रवास गेले दहा वर्षे चालू आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

समाधानकारक उद्दिष्ट मिळाले हे खरोखरीच चांगले झाले.
मात्र, अखेरीस ते पुस्तक वाचणार्‍याच्या हातात पडले की नाही?

असो. गोष्ट प्रेरणादायक आहे. आवडली.

गोळेसाहेब
लौकिक दृष्ट्या सर्व काही आलबेल असूनही अंतरीच्या तळमळीबद्दल ही सर्व हकिकत आहे.पुस्तके मुलांच्या हाती नक्कीच पड्ली व अजून ही पडत आहेत.
सर्व वाचकांच्या अन तुमच्या प्रोत्साहनाबद्दल आभार.हीने वाचले आहेत.

लौकिक दृष्ट्या सर्व काही आलबेल असूनही अंतरीच्या तळमळीबद्दल ही सर्व हकिकत आहे

अतिशय कौतुकास्तद आहे हे सगळे.

हल्लीच मी दोघा-तिघांच्या तोंडुन ऐकले की नोकरीचा कंटाळा आलाय, गरजही नाहीय, पण घरी बसुन काय करणार म्हणुन नोकरीत पाट्या टाकायचे काम चालु आहे. अशा लोकांनी हे वाचायला पाहिजे.

रेव्यु... खरंच अभिनव आणि कौतुकास्पद उपक्रम!!! अभिनंदन आणि शुभेच्छा! आनंदाच्या पुढच्या वाटेची वाट बघतेय!

स्नेही मंडळींच्या प्रतिसादाने खूप भारावून गेलोत आम्ही दोघेही.
शतशः धन्यवाद.
आजच पुढच्या प्रवासाबद्दल लिहित आहे.
पुनः आभार
Happy

सर्व वाचकांना शतशः धन्यवाद्.आपल्या उत्स्फूर्त कौतुकाने आम्ही भारावून गेलो आहोत.
सौ रेव्यु व रेव्यु

खरच प्रेरणादायी आहे हे काम. तुमच्या सौना, साष्टांग नमस्कार. "कोणताही गाजावाजा न करता" स्वान्त्-सुखाय म्हणून जे काही निवडलंय... ते देवाचं काम नाही तर अजून काय...

Pages