Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 14, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » रंग दे बसंतीच्या निमित्ताने » Archive through February 14, 2006 « Previous Next »

Dineshvs
Saturday, February 11, 2006 - 3:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रंग दे बसंतीवर चर्चा घडावी असे मला मनापासुन वाटते. ईथे या सिनेमाची कथा थोडक्यात मी देतोय, पण त्यापुर्वी एक किस्सा सांगतो.

आपल्या GS1 चा छोकरा आमच्या बरोबर कधीकधी असतो. माझ्या पावपट त्याचे वय आहे तरिही, आम्ही दोघे क्षुल्लक गोष्टीवरुन भांडतो. आमच्या भांडणाचा विषय एखादा दगड देखील असु शकतो. आमच्या दोघांपैकी लहान कोण हे न कळल्याने, GS1 आमच्या भांडणात कधीच पडत नाही. त्याला मी एकदा प्रश्ण विचारला होता.

प्रश्ण असा होता कि, उत्तर काय आहे ?
त्याला अर्थातच याचे उत्तर आले नाही. उत्तर हि दिशा आहे, असे उत्तर मला अपेक्षित होते. आज या चर्चेनंतर तुम्हालाहि हाच प्रश्ण विचारणार आहे मी.

तर या सिनेमाची कथा अशी. ( ज्यानी बघितला आहे त्याने हे वाचले नाही तरी चालेल )

भगतसिंगच्या वेळी जेलर असणार्‍या एका अधिकार्‍याची डायरी, त्याच्या नातीच्या हाती लागते. त्या काळात त्यानी जी निरिक्षणे नोंदवलेली असतात, त्याने ती मुलगी फ़ार प्रभावित होते, व ती या घटनांवर एक डॉक्युमेंटरी करायची ठरवते. ती त्यासाठी हिंदी शिकतेच आणि शिवाय भारतातील एका मुलीशी मैत्री हि जोडते.
ब्रिटनमधे ती या डॉक्युमेंटरीसाठी फ़ायनान्स मिळवायचा प्रयत्न करते. पण त्या लोकाना या विषयाचे महत्व पटत नाही, त्याने निराश होवुन त्या मंडळीना एक सणसणीत पंजाबी शिवी देऊन ती बाहेर पडते. तरिही स्वताच्या हिमतीवर ती डॉक्युमेंटरी करायची ठरवते. त्यासाठी दिल्लीला येते. तिच्या मैत्रीणीने ईथे थोडीफ़ार तयारी करुन ठेवली असते.
या फ़िल्ममधल्या भुमिका साकार करण्यासाठी तिला कलाकार हवे असतात. ती कॉलेजमधल्या काहि मुलामुलींची स्क्रीन टेस्ट घेते, पण त्यांच्यापैकी कुणीही तिला पसंत पडत नाही. तिच्या मैत्रीणीचे काहि मित्र असतात, त्यांच्याशी ती तिची ओळख करुन देते. त्यांची दंगामस्ती चालु असताना, एक भगवे ऊपरणे घेतलेला कार्यकर्ता येऊन दमदाटी करतो. व थोडीशी वादावादी होते.
या ग्रुपमधे एक शीख मुलगा, एक मुसलमान, एक हिंदु व्यापार्‍याचा मुलगा, एक टपोरी वाटेल असा मुलगा असे असतात. तेहि त्या ब्रिटिश मुलीचा प्लॅन हसण्यावारी नेतात. पण मग हळु हळु तिचा प्रामाणिकपणा त्याना जाणवायला लागतो. ते सगळेजण तिच्यासाठी फ़िल्ममधे काम करायला तयार होतात. एका मुस्लीम कवीच्या भुमिकेसाठी तो हिंदु कार्यकर्ता पण तयार होतो. तिचे चित्रीकरण व्यवस्थित पार करते. या सगळ्या चित्रीकरणात ते व त्यांचे कुटुंबीयहि नकळत गुंतले जातात.

ब्रिटिश मुलीच्या भारतीय मैत्रीणीचे एका मिग पायलटवर प्रेम असते. त्यांचा साखरपुडाहि या सगळ्यांच्या साक्षीने होतो. त्याचे वडीलहि सैनिक असतात त्यामुळे त्याची आई खंबीर असते.

दुर्दैवाने त्याच्या विमानाला अपघात होतो, आणि त्याचा मृत्यु होतो. तो अपघात घडताना त्याला पॅराशुटच्या मदतीने स्वताचा जीव वाचवणे शक्य असते, पण तसे केल्यास विमान एका भरवस्तीच्या जागी कोसळले असते, त्यामुळे तसे न होवु देता तो विमान एका निर्जन जागी नेतो व त्यात त्याचा जीव जातो.

या बातमीने अर्थातच सगळे हादरतात. पण संरक्षण मंत्री तो वैमानिक निष्काळजी होता, म्हणुन हा अपघात घडला, असे विधान करतात. त्यावरहि टिव्हीवर चर्चा होते. त्याचे प्रशिक्षक या आरोपाचा ईन्कार करतात.

त्या मुलाची आई एक मुक मोर्चा काढुन सत्याग्रहाला बसते, तिला लोकांचीहि साथ मिळते. पण या सत्याग्रहावर अमानुष लाठीहल्ला होतो, त्यात त्याची आई व ईतरहि अनेकजण जखमी होतात. हा लाठीहल्ला घडवुन आणण्यात सत्ताधारी पक्षाचाच हात असतो, आणि त्यामुळे त्या पक्षाचा कार्यकर्ता ऊद्विग्न होतो.

संरक्षण मंत्र्यांच्या बेजबाबदार वर्तणुकीची सगळ्यानाच चीड येते. आणि त्यांच्या मते या मंत्र्याला ठार मारावे असे ठरते. सत्य कळुन आल्यामुळे पक्ष कार्यकर्ता देखील त्यांच्या योजनेत सामिल होतो. सकाळी प्रभातफ़ेरीसाठी निघालेल्या मंत्र्यावर गोळी घालुन त्याची हत्या केली जाते.

यामुळे काहि ऊलटाच प्रकार घडतो. त्याच्या मृत्युच्या मागे परकिय हात असल्याचा प्रचार सरकारतर्फे केला जातो. त्याचा मृत्यु बलिदान ठरवला जातो. त्याला मरणोत्तर भारतरत्न देण्याची चर्चा होते.

या सगळ्या घटनांमुळे हे तरुण आणखीनच चवताळतात. तसेच निराशहि होतात. त्यांच्यात वादावादी होते. त्यांच्यातलाच एक असलेल्या मुलाच्या वडीलानीच मिग चे बनावट सुटे भाग, पुरवल्याचे त्याना कळते.
ते स्वताला पोलिसांच्या स्वाधीन करायचे ठरवतात, पण तसे केले असते तरी सत्य लोकांपर्यंत कधी पोहोचलेच नसते, म्हणुन भल्या पहाटे ते एक रेडिओ स्टेशन ताब्यात घेतात, तिथे खुलेपणाने आपला गुन्हा कबुल करतात, शिवाय लोकानी विचारलेल्या प्रश्णाना योग्य ती उत्तरेहि देतात.

त्यामुळे अर्थातच जनता खवळुन ऊठते, पण त्या सगळ्यांवर कमांडो कार्यवाही करुन सगळ्याना मारुन टाकतात. त्याना तश्याच ऑर्डर्स मिळालेल्या असतात.

जरी कथा माहित झाली, तरिही हा सिनेमा बघायला हवा, कारण त्याचे सादरीकरण छानच आहे.

( आणखी चर्चा कर्ण्यापुर्वी, लता बद्दल चार ओळी. लता आशाशी आमच्या पिढीचे भावनिक नाते होते, आणि कायम राहिल. त्या सुरानी आम्हाला जोजवले, हसवले आणि रडवले देखील. आमच्या आयुष्यातल्या अनेक आठवणीना त्यांच्या सुरांचे कोंदण आहे. आता लता वृद्ध झालीय, फ़ारशी गातहि नाही.
आपली आई, मावशी म्हातारी झाली म्हणजे आपण तिला टाकुन देतो का ? तिने खास आपल्यासाठी थरथरत्या हाताने कधी खीर केली तर ती वाटी भिरकावुन देतो का ? आपण तिला जरुर सांगु कि आता तु थकलीस, नको त्रास घेऊस, पण ती खीर तर नक्कीच खाऊ ना. या सिनेमात लताने केवळ चार पाच ओळी गायल्या आहेत. तेसुद्धा वहिदा रेहमानसाठी. आवाज पुर्वीसारखा नसला तरी अगदी वाईटहि नाही. असो मी जरा वाहवलो, पण हा आजचा विषय नाही. )

तर मी या सिनेमाच्या सादरीकरणाबद्दल लिहित होतो. ईथे ईतिहास आणि वर्तमान समांतरपणे जाताना दाखवले आहे. त्याची लावलेली संगती ओढुन ताणुन लावल्यासारखी मला तरी वाटली नाही.
आक्षेपाचे बरेचसे मुद्दे, कथेच्या ओघात गळतात. ऊदा आमिर कॉलेजकुमार वाटत नाही, याचे उत्तर एका संवादात असे मिळते कि, तो पदवीधर होवुन पाच वर्षे झालीत, आणि बाहेरच्या जगात स्वताची ओळख निर्माण करु शकलेला नाही.
त्या मुलीचे सगळ्यांच्या गळ्यात हात टाकणे कुणाला विचित्र वाटु शकेल, पण तिच्या चेहर्‍यावरचा निरागस भाव आणि पुढे एका प्रसंगात आमिरने तिला अपनी बच्ची म्हणणे, सगळ्या शंकांचे निरसन करते.
लाठीमाराच्या प्रसंगात सगळेच मार खाताना दाखवलेत, त्यात कुठेहि हिरोगिरी वाल्या फ़ाईट्स नाहीत. फ़क्त तो पक्ष कार्यकर्ता त्वेषाने हल्ला परतवतो.
असो आजचा विषय हासुद्धा नाही.
आज चर्चा करायची आहे ती या सिनेमाने पुढे आणलेल्या प्रश्णांवर.

आज आपल्या देशात भ्रष्टाचाराचा अतिरेक झालाय, आपल्यापैकी सगळ्यानीच याचा त्रास भोगलाय. पण तरिही आपण त्या विरुद्ध कधीही आवाज ऊठवत नाही.

जयललिता, लालु प्रसाद यानी भ्रष्टाचार केला नाही असे कुणीतरी म्हणु शकेल का ? पण आपल्या न्यायव्यवस्थेला तसे वाटत नाही. जर तपास यंत्रणा त्यांच्या विरुद्ध पुरावे सादर करु शकत नसेल, तर त्याबद्दल मार्गदर्शन करायला कुणीच का पुढे येत नाही. पण गुन्हेगारांची वकिलपत्रे घेण्यासाठी मात्र अनेक नामवंत वकिल सहज ऊपलब्ध असतात.

ईतकेच कश्याला, बोफ़ोर्स प्रकरणात लाच दिली गेली नाही, हे पटतय तुम्हाला ? मग क्वात्रोचीला पाठीशी घालण्याचे प्रयत्न कसे व का केले जातात ?

या सिनेमात एक सवाल आहे, आपल्या गुन्ह्यांसाठी शिक्षा भोगत असलेल्या, एकातरी राजकिय नेत्याचे नाव संगता येईल ? नुसते चौकशीचे फ़ार्स करत रहायचे.

मुंबईत बॉंब स्फोट होवुन किती वर्षे झाली, कसले गुर्‍हाळ चालु आहे त्या बाबतीत ?

हर्षद मेहताचे काय झाले, प्रत्येक वेळी जेंव्हा शेअर प्राईज ईंडेक्स वाढतो, तेंव्हा एखादा नविन घोटाळा बाहेर येतो, आता कुठला येतोय ते बघायचे ! कारण सध्याहि तो वाढतोय.
मग राजकीय नेत्यांची क्लीन चिट ( कायपण शब्द आहे हा ) देण्याचे हास्यास्पद प्रकार का सुरु असतात ?

या सिनेमात मांडलेला एक मुद्दाहि मला लक्षणीय वाटतो, कि नेते आकाशातुन टपकत नाहीत, ते आपणच निवडुन देतो, मग आपली जबाबदारी काहिच नाही का ? व्यवस्थेच्या बाहेर राहुन या व्यवस्थेवर टिका करणे सोपे आहे पण या व्यवस्थेत घुसुन ती सुधारणे जरा कठीण आहे.

ईतर देशात स्थलांतरीत होणे हाहि ऊपाय नाही, कारण कुठलाच देश पर्फ़ेक्ट नाही. ( याच सिनेमातले वाक्य ) मग आपलाच देश का सुधारु नये ?

ईथले ईव्हेंट्स मला अतार्किक वाटले नाही. राजकिय नेत्यांच्या प्रत्यक्ष खुन्याला शक्य तितक्या लवकर, चौकशीपुर्वीच ठार मारले जाते. ( केनेडी, ईंदिरा गांधी, राजीव गांधी सगळ्यांच्या बाबतीत हेच झाले. ) या चौकशीतुन काहि वेगळीच माहिती समोर यायची शक्यता असते ना. या सिनेमातहि तसेच दाखवले आहे.

आणि सगळ्यांचा आक्षेप मला दिसतोय तो ईथे त्या तरुणानी अनुसरलेल्या मार्गाला. सिनेमात तो मार्ग योग्य आहे असे कुठेहि सांगितलेले नाही. शेवटच्या प्रश्णोत्तरात याची त्रोटक चर्चा आहेच. त्याना कुणाचेहि मार्गदर्शन नव्हते, कदाचित त्यांच्या अपरिपक्व मनोवस्थेने ने निर्णय घेतले असतील. त्यांच्या आईवडीलानी देखील काहितरी वेगळे सुचवले असते.
पण त्यांच्या मनातील चीड तर पटते ना ? आणि प्रश्ण आहे हे तर पटते ना ?

मग माझा प्रश्ण परत विचारतो, कि उत्तर काय आहे ? उत्तर हि दिशा आहे का ? फ़क्त हिच दिशा आहे का ?



Manya
Sunday, February 12, 2006 - 8:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश
हा चित्रपट मी पाहिला, तुम्ही इथे कथा नेहमीप्रमाणेच फ़ार छान लिहिली आहे, तरी चित्रपट खरच सुरेख आहे आणि एकदा तरी नाक्कि बघा. remix च्या जमन्यात, इतिहास आत्ताच्या गोष्टीशी संदर्भ देउन वेगळ्या प्रकारे मांडला तर त्या स्वातत्र्य विरांच्या बलिदानाचे महत्व नव्या पिढीला कळेल, मला चित्रपटाची मांडणी खुप आवडली.
दिनेश तुम्ही मांडलेल तुमच मत, चर्चा, प्रश्न हे माझ्या मनातहि आले.
देशात जे घडत आहे त्यावर काही उपाय आहे का?
आपण काय करु शकतो?
चित्रपटात दाखवलेला मार्ग योग्य आहे का?

शेवटच्या प्रश्नाच उत्तर मी तरी " नाही " असच देईन, पण जे घडत ते बदलण्यासाठी उपाय आहेत आणि आपण नक्कीच काहि करु शकतो. चित्रपटात सिद्धार्थ म्हणतो तस system मधे समाविष्ट होउन आपल्याला जमेल तेवढा बदल घडवता येइल, हि शिकवण पालकानी शिक्षकांनी मुलांना द्यायला हवी.

करता येण्यासारख्या बर्‍याच गोष्टी इथे सुचवता येतिल, पण सत्य हे हि आहे की मी स्वत्: तरी त्यातल काय करु शकेन?
पण एक गोष्ट तरी ठरवली आहे की ह्यापुढे प्रत्येक election ला मत द्यायच, आपल्या निवडीच सरकार असो नसो, हे एक काम तरी करायच, मतदान न करता सरकारला शिव्या घालयच हक्क मला नाही


Dineshvs
Sunday, February 12, 2006 - 12:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मन्या, एक मजा आहे म्हणजे जेंव्हा आमदार आणि खासदारांचे भत्ते वाढवायचे विधेयक सादर केले जाते तेंव्हा ते कुठल्याहि चर्चेशिवाय बिनबोभाट पास होते, ( जश्या काहि यांच्या चुली, या भत्त्यावरच पेटतात. ) पण ऊमेदवाराला परत बोलवायच्या हक्काची चर्चाहि होवु शकत नाही.
निवडणुकावर केला जाणारा खर्च हा खरेच त्या मर्यादेत असतो, हे कुणालातरी पटतेय का ? हा खर्च एक गुंतवणुक म्हणुनच केला जातो. पुढच्या पाच वर्षात सात पिढ्यांची बेगमी करुन ठेवता येते. ( एखादा नगरसेवकहि हे करतो )
आपण निवडुन दिलेल्या ऊमेदवाराला परत बोलवायचा हक्क मिळाला तरच त्यावर वचक राहिल. सरकारी नोकरीसारखेच पद आहे हे. जाब विचारणारे कोणी नाही.


Bee
Sunday, February 12, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, चित्रपटाची कथा छान लिहिली आहे. उत्तर दिशा आहे हे मान्य आहे पण ह्या दिशेकडे झेपवणार्‍या पावलांना अजून प्रेरणा मिळाली नाही. रंग दे बसंती मध्ये मित्राचा विमान अपघात होतो, तो त्यात जातो, आपल्या मैत्रीच्या खातिर त्याची मित्रमंडळी पेटून उठतात, त्यात मत्र्यांचा खून होतो, आकाशवाणीवर कबूली दिली जाते. पण हा संपूर्ण प्रसंग त्या त्या व्यक्तींशी घडलेला आहे. इतर कुणी ह्या अन्यायाला तोंड देण्यासाठी समोर येत नाही. भारतात सर्वसाधारण परिस्थिती अशीच आहे. मागे धूप नावाचा एक सुंदर चित्रपट आला होता त्या कथेत बाप आपल्या मुलाच्या मरणानंतर त्याला न्याय मिळवून देतो. ही ज्याची त्याची लढाई दाखवली आहे. त्यात तिर्‍हाईत मनुष्य सामिल होत नाही. अजय देवगनचा आणि विवेकचा मागे तो कुठला बरे चित्रपट youth की काय त्यात अजय देवगन तरूणांना एकत्रीत करून चळवळ करतो पण त्या चित्रपटाचा आशय इतका बोलला किंवा हृदयाला भिडणारा नव्हता. मला हेच म्हणायचे आहे की जोवर एखादी गोष्ट आपल्या नाकातोंडाशी येत नाही तोवर मनुष्य गुपचुप बसतो, दुरून पाहतो, सहानुभुती बाळगतो. स्वतःवरती बितते तेंव्हा त्यावेळी तो झगडतोही. इतपर्यंत जरी कुणाला करता आले तरी पुरे आहे.

Charu_ag
Sunday, February 12, 2006 - 6:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, एका छान विःहयाला सुरुवात केलीत. या विषयवर लिहावे असे वाटत होते, पण सुरुवात कुठुन करावी हेच कळत नव्हते.

विषय खुप मोठा आहे, आणि सगळ्यानाच विचार करायला लावणारा आहे.

आम्ही चर्चा करताना अनेक प्रश्ण उपस्थित करतो.

१) काय बदल व्हाअला हवेत?
२) का व्हायला हवेत? ...... हे महत्वाचे
३) हे बदल कुणी करायचे आहेत?

या प्रश्नाचे उत्तरे देण्या आधी मुळ समस्या थोडक्यात पाहुयात.

१) आर्थिक विषमता
२) शेतकर्‍याची स्थिती.
३) बेरोजगारी
४) use of manpower , परराज्यातील युवकांचे इतर प्रगत राज्यात स्थलांतर
५) शैक्षणीक दुरावस्था.






Charu_ag
Sunday, February 12, 2006 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१) आर्थिक विषमता:-

आज आय टी क्षेत्रात भारत अग्रेसर आहे. अनेक नवीन संधी उपलब्ध झाल्या अहेत. शहरी भागाचा विचार केला त्यातुनही दक्षिन भारताचा विचार केला तर आपन प्रगती करतोय असेच एकुन चित्र आहे. पण ग्रमीण भागात, उत्तर, इशान्येकडील राज्यात या प्रगतीचा, आर्थिक सुबत्तेचा फायद कुणालाच होत नसल्याचे दिसुन येईल. आय टी तील प्रगती हे केवळ आभास वाटतो. त्याचा आणि भारताची एकुनच आर्थिक सुधारणेचा काहीही संबध दिसुन येत नाही. या क्षेत्रामुळे मिळनारे फायदे केवल त्या क्षेत्रापुरतेच मर्यादीत राहतात. कारण?


२) शेतकर्‍यांची स्थिती

शेतकरी कर्जबाजारी पणामुळे आत्म्हत्या करतात, हा विषय आता नविन राहिलेला नाही, ही अत्यंत खेदाची बाब म्हणता येईल. शेतीचा विचार केला तर आज महाराष्ट्रातील शेतीची काय स्थिती आहे ते आपण सर्व जाणतोच. बेभरवश्याचा पाऊस, शेतीमालास योग्य भाव न मिळणे, व्यापारी आणि दलाल यात अडकलेला छोटा शेतकरी, आणि यामुळे आलेली उदासिनता. कारणे?



Charu_ag
Sunday, February 12, 2006 - 6:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३) बेरोजगारी


बेरोजगारी, मग ते शिक्षिईत किंवा अशिक्षित, कुणामध्येही असली तरी वाईटच. अशिक्षितांचा विषय सोडा, पण शिक्षितांमध्ये एक ठरावीक चाकोरी सोडुन नवीन वाट चोखाळण्यची किती जणांची तयारी असते?

आज व्यावसायीक शिक्षन सोडले तर इतर क्षेत्रातील संधी विषयीची अनभिज्ञता हे एक मुख्य करण होऊ शकेल. फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर डोक्टर आणि इन्जीनीयर ही दोन क्षेत्र सोदुन इतर क्शेत्राबद्दल असलेली अनास्था हे मुख्य कारण आहे. आपल्या मायबोलीवरच कुणीतरी विधान केले होते की या दोहोव्यतिरिक्त इतर क्षेत्रांचा फारसा उपयोग होत नाही. मुळात आपल्याला अश्या किती क्षेत्राबद्दल माहित असते हा मोठा प्रश्न आहे. असो, हा विषय वेगळाच आहे.

पण याचे खापर फक्त व्ययस्थेवर फोडता येणार नाही.

४) use of manpower , पररराज्यातील युवकंचे इतर प्रगत राज्यात स्थलांतर.

हा विषय ही तसा मोठा आहे आणि मुख्य म्हणजे ज्वलंत आहे. यातील दोन वेगवेगळ्या संस्कृतींच्या क्लॅश वर लक्ष मी देणार नाही. पण मुख्य मुद्दा हा आहे की व्यक्ती स्थलंतर का करते? रोजगाराची संधी, चांगले राहणीमान सुरक्षित भविष्य. ही समस्या केवळ अशिक्षितचा विचार केला तर भयावह आहे. शिक्षित स्थलांतरीत कमित कमी त्या राज्यातील विकासाला हातभार लावतात, पण अशिक्षीत स्थलांतरीतामुले समस्याच जास्त निर्मान होतात, उ.दा. राहन्याची, पण्याची व्यवस्था.

दुसरा मोठा तोटा, म्हणजे, मनुश्यबळाचे विषम distibution दक्षिनेकडील राज्ये, जी इशान्य आणि उत्तरेच्या मानाने तंत्रज्ञाच्या द्रुष्टीने प्रगत आहेत पण शेतीच्या द्रुष्टीने निसर्गाच्या अवक्रुपेमुळे म्हणा तितकी नशिबवान नाहीत, तिथे अशिक्षित मनुश्यबळाची किती आवश्यकता असते? उलट ज्या उत्तरेकडील राज्याकडुन हे लोक येतात तिथेच त्यान्ची खरी गरज आहे. गन्गेच्या काठावरील सुपीक भुमीची तुलना अन्य कशाशीही करता येनार नही. मुबलक पाणी, सुपीक जमीण, निसर्गाची कृपा या सगळ्याच गोष्टीमुळे भरपुर अन्नधन्य मिळते. पण तिथले काम करणारे हातच जर भितीने म्हणा किंवा कुठल्याही कारणने म्हणा जर बाहेर जाऊ लागले तर सगळाच असमतोल होइल. या लोकसन्ख्येस तिथेच कसे थंबवता येईल? अर्थात त्यानी आयुश्यभर शेतीच करावी काय? असा प्रश्न ही निर्मण होऊ शकतो. अन्नाची गरज ही इतर सर्व गरजापपेक्षा मोठी असते. या लोकांचे स्थलांतर थांबवने, त्याना सुरखित आयुश्याची हमी देणे या खुप महत्वाच्या गोष्टी आहेत. त्यावार काहीतरी ठोस तोडगा निघणे खुप जरुरीचे आहे.



Charu_ag
Sunday, February 12, 2006 - 7:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

५) शैक्षणिक दुरावस्था.

हा कळीचा मुद्दा आहे. याबाबतीत मी फक्त महाराष्ट्रातील आणि उत्तर प्रदेशातील शिक्षन व्यवस्थेवरच लिहीन.
माझ्या आपल्या शिक्षण व्यवस्थेबद्दल खुप तक्रारी अहेत. सगळ्यात मह्वताचा प्रश्न म्हणजे आपण नेमके काय शिकतो? एक नोकरी मिळवण्याचे ज्ञान सोडले तर इतर काय मिळते? आपण जितके प्रगत आपले शिक्षन समजतो, तेवढे खरच आहे का? अर्थात याचे उत्तर आहे नाही'. हो, माझे शिक्षन ही याच राज्यात झालेले आहे, तेही मराठी माध्यमातुन, पण तरीही हे म्हणन्याचे धाडस मी करते आहे.

अगदी मुद्द्याचच बोलायच म्हटल तर, आपला इतिहास सुद्धा आपल्याला नीट शिकवलेला नाही. जो शिकवला जातो तो ही सरकरी इतिहासच असतो. आपल्या स्वताच्या इतिहासाबद्दल आपण अनभिज्ञ असतो. किंबहुना इतिहास हा scoring चा विषय म्हनुन त्याचा अभ्यास सोडला तर फारसा त्याचा विचार ही कुणी करताना दिसत नाही. अर्थात इतिहास काय देतो हा वादाचा विषय होऊ शकतो, तो शिकवावा का हा सुध्ध्ह वाद होऊ शकतो, पण इतिहस एक विचार' देत असतो. तुम्ही कुठे जाणार या प्रश्नाचे उत्तर तुम्ही काय होता यात दडलेले असते, हा आपला माझा विचार. फक्त इतिहासचेच कशाला पण गणित, भौतिकशास्त्र, रसायन शास्त्र या सगळ्या बाबतीतच आनंद आहे. भौतिक शास्त्र शिकताना आम्ही बारावीत पण भौतीक शास्त्राचा इतिहासच लिहिलाय. describe, write notes on हे आपले काही प्रश्न. विचाराना चालना देणारे, आणि व्यक्ती घडवणारे शिक्षण आपल्या इथे मिळत नाही ही खुप मोठी खंत आहे. ही गोष्ट झाली बारावी पर्यंतची.

विद्यापीठामध्ये काय अवस्था आहे? मी पुणे विद्यपीठाची विद्यार्थिनी आहे, ज्या विद्यापीठाचा आपल्याला खुप अभिमान आहे, त्याची अवस्था काय आहे? आपल्या प्रगत महारष्ट्रात किती central universities आहेत? तर एकही नाही. तशी नावाला MAHATMA GANDHI ANTARAASHTRIYA HINDI VISHWAVIDYALAYA आहे पण बाकी बाबतीत आनंदीआनंदच आहे. उलट ज्य उत्तर प्रदेशाला आपण नावे ठेअतो, त्या u.p. मध्ये चार central universities aaNi 3 iits आहेत. २००० पर्यंत तिथे शिक्षनाचे व्यावसायिकरण होण्या आधी तिथली शिक्षन व्यवस्था देशात सर्वोत्तम होती. एक धक्कादायक सत्य असे आहे की, तिथे ज्याना B.A. ला सुद्धा admission मिळत नाही ते दक्षिणेत येऊन doctor aaNi engineer होत असतात.

फक्त महाराष्ट्राचाच विचार केला तर पहिल्यांदा शिक्षाणाचे व्यावसायीकरण थाम्बावायला हवे.


Charu_ag
Sunday, February 12, 2006 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता झाले प्रश्न, आता थोडी उत्तर शोधण्याचा प्रयत्न करु.



प्रत्येक बाबतीत राजकारण आनि system ला नावे ठेवून काहीच साध्य होणार नसते. आपणही या समस्यचा आपण ही घटक आहोत, आणि जे काही बरे वाईट होइल त्याचे परिणाम आपल्यालाच भोगयचे असतात.
राजकारण बदलने ही स्वतच एक मोठी प्रक्रिया होऊ शकेल. तुम्ही कुणाची विचारसरणे बदलु शकत नाही. पण आपन कुणाला मत देतोय हे तरी आपल्यला ठरवत येते, आपण व्यक्तीला मत देतोय की त्या पक्षाला? बरेच जण पक्षाला नाही तर व्यक्तीला मत देत असतात. पण आपण ज्याचे गुण गातोय, तो खरच तेवढ्या लायकीच आहे का हा महत्वाचा प्रश्न उरतोच. व्यक्ती पुजा हा आपल्या देशाला लागलेला सर्वात मोठा रोग आहे. देशापेक्षा कुणीही नेता मोठा नही. मग खरच जर एखाद्याला देशाचे भले करायचे असेल तर आपली व्यक्ती निष्ठा आधी पडताळुन पहावी. मी ज्या व्यक्तीला निवडुन देतोय, तो माझ्या देशाचे, प्रदेशाचे, गावाचे भले करु शकेल का?

जेम्व्हा system बदलायची गोष्ट करतो, तेम्व्हा, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, एक प्रश्न विचरायचा की माझे काम किती प्रामाणिक पणे करतोय? एखद्याने एखादे काम करण्यसठी मला लाच मागितली, तर माझे काम लवकर व्हावे म्हणुन मी ती देतो का? देईन का?

जे लोक शेतीशी निगडीत आहेत त्यानी देखिल विचार करायला हवा, जी परम्परागत शेती पद्धती आपण वापरतोय, ती आजच्या काळात उपयुक्त आहे का? बदलत्या हवामानानुसार यात कसे बदल करता येतील? सगळ्यात महत्वाचे म्हणजे शेतकयांची काळानुरुप बदल करण्याची, काळाबरोबर चालन्याची तयारी हवी. आधुनिक उपकरणे, नविन पिकपदधती चा अवलम्ब करयला हवा. त्याना या गोष्टींची ओळख करुन देण्याचे मोठे काम आजची शिक्षित तरुण पिढी करु शकते.

शेवटी हा देश आपला आहे, आणि या देशातील प्रत्येक प्रगत अप्रगत घटक आपला आहे. राजकारण असो वा समाज कारण उदसिनता सोडुन आपला हातभार लावणे हे एक मोठे काम आहे, नाही का?



Charu_ag
Sunday, February 12, 2006 - 7:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी लिहीलय ते खुपच विस्कळीत आहे, पण काय सांगायचय ते प्रामाणिक पणे सांगण्याचा एक प्रयत्न केला आहे.

Gs1
Monday, February 13, 2006 - 6:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, विषय छान आहेच. पण उत्तर विचारण्यावर थांबू नकोस, तुला उमगलेली उत्तर वा दिशा पण लिही.
की ती चर्चेच्या समारोपासाठी राखून ठेवली आहेस ?
चारू, छ्हान सुरूवात केली आहेस..


Savyasachi
Monday, February 13, 2006 - 9:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आय आय टी च्या ४ माजी विद्यार्थ्यांनी एक परित्राण नावाचा पक्ष स्थापन केला आहे.

Ekanath
Monday, February 13, 2006 - 10:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश महोदय,

मी हा चित्रपट पाहिला नाही. त्यामुळे चित्रपटाविषयी फारसे बोलता येणार नाही. परंतू, कथा सामान्यपणे सामाजिक हिंदी चित्रपटाची असते तशीच वाटते. अनेक घटनांचा एकत्र परिणाम होऊन लोक " क्रांती " करणार आणि मग जग बदलल्याचे दाखवणार. चित्रपटाची हाताळणी उत्तम असू शकते. पण माझ्यामते यावर उपाय फार आधीच नाना पाटेकर यांनी " प्रहार " या चित्रपटात दाखवलेला आहे.

जग / समाज हे एका क्षणात किंवा एका क्रांतीने बदलू शकत नाही, असे वाटते. क्रांती ही हळूहळू आणि टप्प्याटप्प्याने होत असते. आपण बीज पेरत जायचे, ते उगवण्याची फार वाट पहायची नाही. याच अर्थाने महाभारतात " कर्मण्येवाधिकारस्ते " म्हटले आहे का?

क्रांती,बदल हा शिक्षण आणि धर्म या मार्गेच होऊ शकतो. शस्त्राने घडवूब आणलेली क्रांती ही पुढच्या लढ्याला जन्म देते, असा आजवरचा तरी अनुभव आहे.

अर्थात, मी चित्रपट पाहिला नाही, त्यामुळे चित्रपटाविषयी काही बोलू शकत नाही. पण बदल / क्रांती याविषयी मी काही माझे विचार सांगितले.


Moodi
Monday, February 13, 2006 - 2:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश नेहेमीप्रमाणे तुमचे चित्रपटाचे समिक्षण उत्कृष्ट आहे. अन विषय खरोखर चांगला घेतला आहात. यात वाद नाही पण वादाचे मुद्दे मी पुढे मांडणार आहे, बर्‍याच चित्र रसिकाना ते पटणार नाहीत पण मला वाटतय ते मी लिहीणार आहे.
मी यात कुठल्याही राजकीय पक्षावर अन संघटनेवर शरसंधान करणार नाही, पण प्रश्न जरुर विचारेन, उत्तर देता येईल त्यांनी द्यावे. हुसैनवर बराच धुडगुस घालुन झाला, आता इथे कोणते कळकळीचे प्रश्न येतायत ते बघु.
चारूने नेहेमीप्रमाणे अतिशय छान अन सोप्या भाषेत समस्या उलगडवुन दाखवल्या. तिचे विचार अतिशय सुंदर अन तार्कीक असतात.

मी हा रंदेब पाहिलेला नाहिये, पाहिन लवकरच.

पण मला खालील प्रश्न पडलेत त्याची उत्तरे आहेत का कुणाजवळ?

१) चित्रपटातील हे सगळे कलाकार मुंबई अन तेथील लोक पुरात सापडले होते, तेव्हा काय करीत होते? जे आता सामाजीक जबाबदार्‍या अन सरकारच्या अकार्यक्षमतेवर चित्रपटातुन प्रहार करीत आहेत.

२) हे कलाकार जर माणूस असतील तर यांनी सामाजीक जाणिवेतुन काय अन कसली मदत केलीय? अन कोणत्या संवेदनेतुन यांना आत्ताच हे भान आले? की फक्त समाजातील वास्तव जे लोकांना आधीच माहीत आहे ते पुढे आणुन आम्ही काहीतरी फार मोठी क्रांती किंवा जागृती करीत आहोत असा आव आणुन गल्ला भरु पहात आहेत? उगीच लोकांच्या भावनांना हात घालुन गल्ला भरण्यात अर्थ काय?

३) भारतातल्या भ्रष्टाचाराबाबत बोलत असताना या लोकांनी कधी आपला इन्कमटॅक्स नियमीत भरला आहे का?

४) नेहेमी काही झाले की हे लोक उघड्या गाड्यांमधुन मदत फेरी काढण्याचा आव आणुन लोकांच्याच खिशातुन पैसे काढण्याचा भिकारी पणा का करतात?

५) काही ठरावीक अन प्रामाणीक कलाकार सोडले तर सरकारकडुन मदत घेऊन परत दाऊद अन पाकिस्तानला मदत करतांना यांना लाजा का वाटत नाहीत? लोकांमध्ये जर संवेदनेची जागृती करायची आहे, क्रांती घडवायची आहे, भ्रष्टाचार जर दूर करायचा आहे तर हे लोक चित्रपट सृष्टीत गुंतवलेला काळा पैसा बाहेर काढुन गरीब लोकांची गरिबी दूर करुन त्यांना शिक्षण अन नोकरीची मदत का करीत नाहीत? उगाच चित्रपटात बेंबीच्या देठापासुन बोंबलुन सरकारच्या विरुद्ध का कंठशोष करीत असतात?

६) चित्रपटातुन अकारण भडक हिंसा अन सेक्स दाखवुन हे समाजाला कोणत्या दिशेने नेत आहेत?

भारतात जन जागृती ही चित्रपटांद्वारे कधीच होणार नाही, ती होवु शकते अन घडली आहे ती फक्त जागृत अन सुशिक्षीत लोकांद्वारेच. जसे पूर्व काळापासुन महात्मा ज्योतिबा फुले, आगरकर, डॉ. राजाराममोहन रॉय यांच्या द्वारे होवु शकली तशीच. असा कुणी नेता समाजात आहे का?

लोकांना स्वताच्या हक्काची किती माहिती आहे? कायद्याचे किती ज्ञान आहे? परस्पर संबंध कसे आहेत?

मला इथे गावांचा वाद नाही पेटवायचा, पण जे डोळ्याला दिसतय ते विचारते. कुणावर मी वैयक्तीक आरोप करीत नही हे कृपया लक्षात घ्यावे.

पाऊस पूण्यात पडला अन मुंबईतही पडला. मुंबईच्या लोकांनी शांततेने सर्व कामे केली. अन पुण्यात खड्डे पडल्यावर पुण्याची बदनामी झाली, टिका झाली. मग पुणेकरांनी महापालिकेत भांडुन ते रस्ते बर्‍याच प्रमाणात सुधरवण्याची तरतुद केली पण मुंबईकर मिठी नदी, तिच्यातील कचरा, परकियांचे लोंढे, त्यांचे बेकायदा धंदे, दादागिरी, माफिया चक्र, रेल्वेची दुर्दशा, लोकांचे हाल, नोकर्‍या, सरकारमधील अन नेतेपदाबाबतचा बाजार, शेतकर्‍यांच्या आत्महत्या अन दुसरी कडे आमदारांना गाड्यांचे कर्ज याबाबत अन असंख्य अशा गोष्टींबाबत का बोलत नाहीत? का जागृत नाहीत? जागृती गाव सापेक्ष आहे का? यांचा वाली कोण? मुंबईकरांनी आताच जागृत व्हायला नको का? आमिर अन सोहा मदत करतील काय?



Dineshvs
Monday, February 13, 2006 - 4:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चारु, प्रश्ण तर मांडले आता, उत्तरे लिहायला हवी. मूडि, या सिनेमात कलाकाराना अजिबात महत्व नाही, अगदी आमिर खानलाहि नाही. पण तरिही मला मांडलेला मुद्दा मह्त्वाचा मांडला.

आपल्या देशात लष्करभरती सक्तीची नाही. आजहि अनेक जमातीत घरटी एक मुलगा सैनिकात पाठवायचा हा नियम आहे, आमच्याहि घराण्यात हा नियम आहे, माझे अनेक मामा मिलिट्रीत होते. एका मामाला मुलगा नाही तर त्याने मुलीला पाठवले. ईतर अनेक देशात सैनिकि शिक्षण आणि सेवा सक्तीची आहे.

आपल्या लष्कराचे मनोबल ऊच्च आहे. ईशान्येकडच्या राज्यातील व काश्मिरमधल्या घटना, माहित असुनहि, सैनिक खरेच प्रसंसेस पात्र आहेत.

आपल्या लष्कराच्या नेतृत्वाला, राजकिय मह्त्वाकांक्षा नाही. पाकिस्तानसारखे आपल्या देशात घडले नाही, घडणारहि नाही.

पण आपल्या देशातील भ्रष्टाचार ईतक्या हिन पातळीवर गेलाय, कि लष्करसंबंधी खरीदीतहि अनेक घोटाळे होतात, आणि आता कुणाहि राजकिय नेत्याच्या चारित्र्याची खात्री राहिलेली नाही.

या कथेतील तरुणाना राग आलाय तो याचाच. त्याच्या मित्राची त्याच्या आईची निष्ठा त्याना माहित आहे, आणि तरिही त्याच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप होतो हे त्याना सहन होत नाही.
असे स्वताला भिडल्याशिवाय आपण काहि करतच नाही.
याच सिनेमात काहि उत्तरे सुचवली आहेत, आणि त्यापैकी एक आहे, सक्रिय राजकारणात ऊतरण्याचा. तसे प्रयत्न तुरळक असले तरी होताहेत, ते आणखी व्हायला पाहिजे.
बी ने उल्लेख केलेल्या युवा मधेहि सध्याच्या तरुणांच्या तीन प्रकाराचे छान दर्शन होते, एक आहे ज्याला या देशाशी काहि घेणे देणे नाही, दुसरा आहे तो सरळ सरळ राजकिय गुंड आहे आणि तिसरा आहे तो सक्रिय राजकारणात ऊतरलाय.
त्या सिनेमात राणी आणि अभिषेकने उत्तम अभिनय करुन सिनेमा खाऊन टाकलाय, शिवाय ईतर तांत्रिक बाजु ( ऊदा हावडा ब्रिजवरची मारामारी ) उत्तमच आहेत, त्यामुळे त्यातला आशय मागे पडला होता, ईथे तसे झालेले नाही.
त्यामुळे सक्रिय राजकारणात ऊतरणे व अखेरपर्यंत आपली धेयनिष्ठा राखणे हा एक ऊपाय आहे, असे मला वाटते. आणखी काय ते सुचवा.


Moodi
Monday, February 13, 2006 - 5:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश लष्कराचेच म्हणाल तर आज माझा एक चुलत अन अन एक आतेभाऊ आहे नेव्ही अन एअरफोर्समध्ये. आता यांना भेट झाल्यावर नक्कीच विचारेन याबाबत, कारण आपण तसे दूर असतो पण ह्या लोकांचा अगदी काही नाही म्हटल तरी थोडा संपर्क येतोच की.

मला राग येतो तो या बाबतीत की तेव्हा जनमानस पण का स्वस्थ असते हेच कळत नाही, जेव्हा असे अनेक प्रसंग घडतात की ज्याने देशाची सुरक्षा अन व्यवस्था धोक्यात येते. दुर्दैवाने आज कित्येक गावांपर्यंत मूलभुत सोयी अन शिक्षण पोचलेले नाहिये. इशान्य पूर्वेकडील राज्यात अतिरेकी आलेत अन तो भागही तोडु पहात आहेत. काश्मिरचे रणकंदन तर चालुच आहे.

प्रत्येक वेळी विरोधी पक्षानेच सरकारला जाब विचारला पाहिजे असे नाही, तर लोकांनी सुद्धा आता तरुणांचे छोटे स्वतंत्र गट करुन त्यांना वयस्कर लोकांनी मार्गदर्शन करुन जागृती केली पाहिजे. पण आजकाल मोठ्यांचे पण कुणी ऐकत नाही ना. आई बापालाच विचारत नाहीत तर इतरांचे काय.


Champak
Monday, February 13, 2006 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या देशात सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था ही राजकीय आहे, अन जर मुळात बदल हवा असेल तर ह्या संस्थेत बदल व्हायला हवा. तो दोन मार्गाने होतो. कि या सरकारी यंत्रणेत प्रवेश मिळवुण यंत्रणा सुधारा ( हा वेळखावु अन लोकशाही मार्ग ) अथवा ही यंत्रणा च उध्वस्त करा अन दुसरी यंत्रणा निर्माण करा.. जे कि नक्षलवादी करील असतात. नक्षल्यांचा भारतीय राज्यघटनेवर अन न्याय व्यवस्थेवर विश्वास नाही.

सरकारी यंत्रणेत शिरकाव करण्याचे दोन मार्ग एक नोकरशाही अन दुसरी राजकिय सत्ता. सामान्य मध्यमवर्गीयांना नोकरशाहीच्या माध्यमातुन सत्तेत शिरकाव शक्य आहे. पण सुखवस्तु कुटुंबातले लोक सहसा त्या वाटेला जात नाहीत. केन्द्रे सरकारी सेवे मध्ये महाराष्ट्राची त दयनीय अवस्था आहे!

दुसरा राजमार्ग तो राजकिय संस्थेमध्ये प्रवेश मिळवणे. तो सामान्यांना सहज शक्य नाही. अन आजच्या स्थितीत तर कठीण च आहे.

वर ज्या परित्राण पक्षाचा उल्लेख आला त्यांच्या एका हितचिंतकाशी बोलताना ही, मी सआंगितले होते कि मनी अन मसल पावर असल्याशिवाय त्या भानगडीत पडु नका. स्वतः चा उद्योग उभा करुण आपल्या आर्थिक नाड्या प्रस्थापित राजकारण्यांच्या हाती जाणार नाहीत ह्याची खबरदारी घ्या. कारण जर तुमच्या आर्थिक नाड्या प्रस्थापितंच्या हाती असतील त तुम्ही त्यांना विरोध करणे केवळ अशक्य आहे. साखर पट्ट्यातील राजकारण ह्या च खेळावर चालते.
अर्थात सरळ गुंड बनणार असाल तर च हे करा असे नाही, पन किमाण deterent power असायला हवी. तिथे दयामाया नसते. अन शिकलेल्या लोकांनी येण केण प्रकारे राजकरणात जावे असे मला नेहमीच वाटते. तुमचे आदर्श अन सिद्धांत राजक्रानात स्थिर स्थावर होईस्तोवर गुंडाळुण ठेवा, अन मग तिथे एकदा स्टेबल झाला कि मग चांगला कारभार करा. हे कदाचित काहींना पटणार नाही. पण, अगदी महाभारतात देखिल भीमाच्या हातुन दुर्योधनाला मारताना श्रीकृष्णाने नियम तोडायला परवाणगी दिली च होती ना? काही चांगल्या गोष्टी करायच्या असतील त काही वाईट गोष्टी करणे क्षम्य असते, असे मला practical वागणे योग्य वाटते.

NGO चालवणे हा ही एक धंदा झाला आहे असे म्हणणारे अनेक लोक आहेत त्यामुळे कुणाला समाज सेवा वगैरे करायची लहर आली त माझे हे च सांगणे असेल कि बाबा तु तुझ्या स्वतः च्या हिमतीवर जो पैसा मिळवतो त्या चा च वापर कर, कुणाकडे झोळी घेउण जावु नको!

मी सध्या आमच्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थी संघटना बांधायचा प्रयत्न चालवला आहे. एक प्राध्यापक मार्गदर्शन करित आहेत. चित्र उत्साहवर्धक नाही, पण मी दगडावर डोके आपटायचा निर्धार केलेला आहेच!:-)


Dineshvs
Monday, February 13, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडि, हे जाब विचारणेच होत नाही आपल्याकडे. एकदा निवडणुक जिंकला कि पोहोचला म्हणायचा.
चंपक, तरुणाना आपल्या पक्षाला बांधुन घेण्यासाठी सगळेच पक्ष आतुर आहेत. पण त्या तरुणाना कितपत वाव असतो तिथे, वापरलेच जाते ना त्याना.
तुमच्यापैकी किती जणानी जनता पक्षाचा ऊदय आणि अस्त पाहिला आहे, कल्पना नाही. पण त्यावेळी लोकानी फ़ार आशा ठेवल्या होत्या, मग मात्र घोर निराशा झाली. आता तसे व्हायला नको.


Giriraj
Monday, February 13, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चम्पक! उत्तम नोंद! राजकारणात सक्रिय सहभागी होणे पण राजकारण आंगाशी लागू न देणे हे खरंच फ़ार कठीण आहे पण अशक्य नाही. म्हणूनच तू किंवा GS सार्ख्यांनी राजकारणात आले पाहिजे!

माझ्याकडे एक उपाय आहे.. तो अनेक समस्यांवरचा रामबाण उपाय ठरू शकेल. जरा सविस्तरपणे विचार करुयात...

आपण जे या आणि इतरही समस्यांबद्दल बोलतो त्यांनी आपलीच मोठे होण्याची प्रक्रिया जरा आठवून पहावी. आपल्यात जे सद्गुण किंवा समाजहिताचा विचार आलाय तो कुठून आला हे एकदा तपासून पहावे. मला तरी वाटत्म की यात संस्कारांचा फ़ार मोठा वाटा आहे म्हणजेच पर्यायाने आपल्या आई वडलांचा आणि गुरुजनांचा! यात काही गोष्टी आई वडलांनी संस्कारित करूनही कधी कधी गुरुजनांचा जबरदस्त प्रभाव एका विशिष्ट वयात असल्याच आपल्याला आढळून येईल.

तर उपाय अगदी सोपा आहे.. थोडा वेळखाऊ वाटेल पण क्रांति हा एक फ़सवा प्रकार असतो तर उत्क्रांति हा निसर्गनियम आहे आणि एका राषट्राच्या किंवा मानवसमाजाच्या दृष्टीने काही शे वर्षांचा काळ हा नगण्या म्हणता येईल इतका लहान असतो.
उपाय आहे अशी संस्कारक्शम पिढी घडवण्याचा की जी पुढे या समाजविघातक प्रवृत्तिपासून स्वतःच आणि पर्यायाने समाजाच रख़्शण करील. मात्र ते वैचारीक आणि वैयक्तिक पातळीवर असेल. यात कोणत्याही शस्त्रांचा आणि कुमार्गांचा वापर केला जाणार नाही. यासाठी चांगल्या बाबी लहानांच्या मनावर तितक्याच प्रभावीपणे बिंबवल्या गेल्या पाहिजेत.याचाच अर्थ असा की सर्व काही morality च्या पायावर बेतल पाहिजे.

मला एक प्रशन विचारावासा वाटतो.आपल्यातले खूपशे जण IT संबंधित क्शेत्रातले आहेत की ज्याठिकाणी तुमचा भ्रष्टाचाराशी उघड संबंध येत नाही किंवा तुम्हाला यातली प्रलोभनच नाहीत. कोणी असे आहेत का की ज्यांनी प्रलोभन असणार्‍या क्षेत्रातही स्वतःचा सच्चेपणा आणि मनाची एकाग्रता टिकवून ठेवली आहे? आपण एखाद्या प्रलोभनक्षेत्राच्या मर्यादेत नसू तर त्याविरुद्ध असणारी चीड आणि संताप हा कधीकधी आपण त्याचे भाग नाहित म्हणून असतो. पण तीच प्रलोभन आपल्यापर्यंत आली तर तो एक शिष्टाचाराचा किंवा अपरिहार्यतेचा भाग बनू शकतो. एका दुकानदाराने नगरपालिकेतल्या भ्रषटाचाराबद्दल बोलणे वेगळे आणि त्याच दलदलित राहून त्याचा भाग न होता त्याविरुद्ध बोअलणे वेगेळे असते. याचाही एकदा स्वतःशी विचार करा. मी हा विचार केलेला आहे कारण मी अश्या अनेक प्रकारांतून गेलो आहे. मात्र मी विरोध हा मार्ग न अवलंबता माझ्यापुरते नियम आखून घेतले आहेत.
हे सांगण्यामागचा मूळ हेतू हाच की आपल्याला वाटनारी काळजी ही वरवरची असू नये किंवा आपल्या बाबतित काही अनुचित घडले म्हणून मी समाजाबद्दल विचार करायला लागलो अशी असू नये. ती खरोखरीच आंतरीक असावी, निरपेक्ष असावी आणि व्यक्तिसापेक्ष असू नये. तरच या सगळ्या चर्चांचा उपयोग आहे नाहीतर वेळ घालविण्यासाठी नाक्यानाक्यावर घदणार्‍या चर्चेसारखीच एका नव्या युगाच्या virtual कट्ट्यावर घडलेली चर्चा एव्हढेच्ग याचे स्वरूप मर्यादित होईल.

आणि आपला सभ्यपणा तसेच सच्चेपणा दाखवायचा असेल तर ही उत्तम चर्चा भरकटत हमरीतुमरीवर येऊ देऊ नये असे मला वाटते.

मला सुचलेला उपाय हा थोदा idailistic वातला तरी समाजात morality वाढवायला ही संस्कारक्शम हृदयेच उपयोगी ठरतिल आणि morality म्हणजेच नैत्कता हाच सर्व समस्यांवरचा उपाय आहे!

धन्यवाद!


Moodi
Monday, February 13, 2006 - 8:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश मला मात्र वैयक्तीकरित्या जंजीरमधला ओमप्रकाशचे व्यक्ती चित्रण आवडले, जो स्वतच्या मुलाच्या विषारी औषधांच्या की दारुच्या सेवनानंतर झालेल्या मृत्युनंतर इतरांचे तसे होवु नये म्हणुन चाकोरीबाहेर राहून अमिताभची म्हणजे जंजीरमधल्या विजयची मदत करतो अन त्या गुंडांना पकडुन देतो.
बरेचसे प्रामाणीक IAS ऑफिसर अन पोलीस अधिकारी दुर्दैवाने कायद्याने बांधलेले असतात त्यामुळे त्यांना नेमकी अशी संधी मिळत नाही, की ते समाजविघातक शक्तींना जायबंदी करु शकतील.

सामान्य माणसाचे आयुष्य घर, मुलांचे प्रश्न इत्यादीत जाते, त्यामुळे तो पण मेटाकुटीला येतो. घरुन पाठिंबा मिळुन समाजात बदल करणे हे एखादीच किरण बेदी करु शकते. पण हे ही नसे थोडके. आज जर मुलींना पण या व्यवसायात सुरक्षितता मिळाली तर त्याही येतीलच.

मात्र सगळेच आबा पाटिल नाही हो होवु शकत, फार सहन करावे लागते अन पाठिंबा मिळवावा लागतो बाकिच्यांचा पण.


Champak
Tuesday, February 14, 2006 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1410671.cms
शेवटचा परिच्छेद विचार करण्या सारखा आहे!

Dineshvs
Tuesday, February 14, 2006 - 5:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरि, हि शुचिता आपल्या सर्वात येणे फ़ार मह्त्वाचे आहे.
गर्वाने नाहि पण अभिमानाने म्हणेन कि केवळ याच कारणासाठी मी सी ए होवुनहि कधीहि प्रॅक्टिस केली नाही.
माझी वहिनी सेल्स टॅक्स ऑफ़िसर आहे, तिहि कधीहि या प्रलोभनाला बळि पडली नाही. पण तरिही एकट्याने फ़ार काहि करता येत नाही हे खरेच.

मला वाटते जनता पक्षाच्या वेळी तुम्ही सगळे लहान होता, त्यावेळी लोकानी ऊस्फ़ुर्त पाठिंबा दिला होता.
पण थोड्याच कालावधीत लोकांचा भ्रमनिरास झाला आणि तेंव्हापासुन सामान्य शिक्षित मतदार, राजकारणापासुन दुर जाऊ लागला. ती प्रक्रिया अजुनहि चालु आहे.

वरती चारुने शेतकर्‍यांचा प्रश्ण मांडलाय. भाग्यश्री आणि नलिनी या पण शेतकरी कुटुंबातुन आल्या आहेत.
नेमके काय प्रश्ण आहेत या शेतकर्‍यांचे,
तर नियोजनाचा अभाव, सगळे लावतात म्हणुन आपणहि ऊस लावायचा हि वृत्ती, बियाणे खते यात भेसळ, कर्जबाजारीपणा, सुधारीत तंत्राची माहिती नसणे, आणि पावसाचा लहरीपणा.
यातले बरेचसे प्रश्ण निखळ नेत्रुत्वाने सुटु शकतात, भारतात आता १५५१ हि हेल्पलाईन पण आहे शेतकर्‍यांसाठी.
पण सगळ्यात मोठा प्रश्ण आहे तो पाणी पुरवठ्याचा, माझ्या लहानपणापासुन मी गंगा कावेरी प्रकल्प ऐकतोय, पण तो होवु शकत नाही. तो जर झाला तर निदान पाण्याचा तरी प्रश्ण सुटेल.
आपल्याकडे कुठलीच पाटबंधारे योजना वेळेत पुरी होत नाही, कारण तिथे ठाई ठाई भ्रष्टाचार होतो, म्हणजे
सर्व देवं नमस्कारं, केशवं प्रति गच्छति, तसे बहुतेक रोगांचे मुळ हे भ्रष्ट राजकारणी आणि ऊदासिन मतदार, हेच आहे.
एखादा अण्णा हजारे काहि करु बघतो, तर त्याचा राजकिय फ़ायदा ऊठवला जातो. मला हेहि कळत नाही कि अण्णा काय, धर्माधिकारी काय, अश्या राजकिय प्रलोभनाला बळि का पडतात, मग लोकानाहि कुणावर विश्वास ठेवावासा वाटत नाही.
मग नव्याने राजकारणात येणार्‍या लोकानी हा विश्वास कसा मिळावायचा ? याचा विचार करु या. त्यानी आपल्या प्रामाणिकपणाची खात्री कशी पटवावी. ?


Bhagya
Wednesday, February 15, 2006 - 1:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला काही मुद्दे विचार करण्याजोगे वाटतात. पोस्ट मोठि आहे, पण लक्ष देऊन वाचा.

१. economy फ़ास्ट किती लोकांसाठी grow होते आहे? फ़क्त ज्यांना IT/BPO मध्ये खूप चांगले jobs आहेत त्यांच्यासाठीच न? आणि economy grow होऊन फ़ायदा किती लोकांना आहे? अजून्ही human poverty index च्या लिस्ट मध्ये आपला नंम्बर १२७ आहे. हि link वाचा.

http://hdr.undp.org/statistics/data/indicators.cfm?x=17&;y=1&z=1

ज्यांच्याकडे आधीच पैसे आहेत त्यांना अजून मिळू नयेत असे नाही, पण ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांना basic amenities जसे की अन्न, वस्त्र निवारा तरी मिळाव्या?

ह्या economy मध्ये फ़क्त पैसे असणारे आणि नसणारे यांच्यातलि दरी वाढते आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, दिल्ली येथिल VC इथे आले असताना त्यांनी हेच विचार मांडले. हे VC एक मोठे economist पण आहेत. अहो, sensex जो वाढतो आहे, त्याचा उपयोग फ़क्त ६% लोकांना आहे.
आता आपल्या भारतात made in chinaa गोष्टी सहज मिळतात. आणी ह्या गोष्टी, जसे की पतंग, फ़टाके, होळीच्या पिचकार्‍या ई. ह्या बहुतांशी हातावर पोट असलेल्या लोकांना employ करुन बनवलेल्या असतात. सध्याचे चित्र पाहिले, तर
· छोटे उद्योगधंदे पुढे मागे मोठेहि?) चिनकडे द्यायचे, जेणेकरून गरिब अजून गरिब होतील आता तर काय china आणि India ने joint commodity exchnge पण स्थापन केले आहे आहे बुव्वा! चायना इतक्या low cost मध्ये आपण बर्‍याच गोष्टी बनवुच शकत नाही.
· परदेशातील IT आणि इतर कंपन्यांनी जास्तीत जास्त गुंतवणूक करावी म्हणुन प्रयत्न करायचे, त्यांच्या जीवावर इथे IT sector grow करायचे
· वरच्या दोन मुद्द्यांप्रमाणे, चीन आणि विदेशी companies वर economy dependent बनवायची आणि आपला मुळ उद्योग शेती यासाठी वीज आणि पाणी नसले तरी चालतील असा attitude ठेवायचा.
चायना कसा पाठीत खंजीर खुपसतो हिन्दी चिनी भाई भाई म्हणत्) ते विसरून चालणार नाही. आणी परदेशी companies जिथे स्वस्त वाटेल तिथे गुंतवणूक करतात. उद्या भारताला दूर सारून दुसरीकडे कुठे गेले तर आश्चर्य वाटू नये. आणी शेतीची आपुल्या हस्ते वाट लावून घेतल्यामुळे, तेलही गेले, तुपही गेले आणि हाती धुपाटणे आले असे व्हायचे. (अर्थात हे extreme picture झाले पण अशक्य मुळीच नाही.)
· ६४% लोक शेतीवर अवलंबून आहेत. patience असेल तर ही पूर्ण लेखमाला वाचा:

http://www.rupe-india.org/36/intro.html



Bhagya
Wednesday, February 15, 2006 - 1:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


आता प्रश्न शेतकर्‍यांचा आणि समाजाच्या दृष्टितुन निम्न दर्जाच्या नोकर्‍या करणार्‍या लोकांचा, जसे की मोलकरणी मजूर आदी.

· शेतकरी राजा हा नावाचा राजा तीन गोष्टिंवर अवलंबून असतो पाणी, पाऊस आणि सरकार. आणि हो, वीज सुद्धा. या चारहि गोष्टि किटि बेभरवशाच्या आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिति आहेच. बी-बियाणे यासाठि असलेल्या सबसिडीपासून, सरकारीकर्जापासून, अनुदानापासून अनेक गोष्टी लाच दिल्याशिवाय, खेटे घातल्याशिवाय हातात पडत नाहीत. अनेक खटपटी लटपटी करून या मिळाल्या, कि बीज पेरायचे.
· बीजाला घालायला पाणी आणी पंपासाठी वीज असेल तर पिके वाढवायची. पाऊस वेळेवर येणे, अतिवृष्टी येणे अथवा मुळीच न येणे ह्यातील काहितरी होऊन जी पिके हाती येतिल ती विकायला काढायची.
· पिके विकताना दर पडले, दर ठरवताना आंदोलन होऊन पीक कोठारात सडले यापैकी काहि झाले नाही तर जे पैसे मिळतिल ते हाति घ्यायचे.
· पैसे आले की पहिले कर्ज फ़ेडायचे, आणी दुसरे पिक हाती येईपर्यन्त अर्धपोटी दिवस काढायचे, मुल-बाळांच्या शिक्षणे, लग्ने यासाठि अजून कर्ज काढायचे किंवा पुढे ढकलायाचे.
· असह्य झाले तर गळफास लावून मरायचे....

निम्न दर्जाची कामे करणारे लोक ह्यांचेहि आयुष्य असेच. दिवसभर कष्ट करायचे, अपुर्‍या पोटावर आणी पैशावर दिवस काढायचे, शिक्षण, कुटुंबनियोजन माहितीच नसल्याने अजून पोरे पैदा करायची आणि त्यांना पण त्याच चक्रात ढकलायचे. सगळाच अंधार!!!


Bhagya
Wednesday, February 15, 2006 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता वरच्या दोन पोस्ट्स मधल्या समस्यांवर उपाय?
माझ्या मते

by POLITICIANS (uncorrupt which is highly impossible) -
control of Population (why can't we do it? - this is another v&c issue) and
-erradication of poverty. (by taking care of people at grassroot levels)

आणि जोपर्यन्त आपले नेते सुधरत आणि सुधारत नाहीत, तोपर्यंत सारे अशक्य. कुठल्याही प्रगत देशात पहा, नेते खुपच कमि corrupt असतात, असले तरी सर्वसामान्य लोकांना अन्न वस्त्र निवारा मिळन्याच्या मध्ये ते येत नाहीत.



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators