ये कुछ आधे अधुरे पन्ने है - पन्ना ६

Submitted by स्वप्ना_राज on 26 February, 2010 - 01:42

मौतका खौफ है क्योंकी उसे समझ नही पाते है
नादान है हम सब जो जिंदगीसे नही घबराते है

म्रृत्यू हे एक अजब कोडं विधात्याने घालून ठेवलंय जे भल्याभल्यांना आजतागायत सुटलेलं नाहीये. ज्ञात असलेलं सगळं सोडून ज्याच्याबरोबर जायचं त्या म्रृत्यूच्या पलीकडचं अज्ञात हे त्याच्याबद्दल वाटणार्‍या भीतिचं एक कारण. आपण कोणीच त्याला समजू शकलो नाहीये. पण मग हाच निकष लावला तर आपण आयुष्याला पण घाबरायलाच हवं नाही का? ते तरी आपल्याला कुठे उमगलंय?

एका अंधार्‍या खोलीच्या एका दारातून कोणीतरी आत ढकलून द्यावं आणि आपण वाटेतले अडथळे पार करत करत बाहेर पडायचं दुसरं दार शोधावं तस्सा हा खेळ. वाटेत काय आहे माहित नाही. पडायला होतं, ठेचकळायला होतं, खूप लागतं सुध्द्दा - कधी जखमा दिसतात, कधी दिसत नाहीत. कधी रक्त येतं, कधी अश्रू. कधी सावरणारे हात अचानक पुढे येतात तर कधी आत्ता-आत्तापर्यंत सोबत असलेले हात सोडून मो़कळे होतात. खूप यत्न करूनसुध्दा वाट सापडत नाही तेव्हा आपल्याला जन्माला घालून कळसूत्री बाहुलीसारखं नाचवणार्‍या त्या अद्रृश्य शक्तीचा संताप येतो - सगळं काही तुझ्या हाती ठेवायचं होतं तर मला जन्माला कशाला घातलंस? पुढे जायची इच्छाच खुंटते, आपण थांबतो, दिग्मूढ होतो. कधी आपलं आणि त्यातून डोकं वर निघालंच तर दुसर्‍याचं दु:ख पाहून वाटतं की पर्वताएव्हढं दु:ख न मागता मिळतं पण जवाइतकंही सुख मागूनही अप्राप्यच का राहतं?

खरंच, प्रेमात पडावं इतकं आयुष्य सुंदर आहे?

-----

"ह्या शनिवारी तो पेस्ट कंट्रोलचा माणूस येणार आहे. बरं झालं बाई, ह्या नव्या कंपनीकडून करून घ्यायला लागल्यापासून घरात एक झुरळ दिसत नाही. आणि परत काही त्रास नाही. पूर्वीची ती सर्व्हिस होती तेव्हा त्या माणसाचं काम झालं की कुलूप लावून बाहेर पळायला लागायचं ४-५ तास."

"खरंच ग, आता टिक २० मिळतं का बाजारात? मला नाही वाटत त्याला कोणी गिर्‍हाईक असेल. बाय द वे, तुला ती गंमत आठवतेय का? मी दहावीत असताना रिझल्टचं उगाच टेन्शन घेतलं होतं आणि तू घरात असलेली टिक २० ची बाटली लपवून ठेवली होतीस?"

"तुला हसायला काय होतंय...माझा जीव टांगणीला लागलेला होता तुझा रिझल्ट लागेपर्यंत"

"अग पण लहानपणापासून ओळखतेस ना तू मला? तुला असं वाटलंच कसं की मी असं काहीतरी करेन? दुसर्‍या जन्मात मला परत पहिलीपासून नाही का सुरूवात करावी लागणार शिकायला?" मला हसू आवरत नव्हतं.

आई मात्र गंभीर झाली होती. "त्याला तसंच कारण होतं. आता विषय निघालाच आहे तर सांगते. तुझ्या बाबांच्या ऑफिसमध्ये दुसर्‍या सेक्शनमध्ये एक माणूस होता. त्याचीही मुलगी तुझ्याएव्हढीच होती तेव्हा. आणि त्याच दिवसांत बातमी आली की तिने काहीतरी कीटकनाशक घेतलं रात्री. जेव्हा वेदना फारच असह्य झाल्या तेव्हा आईवडिलांच्या खोलीत आली आणि "मला वाचवा, मला मरायचं नाहीये" असं सांगायला लागली. त्यांनी खूप धावपळ केली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. आजही विचार केला तर अंगावर काटा येतो माझ्या. आपण आपल्या मुलीला वाचवू शकलो नाही ह्याचं दु:ख त्या आईबापांना जन्मभर खात राहील."

"आणि तुला माहिताहे? तुमचा रिझल्ट लागला तेव्हा ती मुलगी चांगल्या मार्कांनी पास झाली होती. तिच्या आईवडिलांना कळलंच नाही की तिने रिझल्टचं टेन्शन घेऊन आत्महत्या केली होती का काही आणखी कारण होतं."

ज्या पोटच्या गोळ्याने जगातून जाताना आपल्याला निरोप द्यायचा तिला चितेच्या हवाली करताना त्या आईवडिलांच्या मनाला काय यातना झाल्या असतील त्याची कल्पनाच मी करू शकत नाही. ह्या जगात प्रत्येकाला त्याचा स्वतःचा क्रॉस स्वतःच वहावा लागतो हे खरंय पण कधीकधी दुसर्‍याच्या क्रॉसवरचे खिळे आपल्याला सुध्दा रक्तबंबाळ करून जातात.

-----

मीताबद्दलचं माझं फर्स्ट इम्प्रेशन म्हणजे - आगाऊ! आणि माझं एखाद्याबद्दल वाईट मत झालं की ते टिकून रहातं. आई म्हणते त्याप्रमाणे त्या माणसाने आपलं डोकं कापून माझ्यासमोर ठेवलं तरी मी तो भोपळाच आहे असं म्हणणार. इलाज नाही.

तरी पण मी ज्या प्रोजेक्टवर होते त्यावर ती पण होती त्यामुळे कामाच्या संदर्भात, लंच घेताना आणि बर्‍याचदा संध्याकाळी घरी जायला निघताना सुध्दा आम्ही बरोबरच निघायचो. गप्पांचा विषय अर्थातच सुरुवातीला प्रोजेक्टचं काम हा असायचा. मग हळूहळू नवा रिलिज झालेला हिंदी पिक्चर (जो मी कधीच पाहिलेला नसायचा!), नवी हिट गाणी वगैरे वर चर्चा सुरू झाली. एक-दोन वेळा तिच्या बोलण्यात मुलाचा उल्लेख आला तेव्हा तिचं लग्न झालंय हे मला कळलं. ती महाराष्ट्रीयन नसल्याने मंगळसूत्र घालण्याचा प्रश्नच नव्हता म्हणून आधी लक्षात आलं नव्हतं. तरी पण कधी नवर्‍याबद्दल बोलायची नाही. थोडं ऑड वाटलं तरी आपल्याला काय करायचंय म्हणून मी लक्ष दिलं नाही.

बाकी रहायची मात्र एकदम अ‍ॅफ्ल्युअन्ट लोकॅलिटीमध्ये - तसं तिच्या बोलण्यावरूनच एकदा कळलं. एकदा नाही म्हटलं तरी मला वाटलंच - काय मजा आहे बाईसाहेबांची, आपल्याच वयाची आहे पण लग्न होऊन एक मुलगा (म्हणजे समाजाच्या दृष्टीने गंगेत घोडं न्हालंच की!) आहे, मस्त घर आहे, नोकरी नाही केली तरी नवर्‍याच्या कमाईवर मस्त राहू शकते. घरी आईला सांगायची चूक केली आणि मासाहेब कडाडल्या "तुला कोणी नको केलंय का लग्न करून घरी बसायला? पण नाही, करियर करायची आहे. नवर्‍याचा पैसा म्हणजे आपला नाही हे काहीतरी आहे डोक्यात. अजूनसुध्दा अंधेरीपर्यंत तडफडत जाऊन नोकरी करायची गरज नाहिये, घरात राहून सोशल वर्क करायचं तर ते कर. आम्ही तुला पोसायला समर्थ आहोत." अरेरे

मग एक दिवस मीताने एक फोटो दाखवला - तिचे आईवडिल आणि मुलगा. ह्यात पण पतिराज गायब. आणि मुलाला पाहून छातीत थोडं धस्सच झालं माझ्या. पण ती उत्साहाने त्यांच्या ट्रीपबद्दल सांगत राहिली आणि मी ऐकत राहिले. काही विचारायचं धाडस नाही झालं मला.

वर्ष संपत आलं होतं आणि प्रोजेक्टच्या ग्रूपने सहलीला जायचं ठरवलं. कळवा बीचला जायचं ठरलं. "मै निखिल को लानेवाली हू" मीताने जाहिर केलं. "अरे, बिनधास्त लेके आ. हम सब है ना" प्रोजेक्ट लीडरच्या बोलण्याचा संदर्भ नाहीच लागला. पण दुसर्‍या दिवशी मीताच्या मुलाला पाहिलं आणि माझी शंका खरी निघाली - त्याचं बोलणं त्याच्या वयाच्या इतर मुलांसारखंच पण हालचाली मात्र बर्‍याचश्या मंद गतीने होत होत्या. दुपारी समुद्रात हुंदडून आल्यावर त्याला कपडे बदलताना मीताची बरीच मदत घ्यावी लागली. आणि त्याचं थोडंसं क्रृश शरीर माझ्या नजरेतून सुटलं नाही. पण पोरगा गोड होता. आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली.

संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला तिला एकटीच बसलेली बघितली. "चल मीता, अब निकलेंगे आधे घंटेमे. बहोत मजा आया ना?"

"हां रे, निखिल कहा पे है"

"अरे वो लोग सब मस्ती कर रहे है वहापे. तू अकेली क्यो बैठी है? चल वहा जाते है"

"नही रे, अच्छा लग रहा है यहापे. ऐसा मौका पता नही फिर कब मिले" आणि एकदम तिच्या डोळ्यांत टचकन पाणीच आलं.

माझा एक प्रोब्लेम असा आहे की कोणी रडायला वगैरे लागलं की मला काय करावं तेच कळत नाही. आपण पाहिलंच नाही असं दाखवायचं असतं का ती व्यक्ती शांत व्हायची वाट बघायची असते? काही विचारावं तर दुसर्‍याच्या आयुष्यात दखल दिल्यासारखं होणार. मी तशीच बावचळून उभी राहिले. पण तीच लगेच शांत झाली आणि आम्ही परत फिरलो.

पुढच्या महिन्यात एकदा दुपारी पासपोर्ट ऑफिसला जायचं आहे असं सांगून ती लवकर निघाली. दुसर्‍या दिवशी तिला मी सहज विचारलं की तिच्या आणि निखिलच्या पासपोर्टचं काम झालं का. "अरे, कल डिव्होर्स पेपर की कॉपी देने गयी थी." माझा हात चहाच्या कपासकट हवेतच राहिला. "अब उन्हे डेथ सर्टिफिकेट की कॉपी चाहिये. कहासे लाऊंगी मै." माझा पहिला प्रश्न मनातच राहिला. "किसका डेथ सर्टिफिकेट मीता?" "मेरे हजबंडका." पुढचा प्रश्न मनात असून ओठांवर येईना. "मुझे किसीने बताया के उसकी डेथ हो गयी है लेकिन उन्हे बाकी कुछभी नही पता" हे मात्र मला झेपेनाच. मी नुसतीच वेडयासारखी बघत राहिले तिच्याकडे. इतक्या थंडपणे कशी सांगू शकते ही हे सगळं?

पण तिचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. खिडकीतून बघत स्वतःशीच पुटपुटली "अठारा बरसकी थी जब शादी की मैने. पढाईमे मन नही था सो सोचा शादी करके घर बसाऊंगी. मुझे कभी नौकरी करनीही नही थी. पता नही जिंदगीमे ये क्या हो गया"

जवळ कुठेतरी कडकडून वीज पडावी आणि कानठळ्या बसून एकदम दचकायला व्हावं तसं झालं माझं. माझ्या मनातलं तिचं सुखासीन आयुष्य माझ्या मनातच होतं फक्त. वास्तव काही वेगळंच होतं. माझ्याच वयाची ही मुलगी पण आयुष्याने कसले दशावतार दाखवले होते तिला. त्यामानाने आपण सुखी हा विचार मनात आला मात्र, माझी मलाच आधी लाज वाटली, मग भीती वाटली. नकळत समोरच्या लाकडाच्या टेबलला हात लावला "टच वूड"! आणि मी हिला आगाऊ म्हणत होते. जगाने दु:खावरची खपली ओरबाडून काढू नये म्हणून ती असं वागत होती हे मला कधी कळलंच नव्हतं.

आपण एक बेत करत असतो आणि दूर कुठेतरी बसून नियती खदखदून हसत दुसरंच काही ठरवत असते. "अस्सं ठरवलंयस तर. बघतेच मी कसं होतंय ते". सटवाईने अद्रृष्य अक्षरांत कपाळावर काय लिहिलंय ते दिसायची दिव्य द्रृष्टी माणसाला येईपर्यंत हे असंच चालायचं. ठेच लागून आपण शहाणे होईतो सगळा खेळच संपलेला असतो.

-----

शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात. खरं तर माणसाने हॉस्पिटलची पायरी पण चढू नयेच. आपल्याला काही झालं नसलं तरी आजारी वाटायला लागतं. त्या दिवशी आईबरोबर तिच्या अ‍ॅन्युअल चेकअपसाठी गेले होते. अख्खं पॅकेज असल्यामुळे दुपारपासून निरनिराळ्या डिपार्टमेन्टमध्ये ती फिरत होती - नळाबरोबर गाड्याची यात्रा तशी तिच्याबरोबर मी पण.

शेवटी मॅमोग्राफीच्या सेक्शनमध्ये आलो. आई आत गेली आणि मी बाहेर बसले. बरोबर पुस्तक होतं म्हणून वाचण्यात गढले. काही वेळाने पहाते तर आई अजून आली नाही. नाही म्हटलं तरी धास्तावलेच. ५ मिनिटं अस्वस्थ चुळबूळ. मग मी उठणार तोच आई आली.

"झालं?"

"हो. का ग?"

"काही काळजी करायचं कारण नाहीये ना? तुला यायला वेळ लागला म्हणून काळजी वाटली."

"अग रिपोर्ट उद्या मिळेलच. पण मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे."

"का? तसं काही वाटलं तर सांगतात का ते लगेच?"

"मागच्या वर्षी तू नव्हतीस माझ्याबरोबर. मी आणखी एक बाई अश्याच बाहेर बसलो होतो इथे. आमच्याबरोबर एक मुलगी पण बसली होती. एव्हढ्यात आतून एक डॉक्टर आणि तिच्याबरोबर एक बाई आली. त्या डॉक्टरने त्या मुलीला जवळ बोलावलं आणि ताबडतोब त्या बाईला घेऊन टाटाला जायला सांगितलं. ती मुलगी एकदम घाबरून रडायलाच लागली. मला सगळ्यात कमाल वाटली त्या आईची. ती शांतपणे त्या मुलीला तिच्या वडिलांना फोन लावायला सांगत होती. एव्हढं धैर्य कुठून आणतात बायका?"

तरी बरं आई हे मला आत्ता सांगत होती. आधी सांगितलं असतं तर माझं बाहेर बसून काय झालं असतं ह्याचा विचारच करवत नाही. मला न पाहिलेली ती आई आणि तिची मुलगी दिसायला लागल्या. "चल, जाऊ यात इथून" म्हणून जवळजवळ ओढतच मी आईला बाहेर नेलं.

आनंद बाबूमोशायला काय म्हणतो आठवतंय? तो म्हणतो की आपण माणसं उद्याचं दु:ख आज ओढवून घेतो आणि मग आजचा आनंद हरपून बसतो. का करतो आपण असं? कारण अनेक जन्मांच्या अनुभवावरून माणसाला कळून चुकलंय की सुखाच्या आगमनाची वर्दी कधीकधी आधी मिळते. पण दु:ख नेहमी चोरपावलांनीच येतं. आपण जगण्यात मश्गूल असतो. "सारी दुनिया मुठ्ठीमे" असं वाटत असतं आणि एका वळणावर एकदम दु:ख येऊन समोर उभं रहातं, विचारतं "ओळखलंस ना मला? चल आता मीच आहे तुझ्या सोबत". आपण चमकतो - अरे, मग आत्ताआत्तापर्यंत बरोबर चालत होतं ते कोण होतं? ते सुख होतं हे लक्षात येईतो ते दिसेनासं झालेलं असतं. दु:खाला बरोबर घेऊन चालण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून उद्या चालायचं ते आज चालतो. सुख नसेलच तर दु:खाची धार बोथट होते, नाही का?

-----

कुठेतरी वाचलेला एक शेर आठवत रहातो:

सुना है जिंदगी इम्तिहान लेती है फराझ
पर यहा तो इम्तिहानोंने जिंदगी ले ली.

-----

ह्याआधीची पानं:

पन्ना १

पन्ना २

पन्ना ३

पन्ना ४

पन्ना ५

गुलमोहर: 

स्वप्ना , अगदी मनातलं मनात शिरून लिहिलंस्.मनातल्या भावनांना शब्दरूप दिलेस.
जहांपन्हा , तुसी ग्रेट हो!!!!

मस्त लिहिलेय्स ग.. अगदी मनातल<...

आपण एक बेत करत असतो आणि दूर कुठेतरी बसून नियती खदखदून हसत दुसरंच काही ठरवत असते. "अस्सं ठरवलंयस तर. बघतेच मी कसं होतंय ते".
माझा एकही बेत अद्याप पुरा केलेला नाहीये ह्या बाईने.. कसं काय जमवते माहित नाही, पण माझ्यापेक्षा लई लई हुश्शार आहे बाई... Happy

स्वप्ना काय नेहमी त्याच त्याच टाईपचे प्रतिसाद लिहायचे?

एका वळणावर एकदम दु:ख येऊन समोर उभं रहातं, विचारतं "ओळखलंस ना मला? चल आता मीच आहे तुझ्या सोबत". आपण चमकतो - अरे, मग आत्ताआत्तापर्यंत बरोबर चालत होतं ते कोण होतं? ते सुख होतं हे लक्षात येईतो ते दिसेनासं झालेलं असतं. दु:खाला बरोबर घेऊन चालण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून उद्या चालायचं ते आज चालतो. सुख नसेलच तर दु:खाची धार बोथट होते, नाही का? >>>>खूप आवडलं.

योगमहे, shravaneejoshi, साधना, अजय जवादे, हसरी, आऊटडोअर्स, झकासराव, नुतनजे - ह्या वेळी लेख जरा जास्तच मोठा झाला. पण वेळात वेळ काढून वाचलंत ह्याबद्दल मनापासून आभार Happy

साधना, माझ्या पण मार्गात नेहमीच आडवी आलीय ती Sad आजकाल मी फक्त उद्यापुरतं प्लॅन करते. Happy

आणि हो, तुमच्यापैकी कोणी मालिकांच्या बीबीवर येत नसेल तर हे पहा:

The Welfare Of Stray Dogs (WSD) तर्फे February 25-28 (Thu-Sun), 10 am to 7 pm The garage of Vaswani Mansions, Opposite K C College, Churchgate, Mumbai इथे डोनेट केलेल्या नव्या आणि जुन्या पुस्तकांचं एक्झिबिशन भरवलं आहे.

P.G. Wodehouse, Aldous Huxley,Robin Cook, Agatha Christie,P D James,John Grisham(hardback editions),Dale Carnegie,Jhumpa Lahiri, Mills and Boon and many many more

All proceeds from the book sale will go towards our sterilization and rabies prevention programme.

पुस्तकप्रेमी and/or प्राणीप्रेमी असलात तर चुकवू नका. Happy इथे ही सूचना पोस्ट केली म्हणून कदाचित ऑड वाटेल पण जितक्या जास्त लोकांना कळेल तितकं चांगलं.

स्वप्ना, खूप खूप सुंदर लिहितेस. तुझा अनुभव माझाच होण्याइतकं सहज्-सुंदर. तुझ्या नव्या पन्न्यांची मी खरच वाट बघते... लिहीत रहा. अनुभव घेणं एक गोष्टं आहे.... तो दुसर्‍याला तितक्याच ताकदीनं देऊ शकणं... ये बात कुछ खास है.... तुझी खासियत आहे.
(मृत्यूविषयीचे पहिल्या भागातले तुझे विचार मी पुन्हा पुन्हा वाचले... केवळ अप्रतिम. )

स्वप्ना,
तुमचे या आधीचेही लेख वाचले आणि हा अभिप्राय सुचला,

आपके अधुरे पन्ने कई यादें रोशन कर गए,
कुछ जखम ताजा कर गए, कुछ उन्हे भर गए,
हम लाख कोशीशों के बादभी जो न कर सके,
ये पन्ने ऐसी हर दिवार पार कर गए

mnp, मस्तच आहे तुमची अभिप्राय देण्याची पध्दत आणि अभिप्राय सुध्दा! Happy काही जखमा ताज्या झाल्या असतील तर खरंच सॉरी. Sad सायो, तुमचे खूप खूप आभार

>>> कारण अनेक जन्मांच्या अनुभवावरून माणसाला कळून चुकलंय की सुखाच्या आगमनाची वर्दी कधीकधी आधी मिळते. पण दु:ख नेहमी चोरपावलांनीच येतं. आपण जगण्यात मश्गूल असतो. "सारी दुनिया मुठ्ठीमे" असं वाटत असतं आणि एका वळणावर एकदम दु:ख येऊन समोर उभं रहातं, विचारतं "ओळखलंस ना मला? चल आता मीच आहे तुझ्या सोबत". आपण चमकतो - अरे, मग आत्ताआत्तापर्यंत बरोबर चालत होतं ते कोण होतं? ते सुख होतं हे लक्षात येईतो ते दिसेनासं झालेलं असतं. दु:खाला बरोबर घेऊन चालण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून उद्या चालायचं ते आज चालतो. सुख नसेलच तर दु:खाची धार बोथट होते, नाही का?>>>
अफाट -केवळ अफाट!!!!
शब्दच नाहीत माझ्याकडे हे व्यक्त करायला!!
अन काय ओघवतं लिहिलय!!
पन्न्यामागून पन्ने मला स्वप्ना क्या चीज है हे डोळ्यापुढे आणतायत.
जियो -बस लिखते जाओ!!
गॉड ब्लेस!!!
Happy

मी कालपासूनच पन्ने वाचायला सुरुवात केलीय. सगळेच एकदम अफाट सुंदर लिहिलेयत स्वप्ना. केवळ अप्रतिम.

आपण एक बेत करत असतो आणि दूर कुठेतरी बसून नियती खदखदून हसत दुसरंच काही ठरवत असते. "अस्सं ठरवलंयस तर. बघतेच मी कसं होतंय ते". >> आधीच्या पानांवर प्रतिसाद दिला नाहीये. पण हे वरचं वाक्य वाचल्यावर राहवलंच नाही. अगदी अगदी झालं वाचून. मी तर त्या त्या दिवशी केलेले बेत पण कधी पूर्ण होत नाहीत. Uhoh

आपण जगण्यात मश्गूल असतो. "सारी दुनिया मुठ्ठीमे" असं वाटत असतं आणि एका वळणावर एकदम दु:ख येऊन समोर उभं रहातं, विचारतं "ओळखलंस ना मला? चल आता मीच आहे तुझ्या सोबत". आपण चमकतो - अरे, मग आत्ताआत्तापर्यंत बरोबर चालत होतं ते कोण होतं? ते सुख होतं हे लक्षात येईतो ते दिसेनासं झालेलं असतं. ....मस्त..!