परीक्षा : असाव्यात की नसाव्यात....

Submitted by मंजिरी सोमण on 19 June, 2010 - 06:24

माझी मुलगी राधा, पहिल्या दिवशी शाळेत जाऊन आल्यावर तिच्या नविन वर्षाच्या डायरीत ८वी पर्यंत फक्त सहामाही आणि वार्षिक अशा २ च परीक्षा वर्षभरात घेणार असल्याचं कळलं. 'सर्व शिक्षा अभियानां'तर्गत, मुलांना जास्तीत जास्त प्रमाणात शाळेकडे खेचण्याचा, तळागाळातल्या मुलांनाही शाळेची, पर्यायाने शिक्षणाची गोडी लावण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

या मधे २ मतप्रवाह आहेत .............
१. अनेक पालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दर महिन्याला तो परीक्षानामक राक्षस येऊन मानेवर बसणार नाही. त्यामुळे मुलांना शिक्षण हे ओझं न वाटता शाळेत जाणं हा आनंदाचा भाग होईल. परीक्षांमुळे येणारे ताण तणाव, निकालाची भिती, अपेक्षाभंग, पालकांचा वाढता दबाव, स्पर्धा, उंदिर-शर्यत(rat-race :फिदी:), त्यामुळे मुलांमधे नकळत निर्माण होणारी असूया या सगळ्या गोष्टींना आळा बसेल.

२. दुसरा मतप्रवाह असा की, जर परीक्षाच नसतील तर मुलं परीक्षेचे वेळापत्रक लागेपर्यंत पुस्तकाला हात सुद्धा लावणार नाहीत. एका सत्रात एक परीक्षा ती सुद्धा १०० गुणांची, यामुळे अचानक मुलांवर अभ्यासाचं ओझं पडेल. शिवाय परीक्षाच नसतील तर मुलांचा कस लागणार कसा??? त्यांना आतून drive येणार तरी कसा? दर महिन्याला घेणात येणार्‍या चाचणी परीक्षांमुळे मुलांचे २-२ का होईना, धडे डोळ्याखालून जात होते.

यावर एक उपाय म्हणजे, गुणपद्धती ऐवजी श्रेणीपद्धत अंगिकारावी. शिवाय आता चाचणी परीक्षा नाहीत तर त्याऐवजी आठवड्याला प्रत्येक मुलाचं वेगवेगळ्या प्रकारे अवलोकन करण्यात यावं.... सामुहिक चर्चा, एखाद्या विषयावर पुढे जाऊन बोलणे, presentation वगैरे, प्रत्येक मुलाची रुची कुठल्या क्षेत्रात आहे हे जाणून घेऊन त्याप्रकारचे शिक्षण घेण्याला त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्यात यावं, म्हणजे प्रत्येक मूल हे परीक्षार्थी न होता खर्‍या अर्थाने विद्यार्थी बनेल....

याबद्दल तुम्हाला काय वाटतं???

गुलमोहर: 

परीक्षा नसावी ! प्रॅक्टीकल इम्प्लीमेन्टेशन असावं कार्यशाळा असाव्यात. नवं नवं असं शिकता येईल जेणेकरून..

परीक्षा आहे म्हणून मार्क मिळवण्याच्या दृष्टीने केलेला अभ्यास नसेल मग तो फक्त Happy

डुआया, या सगळ्यासाठीचं नियोजन, शिक्षकांना त्या दृष्टीने प्रशिक्षण देणे तितकेच गरजेचे आहे. त्यामधे किती वर्ष जातील कोण जाणे!

मंजिरी, अगदी खेड्यापाड्यांमध्ये नाही, पण तालुका, जिल्हा पातळीवर ह्यासाठी शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षणही देता येईल, नै? जिथे जिथे इंटरनेटची सोय आहे तिथे तिथे शिक्षक सामूहिक रित्या असे प्रशिक्षण घेऊ शकतात.

अभ्यास म्हणजे सराव... मनन... चिंतन...
परीक्षा म्हणजे तणाव... शर्यत... चिंता...

शिक्षण हे बुद्धीच्या विकासासाठी असावे...

न सा व्या त...
परिक्षेत यशस्वी झालेले कित्येक जण आयुष्यात यशस्वी होतातच असे नाही.
खरेतर खूप वाद-विवाद करण्यासारखा विषय आहे हा, असो.

नसाव्यात.
खरं सांगायचं तर आपल्याकडे फक्त पुस्तकी शिक्षण दिलं जातंय,साचेबद्ध. त्या शिक्षणाचा कितीसा उपयोग अर्थार्जनाच्या द्रुष्टीने होऊ शकतो?
वर्षानुवर्ष अशीच यांत्रिक पद्धत चालु आहे. घाऊक प्रमाणावर प्रत्येक क्षेत्रात फक्त पदवीधर निर्माण करतोय.

अ)परीक्षा नसतील तर अपेक्षित ज्ञानपातळी गाठलीय का नाही हे तपासण्याचा दुसरा मार्ग हवा. -----वि.------
ब) परीक्षेत मिळालेले गुण हे ज्ञानपातळीचे द्योतक असतातच असे नाही.
मला या दोन्ही बाजू खर्‍या वाटतात.
तेव्हा परीक्षांचे स्वरूप बदलावे, गुणांपेक्षा श्रेणी द्यावात त्यामुळे पालक मुलांना येत असलेला ताण कमी होईल. काठिण्य पातळी निवडण्याची संधी देऊन मुले+पालक+शिक्षक यांनी ती ठरवावी.

तोषा,
जे 'शिक्षणाच्या आईचा......' मधे दाखवलं आहे तेच....... 'सतरा साते किती' या प्रश्नाचं उत्तर शिक्षक तरी पटकन देऊ शकतील काय? आणि मग हिशोबाचाच विचार करायचा म्हटल्यावर रस्त्यात फुगे विकणारा ५ वर्षाचा मुलगा सुद्धा चटकन हिशोब करून सुटे पैसे आपल्या हातावर ठेवतो. त्याला काय करायचीये रे शिकून फ्रेंच आणि रशियन राज्यक्रांती??? त्याला काय आणि आपल्या मुलांना काय..... तसल्या सगळ्या अभ्यासक्रमावर बेतलेल्या परीक्षा उत्तीर्ण होऊन काय उपयोग?
आता तर CET मुळे १० वी आणि १२वी च्या परीक्षांना पण काही अर्थ राहिला नाहिये....

आता चाचणी परीक्षा नाहीत तर त्याऐवजी आठवड्याला प्रत्येक मुलाचं वेगवेगळ्या प्रकारे अवलोकन करण्यात यावं.... सामुहिक चर्चा, एखाद्या विषयावर पुढे जाऊन बोलणे, presentation वगैरे, प्रत्येक मुलाची रुची कुठल्या क्षेत्रात आहे हे जाणून घेऊन त्याप्रकारचे शिक्षण घेण्याला त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्यात यावं, >>>

सी.बी.एस.सी. बोर्डाच्या शाळांमधे (९वी आणि १० वी साठी) हे गेल्या वर्षीच सुरू करण्यात आलेलं आहे. आणि कुणाचाही विश्वास बसणार नाही (माझाही बसला नसता) पण मुलांमधले इतके सुप्त गुण बाहेर येतायत की त्यांचे पालकच नव्हे तर खुद्द शिक्षकही अवाक होतायत.
(याच संदर्भात मी मागे एकदा एक छोटंसं भाष्य टाकलं होतं : http://www.maayboli.com/node/12808)
आदित्यच्या एका मित्रानं त्याच्या फेसबुक अकाऊंटवर स्टेटस टाकलं होतं की 'काश.... हमेशा एक्झाम्स अगर ऐसे ही होते...'
या एका वाक्यातच सगळं आलं.

मंसो (हेहेहे मिसो तसं मंसो Proud )

नियोजन, शिक्षकांना त्या दृष्टीने प्रशिक्षण देणे तितकेच गरजेचे >> ह्म्म्म्म साचेबद्ध कामगार बनवण्याच प्रशिक्षण असं काय नी किती बदलेल ?

What do you think about home schooling? मागच्या आठवड्यातला शनवारचा लोस वाचलास का? मला आवडल्ये ही संकल्पना Happy

I would love to teach and in that process to undo the old lessons learned, relearn and ultimately to be in my own school once again Proud

काय म्हणतेस?

What do you think about home schooling? मागच्या आठवड्यातला शनवारचा लोस वाचलास का? मला आवडल्ये ही संकल्पना >>>

मी तो लेख वाचला होता. Happy (त्या मुलीच्या आई-वडिलांचा तो निर्णय तसा धाडसीच होता.)

खरं आहे मंजे, आपली सध्याची शिक्षणपध्द्ती परीक्षार्थी घडवते, विद्यार्थी नाही घडवतं.
माझ्या मते चांगले विद्यार्थी घडवले गेले पाहीजेत, आणि तू त्याकरता जो उपाय सुचवला आहेस तो योग्य वाटतो. प्रश्न एवढाच राहतो की ह्याकरता आधी शिक्षकांना तयार केले पाहीजे, कारण सध्या खुपच कमी शिक्षक एखादा विषय 'शिकवताना' दिसतात. ( with all due respect to good teachers )

'तारें जमिन पर' मधील रामशंकर निकुंभ सारखे शिक्षक तर आजकाल अभावानेच सापडतील. पण खरंच, अश्या शिक्षकांची आज गरज आहे. मुलांची त्या त्या वयातली मानसिकता ओळखुन त्यांना घडवणारे शिक्षक हवेत.

मंजे, आणि लिखाणाला सुरुवात केलीस तर .... GOOD ..... छान वाटलं वाचून .... Happy .... आता लगे रहो !

परिक्षा नक्कीच असाव्यात, कारण त्यातून आपण कुठे आहोत हे नक्कीच कळतं. रामायण, महाभारतापासून परिक्षा कोणाला चुकल्या आहेत का ? पण परिक्षेच स्वरूप बदलाव , नुसतचं शिक्षकी पेशा म्हणून परीक्षा घेण्यापेक्षा परीक्षा घेतल्यावर त्यावर पुन्हा एक अभ्यास असावा पण शिक्षकांसाठी. कुठला विद्यार्थी कुठल्या विषयात कमी आहे हे प्रगतीपुस्तकावर लिहिण्यापेक्षा असं का याची उत्तरं त्यांनीच शोधायला हवीत. बाकी मंजिरी तू सुचवलेले पर्याय १०१% उत्तम. मी सहमत आहे.

डुआय, लली, अमोल,
३ इडियट्स मधला फनसुक वांगडू अशाच कॅटॅगरीतला शिक्षक आहे. त्याला मुलांना आनंदाने, ओझं वाटणार नाही, आवडेल त्या क्षेत्रात आत्मविश्वासाने पाऊल ठेवणारी मुलं घडवायची आहेत. यासाठी 'कौन कितने पानी में पहाण्यासाठी परीक्षा तर हव्यातच पण वेगळ्या पद्धतीने ज्याची मुलांना धास्ती वाटणार नाही. माझ्या मैत्रिणीचा मुलगा एरवी अगदी व्यवस्थित असायचा, पण परीक्षा हॉल मधे गेल्यावर त्याचं अवसानच जायचं... हे थांबायला हवं

अरुंधती, राजेश्वर, इंद्रा, अनुजा, भरत, सुर्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद... या सगळ्या चर्चेचं तात्पर्य काढून आम्ही शाळेतल्या काही आया जाऊन मुख्याध्यापकांशी बोलणार आहोत.... (चिमण, हे तुझ्यासाठी आहे Happy )

मंजे, परिक्षा असाव्यात.. पण त्यांचे स्वरुप बदलावे. गुणांपेक्षा श्रेणी पद्धत असावी.

आता चाचणी परीक्षा नाहीत तर त्याऐवजी आठवड्याला प्रत्येक मुलाचं वेगवेगळ्या प्रकारे अवलोकन करण्यात यावं.... सामुहिक चर्चा, एखाद्या विषयावर पुढे जाऊन बोलणे, presentation वगैरे, प्रत्येक मुलाची रुची कुठल्या क्षेत्रात आहे हे जाणून घेऊन त्याप्रकारचे शिक्षण घेण्याला त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्यात यावं, >>> १०१% अनुमोदन.

>>सामुहिक चर्चा, एखाद्या विषयावर पुढे जाऊन बोलणे, presentation वगैरे, प्रत्येक मुलाची रुची कुठल्या क्षेत्रात आहे हे जाणून घेऊन त्याप्रकारचे शिक्षण घेण्याला त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्यात यावं, म्हणजे प्रत्येक मूल हे परीक्षार्थी न होता खर्‍या अर्थाने विद्यार्थी बनेल.

अगदी अगदी १००% अनुमोदन.

आता चाचणी परीक्षा नाहीत तर त्याऐवजी आठवड्याला प्रत्येक मुलाचं वेगवेगळ्या प्रकारे अवलोकन करण्यात यावं.... सामुहिक चर्चा, एखाद्या विषयावर पुढे जाऊन बोलणे, presentation वगैरे, प्रत्येक मुलाची रुची कुठल्या क्षेत्रात आहे हे जाणून घेऊन त्याप्रकारचे शिक्षण घेण्याला त्या विद्यार्थ्याला प्रोत्साहन देण्यात यावं, >>>
एका वर्गात ६०-६० मुले असतील तर हे सगळं प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक विषयासाठी करणं कितपत जमेल? आणि हेच जर करायचे म्हटले तर त्यानी शिकवायचे कधी?
माझा बदलाला विरोध नाही, practical difficulty मांडतेय एवढंच!

परि़क्षा असाव्यातच. जोवर मुल्यमापनासाठी योग्य पर्याय सापडत नाही तोवर परिक्षा असायलाच हव्युआत अन्यथा यात असामान्य आणि अतिसामान्य दोघांचही नुकसान होणार.

माझ्या मते परिक्षा असाव्यात, तसही तुम्ही रॅट रेस मधे आत्ता नाही पण १०, १२ वी ला धावडवणारच ना मुलांना, मग उलट परिक्षे मुळे त्यांना निदान रॅट रेस मधे धावायची सवय तरी राहिल, हां पण त्यामधे आपल्या पाल्याला कितपत धावडवायच हे ज्याने त्याने ठरवल पाहिजे, प्रत्येक मुल आपापल्या ग्रास्पिंग प्रमाणे कमी जास्त मार्क्स मिळवत हे आधी पालकांनी समजून घेण गरजेच आहे,पैकीच्या पैकी मार्कांचा अट्टाहास पहिले पालकांनी सोडण महत्वाच आहे, म्हणजे मग परिक्षेचा तितकासा बाऊ वाटणार नाही. मुल्य मापन, गुणवत्ता मापन हे व्ह्यायलाच पाहिजे. त्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधण गरजेच आहे.
अत्ता परिक्षा नाही म्हणून सगळ्या पालकांमधे चर्चा चालू आहे , पण मला वाटत, कि आपल्या सगळ्यांना माहिते आपली शिक्षण पद्धती चुकीची आहे, व्यवसायभिमुख शिक्षण, प्रॅक्टीकल , रोजच्या जिवनात उपयोगी पडणार शिक्षण आपल्य मुलांना शाळेतुन मिळत नाही. पण त्या बद्दल कोणीच बोलायला, एखदा पालक ग्रुप करायला कोणीच तयार नाही,आपण मुलांना आवडीच शिक्षण शाळे तुनमिळाव ह्यासाठी प्रयत्नच करत नाही, त्यासाठी बाहेरचे क्लास लावतात पण आपल्या शिक्षण पद्धती विरुद्ध कोणीच आवाज उठवत नाही. मी माझ्या मुलीला स्कॉलरशिपचा क्लास लवला नाही म्हणून मला सध्या सगळ्यांनी वेड्यात काढल्य.
कुठे तरी मला ही जाणवून गेल की अरे आपण खरच फार मोठी चूक करतोय की काय? पण लेकीने सांगीतलय, अभ्यासाच्या कुठल्या ही क्लासला मी अजिबात जाणर नाही नाही तर मला परिक्षेलाच बसायच नाही. मला वाटत ह्यातच सगळ आल.
असो, विषयांर झाल थोड, पण मंजे सध्याचा एकदम हॉट विषयाला तोंड फोडलय्स.सो लगे रहो. मस्त लेख आणि प्रतिक्रिया.

स्मिता पटले,आधीपासुन सवय असेल तर पुढच्या परीक्षा अवघड वाटणार नाहीत. हवे तर परीक्षेच्या ताणाचे समायोजन कसे कारायचे हे शिकवावे. नंबर देण्या ऐवजी grades दयाव्यात. पन परीक्षा नकोच हे काही पटत नाही.
होमस्कूलींग हा पर्याय कितीही भारी वातत असला तरी सगळ्यांनाच अमलात आणने जरा कठिण आहे.
इथे थोडे विषयांतर वाटेल, पण पुण्यात काही वेगळ्या वाटेने जाणार्‍या शाळा आहेत, त्यांचे खुप कौतुकही होते, पण मला नेहमीच प्रश्न पडतो दहावी झाल्यावर सरधोपट स्पर्धेत ती मुले उतरतात तेव्हा त्यांचे काय होते?
मी शालेत असताना ज्ञानप्रबोधीनीचे असेच फार कौतुक होते, वेगली शाला वेगली शाळा म्हणुन (आता तेव्हडे ग्लॅमर नाही राहिले) to be very honest ,me or my friends could never gelup with those prabodheenee students. त्यामुळे मोठ्या भावंडांना निक्षुन सांगितले होते माझ्या भाचरांच्या admissionच्या वेळी खबरदार प्रबोधीनीत घातले तर.

विषय चान्गला आहे,
पण हे सर्व नन्तरचे प्रश्न!
पहिली ते दहावी पर्यन्तच्या अभ्यासक्रमाबाबतच माझ्यापुढे भले थोरले प्रश्न चिन्ह आहे!
अगदी आमच्याही वेळेस, ते जे जे "शिकवले जायचे" ते का, अन त्याचा उपयोग माझ्या आयुष्यात काय झाला हे प्रश्न मला अजुनही सतावतात! Happy
अभ्यासक्रमाबाबतच स्थल/कालविशेषानुसार अधिक लवचिकता आली, तर वर उद्भवणारे प्रश्न मूळातच नाहीसे होऊ शकतील असे माझे मत! Happy
(अर्थात माझ्या मनात उद्भवत असलेले विचार या बीबीच्या विषयाशी तितकेसे सुसन्गत नाहीत असे वाटते, अन्यथा एक-दोन नजिकची उदाहरणे दिली असती.... नव्हे नव्हे देतोच आता एक उदाहरण!
लिम्बीच्या गावचा एक धनगर मुलगा, मुळात ते त्या गावचे नसुन बाहेरुन येऊन स्थाईक झालेले. मुलगा यन्दाच दहावी पास झाला, माझ्यासमोर त्याची मार्कलिस्ट आहे, बेस्ट ऑफ फाईव्ह मुळे ५२% मार्क्स, गडबड झालीये ती इन्ग्रजी विषयात. अकरावीला काय करावे हा प्रश्न, आयटीआय करावे, तर जवळच्या ठिकाणी वसतीगृह उपलब्ध नाही, येऊन जाऊन करण्याचा "खर्च" परवडत नाही - हो एसटीचा पास मिळतो हे खरे, पण सोईस्कर व वेळेत ती उपलब्ध अस्तेच असे नाही तेव्हा वडापवरच सर्व अवलम्बुन, अर्थातच रोखीने! कॉमर्स ला जावे तर त्यात इन्टरेस्ट नाही, सायन्सचा विचारही करू शकत नाही.
बर, दहावी झाली, समजा पुढे आयटीआय चा कोणताही ट्रेड केला वा अगदी कॉमर्सलाही गेला, तरी तिनचार वर्षानन्तर त्या जोरावर कुठले काम मिळणार? मागिल दोन तिन वर्षात लोकान्च्या शेतावर मजुरीने कामास जाणार्‍या या विद्यार्थ्याचे भवितव्य काय? दहावीपर्यन्तच्या शिक्षणाने त्याच्या (त्याच्याच काय, कुणाच्याही) जीवनात असा कोणता बदल घडवुन आणलाय? अन नन्तरचे लौकिक सहजसाध्य शिक्षण देखिल असा काय बदल घडवुन आणणारे? की दहावी-बारावी पास बेरोजगारान्च्या सन्ख्येत अजुन एक भर? मला हे प्रश्न पडतात, उत्तरे मिळत नाहीत.
हाच नव्हे तर असेच असन्ख्य विद्यार्थी, या एसएसेस्सी/एचेस्सीच्या शब्दशः" जाळ्यात" सापडतात, दुसरा पर्यायच नसतो, अन तथाकथित सुशिक्षित बेरोजगार म्हणुन जगु लागतात, दहावी-बाराव्वी होईस्तोवर, त्यान्नि बहुधा त्यान्चे पिढीजात खानदानि व्यवसायाचे कौशल्यदेखिल गमावलेले असते. अन मग शहरात राहून "मराठी लोकान्ना कामच करायला नको, ते युपीबिहारी बघा" अस्ले अकलेचे तारे तोडायला देखिल आमच्या बा चे काय जाणार असते?
वरील धनगराच्या मुलाला त्याच्या मूलभूत व्यवसायानुरुप शिक्षण जोवर उपलब्ध होत नाही तोवर या दहाव्वीबाराव्वीच्या प्रश्नान्ना वा परीक्षापद्धती असावी की नसावि याला काहीच अर्थ नाही असे माझे मत आहे)

स्मिते,
राधाने तर यावर्षी मला निक्षून सांगितले आहे की मी science olympiad, maths olympiad, mathix, cyber olympiad असल्या कसल्याही परीक्षांना कधीच बसणार नाही...... क्लास वगैरे लावणं फार दूरची गोष्ट. शाळेतून आलेली नोटिस वाचून ती आणि तिच्या मैत्रिणींचे 'येस्स्स' बरंच काही सांगून गेले. अनेक तिच्या वयाच्या मुलींना विचारलं तर त्यांना practicals आवडतात पण परीक्षेचे पेपर लिहणे त्यांना आवडत नाही. हे कशामुळे असेल???

लिंबु, तुझे विचार या बीबी शी सुसंगत वाटतायत मला यासाठी की व्यवसायानुरुप शिक्षणामधे सुद्धा परीक्षापद्धत अवलंबता येऊ शकते. त्या त्या विषयाच्या ज्ञानाचा कस लागण्यासाठी तुम्ही प्रॅक्टीकल परीक्षा घ्या. पण परीक्षा पद्धत हवी. मुळात या सगळ्या मागे अभ्यासक्रम हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याकडे म्हणावे तसे गांभिर्याने लक्ष दिले जात नाही.

आर्क, नंबर ऐवजी ग्रेड दिल्या तरी मुलांमधे नकळत स्पर्धा सुरू होतेच..... त्याला 'ए' ग्रेड मिळाली, तुला 'सी' कशी काय मिळाली...... त्यातून ताण तणाव सुरुच राहतात. Sad

अश्विनी, तुझा मुद्दा लक्षात घेता, ६०-६० मुलांचं अशा पद्धतीने मूल्यमापन करण्यातली प्रॅक्टिकल डिफिकल्टी ही पेपर तपासून प्रत्येक मुलाचं गुणपत्रक बनवण्यात ही आहेच. शिवाय, आपल्याकडे लेखी बरोबरच प्रॅक्टिकल परीक्षा घेतल्या जातात त्याच पद्धतीने हे करता येऊ शकतं.

मंजे ,अभ्यास करायचा म्हणजे तणाव हा नक्कीच येणार.. त्यामूळे अभ्यास, परीक्षा तणाव यामधे अंतर पडणे अशक्य !

नंबर ऐवजी ग्रेड दिल्या तरी मुलांमधे नकळत स्पर्धा सुरू होतेच..... त्याला 'ए' ग्रेड मिळाली, तुला 'सी' कशी काय मिळाली...... त्यातून ताण तणाव सुरुच राहतात.
>> तेच तर ना, स्पर्धेची सवय हवीच, ती टळत नाही आयुष्यात. ताण कसा हाताळायचा हे शिकवा मुलाना.मुळात A grade मिलवणार्‍याला जो आत्मविश्वास मिळतो त्याचे काय. सी ग्रेडवाल्याला आपण ह्या ह्या विषयात कच्चे आहोत हे कळणे फार गरजेचे आहे.ताण नको ताण नको म्हणुन फार लाड तरी काय उपयोगाचे.परीक्षेसाठी मान मोडुन अभ्यास करण्यात एक गम्मत असते, असा भरपुर अभ्यास केल्यानंतर येणारी सुट्टी जास्त आनंदात जाते हे शिकवाना मुलांना.
अगदी scholarship,olympiyad,प्रज्ञा,प्रावीण्य ह्या परीक्षाही हव्यातच्.कळणार कसे ह्या विषयात तर्बेज कोण ते. देउन तर बघा, नाही जम्ले तर नाही जमले.परीक्षाच नको असे म्हणुन आपण आपल्या मुलाना पळपुटे तर नाही बनवत आहोत ना?

ताण नको ह्या न्यायाने जर माझे अप्रेझलही बंद केले तर मला कळणार कसे improvement कुठे हवी ते.
सगळ्यानाच सारखा पगारवाढ देता येत नाही तसे मार्कही देता येत नाहीत, पण म्हणुन परीक्षाच नको हे काही पटत नाही

प्रश्न केवळ परीक्षेपुरता नाहिये. प्रश्न शिक्षणपध्तीचा आहे.

परीक्षा म्हणजे तणाव येणारच. कारण परीक्षेमधुन स्पर्धा सुरू होतेच - ग्रेड असुदे नाहितर मार्क्स.
शिक्षण हे goal- oriented आहे तोपर्यत ह प्रश्न राहनारच. काय शिकतो हे महत्व्वचे नसुन परीक्षा - जी एक महिना, सहा महिने , एक वर्षाने येते ती महत्वाचि होते. भविष्य महत्वाचे होते, वर्तमान नाहि. वर्तमानाचा भविष्यात होम केला जातो. शिक्षणाची मजा जी केवळ वर्तमानात येउ शकते ती भविष्याच्या काळजीत सम्पुन जाते.

एखादि गोष्ट सहजतेने करण्यात जी मजा आहे ती मारुनमुटकुन करायला लावल्यावर कशी येइल ?

सगळ्यानाच सारखा पगारवाढ देता येत नाही तसे मार्कही देता येत नाहीत >>>> नाहि पटले. मार्क का नाहि सारखे देता येणार ?

Pages