एक घर आसपास
जेंव्हा मला आपले एकटे राहणे अपरिहार्य आहे असे वाटले त्यावेळी मी घर बघायला सुरवात केली. होतो त्या घरात अगदी जीव गुदमरुन जात असे. शेवटी धुमसत धुमसत का होईना माझ्या मनानी घर शोधायचेच असा निर्णय घेतला. ह्यापुर्वी कधीच एकटे राहण्याची वेळ माझ्यावर आलेली नव्हती. कधी कुणाशी वाद जरी होत नसले तरी भावबंध जुळतील असेही मला कधी वाटले नाही. तर कधी ह्याच्या अगदी विरुद्ध. पटत जरी नसले तरी त्यांचा माझ्या आसपास असण्याचा केवढा तरी आधार वाटायचा. पण असला आधार तरी काय कामाचा जो मला अधिकाधिक कमकुवत करीन. घरात लहान असल्यामुळे आणि सतत आई नाहीतर बहिणीचा पदर धरून राहण्याची सवय इतकी जडली होती की बाहेरच्या जगात त्यांच्याविणा पाऊल टाकणे खचितच मला खूप कठिण गेले.. खास करून भावनिक दृष्ट्या. माझ्यापेक्षा लहानलहान मुले रात्री बेरात्री शीसूला एकटी जात त्यावेळी मला बाहेरच्या मिट्ट काळोखाची खूप भिती वाटायची. एकदा तर बाजूच्या रिकाम्या क्वार्टर मध्ये खेळता खेळता काळोख भरून आला आणि मला माहितीच पडले नाही. कुणीतरी मग त्या घराची कडी बाहेरून बंद केली आणि माझे घर अगदी लागूनच असतानाही मी जोराची आरोळी ठोकली. आईने ती ऐकली आणि माझ्या कानात फ़ुंकर घालत मला पोटाशी कवटाळले. तिच्या कुशीत शिरताना मला क्षणात सुरक्षितता जाणवली. हे आज आठवले की मला वाटते आपण किती खंबीर झालो आहोत. कित्येक दिनं मास वर्ष आपण एकटेच घालवितो कुणाचा कसलाच आधार नसताना. जेंव्हा मी घर बघायला सुरवात केली त्यावेळी जवळपास सगळी agent मंडळी माझ्या ओळखीची झाली होती. मला नेमके कसले घर हवे होते हे त्यांना कळत नव्हते आणि मलाही आपल्याला नक्की कसे घर हवे आहे ते सांगता येत नव्हते. खरे तर मला घरातले घरपण हवे होते जे नविन घरात नक्कीच नसते. ते विकत घेता येत नाही, ते निर्माण करावे लागते. फ़ोनवर ह्या agents पैकी कुणी माझा आवाज ऐकला की ते लगेच मला ओळखत आणि नाही सध्या तरी घर नाही असे सांगत. मला जेवढीकाही घरे दाखविल्या गेली त्या रिकाम्या घरात शिरताना माझ्या अंगावर सरसरून काटा उभा रहायचा. एकदा नविन घर बघताना वरुन खाली पाल माझ्या डोक्यावर फ़िरत होती. तिला पाहून मी ते घर स्विकारणे वेगळे पण आपण एकदाचे कधी इथून बाहेर पडतो असे वाटले होते. कितीतरी चांगली घरं मी बघितली असतील पण त्या रिकाम्या किंवा चिनी - मलय वस्तुंनी भरलेल्या घरात आपण राहूच शकणार नाही हे मला लगेच उमजायचे. मग हताश मनानी आहे त्या घरात जावून माझ्या बंदीस्त खोलीत विचारमग्न स्थितीत अंग झोकून द्यायचो आणि आपल्याला कधी हवासा आशियाना गवसेल ह्याचा विचार करत बसायचो. शेवटी शेवटी आहेत त्यांच्यासोबत जीव इतका विटला होता.. इतकी उबग आली होती त्यांच्यासमवे राहण्याची की परत एकदा घर की तलाश सुरू केली पण तोच अनुभव. इथल्या काही मराठी मंडळींना विचारपूस करून पाहिली पण त्यांच्याकडे एकतर कुणी paying guest म्हणून ठेवले जात नसे आणि जिथे असे असायचे तिथल्या खोल्या आधीच भरून जात असत. माझ्या मनानी एकदम कच खाल्ली होती. शेवटी एक अगदी अखेरचा प्रयत्न म्हणून माझ्या आॅफ़ीसमधील एक व्यक्ती घर खाली करून लंडनला कामानिमित्त्य जाणार होती. ते भारतीयच होते आणि त्यांचे घर सरकारी असल्यामुळे फ़र्निचरपण त्यांचेच होते. शिवाय असा नियमही होता की आपण आपले घर कुणाला transfer करू शकतो. मी त्यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरातील खास भारतीय वातावरणानी माझे मन लगेच प्रसन्न झाले आणि तिथल्या तिथे मी स्वप्न बघू लागलो.. इथे आपले हे सामान असेल.. तिथे ते असेल.. इथे हे ठेवू अन तिथे ते. एक दिवस विचार करून मी त्यांना होकार दिला. त्यांचे जुनेपुराने फ़र्नीचर विकत घेतले आणि ऐन श्रावण महिना होता म्हणून घरात सत्यनारायणाची पूजा करून गृहप्रवेश केला. ते भारतीय जोडपे काल संध्याकाळी सोडून गेले तर मी लगेच सकाळी तिथे पोचलो. शेजारच्या तमिळ बाईला खूप आश्चर्य वाटले त्याचे. आमची लगेच गट्टी पण जमली. नंतर ह्याच घरात आमचे कविता वाचनाचे कार्यक्रम झाले, मित्रांना house-warming ची पार्टी देऊन झाली. पहिल्याच दिवशी मी अगदी बेड रूमचे दार सताड उघडे ठेवून अंधारात गाढ झोपी गेलो. बेडरूममधेच देवघर ठेवले. आपल्याला रात्री झोप लागेपर्यंत निरांजन तेवत ठेवायचे इतके तेल ओतून माझी पूजा होते. त्या प्रकाशाचा मला कितीतरी आधार वाटतो. एकदा एक मित्र मला म्हणालाही बेडरूममध्ये देवघर नको जेंव्हा एक खोली रिकामी आहे. त्यावेळी त्याला काय समजवून सांगावे म्हणून मी जाऊ दिले. रोज सकाळी उठलो तर सिंक मध्ये मुंग्याची रांग असते. तिथे बोटानी टकटक केले तर पाच मिनिटात त्या आपल्या घरात शिरतात. समोरच्या हिरव्यागार झाडावर कावळ्याचे घरटे आहे. पण ती येतात कधी आणि जातात कधी काहीच पत्ता लागत नाही. क्वचितप्रसंगी कावळीन पिलांना भरवताना दिसते. ऐरवी साळूंक्यांचा कलकलाट असतो. बाकी सगळे काही शांत शांत असते. मध्येच इथे कधी कधी मोकळ्या जागेवर चायनीज नाटके होतात. त्यात भांड्यांची बरीच आदळ - आपट होते. आत्ता नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या योगाच्या गुरजींनी मी कुठे राहतो ह्याची विचारपूस केली त्यावेळी सध्या तरी मी एकटाच राहतो अजून दोनाचे चार हात व्हायचे आहे असे उत्तर दिले. ते म्हणाले एकटे राहणे चांगले असते योग्याला. मी मनात म्हंटले चांगले की वांगले हे माहिती नाही पण प्रेमाचे जर कुणीच सोबतीला नसले तर मग आपलपोटी स्वातंत्र्य बरे. गेल्या रविवारी कधी नव्हे तो एकाचा कामानिमित्य फ़ोन आला.. की घर हवे आहे तीन माहिन्यांसाठी. तेंव्हा मी लगेच नकार दिला. नंतर वाईटही खूप वाटले पण आपले अनुभव आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि आपल्यासारख्या मनकवळ्या लोकांनाही नाईलाजास्तव खोटेनाटे बोलावे लागते. असो.. चौदा वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर मला Home sweet home!!!!! लाभले हे महत्त्वाचे.