आपल्या विधायकांच्या बेजबाबदार करणीमुळे दहशतवाद नक्कीच फोफावेल!
"नेमेचि येतो मग पावसाळा" या धर्तीवर भारतात अतिरेकी हल्ले होऊ लागले आहेत पण या हल्ल्यांबाबतचे भारत सरकारचे (आणि कांहीं राज्य सरकारांचे) धोरण काय आहे हेच कळेनासे झाले आहे. हे हल्ले थेट पाकिस्तानातून होत आहेत कीं पाकिस्तानचे लष्कर, ISI अधिकारी आणि धर्मांध लोक आपल्याच देशातील कांहीं भरकटलेल्या भारतीय तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा दुरुपयोग करून हे हल्ले घडवून आणत आहेत हेही स्पष्ट होत नाहीं आहे. प्रत्येक हल्ल्यानंतर आपल्या हाती हल्ली कांहींच लागत नाहीं. पण शेवटी आपल्याला मिळालेल्या पुराव्यावरून शंभर टक्के निखळ कांहीं कळले नाहीं तरी कांहीं पक्के आडाखे बांधावेच लागतील आणि या आडाख्यांना अग्रहक्क (priority) देऊन त्यानुसार आपले प्रतिबंधक उपाय योजायलाच हवेत. या सर्व बाबतीत सरकार फारच उलट-सुलट मतप्रदर्शन करत आहे.
उदाहरणार्थ मुंबईतील हल्ल्यानंतर चिदंबरम् यांनी निवेदन केले होते कीं प्रत्येक अतिरेकी हल्ल्यानंतर जरी शेजारी राष्ट्राकडे बोट दाखविले जात असले तरी घरभेदी अतिरेक्यांचे अस्तित्वही यात दिसून येत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आवारात अलीकडेच झालेल्या स्फोटानंतरही त्यांनी याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला. तर दुसर्या बाजूला पंतप्रधान म्हणत आहेत कीं पाकिस्तानने पुन्हा आपली प्रशिक्षण शिबिरे कार्यान्वित केलेली आहेत. या दोन परस्पर विधानातून सामान्य जनतेने काय अर्थ काढायचा?
एक गोष्ट लक्षात ठेवली पाह्जे कीं लंडनमधील भुयारी रेल्वेत झालेले बाँबस्फोट असोत किंवा न्यूयॉर्कच्या "टाइम्स स्क्वेअर" मधील (Times Square) फैसल शहजादने योजलेला पण फसलेला बाँबहल्ला असो, त्या सर्वांचे प्रशिक्षण पाकिस्तानातील अतिरेकी "घडविणार्या" प्रशालांतच होत आहे. लंडनमधील हल्ले इंग्लंडमध्ये जन्मलेल्या व जन्मापासून इंग्लंडमध्येच लहानाचे मोठे झालेल्या मुस्लिम तरुणांकडून करण्यात आले होते, तर फैसल शहजादने जेमतेम एक वर्षापूर्वीच अमेरिकेचे नागरिकत्व घेताना त्या राष्ट्राशी (अमेरिकेशी) एकनिष्ठ रहायची शपथ (Oath of allegiance) घेतली असूनही आपल्या स्वखुषीने पत्करलेल्या "दत्तक" देशावर हल्ला करण्याची योजना करताना, त्याच्या आखणीबाबत पाकिस्तानात प्रशिक्षण घेताना व नंतर ती योजना कार्यान्वित करताना त्याला सदसद्विवेकबुद्धीची कसलीही टोचणी लागली नव्हती असे त्याने पोलीस तपासात स्पष्टपणे कबूल केले होते. असेच कांहीं आपल्या देशात होत आहे काय?
आज सर्वच देशांना अतिरेकी हल्ल्यांपासून भय आहे. भारताबाहेरील हल्ल्यांबद्दल विचार केल्यास अमेरिकेवर झालेले ९/११चे चार विमान हल्ले, लंडन भुयारी रेल्वेवर आणि बसेसवर झालेले बाँबहल्ले, ही मोठी उदाहरणे झाली. पण चिदंबरम् यांच्या आकड्यांनुसार २०११ सालच्या ऑगस्टपर्यंतच्या फक्त आठ महिन्यांत जगातल्या २२ देशांत २७९ छोटे-मोठे अतिरेकी हल्ले केले गेलेले आहेत. त्यांच्या मतें अतिरेकी हल्ल्यांचे उगमस्थान आहे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान. तिथल्या चार प्रमुख अतिरेकी संघटनांपैकी लष्कर-ए-तोयबा, जैशे मुहम्मद व हरकत-उल-मुजाहिदीन अल इस्लामी या तीन संघटना भारतावर हल्ले करण्याकडे लक्ष केंद्रित करत आहेत व त्यासाठी भारतात काश्मीर, नेपाळ व बांगलादेश सरहद्दीद्वारा तसेच श्रीलंकेतून तालिळनाडूद्वारा अतिरेक्यांना घुसविणात येत आहे असेही ते म्हणाले.
याखेरीज (तथाकथित भारतीय) इंडियन मुजाहिदीन व सध्या प्रतिबंधित असलेली सिमी (Students' Islamic Movement of India) या संघटनाही कार्यान्वित आहेत. यातल्या कित्येक संघटनांना बाँब बनविण्याचे प्रशिक्षणही देण्यात आलेले आहे (कुणी आणि कुठे ते सांगायला नकोच). पंतप्रधानांच्या "पाकिस्तान आपली प्रशिक्षणकेंद्रें पुन्हा कार्यान्वित करत आहे" या विधानाचा असाच अर्थ नाहीं कां?
आता तिसरी बाजू पहा. एकीकडे मुंबई-दिल्ली-आग्रा असे अतिरेकी हल्ले नित्यनेमाने होत असताना तामिळनाडूच्या विधानसभेने राजीव गांधींच्या मारेकर्यांना फाशीऐवजी कैदेची शिक्षा व्हावी असा ठराव एकमताने पास करवून एक अनिष्ट पायंडा पाडला! पाठोपठ आता जम्मू-काश्मीर विधानसभाही अफजल गुरूबद्दल असाच ठराव सप्टेंबरअखेर आणत आहे!
तामिळनाडूने हा ठराव आणून एक प्रचंड चूक केली आहे!
श्रीलंकेचे तीन तामिळभाषिक नागरिक इथे येतात काय, भारताचा एक मानबिंदू असलेल्या आपल्या माजी पंतप्रधानांना आत्मघाती बाँबहल्ला करून मारतात काय आणि त्या मारेकर्यांना खालच्या कोर्टापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्वांनी एकमुखी फाशीची शिक्षा ठोठावली असताना व राष्ट्रपतींनीही दयेचा अर्ज फेटाळलेला असूनही त्यांच्या फाशीविरुद्ध केवळ ते तामिळभाषिक (fellow Tamilians) आहेत म्हणून हा देशद्रोही ठराव कुणी एक विधायक मांडतो काय आणि प्रत्येक विधायकाची सदसद्विवेकबुद्धी त्याला या ठरावाला विरोध करायला सांगत असतानासुद्धा केवळ विरोध केल्यास पुढच्या निवडणूकीत "द्रमुक" आपल्याला तमिळहितविरोधी म्हणून खिंडीत पकडेल या काल्पनिक भयगंडाने पछाडलेल्या जयललिताबाई-त्यांनी आधी "हा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्यात मी कांहींही करू इच्छित नाहीं" असे विधान केलेले असूनही-आयत्या वेळी शेपूट घालून पुढची निवडणूक हरण्याच्या भीतीने आपल्या सर्व विधायकांना एकमुखी हात वर करायला सांगतात काय.....सगळंच तद्दन देशहिताविरोधी!
या घटनेमागे आपल्या विधायकांचे एकजात अतीशय सडके मेंदू दिसले मला! म्हणूनच माझे शीर्षक मी त्यांच्या करणीला उद्देशून दिलेले आहे.
खरे तर ते तीघेही भारतीयसुद्धा नाहींत, तर श्रीलंकेचे नागरिक आहेत, मग केवळ तामिळी म्हणून आपल्याच तामिळनाडू विधानसभेने असा ठराव मांडून पास करवून घ्यायचा? मग जम्मू-काश्मीर विधानसभेतनेही असा ठराव कां करू नये? मग उद्या पाकिस्तानी कसाबलाही सोडून देण्याबाबत एकाद्या भारतीय प्रांताने किंवा एकाद्या भारतीय धार्मिक संघटनेने असाच ठराव केलेला चालेल? आपले आपण निवडून पाठविलेले सगळेच विधायक मतांचा जोगवा मागणारे भिकारी आहेत काय? आपले विधायक केवळ खुर्चीसाठी कुठल्या थरावर जाऊ शकतात याचे इथे "मनोहारी" दर्शन होते. यांच्यातील देशभक्ती लोप पावून आता फक्त प्रांतभक्ती आणि सत्ताभक्तीच उरली आहे काय?
अशीच "सत्तेसाठी कांहींही" वृत्ती अलीकडेच पाकिस्तानी राजकारणातही मला दिसली. नवाज शरीफ यांना नेस्तनाबूत करून २०१४ची निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने सध्या जरदारी आणि मुशर्रफ यांच्यात म्हणे "दिलजमाई"ची बोलणी मागच्या दाराने सुरू झाली आहेत. म्हणजे जरदारींच्या लेखी आपल्या बायकोचे आणि (पाकिस्तानचे राहुल) बिलावलच्या लेखी आपल्या आईचे रक्त नगण्यच आहे? ज्या माणसाचे हात आपल्या पत्नीच्या/आईच्या रक्ताने माखलेले आहेत अशा माणसाशी केवळ सत्तेसाठी दोस्ती? मला तरी ही बातमी वाचून असेच वाटले.
तामिळी विधायकसुद्धा पुढच्या निवडणुकीवर डोळे ठेवून मूर्खांसारखे वागत आहेत हे उघड दिसत आहे.
"आपल्या देशात प्रत्येक बाबीला राजकीय आणि धार्मिक रंग दिला जातो हे दुर्दैवी आहे. आपलेच राजकीय नेते असे वागत आहेत हे दुर्दैवी आहे, पण ते खरे आहे याचे मला दु:ख होते" असे जे विधान ओमार अब्दुल्ला यांनी केले ते खरेच आहे. ही परिस्थिती बदलायलाच हवी, अशा तर्हेचा क्षणिक स्वार्थासाठी देशाला विकायला काढायची वृत्तीही बदलायला हवी!
१९६० च्या आसपास मी कॉलेजात असताना एका वेश्येची आणि तिच्या दलालाची कथा असलेला एक चित्रपट मी पाहिला होता. (नांव आठवत नाहीं.) त्यातली वेश्या झालेली नटी आपल्याच दलालाला चिडून म्हणते कीं "तू तो तेरे अम्मीसेभी कमीशन लेगा!" आपल्या विधायकांची आपल्या जन्मभूमीबद्दलची आस्था पाहून मला त्या वाक्याची आठवण झाली. हे विधायक आपल्या आईलाच विकायला कां निघाले आहेत? त्यांना कोण आवरणार? हे बदलले पाहिजे असे सर्वांनाच मनापासून वाटत असणार पण ठामपणे उभे राहून सुरुवात कोण करेल?
अशा ठरावांतून आपण अतिरेक्यांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन देत आहोत. आपण त्यांना सांगत आहोत कीं "तुम्ही कांहींही करा. भारताचे ’दयाघन सरकार’ तुम्हाला जिवे मारणार नाहीं. तुरुंगात तुमची उत्तम बडदास्त ठेवली जाईल. आणि तुम्ही जन्मठेपेची शिक्षा भोगताना आंही एकाद्या मंत्र्याच्या मुलीला पळवू [*१] किंवा एकाद्या विमानाचे अपहरण करून ते कंदाहारला नेऊ [*२] आणि तुम्हाला सोडवून आणू.([*१] १९८९ साली केले गेलेले मुफ़्ती मुहम्मद सयीद या भारताच्या गृहमंत्र्यांच्या रुबैय्या सयीद या मुलीचे अपहरण आणि JKLF चे नेते शेख अब्दुल हमीद, गुलाम नबी बट्ट, नूर महम्मद कल्वाल, महम्मद अल्ताफ व एक पाकिस्तानी अतिरेकी जावेद अहमद झरगार यांना सोडून करवून घेतलेली तिची मुक्तता. अधीक माहिती वाचा http://www.time.com/time/magazine/article/0,9171,959443,00.html या दुव्यावर आणि [*२] मुश्ताक अहमद झरगार, अहमद ओमार सईद आणि मौलाना मसूद अझर यांना जसवंतसिंग कंदाहारपर्यंत "पोचवून" आले. अधिक माहिती http://en.wikipedia.org/wiki/Indian_Airlines_Flight_814 या दुव्यावर वाचता येईल)
आपण नको तिथे व नको तितके पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करत असतो. कपडे, नीतिमत्ता, उधारीवर चैन करणे, जीवन-शैली वगैरेंच्या बाबतीत आपण अमेरिकन होऊ लागलो आहोतच. ते चुकीचे आहे. पण अमेरिकेने ज्या पद्धतीने "डूख धरून" ओसामा बिन लादेनला मारले त्याचे अनुकरण आपण नक्कीच करायला हवे! देशाच्या सन्मानाशी खेळाणार्यांना कसली दया-माया?
तरी राष्ट्रपतींकडे दयायाचना करण्याची पद्धत ताबडतोब रद्द करून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांना झालेली शिक्षा थेट अमलात आणावी. फाशीची शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यास अशा व्यक्तीला न्यायालयातून थेट वधस्तंभावर नेण्याची नवी प्रथा सुरू करायला हवी. नाहीं तर असे भिजत घोंगडे ठेवून शेवटी माफी मिळण्याची शक्यता रूढ झाल्यास अतिरेक्यांना आणखीच फावेल कारण त्यांच्या मनात "भारत हा एकसंध देश नसून प्रत्येक प्रांत म्हणजे एक देश आहे" असे चित्र उभे राहील व अतिरेकी हल्ले करण्यामुळे जिवे मरण्याचे त्यांचे भय नष्ट होऊन अशा उचापती करण्याचा दुप्पट उन्माद त्यांना येईल. हे थांबविलेच पाहिजे!
आपल्याला काय वाटते?
आपल्या विधायकांच्या बेजबाबदार करणीमुळे दहशतवाद नक्कीच फोफावेल! (सुधारित)
Submitted by sudhirkale42 on 18 September, 2011 - 08:32
गुलमोहर:
शेअर करा
वज्र३००-जी, पण सामान्य तमिळ
वज्र३००-जी,
पण सामान्य तमिळ माणासाला श्रीलंकन तमिळांबद्दल आत्मियता नक्कीच आहे. माझ्या मते त्यात गैर असे काही नाही. आत्मीयता नक्कीच आहे कारण इथे जकार्तामध्ये ती मला कधी-कधी दिसते. त्यात एरवी कांहींच गैर नाहीं. आपल्यालाही मॉरीशसच्या मराठी लोकांबद्दल आत्मीयता वाटते. पण ही आत्मीयता देशाच्या हिताच्या आड येत असेल तर देशभक्ती जिंकली पाहिजे. तसेच मॉरीशसचे मराठी लोक मॉरीशस या त्यांच्या स्वेच्छेने स्वीकारलेल्या देशाच्या हितांविरुद्ध वागू लागले (जसे कांहीं तामिळी श्रीलंकेत वागत होते) तर आपण त्यांचे समर्थन करता कामा नये.
अतिरेकींची बाब वेगळी आणि प्रतिभा पाटील-शेखावत या लढतीची बाब वेगळी. त्यांची तूलना करणे बरोबर ठरणार नाहीं. या लढतीत मी व्यक्तिशःसुद्धा प्रतिभाताईंनाच पाठिंबा दिला होता व शिवसेना आपल्या तत्वाला जागली याबद्दल बरेही वाटले होते.
अपराध्याला दयेचा अधिकार आपल्या घटनेत आहे, ते बदलणे कठिण आहे. अतिरेक्यांच्या बाबतीत ती (घटना) बदलायची वेळ आलेली आहे असे मला तरी वाटते. शिवाय दयायाचनेला हो किंवा नाहीं हे उत्तर देण्याच्या काळालाही सीमा असली पाहिजे. ती ओलांडली तर आपोआपच ती नाकारलेली आहे असे समजून अपराध्याला फासावर लटकविले पाहिजे.
इथेच नाहीं पण इतर संस्थळांवरही धागे हायजॅक होतात. मी फक्त त्यांचा "नेम सुधारण्या"चा प्रयत्न करतो.
>>> मास्तुरे...अहो किती चुका
>>> मास्तुरे...अहो किती चुका करत आहात ..वर्णन असे लिहिले आहे जसे आपणच अतिरेकी बनुन त्या विमानत होतात.. दिव्यदृष्टी आली का आपल्याला..?
गुगलवर शोध घ्या. अपहरणाच्या संपूर्ण कहाणीच्या अनेक लिंक्स मिळतील.
>>> आधी भारतात उतरलेच नाही असे जाहीर करतात..मग उतरले असे कळल्यावर ..उतरल्यावर काय काय घटना झाल्या त्या सगळ्या नाट्यरुपांतरीत लिहिता सुध्दा..
ते भारतात उतरले नाही असे मी कधी म्हणालो? मी पहिल्यापासूनच हेच लिहिले आहे की अमृतसरला ते विमान फारच थोडा वेळ उतरले होते (अंदाजे ५० मिनिटे). तेवढ्या वेळात दिल्लीहून सुपरमेन (कमांडो) पाठवून कमांडो कारवाई करून अपहरणकर्त्यांना मारून विमान मुक्त करता आले असते असे काही जणांचे मत आहे. केवळ ५० मिनिटांत दिल्लीहून कमांडो पोचून विमान मुक्त करण्याच्या अशक्यप्राय कारवाईची अपेक्षा करताना, २६/११ ला दिल्लीहून मुंबईला कमांडो पाठवायला १२ तास लागले होते व त्यानंतर अतिरेक्यांना मारायला तब्बल ४८ तास लागले होते हे फारसे कोणाला आठवताना दिसत नाही. ५० मिनिटे इतका कमी अशा कारवाईसाठी फारच अपुरा होता हेच मी लिहिले आहे. अत्यंत काळजीपूर्वक योजना आखलेल्या व अतिशय सावध असलेल्या अपहरणकर्त्यांनी भारताने अमृतसरला विमान अडकवू नये म्हणून केवळ ५० मिनिटांच्या आतच ते देशाबाहेर न्यायला लावले होते. एकदा ते भारताबाहेर उडाल्यावर त्यांच्या मागण्या मान्य करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नव्हता.
अशा तडजोडीला अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले, भारताच्या इतिहासातील सर्वाधिक शरमेची गोष्ट इ. स्वरूपात अतिरंजित स्वरूपात वर्णन करणे चुकीचे आहे. अमेरिकेला सुध्दा इराणमधले आपले ७८ नागरिक सोडवायला २ वर्षे वाट पहावी लागली होती.
अतिरेक्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा हा काही पहिला प्रसंग नव्हता. १९८९ मध्ये मुफ्ती महंमद सईदने स्वतःच आपल्या रूबिया सैद या मुलीच्या अपहरणाचा बनाव रचून ५ अतिरेक्यांची सुटका करायला लावली होती (तेव्हा तो केंद्रीय गृहमंत्री होता). याच मुफ्ती महंमद सैद च्या पक्षाशी काँग्रेसने २००२-०८ या काळात युती करून त्याला काश्मिरचा मुख्यमंत्री बनवले होते.
त्यानंतर १९९१ मध्ये एच एम टी चे काश्मिरमधले महाव्यवस्थापक दोराईस्वामी यांचे अतिरेक्यांनी अपहरण केल्यावर पुन्हा एकदा ५ अतिरेकी सोडले होते (तेव्हा पंतप्रधान नरसिंहराव होते).
१९९३ मध्ये तर मशिदीत अडकलेल्या १५-२० अतिरेक्यांना निवडणूकीत मते जाऊ नयेत यासाठी वेढा उठवून सुखरूप पाकिस्तानला जाऊन दिले होते (पंतप्रधान नरसिंहराव). हाच भारताच्या इतिहासातला सर्वाधिक शरमेचा प्रसंग असेल.
२०११ मध्ये नक्षलवाद्यांनी ओरिसात अपहरण केलेल्या आय ए एस अधिकार्यांना सोडविण्यासाठी ४-५ नक्षलवादी कैद्यांना सोडून दिले होते.
>>> कधी पुर्व तर कधी एकदम पश्चिम.. ? एका ठिकाणी उभे रहा पाहु..आधी.. वारा जसा वाहतो ज्या ज्या दिशेला वाहतो त्यात्या दिशेला आपले लिखान असते..
काहीतरीच काय? माझी मते सर्वत्र सारखीच आहेत.
सुधिर काळे, नेहमीप्रमाणेच
सुधिर काळे, नेहमीप्रमाणेच चांगला लेख. काही प्रतिक्रिया पण वाचनीय.
तामिळनाडूत तामिळ वाघांची
तामिळनाडूत तामिळ वाघांची प्रसिक्षण केंद्रे/शिबिरे होती या कुजबुजीत तथ्य आहे असंच वाटायला लागलंय.
या विचारांशी सहमत नाही. ते
या विचारांशी सहमत नाही. ते विमान थेट काठमांडूतून पळविण्यात आले होते (भारतातून नव्हे). त्यात भारताची कोणतीही चूक नव्हती. त्यातल्या एका प्रवाशाला अतिरेक्यांनी आधीच मारून टाकले होते. त्यात असलेल्या १६० प्रवाशांचे प्राण वाचविण्याकरता त्या तिघांना सोडण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. ते विमान कंदाहार विमानतळावर तालिबानी सैनिकांनी व रणगाड्यांनी वेढलेले होते. जगातल्या कोणत्याही देशाला, अगदी इस्राईलला सुध्दा, कंदाहारला जाऊन कमांडो कारवाई करणे संपूर्ण अशक्य होते. भारताने १६० निरपराध प्रवाशांचे प्राण वाचविण्यासाठी योग्य तीच कृती केली होती. या मुद्द्यावर पूर्वी बरीच चर्चा झालेली आहे. नवीन चर्चा करण्यात अर्थ नाही.
आधि जाहीर करतात की आधीच मारुन टाकले नंतर लिहितात की अमृत्सर ला आल्यावर मारले......... ?????????? काय हे
याचा अर्थ काय घ्यायचा......
उगाच शब्दच्छल करू नका. आधीच
उगाच शब्दच्छल करू नका. आधीच याचा अर्थ कंदाहारला पोचण्यापूर्वीच. वैमानिकाला व इतर प्रवाशांना धाक दाखविण्यासाठी रुपेन कट्यालला अमृतसरला सर्वांदेखत मारण्यात आले होते. नंतर ते विमान दुबईला पोचल्यावर धावपट्टीवर त्याचे प्रेत विमानातून खाली फेकण्यात आले होते.
udayone | 21 September, 2011
udayone | 21 September, 2011 - 12:43 नवीन
जाऊ द्या हो!
ते विमान प्रकरण भाजपाच्या राजवटीत झालंय ना? मग त्याचे समर्थन करावेच लागेल त्यांना.
बाकी लोकांनी केली ती घोडचूक. "ही" होती ती राजकिय व परिस्थितीजन्य अपरिहार्यता. त्यांना कळते. कारण त्यांना विंगेत स्पेशल सीट आहे सर्व घटना बघण्यासाठी. वरून कर्णपिशाच्च वश.
तुम्ही सुद्धा कर्णपिशाच्च वश वगैरे करता येते का याचा प्रयत्न करा, मी विंगेतील सीट ची तिकिटे कोठे मिळतात ते शोधतो.
भाऊबंदकी, प्रेमभंग, मालमत्ता
भाऊबंदकी, प्रेमभंग, मालमत्ता वगैरेसाठींच्या खुनाच्या केसेसमध्ये दयायाचनेची तरतूद समजू शकते, पण पंतप्रधानाची हत्त्या, लोकसभेवरील हल्ला यासारख्या पूर्वनियोजित, अतिरेक्यांनी आपल्या सर्व चाली नीट आखून केलेल्या खुनांच्या बाबतीतली दयायाचनेची तरतूदच घटनेतून काढून टाकायला हवी. राष्ट्रद्रोह्यांना फुकट दया दाखवून "आधुनिक पृथ्वीराज चौहान" कशाला व्हायचे?
माणुस चुका करतो, पण त्या
माणुस चुका करतो, पण त्या लक्षात आल्यावर त्याचा त्याला पश्चाताप होत असेल तर ? या घटनेतील आरोपींच्या मानगुटीवर गेली २० वर्षे सतत फासाचे दोर आवळलेले आहेत. त्यांची तुरुंगातील वर्तणुक अत्यंत चांगली आहे. फाशीची शिक्षा जाहिर झाली, एका वर्षात मिळाली असे नाही आहे... ते रोजच मरत आहेत. या बाबींचा विचार करुनच प्रियांका गांधी यांनी त्यांचे अपराध माफ केले होते.
खरोखरच पष्चाताप होत असेल तर आरोपी बाबत सहानभुतीने विचार करावयाची घटनेत असलेली तरतुद उदात्त मानवतेचे दर्शन घडवतो.
मी वरिल आरोपी आणि निर्ढावलेला कसाब या मधे फरक करेल.
वज्र-जी, इतिहासाची
वज्र-जी, इतिहासाची पुनरावृत्ती होणार असे दिसत आहे. सिमला कराराच्यावेळी इंदिरा गांधींशी झालेल्या खासगी बोलण्यात "पाकिस्तान Line of Control रेषेला आंतरराष्ट्रीय सीमा समजेल आणि भारताच्या ताब्यातल्या काश्मीर विभागात ढवळाढवळ करणार नाहीं पण हे सिमला करारात लेखी घालू नका कारण मग मी निवडणूक जिंकू शकणार नाहीं" असे गोड बोलणारे थोरले भुत्तो परत पाकिस्तानात गेल्यावर बदलले होते व विषारी फूत्कार सोडू लागले होते तशातलाच प्रकार!
आज काय नाटक करतील आणि उद्या कसे पलटतील याचा काय नेम?
"विंगेत" शहाबुद्दिन महंमद घोरी उभेच आहेत हे विसरू नका!!
सु धीर काळे जी चागंला लेख.
सु धीर काळे जी चागंला लेख.
वि मा न दु ब ई त उ त र ले. भारताच्या उच्चपदस्थ लोकांनी दुबईच्या शेख बरोबर कार्यवाहीची
परवानगी मागीतली. अर्थातच त्यानीं ती नाकारली. पूढचे सर्वाना माहीती आहे.
ह्याच दुबईच्या विमान तळावर एरवी कधीही अशी कमांडो कार्यवाहीची झाली नव्हती का ? ह्याच्या
पूर्वी च इ जा रा ईल ने ह्याच विमान तळावर कमांडो कार्यवाही यशस्वी करून दाखवली होती. त्यानी परवानगी
वैगेरे मागीतली नाही.
का ? फक्त भारतालाच प्रत्येक जागी परवानगी घ्यावी लागते. खुद्द्द पाकिस्तानात USA ओसामा
विरूद्द्द कार्यवाही करु शकते.
काल परवाच पतंप्रधानानीं जाहीर रित्या सागींतले की MILITARY CAMPS पा़कीस्तानात परत एकदा
सक्रिय झाले आहेत. ह्याचा अर्थ भारत सर्व माहीती ठेवतो पण कार्यवाही नाही, फक्त जाहीर निषेध.
वा १ मस्त लेख झालाय हा. काही
वा १ मस्त लेख झालाय हा. काही प्रतिक्रिया देखिल उत्तम.
आणि होउद्याहो धागा हायजॅक. त्या निमित्ताने १काच ठिकाणि सर्व विषयांवरील चर्चा वाचायला मिळतेय
Pages