Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 07, 2006

Hitguj » My Experience » भटकंती » माझे दुर्गभ्रमण » सिद्धगड » Archive through July 07, 2006 « Previous Next »

Gs1
Wednesday, July 05, 2006 - 11:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुसळधार पावसातला सिद्धगड ....!

Gs1
Wednesday, July 05, 2006 - 11:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ट्रेकिंगमधल्या कसलेल्या सिद्धांचा गड तो सिद्धगड असे वर्णन वाचले होते सिद्धगडाचे, त्यामुळे तिकडे जाण्याचे बरेच दिवस मनात होते. पण दोन दिवसांचा हा ट्रेक एका दिवसात वा रात्र-दिवसात कसा बसवावा असा प्रश्न होताच.

अखेर शनिवारी १ जुलैला गिरी, कूल, आरती, भक्ती, मिहिर आणि मी असे पाच जण सायंकाळी पाचच्या नागरकोईल एक्सप्रेसने पुण्याहून निघालो. कल्याणला इंद्रधनुष्य ( दत्तराज ) आणि नरेश आम्हाला भेटणार होते. आम्हाला नारिवली या गावी जायचे होते. तिथे कर्जतहून जाणे हे पुणेकरांना जवळचे आहे पण तशा सोयीस्कर बस नाहीत संध्याकाळी पाचनंतर.

तुफान पाउस पडत होता. घाटात तर खिडकीबाहेर ढगांशिवाय काहीच दिसत नव्हते. गप्पा गप्पात कल्याण आले. खचाखच भरलेल्या एस्टीत आम्ही आठ जण शिरलो, नऊला मुरबाडला पोहोचलो. आमची नारिवलीला जाणारी शेवटची एस्टी अगदी पाच मिनिटांनी चुकली. पण मोठा गट असल्याचा फायदा असा झाला की लगेच एक खाजगी जीप घेऊन पुढचा प्रवास सुरू केला. वाटेत म्हसा लागले आणि गोरखगडाच्या वेळेला मध्यरात्री म्हसापर्यंत केलेली पौर्णिमेची पायपीट आठवली.

नारिवली गावात पोहोचलो. गावच्या देवळात सत्संग चालू होता. देउळ अगदी प्रशस्त होते. सत्संग आटोपल्यावर गावच्या मुलांनी अगत्याने चौकशी केली, कळशी भरून पाणी आणून दिले. झोपायला देवळातलीच मोठी चटई वापरायची परवानगी दिली, लागल्यास समोरच्या घरातून पाणी घेता येईल असे सांगितले आणि आमची व्य्वस्था झाली आहे हे बघुनच मग ते घरी गेले. देवळात एक स्वामीजी पण होते मुक्कामाला.

रात्रीचे फारसे जेवायला आणले नव्हते. पुऱ्या, भेळेचा फराळ पार पाडला आणि सकाळी लवकर उठायचे एकमेकांना बजावत झोपी गेलो. थोडा अंधार आणि शांतता होते तोच आरतीच्या किंकाळीने सर्व जण एकदम उठून बसले. तिच्या अंगावर सापसदृश काहीतरी येऊन पडले होते. पण चौकशीअंती तो लेदरचा पट्टा निघाला. पाच वाजता उठलो, सर्व आवरून निघेपर्यंत साडेसहा होउन गेले. पाउस अजिबात नव्हता. ओढे, नदी ओलांडत तासाभरात एका मोकळ्या पठारावर आलो आणि डावीकडे मच्छिंद्रगड, गोरखगड, दमदम्या, साखरमाचीचा डोंगर आणि त्यालाच समोर काटकोनात आडवा पसरलेला सिद्धगडाचा पहाड दिसत होता. गडाचा माथा मात्र धुक्यात पूर्ण वेढला गेला होता त्यामुळे आम्हाला गड ओळखता येत नव्हता. लहानमोठे कितीतरी धबधबे या दोन्ही कड्यांवरून उड्या घेत होते आणि ओढ्यांच्या रुपाने आम्हाला आडवे येत होते.

वाट शोधत तसेच थोडे चालत राहिलो आणि आता चुकलो अशी खात्री झाली तेवढ्यात शेतात काम करणारा भरत नावाचा मुलगा भेटला. जवळच त्याचे गाव होते सिद्धगडपाडा. त्याला वाट विचारली तर त्याने वाटाड्या म्हणून मला घेउन चला असा बराच आग्रह केला, तो मोडवेना म्हणून त्याला बरोबर घेउन निघालो. काहीशा नाखुषीनेच घेतलेला हा निर्णय किती योग्य होता ते नंतर पावलापावलाला जंगलात, दरीत अदृश्य होणाऱ्या विविध वाटा बघून कळलेच. आता लगेच पुन्हा गेलो तरी वाटाड्या लागेल एवढा विस्तृत आणि घनदाट असा हा जंगली भूलभुलैय्या आहे. अजून थोड्या वाटचालीनंतर एका टेकाडावरच्या एकुलत्या झोपडीत चक्क चहा मिळायची सोय झाली त्यामुळे सकाळपासून चहाची भुणभूण करणारे चहाबाज बेहद्द खुष झाले.

ओढ्यांच्या खळ्खळाटाच्या सान्निध्यात सिद्धगडाचा कडा उजवीकडे ठेवत पुढचा प्रवास सुरू झाला. चांगलाच लांबचा व खडा चढ असलेला पल्ला असला तरी दर दहा मिनिटाला एखाद्या धबधब्यात ताजेतवाने व्हायला मिळत असल्याने मजेत चालत राहिलो आणि अखेर निघाल्यापासून चार तासांच्या मेहेनतीनंतर सकाळपासून दिसणाऱ्या या आडव्या पहाडावर एका दरवाजातून दाखल झालो. कोकणातील किल्ला असला तरी सिद्धगड मुख्य रांगेला अगदी खेटून आहे आणि चार हजार फुटांहून अधिक उंच आहे.त्यामुळे एकंदर दमछाक होतेच. इकडुनच भीमाशंकरला वा मिलींद गुणाजीने नावाजलेल्या घाटवरच्या नितांतसुंदर आहुपे गावाला अवघड घाट चढुन जाता येते.

एवढ्या उंचावरच्या पठारावर दहा पंधरा उंबऱ्यांचे सिद्धगड गाव वसले आहे, जंगल तर आहेच पण भरपूर शेतीही आहे आणि मुबलक पाणी असल्याचा फायदा घेत गाव समृद्ध झाले आहे. थोडे चालून डाव्या बाजूला बघतो तर अजून हजार फूट उंच असा एक कडा उभा ठाकला होता. त्याच्या साधारण मधोमध एक गुहा दिसत होती. सर्वांना फारच भूक लागली होती, पण तरी तिथे पोहोचूनच न्याहारी करावी असे एकमताने ठरले.

उभ्या चढणीच्या वाटेने गुहेत पोहोचलो. अक्षरशः स्वर्गात पोहोचल्यासारखे वाटत होते. खाली नजर जाईल तिथे धुके, ढग, हिरवागार आसमंत, त्यात लपलेली साखरमाची आणि सिद्धगड ही दोन पिटुकली गावे, एवढ्या उंचीवरून अगदी खुजे वाटणारे गोरख-मच्छिंद्रचे सुळके आणि इतर शिखरे. डोळे भरून कितीही वेळ पाहिले तरी हलावेसे वाटणार नाही असा हा देखावा पाहण्यासाठी केलेली पायपीट ही अगदी किरकोळ वाटावी एवढे समाधान मिळाले. मुख्य गुहेचे दार बंद करून तिथे रहाणारे साधूबाबा खालच्या गावात गेले होते. आम्ही अरुंद ओसरीत दाटीवाटीने बसलो. प्रचंड मुसळधार पाऊस सुरू झाला. तशातच बरोबर आणलेल्या घन इंधनाच्या स्टोव्हवर गरमागरम कांदेपोहे केले आणि भुकेले जीव त्यावर तुटुन पडले.

पाउस थांबण्याची वा कमी होण्याची लक्षणे दिसेनात, मग तसेच भिजत मी, कूल आणि मिहिर अजून वर निघालो. वाटाड्याने आमचे मन वळवण्याचा बराच प्रयत्न केला, बरीच भीती दाखवली. रस्ता खरच बिकट होता, सुरूवातीला एका धबधब्यातून वर गेलो मग कड्यात कोरलेल्या पायऱ्या तर तरी कधी अरूंद खोबणी, तरी सुदैवाने एवढे धुके होते की मागचे भयंकर एक्सपोजर आम्हाला दिसतच नव्हते. नाहीतर अवघड वाटेपेक्षा ते बघुनच खर तर हात पाय लटपटतात वा डोळे फिरतात. असे बराच वेळ चढलो तरी माथा काही येईना, मग शेवटी तिथुनच सलाम करून परत फिरलो, पण जेवढे गेलो तेवढे सर्वच चित्तथरारक होते. काळजीपुर्वक उतरलो आणि गुहेपासून बाकी सगळ्यांना घेऊन पावसात भिजतच खाली सिद्धगडाच्या पठारावर उतरलो. गडाच्या दरवाजाजवळच एक मंदिर आहे, तिकडे पुन्हा एकदा आमची चूल मांडली, बाजूला धो धो पाउस, चिंब भिजलेलो आम्ही आणि मग थोड्याच वेळात रटारटा उकळणाऱ्या तांबड्या रश्श्याचा वास आसमंतात पसरला. त्यावर मनसोक्त आडवा हात मारून मंडळी तृप्त झाली. या वेळेपासून ट्रेकदरम्यान सच्च्या डोंगरयात्रीप्रमाणे आपला स्वयंपाक आपणच करायचा असे ठरवले होते तो सगळाच बेत अगदी झकास पार पडला.

मग पुन्हा एकदा रमतगमत परतीची पायपीट चालू केली. गेले चार पाच तास चालू असलेल्या मुसळधार पावसाने सगळे चित्र अजूनच पालटले होते. कड्यावरून मधुर खळखळाट करत उड्या घेणारे ओढे आता घनगंभीर आवाज करत एका लयीत कोसळत होते. सकाळची नदी आता कदाचित पार करता येणार नाही, फार पाणी असेल तर तसा प्रयत्नही करू नका, पाणी ओसरेपर्यंत, सकाळपर्यंत थांबावेही लागेल असा इशाराही वाटाड्याने दिल्यावर तर मीही गंभीऱ झालो. एव्हाना संध्याकाळ झाली होती, वाटाड्याचा सिद्धगड्पाड्याला निरोप घेतला आणि शेवटचा टप्पा भराभर चालू लागलो. एकमेकांना धरून नदी ओलांड्ली, सकाळच्या दोन ओढ्यांच्याही नद्या झाल्या होत्या, त्या ओलांडल्या आणि अखेर अंधुक प्रकाशात नारिवलीला पोहोचलो.

देवळात कपडे बदलले. कर्जतला जाणारी शेवट्ची बस तर केंव्हाच गेली होती, आता मुरबाडला जायला साडेआठला बस. पण तसे मुरबाड-कल्याण-पूणे जाणे म्हणजे जवळजवळ सकाळीच पोहोचलो असतो पुण्याला. शेवटी एक खाजगी जीप कर्जतपर्यंत यायला मिळवली. इंद्र आणि नरेशचा निरोप घेतला आणि कर्जतला गेलो, तिथुन पुढे चेन्नई एक्स्प्रेसने लोणावळा आणि मग रात्री अकरा वीसच्या लोकलने पुणे हा सगळा प्रवास अर्धजागृतावस्थेत केला. सगळे इतके दमले होते पण पुन्हा एकदा एक सर्वांगसुंदर आणि पुरेपुर पावसाळी ट्रेक केल्याचे समाधान मनात होते.

आता एक पोर्टेबल गॅस स्टोव्ह घ्यायचा असे ठरते आहे. दिनेश वाचतो आहेस ना ?


Giriraj
Wednesday, July 05, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही तळ(तळाट) टिपा :

१)आरतिच्या अंगावर पडलेला साप वर लेख लिहिणार्‍या लेखकाच्या बुद्धीचा प्रताप होता

२)एकमताने याचा अर्थ सगळ्यांनी मिळून असे नसून वर लेख लिहिणार्‍या लेखकाच्या एकट्याच्या मताने असा होतो

३)घन इंधनाचा स्टोव्ह मी आणि GS ने महत्पराक्रमाने तुळशीबाग नामक बायकांच्या बालेकिल्ल्यात जाऊन आणला होता.तसे करतांना पदोपदी बायकांचे धक्के लागून आमचा तेजोभंग होण्याचे अनेक प्रसंग उद्भवले.परंतु त्या मारुतिरायानेच आम्हाला सुखरुप परत आणले.

:-)


Girivihar
Wednesday, July 05, 2006 - 1:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जेईस सुरेख वर्णन, वाचुन परत जावेसे वाट्तेय.

Robeenhood
Wednesday, July 05, 2006 - 3:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घन इन्धनाचा स्टोव्ह? हा काय लफडा आहे?

Dineshvs
Wednesday, July 05, 2006 - 5:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोर्टेबल गॅस स्टोव्ह तसा अवजड असतो, त्याचा ऊपयोग होत नाही. कोरडे कोळसे वा निर्धुर कोळसे चांगले. ते वजनाने हलके असतात. ते पेटेस्तोवर त्यावर जमा केलेले सरपण शेकवुन ते वापरता येते. जेवण करण्यापेक्षा भरपुर सुका मेवा, चीज, ग्लुकोज, बेसन लाडु जवळ ठेवावे. ब्रॅंडीची बाटलीहि जवळ असावी.
जेवणाचे प्रकार घरी अर्धवट करुन नेले तर चांगले. जसे कोरडी परतलेली खिचडी, उपमा, पोहे वा बेसनभात.
ऊंचीवर विस्तव लवकर पेटत नाही आणि पाणीहि लवकर ऊकळत नाही.
लग्नाच्या जेवणात जे स्टोव्ह वापरतात, त्यावर जेवण नुसते गरम होते, शिजत नाही.
आणि या सगळ्या सुचना, मी घरी बसुन करत आहे.
मनात माझ्याहि पुढच्या सहलीचे मनसुबे आहेत


Dineshvs
Wednesday, July 05, 2006 - 5:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाच ना तो ?
si

Kedarrp
Thursday, July 06, 2006 - 1:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे जीएस भाऊ, मागील वेळी आपण गोरखगडावर गेलो असताना सिध्दगडावर जायचे योजिले होते. आत्ताचे वर्णन वाचून त्याची आठवण झाली.

करा लेको, मजा करा... दर वीकेंडला ट्रेक करा. वृत्तांत लिहा...

Limbutimbu
Thursday, July 06, 2006 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिर्‍या.... एकमत.....
जीएस, झकासच! :-)


Ajjuka
Thursday, July 06, 2006 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mast... mala pan ghya na tumachyat...

Limbutimbu
Thursday, July 06, 2006 - 5:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> mala pan ghya na tumachyat...
मला पण घ्याना काय मलापण घ्याना? तो जीएस एक पोर्टेबल स्टोव्ह घेणारे, तर तस दिनेशला सान्गतो हे! दिनेश कसला भारी? त्याला ठाव हे, हा पोर्टेबल स्टोव्ह घेइल अन दिनेशला बरोबर ये म्हणेल... त्याच्या हातच्या रेसिपी ट्रेक मधे हाणायला... त्याला ठाव हे ना त्याला कामाला लावेल तो, तर तो म्हणतो की तुम्ही कोळसे न्या! आत्ता बोला! तर तुला न्या काय? कोळसे फुन्कुन फुन्कुन पेटवावे लागतील, आहे तुझी तयारी? दिनेशच्या रेसिपी प्रमाणे वेगवेगळ्या रन्गान्चे रस्से करावे लागतील, आहे तुझी तयारी? अन झालच तर "एकमताचे" निर्णय मान्य करावे लागतील, जराही खळखळ न करता, आहे तुझी तयारी?
जर असेल, तर जा बापडी, मला काय? (मी आपल काडी टाकायचा चान्गल ते सान्गायचा प्रयत्न केला)
DDD

Gs1
Thursday, July 06, 2006 - 7:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


काहीही लिहितोस काय रे गिर्‍या ? तुम्ही वरकरणी भूक लागली असे सारखे म्हणत होता तरी तुमच्या मनात वर जाऊन मगच खावे असे आहे हे ओळखून मी तसे बोलून दाखवले इतकेच.

बापरे काय प्रकार आहे हा तुळशीबाग म्हणजे. त्या अनुभवावरच एक लेख लिहावा लागेल. भर गर्दीत मुंबईच्या लोकलमध्ये पुरुषाम्च्या डब्यात शिरलेल्या बाईसारखे कसेबसे अब्रू वाचवून बाहेर पडलो हे नशीबच.

नरेश, मायबोलीवर स्वागत आहे. तुम्ही सुखरूप पोहोचलात हे या पोस्टमुळेच समजले... :-)

अज्जुका, अवश्य ये की. ( तुला कधीपासून विचारायची वगैरे गरज भासू लागली ?) तसही ' आमच्यात ' असा काही प्रकार नाही आमच्यात :-) whole vAvar is our. फार आधीपासून सांगायचीही गरज नाही. ज्याला कोणाला एखाद्या शनिवार - रविवारी सहभागी व्हायचे असेल त्याने फक्त शुक्रवार सकाळपर्यंत सांगायचे की ' मी आहे यावेळेला ' . शुक्रवार दुपारपर्यंत बेत ठरतो आणि जे येणार असतील त्या सगळ्यांना आणि गिर्‍यासारख्या ज्यांना दर वेळेला आग्रह लागतो अशा मानाच्या गणपतींना कळवला जातो. एखाद्या वेळी दोन दिवसांचा असेल तर गुरूवारी ठरतो.

केदार, कधी परतणार रे तू ?

दिनेश, हाच तो. ते अर्ध्या उंचीवर जे पठार दिसते तिथे तिथे सिद्धगड गाव आहे.

लिंबू राजगडावर येणार का ?





Gs1
Thursday, July 06, 2006 - 7:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घन इंधनाचा स्टोव्ह म्हणजे फक्त भांडे ठेवता येईल असा छोटा फोल्डिंग स्टँड आणि खाली त्याला इंधनाच्या वड्या ठेवायला जागा असा प्रकार असतो. हा स्टँड फोल्ड केल्यावर कंपासपेटीएवढा होतो. कॅरमच्या सोंगटीपेक्षा थोडी लहान पण जास्त जाड अशी एक वडी असते जी दहा मिनिटे पुरते. त्यावर कितपत गरम होईल अशी शंका होती म्हणून मी आधी घरी एका वडीवर कितपत पाणी तापते ते बघून त्याप्रमाणे योजना केली होती. एका पंचवीस रुपयाच्या पाकिटात चार वड्या असतात. काडी लावल्यावर वडी लगेच पेट घेते.

साधारण सोळा प्लेट पोह्यांना पाच वड्या लागल्या तर अडीच तीन लिटर रस्सा उकळायला दहा वड्या लागल्या. (मसाला आरतीने अगोदरच भाजून आणला होता). एका वेळेला दोन- तीन वड्या ठेवल्यास पुरेशी उष्णता निर्माण होते.



Dhumketu
Thursday, July 06, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पोर्टेबल स्टोव्ह मिळाल तर सांगा मलाही घ्यायचा आहे.. माझ्याकडे तो घन ईंधनाचा स्टोव्ह आहे.. पण दिनेशनी म्हटल्याप्रमाणे त्याचा जास्त उपयोग होत नाही...

Indradhanushya
Thursday, July 06, 2006 - 9:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्हाला ८.३०ची मुरबाड ST मिळाली, १०.१५ला कल्याणला पोहचलो. :-)

GS च्या हातचा झणझणित रस्सा कायम लक्षात राहिल... अगदि लाजवाब

गिरिच्या तळतळीत टिपांना माझही अनुमोदन आहे... बिच्चारी आरती :-)

वृतांत झकास... फ़ोटो कुठे आहेत?




Itsme
Thursday, July 06, 2006 - 9:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


गिरी तळ (तळाट) टिपे द्वारे तु आपल्या वर वेळोवेळी होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडलीस हे एकुणच बरे केलेस.

पण ते तुळशीबागेचे काही पटले नाही, एरवी ' औरत जात ' प्रकारात मोडणारी सगळी कामे माझ्या कडुन करुन घेणारे तुम्ही असे अचानक जातीने खरेदीला जाण्याचे काही अडले होते का ? गिरी तर गिरी, जीएस तू सुद्धा !!

आसो, पुढच्या रविवरी सौ जीएस ना ' उपाशी पोटी ' सुमारे साडे चार हजार फुटा वर ट्रेक ला नेण्याचा प्लॅन आहे, तमाम अन्यायग्रस्त जनतेस हार्दिक आमंत्रण.

[ बाकी जीएस कसाही असो, गरमा गरम पोहे आणि उकळता रस्सा स्वत : जातीने करून सगळ्या कावळ्याना ( पोटातल्या), आणि कूल च्या पोटातल्या हत्तींना, शांत नक्कीच केले त्याने. ]

शेवेच्या तांबड्या रश्याचा बेत यशस्वी झाला तो केवळ आमचे चहा पिणे होई पर्यंत जीएस ने कोंबड्यांशी केलेल्या वाटाघाटी फिसकटल्यामुळे, नाहीतर तांबड्याचा सामिष पांढरा नक्कीच झाला असता.


Dineshvs
Thursday, July 06, 2006 - 4:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरती कित्ती गं भोळी तु ? कुठल्या ट्रेकला तुला नेतात आणि कुठल्या ट्रेकला नाहि, हे कसे लक्षात येत नाही तुझ्या ?

Naatyaa
Friday, July 07, 2006 - 4:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वर्णन नेहेमीप्रमाणेच उत्तम. मजा करताय.. हा उपक्रम असाच चालु ठेवा.. फोटो सुद्धा टाकत चला...

घन इंधनाचा स्टोव हे प्रकरण interesting वाटत आहे.



Bee
Friday, July 07, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रतिकियांसहीत हा लेख आवडला. गडप्रेमींनो जरा छायाचित्रपण टाकत चला रे.. त्याशिवाय लेख पूर्ण झाला असे वाटत नाही.

Limbutimbu
Friday, July 07, 2006 - 6:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जीएस, अरे मार्च मधे गेलेलो, गेलेलो म्हन्जे काय की जोडीदारानी चौदा सीटरच्या बस मधे एक सीट रिकाम तर मला ओढुन नेलेला, तर तेव्हा माझी जी काही फे फे उडाली ती बघता त्या "राजगडाच्या" वाटेला जाण्याच डेरिन्ग माझ्यात नाही रे भो! :-)
हां हव तर तू या बीला घेवुन जा, तो तुम्हाला गडावर पद्मावतीच्या मन्दिरात मी सान्गितल्याप्रमाण घडीच्या पोळ्या करुन खावु घालू शकेल, हो ना रे बी? करशील ना तू येवढ?
DDd

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators