कर्र कर्र कच्चक .........
अंगणात कुठल्यातरी गाडीचा ब्रेक दाबल्याचा आवाज आला आणि शिवानीने स्वयंपाकघराच्या खिडकीतुन बाहेर बघीतले. गेल्या दिड महिन्यात पहिल्यांदाच कुणाचीतरी चाहूल लागली होती. खरेतर सुरुवातीला शिवानीला थोडे जडच गेले होते इथले वास्तव्य. कायम भरपुर माणसात वावरलेल्या शिवानीला आणि सुहृदलाही इथला एकटेपणा थोडा त्रासदायकच वाटला होता. अर्थात सुहृदला शाळेसाठी नागपुरात अशोकच्या आई-बाबांकडेच ठेवायचे ठरले होते. पण सद्ध्या त्याच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू असल्याने तो आपल्या आई बाबांबरोबरच राहात होता. सुरुवातीला कंटाळा केला त्याने थोडा, पण नंतर दत्ताकाकांबरोबर जंगलात फिरायला जायला लागल्यापासुन रमला होता तोही.
अशोक होशिंगकर.....कॉलेजलाईफ़ संपल्यावर मेरीट असुनही डॉक्टर - इंजीनीअर न होता स्वत:च्या धाडसी स्वभावाला सुट होइल असाच पेशा निवडला होता त्याने. शिवानीची ओळख कॉलेजपासुनची .... त्यामुळे दोघेही एकमेकाला पक्के ओळखुन होते. आज गेली पाच वर्षे फॉरेस्ट ऑफिसर म्हणुन वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केल्यावर वरीष्ठांनी त्याची इथे बदली केली होती. या जंगलातल्या चंदनचोरीच्या घटना आणि अंमली पदार्थाची शेती कायमच्या संपवण्यासाठी अशोकला इथे पाठवण्यात आले होते. जम बसायला थोडा वेळ गेला. ते इनमिन तिघे आणि दिमतीला दोन नोकर. असा काहीसा त्यांचा संसार होता तिथला. नाही म्हणायला बाकीचे कर्मचारी होते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, पण ते ऑफीसजवळच्या क्वार्टर्समध्येच राहत. अशोकला मिळालेला हा बंगला थोडासा जंगलात आतल्या बाजुला होता, पण म्हणुनच अशोकला आणि शिवानीलाही खुप आवडला होता.
छान वेलींचेच कंपाउंड होते. आजुबाजुला मोठमोठी झाडे. सहा खोल्यांचा सुंदर बंगला. पुढे प्रशस्त व्हरांडा. व्हरांड्याला लागुन मोठी दिवाणखान्याची खोली आणि तिला लागुनच असलेले छोटेखानी स्वयंपाकघर. मागच्या बाजुला दोन खोल्या होत्या आणि पहिल्या मजल्यावर दोन लहानशा खोल्या. खालच्या खोल्यातील एक मोठी खोली ते बेडरुम म्हणुन वापरत होते तर दुसरीचा वापर अशोक स्टडी म्हणुन करत होता. वरच्या दोन्ही खोल्या त्यांनी कोणी पाहूणे आले तर त्यांच्यासाठी म्हणुन राखीव ठेवल्या होत्या. चारीबाजुला घनदाट जंगल. कायम वाहणारा बेफाम वारा आणि पक्ष्यांची किलबिल. या सुंदर वातावरणात शिवानीही नाही म्हणता म्हणता चांगलीच रमली होती. फक्त एकच समस्या होती की आजुबाजुला कोणी राहणारे नसल्याने खटकणारा एकटेपणा.
आणि अशातच आज दारात एक लांबलचक कार येवुन थांबली होती. चेहेर्यावर रेंगाळणारी केसांची बट तिने हलकेच मनगटाने मागे सारली आणि खिडकीतुन बाहेर पाहीले. दारात उभ्या राहीलेल्या त्या आलिशान कारचा दरवाजा उघडला आणि त्यातुन बाहेर पडल्या दोन जाडजुड चामड्याच्या चपला. तसे शिवानीने डोळे एकवटले. पुढच्याच क्षणी गाडीतून तो खाली उतरला. साधारण पावणे सहा - सहा फूट उंची, गोरापान देखणा चेहरा. अंगावर पांढरेशुभ्र कपडे आणि पायात चामड्याच्या कराकरा वाजणार्या चपला. वय चाळीसच्या घरात असेल फारतर. पण त्याचं एखाद्या माजलेल्या वळुसारखं वाढलेलं शरीर मात्र त्याच्या देखणेपणाला अगदीच विसंगत होतं. तो दारात येवून उभा राहीला आणि त्याने जोरात आवाज दिला.......
"होशिंगकर साहेब, हायसा का घरात?"
त्याचा तो भसाडा आवाज ऐकला आणि शिवानीने नाक फेंदारलं, " शी, कसला घाणेरडा आवाज आहे. ...... ! ए अशोक, तुझ्याकडे कोणीतरी आलंय बघ."
"कोण आहे गं? बसा म्हणाव त्यांना, आलोच मी कपडे बदलून! " अशोक नुकताच जंगलाच्या राऊंडवरुन परत आला होता.
कपडे बदलुन तो व्हरांड्यात आला आणि व्हरांड्यात बसलेल्या माणसाला बघून त्याच्या कपाळावर आठ्यांचे जाळेच आले.
"नमस्कार, होशिंगकर साहेब. तुमी आला न्हायी आमच्या बंगल्यावर. आमच्या निरोपाचा जबाबबी नाय दिला. म्हनलं चला आपुनच जावं सायबास्नी भेटाया."
"माझ्याकडे काय काम आहे तुझं देशमुख?" अशोकच्या स्वरात कमालीचा तुटकपणा आला होता.
"आमी तुमाला सायेब म्हनुन रायलो राव आन तुमी डायरेक एकेरीवर..........
"गुन्हेगारांशी मी याच भाषेत बोलतो देशमुख ! खरेतर मी आजच येणार होतो तुझ्या बंगल्यावर. पहिली आणि शेवटची वॉर्निंग द्यायला. दोन दिवसाच्या आत जंगलाच्या मध्यावर असलेली ती गांजाची शेती खाक व्हायला हवी. नाहीतर ते सत्कर्म मी माझ्या हाताने करीन."
"लई बोललास सायबा, आमास्नी म्हायीत हुतं तु असा बधणार नाहीस! म्हुन आमी सोताच आलो हुतो. आदीच सांगतु, पुन्हा म्हनशील बोल्लो न्हाय..... तुज्या आदी हितनं दोन फारेष्ट हापिसर बेपत्ता झाले. मढंबी सापडलं नाय त्यांच. दोगं जण रजा घेवुन गेले ते परत आलेच न्हायीत. सायबा, तुबी जा....... रजा घेवून! एकुलता एक लेक हाये तुझा. लई गोड पोरगं हाये बग. आन तुजी बायको..........! आयच्यान लै वंगाळ इचार येत्यात मनात! कायबी राहणार नाय सायबा ! शाणा हो...अन बदली मागुन घे, येतो आमी!"
संतापलेल्या अशोकला एक शब्दही बोलण्याची संधी न देता देशमुख आला तसाच तिथून निघूनही गेला. शिवानी प्रचंड भेदरलेली होती. अशोकने तिला जवळ घेतले.....
"शिवानी, अगं असे आत्तापर्यंत किती जण धमक्या देवून गेले. आपण अजुन आहोतच ना!"
"अशोक, पण हा माणुस मला भितीदायक वाटला रे. त्यात या जंगलात आपण एकटेच राहतो. तु एक दोन शिपाई नेमून ठेव इथे."
"ठिक आहे, तू काळजी करु नकोस. उद्यापासुन जगतापांना मी इथे यायला सांगतो. आणि सुहृदला जास्त लांब जात जावु नकोस म्हणावे जंगलात."
अशोक तिच्या केसातुन हात फिरवत तिला धीर देत म्हणाला तशी शिवानी हलकेच त्याच्या कुशीत शिरली.
.....................................................................................................
रावबहादूर तुळोजीराव रणपिसेंचा वाडा नव्या नवरीसारखा सजला होता. चारच दिवसांपुर्वी त्यांच्या एकुलत्या एका चिरंजिवांचे अभिजीतचे सुमंगल झाले होते. घरातले पाहूणे हळुहळु परतायला लागले होते. रावबहादुर म्हणजे पंचक्रोशीतील बडी आसामी. एखाद्या राजासारखा थाट होता त्यांचा. पसरलेली शेकडो एकर शेती होती. बदलत्या काळाचा अंदाज घेवून विविध उद्योगधंद्यात त्यांनी यशस्वी इनव्हेस्टमेंट केली होती. अभिजीत नुकताच इस्रायलहून शेतीविषयक उच्च तंत्रज्ञानाचे शिक्षण घेवून परतला होता. रावबहादुर वतनदार असले तरी सुधारकी मताचे होते. त्यामुळे घरात कायम चांगल्या लोकांचा राबता असायचा. प्रचंड संपत्ती आणि त्यापेक्षा प्रचंड मोठे असलेले मन यामुळे रावबहादुरांच्या दारात मदत मागायला येणारा कोणीही रिक्तहस्ते परत जात नसे. अभिजीतनेही वडीलांचा हा स्वभावगुण उचलला होता. त्यामुळेच जेव्हा त्याने सांगितले की तो त्यांच्याच कडे मुनीम म्हणुन काम करणार्या चिटणीसकाकांच्या अनुच्या प्रेमात पडला आहे. तेव्हा रावबहादुरांनी स्वत:च चिटणीसांकडे अनुला मागणी घातली होती. अभिजीतसारखा उमदा जावई आणि रावबहादुरांसारखे सदविचारी व्याही नाकारण्यांइतके चिटणीस मुर्ख आणि अव्यवहारी निश्चितच नव्हते. बघता बघता लग्न समारंभ थाटामाटात साजरा झाला. सगळा खर्च रावबहादुरांनीच केला होता. अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यापासुन सगळ्यांनी लग्नाला हजेरी लावली होती.
आणि आज अभिजीत आपल्या नवपरिणीत वधूला.... अनन्याला घेवुन मधुचंद्राला जायला निघाला होता.
"अभ्या, हे काय आम्हाला पटलं नाही बघ. आम्ही तुझ्यासाठी काय काय प्लानिंग केलं होतं. आधी पंधरा दिवस स्विटझरलॆंड आणि नंतर मस्तमध्ये युरोपची टुर आखली होती तुम्हा दोघांसाठी. आणि तु बायकोला घेवून त्या कुठल्या जंगलात मधुचंद्राला जायला निघाला आहेस." रावबहादुर थोडे वैतागलेच होते.." अरे जरा, त्या पोरीच्या मनाचा तरी विचार करायचास!"
"आबासाहेब, अहो अगदीच काही जंगल नाहीय ते. अनिकेतचं गाव तसं बर्यापैकी सुधारलेलं आहे. खुप वर्षापासुनचा मित्र आहे तो आमचा. कधीपासुन मागे लागलाय या या म्हणुन. तेव्हा मग आम्ही ठरवलं की लग्नानंतर मधुचंद्रासाठी म्हणुन त्याच्या गावीच जायचं. डोंगरमाथ्यावर हिरव्यागार झाडीत दडलेल्या त्याच्या देखण्या गावाचे वर्णने ऐकुन आता कधी एकदा तिथे जातो असे झाले आहे." अनन्या मध्येच खालमानेने बोलली तसे रावबहादुर खळखळुन हसले.
"अच्छा, म्हणजे आधीच ठरलय तर तुमचं! ठिक आहे पोरांनो, मिया बीबी राजी तो क्या करेगा तुळोजी. जावा पण नीट जा. आणि फ़ोन करत जा रोजच्याला."
आपल्या तुप लावुन वळवलेल्या गलमिशांवर नेहेमीप्रमाणे हात फिरवत रावबहादुरांनी परवानगी दिली तसा अभिजीतचा जीव भांड्यात पडला. त्याने हळुच अनन्याकडे पाहीले तर ती तिरक्या नजरेने त्याच्याकडेच पाहात होती. त्याने कृतज्ञतेने तिच्याकडे पाहिलं. त्यांना तसे एकमेकाकडे पाहताना पाहुन रावबहादुर उठले आणि शेजारच्या खोलीत निघुन गेले. आईशिवाय वाढवलेल्या एकुलत्या एक पोराची इच्छा मोडणे कसे शक्य होते त्यांना. आपल्या बेडरुममध्ये येवून ते अभिजीतच्या आईच्या फोटोसमोर उभे राहीले.
"देवकी, आज तुझी खुप आठवण येतेय गं ! तु असायला हवी होतीस आज. बघ कसा लक्ष्मी नारायणासारखा शोभतोय जोडा ! परमेश्वरा सुखात ठेव रे माझ्या लेकरांना."
आपल्या मिशांवर ओघळलेले डोळ्यातले अश्रु त्यांनी हलक्या हाताने पुसले आणि त्यांनी नोकराला हाक मारली....
"सदुभाऊ, तयारी झाली का सगळी? आणि गाडी नीट चेक केलीय ना? पोरगं ती बुटकीच घेवुन जातो म्हणुन बसलय. सगळं तेल पाणी नीट करुन घे म्हणावं रामरावाला."
..................................................................................................................
अभिजीतची पॊंन्टेक त्या दोघांना घेवून बाहेर पडली. निघताना किमान दहा वेळा तरी रावबहादुरांनी बजावलं होतं
"काळजी घ्या रे पोरांनो. रोज फोन करत जा आठवणीने. एक वेळ तर अनन्याला वाटले की अभीला सांगावं... कुठे नको जायला बाहेर! आपण इथेच करु साजरा आपला मधुचंद्र. एवढे प्रेम करणार्या आबासाहेबांना सोडुन जायचे अगदी जिवावर आले होते तिच्या. पण पुन्हा अभिचा विरस व्हायचा म्हणु नाईलाजानेच ती तयार झाली. गाडी गावाबाहेर पडली आणि हळु हळु तिचाही मुड बदलायला लागला.
किती सुरेख असतो ना हा असा सहवास ! लग्नाआधीच्या चोरट्या भेटी कितीही हव्या हव्याशा असल्या तरी लग्नानंतर आपल्या माणसाबरोबर असं एकट्याने फिरण्यातली मजा काही औरच असते. त्यात जोडीदार जर अभिजीतसारखा उमदा, तुमच्यावर जिवापाड प्रेम करणारा असेल तर कुणाला हवाहवासा वाटणार नाही हा सहवास. तिच्याही नकळत ती अभिजीतकडे सरकली....
"अभि, आता खरं खरं सांग आपण नक्की कुठे जाणार आहोत ? मघाशी आबासाहेबांशी खोटे बोलताना अगदी जिवावर आलं होतं माझ्या, पण तु परत एवढंसं तोंड करशील म्हणुन मी खोटं बोलले. आता मला सांग, हा अनिकेत कोण आणि त्याचं हे नयनरम्य गाव नक्की आहे कुठे?"
तसा अभिजीत खदखदुन हसला, एक हात तिच्या कंबरेभोवती टाकुन त्याने तिला अजुन जवळ ओढले.....
"खरे सांगु अनु, अनिकेत नावाचा माझा कोणीच मित्रच नाही. पण कुठलेतरी नाव घेतल्याशिवाय आबा ऐकणार नाहीत याची खात्री होती मला, म्हणुन थोडंसं खोटं बोललो. अनु, तुला तर माहीतच आहे माझा स्वभाव. पहिल्यापासुन काहीतरी वेगळं, प्रवाहांच्या विरुद्ध करायची आवड आहे मला. त्यामुळे मधुचंद्रही इतरांपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरा करायचे ठरवले होते मी. काहीही न ठरवता, कसलंही रिजर्वेशन वगैरे न करता उन्मुक्त फिरायचं. निसर्गाच्या जास्तीत जास्त जवळ जायचा प्रयत्न करायचा असं मी ठरवलं होतं. आबांनी कधीच परवानगी दिली नसती म्हणुन नाही सांगितलं त्यांना. पण तु म्हणत असशील तर अजुनही निर्णय बदलु आपण. रावबहादुर रणपिसेंच्या मुलगा आणि सुनेला कुठल्याही पंचतारांकीत हॉटेलमध्ये कुठल्याही क्षणी अॅकोमोडेशन मिळू शकते."
तशी अनन्या समाधानाने हसली.
"नको रे, तुझी आधीची कल्पनाच छान आहे."
गाडी वेगाने पुढे निघाली होती. थोडा अंधार पडायला सुरुवात झाली होती. नऊ वाजुन गेले होते रात्रीचे. तेवढ्यात रस्त्याच्या कडेला घाट सुरु होत असल्याची पाटी पाहीली. आणि अनु अभिजीतला म्हणाली...
"अभि, जपुन रे . आपण घाटात शिरतोय बहुतेक!"
"डोंट वरी जानेमन, ऐसी सडकोपे गाडी चलाना हमारे बाये हात का खेल है!" नकळत अभिने स्पीड वाढवला तशी ती टू सीटर स्पोर्ट्स कार वेगात घाट चढु लागली. तशी अनु अभीला अजुनच चिकटली....
"अभि, हळु रे! केवढी वेगात चालवतो आहेस गाडी . भीती वाटतेय रे !"
बायको भितेय म्हणलं की नवर्याला जोर चढतो तसेच काहीसे झाले आणि अनुला चिडवण्यासाठी म्हणुन अभिने वेग अजून वाढवला.
हवेत गारठा हळु हळु वाढायला लागला होता. तसाच अंधारही वाढू लागला होता. काय गंमत असते बघा इतर कुठली वेळ असती तर आजुबाजुच्या वातावरणाने अंगावर कांटा उभा राहीला असता. काळाकुट्ट अंधार.... लांबपर्यंत पसरलेला वळणावळणाचा, ठिकठिकाणी उखडलेला दुर दुर पर्यंत निर्मनुष्य असणारा रस्ता. मधुन मधुन एखादे वाहन समोरून येवुन जायी तेवढाच काय तो मानवी अस्तित्वाचा भाग. नाहीतर सगळीकडे भयाण अंधाराचे साम्राज्य. सुं सुं करत तुफ़ान वेगाने शिळ घालत वाहणारा, मनात धडकी भरवणारा वारा, त्यातुन रातकिड्यांची ती मनात भिती निर्माण करणारी किरकीर ! कुणीही सामान्य माणुस भीतीने वेडाच होइल असे वातावरण.
पण आपलं प्रेमाचं, विश्वासाचं माणुस जर बरोबर असेल तर मात्र हे वातावरण अगदी हवेहवेसे वाटायला लागते. इतरवेळी भितीदायक भासणारा निर्मनुष्यपणा मग वरदान भासायला लागतो. अभी आणि अनुचंही तसंच झालं होतं. ते भयाण वातावरण त्यांच्या खिजगणतीतही नव्हता. उलट त्या एकांताची मजा एकमेकाच्या सहवासात मनसोक्त लुटत दोघेही भावी संसाराच्या सुखी स्वप्नात पुर्णपणे बुडून गेले होते. कदाचित त्या आवेगातच ते घडुन गेलं.........
...........
.......
....
.......
..............
....................
"अभि, सावकाश पुढे बघ वळण आहे बहुदा."
अनु घाबरून ओरडली तसा अभि गडबडला आणि त्याने गडबडीत गाडी सावरायचा प्रयत्न केला पण आधीच फुल्ल वेगात असलेली गाडी नियंत्रणाबाहेर गेली होती. अभिने वेग आवरायचा खुप प्रयत्न केला पण तोपर्यंत गाडी वेगाने एका झाडाच्या खोडावर आदळली होती. शुद्ध हरपण्यापुर्वी अभीला एवढंच कळलं की आपण समोरच्या झाडावर आदळतोय. शुद्ध हरवण्यापुर्वी मनात आलेला शेवटचा विचार होता तो अनुचाच. अनु ठिक तर आहे ना?
..............................................................................................................................
"अं.. आई गं , डोकं दुखतय गं खुप ! " अनुने हळुच डोळे उघडले. समोर अभि उभा होता. काळजीने भरलेला त्याचा चेहेरा तिला शुद्धीवर आलेले पाहताच आनंदाने भरुन आला. ती शुद्धीवर आलीय हे पाहताच त्याच्या डोळ्यातुन अश्रु वाहू लागले. त्याने एका विलक्षण आवेगाने तिला बाहुपाशात कवटाळले.
"अनु, मी खुप घाबरलो होतो गं. तुझ्या विरहाच्या कल्पनेने प्रचंड घाबरलो होतो. तुझी शपथ अनु, तु जर शुद्धीवर आलीच नसतीस, तर मी देखील त्या समोरच्या दरीत स्वत:ला झोकून द्यायचा निश्चय केला होता."
"वेडाच आहेस अभि, अरे तु असा वागायला लागलास तर आबासाहेबांनी कुणाकडे बघायचं? चल डोळे पुस." अनु आवेगाने त्याच्या मिठीत शिरली. मृत्युच्या तावडीतून सुटका झाल्याचा आनंद तर होताच पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे अभिच्या आपल्यावरच्या अत्त्युच्च प्रेमाची पावतीच जणु मिळवून दिली होती या प्रसंगाने. अभिने आधार देवून तिला गाडीच्या बाहेर काढले. गाडीची अवस्था मात्र खुपच वाईट झाली होती. पुढचा बॉनेटचा भाग बराच मोडला होता. त्यातुन धूर बाहेर पडत होता. समोरची काच तडकली होती. तिच्या काचा सगळ्या रस्त्यावर पसरून पडल्या होत्या. स्टिअरिंगतर वाकडेच झाले होते. एकंदरीत काय तर गाडी पुढे जाण्याच्या लायकीची राहीली नव्हती. अभिचे डोळे भरून आले. आबांनी त्याच्या पंचविसाव्या वाढदिवसाची भेट म्हणुन ही पॊंटेक दिली होती. सगळा महाराष्ट्र पालथा घातला होता त्याने त्या गाडीत बसुन. आणि आज आपल्या परमप्रिय सखीला तिथेच त्या जंगलात टाकुन जायची वेळ आलेली होती.
"अनु, आपण इथुन बाहेर पडु या. ते बघ ....... साधारण दोन अडीच किमीच्या अंतरावर दिवे दिसताहेत. तिथपर्यंत जावू चालत. तिथे जवळपास एखादा फोन बघून आबांना कळवु. ते करतील दुसरी गाडी पाठवायची व्यवस्था." अभि गाडीतल्या कपड्यांच्या बॆगा बाहेर काढीत म्हणाला.
टप... टप .... टप .... अचानक पावसाला सुरुवात झाली. क्षणार्धात पावसाने चांगलाच वेग घेतला. पाऊस धो धो कोसळायला सुरूवात जाली. आकाशात विजा चमकायला लागल्या तशी घाबरलेली अनु अभीला चिकटली.
"हाय.... जालीम ! ये तुफानी रात..... उसमें ये बरसात और आपका साथ. .....
"जिंदगीभर नही भुलेगी ये बरसात की रात ....... अभि चक्क जोरजोरात गायला लागला.
"हाय्य..., काश ये हसिना भी अनजान होती ! तशी तु अजुन अनोळखीच आहेस म्हणा मला, काय?" अभिने मिस्कीलपणे विचारले तशी अनु लाजली.
"अभि, काय रे....? प्रसंग काय आणि तुला सुचतय काय? आधी इथुन सुरक्षीत, कोरड्या ठिकाणी पोहोचायचं बघू!"
" हुक्म सर आंखों पर.... बेगमसाहिबा ! जितनी जलदी हो सके हम आपको किसी महफ़ूज जगह पें ले चलते है! और उसके बाद ................
अभिने अनूला हलकेच डोळा मारला तशी गोरीपान अनु शरमेने अजुनच लाल झाली.
"प्राणप्रिया..... ! आता चलता का देवू फटके?" लटक्या रागाने अनु अभिला मारायला धावली तशी त्याने तिला मिठीतच घेतली.
"ओके...ओके चला, पहिल्यांदा एखादी सुरक्षीत जागा शोधू!"
"आणि त्यानंतर सकाळी... सकाळी परत आपल्या घरी जायचं. बास झाला मधुचंद्र ! समजलं?"
"ए हे काय गं? एवढ्याशा प्रसंगाने घाबरलीस? आपण काय ठरवलं होतं?" अभिने थोडी कुरकूर केली. पण अनुची अवस्था पाहुन त्यालाही ते मनोमन पटले असावे कारण त्याने फ़ारसा विरोध केला नाही.
दुरवर दिसलेल्या त्या दिव्यांच्या दिशेने ते हळुहळु चालत निघाले.
रात्रीची वेळ............ सुनसान रस्ता.......... वरुन मुसळधार पाऊस कोसळतोय.
आकाशात थोडंफार चांदणं होतं पण जंगल दाट असल्याने प्रकाश जमीनीपर्यंत पोहोचतच नव्हता. त्यामुळे खुप जपून चालावे लागत होते. वार्याचा घूं घूम करणारा आवाज आता मनात धडकी बसवत होता. महत्वाचे म्हणजे आता गाडी नसल्याने मनात एकप्रकारची असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. जंगल्याच्या अंतर्भागातुन कानावर येणारे जंगली प्राण्यांचे चित्र विचित्र आवाज भेदरवुन टाकत होते. त्यात वरून कोसळणारा तुफानी पाऊस थांबायचे नाव घ्यायला तयार नव्हता. पायाखाली हळु हळु चिखल व्हायला सुरूवात झाली होती. ओल्या पाचोळ्यातुन चालताना होणारा पचक पचक आवाज भीती घालत होता. असं वाटत होतं की आजुबाजूला कोणीतरी आहे........
घाबरून जावून अनु अजुनच अभिला चिकटत होती आणि अभि चेकाळत होता.
मजल दर मजल करत ते त्या दिव्यांपाशी येवून पोहोचले आणि अभि याहू म्हणुन जोरात ओरडायचाच काय तो बाकी राहीला.
....................................................................................................................
समोर एक छोटीशीच पण सुंदर बंगली उभी होती. अनु आणि अभि पळतच त्या बंगलीपाशी पोचले.
"अनु, आत लाईट दिसतोय म्हणजे कोणीतरी राहात असेलच, मी दार वाजवतो ! " म्हणत अभि पुढे झाला आणि त्याने दाराची कडी वाजवली आणि थोडा मागे सरकुन उभा राहीला.
थोड्या वेळाने कर्र...कर्र करत दार हलकेच उघडले गेले.
"हॅलो"... करत अभि पुढे झाला.
दारात कोणीच नव्हते. तसा अभि चमकला आणि अनू दोन पावले मागे सरकली.
"अगं वार्याने उघडलेले दिसतेय दार. उघडेच होते बहुदा. चल बघुया कोणी आहे का आत ते?
"अभि, मला भीती वाटतेय रे! असं कुणाच्याही घरात शिरायचं म्हणजे."
"अनु ...वेडे, अगं आपण चोरी का करणार आहोत. फक्त आजच्या रात्रीपुरता आसरा हवाय आपल्याला. आत कोणीतरी असेलच आपण आधी त्याची माफ़ी मागु मग त्याने परवानगी दिली तरच इथे राहू. अगदी बाहेरच्या व्हरांड्यात राहायची परवानगी मिळाली तरी आपला प्रश्न मिटला. काय?"
अनुचा हात हातात घेवून अभि घरात शिरला. सगळं घर रिकामं होतं. दिवाणखाना, स्वयंपाकघर, मागच्या दोन खोल्या... वरच्या मजल्यावरच्या दोन खोल्या सगळं रिकामं.
"अनु, अगं इथे कोणीच नाहीय! काय करायचं? एखाद्याच्या घरात असं शिरणं मलाही थोडं चुकीचंच वाटतय......
तेवढ्यात बाहेर कसलातरी प्रचंड मोठा असा आवाज झाला. बहुदा कोठेतरी वीज कोसळली असावी. तशी अनू अजुनच घाबरली.
"अभि, आजची रात्र आपण इथेच काढू या. सकाळी जावू परत. तोपर्यंत कोणी आलेच तर त्याची माफी मागू वाटल्यास, पण आता असल्या वातावरणात बाहेर जायची माझी छाती नाही व्हायची रे."
"ठिक आहे अनु........चल त्या खोलीत काही टॉवेल वगैरे मिळाला तर बघू... तु खुप भिजली आहेस. सर्दी होईल अशाने तुला."
दोघेही त्या खोलीत शिरले आणि अभि बघतच राहीला. खोलीच्या मधोमध एक प्रशस्त शिसवी पलंग होता. एका वेळी चार माणसे आरामात झोपु शकतील एवढा मोठा! त्याने हळुच अनुकडे पाहून डोळे मिचकावले .......
"अन्या, काय विचार आहे....... आज आपण मधुचंद्रासाठी म्हणुन बाहेर पडलो आहोत आणि देवाने एवढ्या संकटांनंतर हे समोर ठेवलय."
अभिचा मिश्किलपणा हळु हळु जागृत होवू लागला होता.
"चल.... तुझं आपलं काहीतरीच! " अनु अशी काही झकास लाजली की .....
ती पाहताच बाला कलिजा खलास झाला.... म्हणत एक मस्त गिरकी घेवुन नाचावेसे वाटु लागले अभिला. अनु त्याच्याकडे अनिमीष नेत्रांने बघत होती.
"अभि, तु दिवसें दिवस ...........
ती आपले वाक्य पुर्ण करायच्या आतच तिला ते जाणवले.
कुणीतरी मंद स्वरात घोरत होते. ते मंद निश्वास स्पष्टपणे ऐकु आले तिला. क्षणभरच पण परत तो आवाज कमी झाला.
अं...अं... कुणीतरी कण्हल्यासारखा आवाज, मग एका कुशीवरुन दुसर्या कुशीवर वळताना होतो तसा आवाज.
खळ्ळं...खळ्ळं.......... काहीतरी पडल्याचा आवाज झाला. अनु आवाजाच्या रोखाने.., किचनकडे धावत गेली. पण किचनमध्ये कुणीच नव्हते. आणि मग तिला पुन्हा तो भास झाला .......
कुणीतरी सावकाश शेजारुन चालत गेल्याचा. पण पावलांचा हा आवाज अगदीच सुक्ष्म होता... एखादे लहान मुल जवळुन चालत जावे तसा. दिसत तर कुणीच नव्हते. तेवढ्यात ते मघाशी उभे होते त्या खोलीचा किलकिला असलेला दरवाजा अचानक उघडला गेला. मागोमाग काही कुजबुजण्यासारखे आवाज...... मग पुन्हा शांतता. प्रत्यक्षात मात्र कोणीच दिसत नव्हतं.
"अभि... अभि.... अनु अभिला हाका मारत त्याच्याकडे पळत गेली. तर अभिचे कशाकडेच लक्ष नव्हते. तो छानपैकी त्या पलंगावर आडवा झाला होता. अनुला बघितलं की त्याने दोन्ही हातांचे हार पसरले.
"अनन्या SSSSSSSSSSSS ....... ये ना SSSSSSSSSSSS....... !"
"अभि चावटपणा पुरे, इथे कुणीतरी आहे. काहीतरी वावरतय इथे. मला जाणवलं आत्ता." अनु घाबरी घुबरी होत म्हणाली.
"ओ कम ऑन स्वीट हार्ट , सगळं घर आपण फिरून बघितलय. कोणीही नाहीय इथे!" अभिने पलंगावर पडल्या पडल्याच तिला जवळ ओढलं.
"अभि अरे खरेच इथे ........................
अनुला काही बोलायची संधी न देताच अभिने तिला जवळ ओढले आणि आपल्य ओठांनी तिचे ओठ बंद करुन टाकले. त्याच्या आक्रमक प्रणयापुढे आपल्या मनातली ती अनामिक, अज्ञात भीती कुठे विरून गेली ते अनुला समजलेच नाही. पुढच्याच क्षणी अनुने स्वत:ला अभिच्या मीठीत झोकून दिले.
................................................................................................................
ती रात्र अनुसाठी स्वर्गीय सुखाची रात्र होती. प्रणयाचा बहर ओसरल्यावर कधीतरी एक दिडच्या दरम्यान तिला झोप लागली. त्यानंतर तिला एकदम जाग आली ती पुन्हा बाहेर पडलेल्या वीजेच्या आवाजानेच. शेजारी अभि शांतपणे झोपला होता. अतिशय तृप्त वाटात होता त्याचा चेहेरा. तिने उठुन खिडकीकडे पाहीले. बाहेर दुरवर वीजेचा लोळ दिसत होता. तेव्हा पहिल्यांदाच तिच्या लक्षात आले की त्या खोलीत एक साधारण सहा फूट उंच आणि चार फुट रुंद असा देखणा, प्रशस्त आरसा होता. आरसा पाहील्यानंतर तिला राहावले नाही. ती पलंगावरुन उठली आणि आरशासमोर जावून उभी राहीली. इकडे तिकडे बघत लाजतच तिने अंगावरची चादर झुगारूनी दिली ..........
...................
............
.......
...........
...................
........................
अगदी हळुच समोरच्या आरशात पाहीले......
आणि पुढच्याच क्षणी तिच्या तोंडुन एक किंचाळी बाहेर पडली. आरशात तिच्या प्रतिबिंबाबरोबरच आणखी तीन पाठमोरी उभी असलेली माणसे दिसत होती. एक पुरूष, एक स्त्री आणि एक लहान चार - पाच वर्षाचा मुलगा. ते तिघेही पलंगावर झोपलेल्या अभिकडे पाहात होते. आपापसात काहीतरी बोलत होते. मागे वळुन बघण्याचे तर धाडसच होत नव्हते. प्रचंड घाबरलेल्या अनुने कान देवून त्यांचे बोलणे ऐकण्याचा प्रयत्न केला. तिला ते कुजबुजणं अस्पष्ट ऐकु आलं.
ती स्त्री पुरूषाला म्हणत होती....
"अशोक, अरे दिसत तर कोणीच नाहीये पलंगावर? पण मग मघाशी मला कुणाचातरी धक्का लागला. कुणाचेतरी उष्ण श्वास माझ्या मानेवर आदळले. मी उठुन पाहीलं तर तु झोपला होतास शांतपणे..माझ्याकडे पाठ करुन ! मग.................!"
त्याक्षणी अनुने मागे वळुन पलंगावर झोपलेल्या अभीकडे पाहीले. तिला ते तिघे काही दिसले नाहीत पण ...
................
..................
..........................
...............................
.....................................
पलंगावर झोपलेला अभि हळु हळु विरघळायला लागला. पुढच्याच क्षणी पलंग रिकामा होता. अनुने घाबरुन जावुन एक किंकाळी फोडली आणि पलंगाकडे धावली. पलंगावर आता अभिचा मागमुसही नव्हता. मागे वळुन तिने पुन्हा आरशाकडे पाहीले.
आता आरशात फ़क्त ती तीन माणसेच दिसत होती. ते तिघेही आता वळुन आरशाकडे पाहायला लागले होते. ती स्त्री आरशाकडे बोट दाखवत तावातावाने त्या पुरुषाला काहीतरी सांगत होती.
आणि आरशातली अनु आता पुर्णपणे विरघळुन गेली होती.
.................................................................................................................
हवालदार शिरोडकरांनी अपघातग्रस्त पाँटेकच्या खिडकीतुन आत डोकावून बघितलं आणि हात आत घातला. लगेचच त्यांनी हलकेच डोके बाहेर काढले आणि तसेच वाकलेल्या अवस्थेत फौजदारांना म्हणाले....
"सायेब, काय पण उपयोग नाय. दोघं बी आन दी स्पाट खलास झाल्याती. गाडीचा तर पार चेंदामेंदा झालाय. "
समाप्त.
(पुर्णपणे काल्पनिक)
विशाल कुलकर्णी
कोणी लिंक
कोणी लिंक लावेल का या कथेची ? नक्की काय लिहायचे होते? पहिला & दुसरा भाग वेगळा वाचला तर स्वतंत्र कथा होऊ शकते.
बाप रे!
बाप रे! विशाल, सगळ्या कथांमधे सगळे विरघळायलाच लागलेत वाटतं! छान आहे.
-----------------------------------------------------------
विठुचा गजर, हरिनामाचा झेंडा रोविला....
-----------------------------------------------------------
विशाल
विशाल पुन्हा सुशी?
विशाल रागावु नकोस, भयकथा हा देखील एक कथेचा प्रकार आहे आणि तू तो सशक्त हाताळतोस. माझा पिंड सुशीचा नाही म्हणुन मी
चिन्ह टाकलय इतकच. मला बुट पॉलिश आणि नांदा सौख्यभरे लिहीणारा विशाल जवळचा वाटतो 
छान जुळलयं
छान जुळलयं कथानक.. थोडसं अँटीसिपेटेड.. देश्मुखाचं काय झालं
शिवानी
शिवानी अशोक आणि त्याच्या मुलाला त्या "देशमुख" नी मारलं...
अभि आणि अनन्या अपघातात ठार झाले...पण त्यांची भुते त्या बंगल्यात होती...
असं आहे नं? विशाल...
मस्त
मस्त गोष्ट.. एकदम आवडली.
मला नाही वाटत पहिले कुटूंब मेले म्हणुन. कथा मधुचंद्राची आहे, पहिले कुटूंब सर्पोर्टींग कास्ट, मेन रोल अभी आणि अनन्याचे.
पहिलीच कथा, जिथे भुतांना माणसे दिसत नाहीत तर माणसांना जसे त्यांचे केवळ अस्तित्व जाणवते तसे त्यांना माणसांचे जाणवते.
साधना
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
साधना धन्स
साधना धन्स आता कळली
पण मग
पण मग देशमुख कुटुंब तरी जीवंत होतं कि मृत होतं
विशाल
विशाल नक्कि काय कथा आहे जरा सांगणार का? नक्की किती भुत आहेत?? त्या देशमुखांचे काय झाले कि ते सुध्दा भुतच होते??
====================================
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे....आपुले अंतर.....
छान आहे
छान आहे गोष्ट. वातावरण निर्मीती एकदम सही.
धनु.
आधी
आधी प्रतिसाद दिला होता पण तो वि र घ ळू न गेला.
धनु.
बाप रे..
बाप रे.. म्हणजे धनु तु सुद्धा...!!!!
विशाल, प्रयत्न चांगला होता. तुझी प्रसंग उभा करण्याची हातोटी मस्तच.
हू ऊ ऊ ssssssssss
हू ऊ ऊ ssssssssss
विशाल,
विशाल, आवडली .... इन्डायरेक्ट्ली जे सांगायचं होतं ते कळालं. पण एक नक्की वाटतं... अजुन जास्त खुलवायला.. रंगवायला पाहिजे होतीस.... जास्त रंग भरता आले असते.. तुझा हातखंडा आहे तो.
----------------------------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......
विशाल,
विशाल, मस्ट गोष्ट.. पण वरच्या प्रश्नांची ऊत्तरे दे पाहू आधी?
न म स्का र
न म स्का र
म स्त च........
कोल्हापूरी मध्ये- नाद नाही करायचा...
सगळ्यांचे
सगळ्यांचे आभार.
साधनाला १००००००००० मोदक.
अनुला आरशात कोण दिसलं याला काहीतरी पार्श्वभूमी हवी म्हणुन पहिले संक्षिप्त कथानक. वाचकांना थोडेसे गोंधळात पाडण्यासाठी फक्त त्याचा वापर केला आहे. नक्की भुत कुठले याचा संभ्रम उडावा म्हणुन आणि शेवटपर्यंत रहस्य कायम राहावे म्हणुन हा खटाटोप.
होशिंगकर फॅमिली जिवंतच आहे. फक्त अनुला त्यांचे अस्तित्व जाणवते. कारण अनु किंवा अभि ही देखील भुते नाहीतच. जीवन आणि मृत्युच्या सीमारेषेवर अडकलेले दोन अशरीरी आत्मे किंवा फारतर त्यांची अपुर्ण राहीलेली इच्छाशरीरे म्हणु हवे तर.
पण आता मनापासुन वाटतेय की होशिंगकर कुटुंबाला न्याय मिळायलाच हवा. पुढेमागे त्यांची कथा देखील येइलच. तोपर्यंत वाट बघा.
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासुन धन्यवाद !
***********************************
नाम फुकट चोखट, नाम घेता न ये वीट !
जड शिळा त्या सागरी, आत्माराम नामें तारी !
पुत्रभाव स्मरण केले, तया वैकुंठासी नेले !
नाममहिमा जनी जाणें, ध्याता विठ्ठलाचे होणे !
विशाल, गोष्
विशाल,
गोष्ट चांगली आहे. अजुन खुलवता आली असती असे वाटते.
कसे झालेय आता..की "सिक्स्थ सेन्स", "द अदर्स" हे सगळे सिनेमे पाहुन लोकाना आता शेवटाची कल्पना आधीच येते..जर दोन पात्रे असतील तर त्यातले एक मेलेले आणि एक जीवंत असणार हे लोक आधीच ओळखतात. त्यामुळे आधी जो "अनपेक्षित" शेवट असायचा तो सध्या "अपेक्षित" शेवट असतो
मला आवडली
मला आवडली कथा
छान रंगवलीय शेवटपर्यन्त.
The others या movie
The others या movie मध्ये ही कल्पना आहे - भुतं माणसांना बघून घाबरतात नी त्यांनाच भूतं समजतात. त्यावरून बेतल्ये का ही कथा?
मस्त रे !
मस्त रे ! आवडली भावा कथा. आणि मला सुध्दा मोदक हवेत. कारण, मला कथेचा उलघडा साधना सारखंच झाला (हे काय बोल्लो तेच कळ्ळे नाही
) !
----------------------------------------
जळुन तृप्त होतो गुलमोहर,
तरी पाउसाची भेट नाही.
गुलमोहराचं जळणं,
कधीच का पावसाला कळत नाही ?
भन्नाटच
भन्नाटच आहे विशालभय !
विशाल छान
विशाल छान आहे कथा , लवकर येऊ दे दुसरी रहस्यकथा
****************************************
वक्रतुंड महाकाय सुर्यकोटि समप्रभ|| निर्विघ्नं कुरूमेदेव सर्वकार्येषुसर्वदा ||||
आवडली कथा!
आवडली कथा!
मलाही
मलाही आवडली कथा!!! मस्त आहे.
*******************
सुमेधा पुनकर
*******************
विशल्या,
विशल्या, भेटल्यावर बोलूच.
.........................................................................................................................
आयुष्याच्या पाऊलवाटी, सुख दु:खांचे कवडसे
कधी काहीली तनमन झेली, कधी धारांचे व़ळसे
आवडली .. छान
आवडली .. छान रंगवलीये...
खुप
खुप दीवसानंतर आज मला तुझी कथा वाचायला वेळ मिळाला. वाचल्यानंतर खुप बर वाटल.
सुंदर कथा ! आवडली मला!
विश्ल्या
विश्ल्या गोष्ट लयी आवडली...
कथा छान
कथा छान आहे. अजुन विस्त्रुत करता आलि असति.........
Pages