मोरपिसे -- २

पंधरा ऑगस्ट आला आणि गेला.. जास्त फरक काही पडला नाही. तसा तो दरवर्षीच येतो. पण यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे सरबानी प्रितमची चांगली मैत्रीण बनून गेली. दोघीजणी रेहानचा विषय बोलताना थकायच्या नाहीत. इतके काय बोलण्यासारखे एखाद्या मुलामधे असू शकते हे मला समजायचे नाही. लेक्चर्स चुकवण्याचे काम सरबानीने आपखुशीने स्विकारले होतं. याचबरोबर होता होता रेहानच्या सर्व मित्रमंडळाशी आमची ओळख झाली होती. मी हाय बाय सोडल्यास कुणाशीच जास्त बोलत नव्हते. रेहान आणि त्याचे सर्व मित्र मला "टच मी नॉट" म्हणायचे. अर्थात पाठून! पुढ्यात बोलले असते तर कानफाट फोडलं असते एकेकाचे.

मला त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. माझ्या आयुष्याचे मार्ग मला वेगळे करायचे होते. चांगल्या मार्कानी बारावी, आणि मग मुंबई. इथे या गावात रहायलाच नको. मुंबईत कुठेही नोकरी मिळाली असती.. काही नाही तर इथे जशा शिकवण्या घेत होते तशा तिथे घेतल्या असत्या. आता कुणीही विचारलं असतं की जर शिकवण्याच घ्यायच्या तर इथे घेण्यात काय वाईट. पण या प्रश्नाच्या उत्तरासाठी संध्याकाळी आठनंतर कधीही माझ्या घरी यायचं. बाबा पिऊन फुल्ल.. आईची टकळी चालू.... बाबा पितात म्हणून आई बडबडायची की आई बडबडते म्हणून बाबा प्यायचे, असं एक विचित्र चक्र होतं. मला तर आजपण ती आठवण पण नकोशी होते..

तर एकूण काय तर मला पुढच्या वर्षी हे गाव सोडायचे होतं. त्यामुळे अभ्यास हे माझे पहिलं काम होतं. भान्गडी वगैरे बसून् मजा करायला माझा बाप प्रितमच्या बाबासारख सरकारी खात्यात नोकरीला नव्हता.

रेहान अधे मधे माझ्यकडे बघून खूप गोड हसायचा. हसताना त्याच्या एकाच गालावर खळी पडायची. मला सर्वात जास्त भन्नाट वाटायचं ते तो जर प्रितमला ओरडत असेल तर ते ऐकायला. खाली मान करून हिरमुसल्या तोंडानं ती ऐकायची. आणि तो कशावरूनही तिला ओरडायचा. आज केस मोकळे का सोडले ते काल रात्री ती का जेवली नाही इथपर्यंत.. प्रितमच्या मते, ते ओरडने नसून तो तिला "प्रेमाने" समजवायचा. डोंबल!

रेहान आणि त्याच्या ग्रूपविषयी मला कितीही तिटकारा आला तरी मी त्याच्यातलीच एक होऊन गेले. ते पण एका धमाल मारामारीनंतर...
आमच्या कॉलेजमधे जय नावाचा अजून एक टुकार मुलगा होता. तो प्रितमच्या मागे लागला होता. असं प्रितमनेच मला सांगितलं होतं. आता प्रितम आणि रेहान याचं लफडं आहे हे अख्ख्या कॉलेजला माहित झालं होतं. तरी तो तिच्या मागे का लागला होता हा मला पडलेला प्रश्न.

तर एकदा त्या जयने कॉलेज संपल्यावर घरी जात असताना प्रितमला वाटेत थांबवलं आणि तो तिला काहीतरी म्हणाला. मी तिच्यासोबतच होते. पण माझं सर्व लक्ष रस्त्यावरून जाणार्‍या रिक्शाकडे होतं . आमच्या गावात रिक्शा फार वाढल्या होत्या. एक रिक्शावाला दिवसाला किती कमवत असावा याचा मी मनातल्या मनात हिशोब घालत होते.
"ए भवाने, कुठे लक्ष आहे तुझं?" प्रितमने मला धपका घातला.
"कुठे नाही.. का? काय झालं?"
"काही नाही... चल रेहानकडे जाऊ,,,"
"आत्ता??" मी जवळ जवळ ओरडले.
"हो आता आणि ताबडतोब."
या दोन शब्दामधे काहीच फरक नव्हता. पण प्रितमला त्याच्याशी काय देणं घेणं.
"हे बघ प्रितम, संध्याकाळचे साडेसहा वाजले आहेत. कॉलेज पाचला सुटतं. इतका वेळ तू रेहानबरोबरच गप्पा मारत होतीस. मी तेव्हा तुला काहीच म्हटलं नाही. पण आता खरोखर खूप उशीर झालाय. उद्या त्याला भेटुन काय ते बोल"
पण तिच्या चेहर्‍यावरची घाई मला स्पष्ट दिसत होती. पण मला वेळ नव्हता. दुसर्‍या दिवशी तिसरीच्या मुलाचे चाचणे पेपर तपासून द्यायचे होते. माझं स्वतःचे केमचं जर्नल पूर्ण करायचं होतं.

मी घरी निघून गेले. प्रितम रेहानच्या घरी गेली असावी बहुतेक. दुसर्‍या दिवशी प्रितम माझ्या घरी आली नाही, मी पण जास्त वाट पाहिली नाही. माझी मी बसने कॉलेजला निघून गेले. वर्गाकडे निघाले होते इतक्यात मला रोशनने थांबवलं. हा रेहानच्या मित्रापैकी एक होता. अर्धा वेळ स्वतःच्या डोळ्यावर आलेल्या झिपर्‍या सांभाळताना गेल्याने दोन वर्षं अकरावीतच होता बिचारा!!
"प्रितम किधर है?" त्याने विचारलं.
"मुझे क्या मालूम.." मी खांदे उडवत उत्तर दिलं.
"ह्म्म," त्याच्या चेहर्‍यावर एकदम विचार करतानाचे भाव आले. मानेला एक झटका देऊन त्याने डोळ्यावर आलेले केस मागे केले. ईईई!! न्हावी मिळत नसता तर मी दिला असता शोधून.
"ऐसा कर, तू भी घर चली जा."
"व्हॉट? मी कशाला घरी जाऊ?" मला काही दुसरे काम नव्हते का काय!
"अरे, आज पंगा हो गया तो तू और प्रितमका नाम नही आयेगा.."
"कैसा पंगा..? क्या बात कर रहे हो?" माझं वाक्य अजून संपलं असेल नसेल तितक्यात चहुबाजूने बाईकचे आवाज आले. एक दहा बारा गाड्या तरी समोरच्या रस्त्यावरून येत होत्या. एकदम तयारीतच असल्यासारखे रोशनने माझा डावा हात धरून मला खस्स्कन ओढलं. आणि तो पुढे पळाला. अजून एक पाच सहा गाड्या पाठून आल्या. त्याच्यावरून काही माणसं उतरली. हातात कसल्यातरी बाटल्या होत्या.
आणि एक्दम सिनेमास्टाईल मारामारी चालू झाली. कोण कुणाला कशाला मारतय हे मला काहीच समजत नव्हतं. ओळखीचा कुणी चेहरा पण दिसत नव्हता. ओझरता रोशन अधून मधून एकदा दिसला.
मी या मारामारीच्या मधोमध उभी होते. कुणीतरी मला परत ओढलं. आयला काय कळसूत्री बाहुली समजले का काय?
"इथे काय करतेस? घरी जा.."
त्याचा चेहरा बघायच्या आधीच मी आवाज ओळखला,
"रेहान काय चालू आहे?"
"काही नाही तो भडवा जय प्रितमला त्रास देतोय.. तिच्या आयची.." आणि यापुढे एक लाथ बाजुकडून आलेल्या एक मुलाच्या तोंडावर. एकदम सिनेमास्टाईल वाटलं मला ते. आणि अच्छा, म्हणून प्रितम काल रेहानकडे गेली होती का? पण जर जय तिला त्रास देतो, तर तसं तिने मला कधीच सांगितलं नव्हतं, उलट काल ती त्याच्याशी व्यवस्थित हसून बोलत होती. काहीतरी गडबड होती आणि मला ती समजत नव्हती इतके निश्चित!

पण ही मारामारी जास्त वेळ टिकली नाही. कदाचित मारामारी करणार्‍या मुलांना माहित नसावं किंवा त्यानी लक्षात घेतलं नसावं पण पोलिस स्टेशन तिथून अवघ्या दहा मिनिटाच्या अंतरावर होतं.
एका मोटरसायकलवरून दोन हवालदार आले. ते यायच्या आत ही मुलं स्वतःच्या गाडयावरून पसार.. काय जबरदस्त टायमिंग आहे. जय आणि त्याचा ग्रूप कॉलेजकडे पळाला होता. रेहान आणि त्याचा ग्रूप मात्र उलट्या दिशेने पळाला होता. मी तिथेच गरगरल्यासारखी उभी होते.
हवालदार माझ्याच पुढ्यात आले.
"पोरं कुठं पळाली?" त्याने मला दरडावून विचारलं.
मी घाबरलेच होते खरंतर... पण मनात एक विचार आला.. जर रेहान कुठे पळाला हे सांगितलं असतं तर.. मज्जा आली असती!!! नाहीतरी त्या प्राण्याने मला खूप त्रास दिला होताच... खडी फोडायला कुठेतरी गेला असता तर...

का कुणास ठाऊक? डोळ्यासमोर भर मारामारीमधे मला ओढुन घेणारा रेहानचा चेहरा दिसला...
आणि मी जय पळाला होता त्या दिशेने हात केला.." तिकडे बाईकवरून पळाली सर्व लोक..."
मी म्हणाले.

माझ्या अख्ख्या आयुष्यात केलेली मी एकमेव चूक!!! अजून निस्तरतेय. अजून रात्री अपरात्री रेहानचा फोन येतो. मी परत परत निरूत्तर होतेय. त्या दिवशी जर मी जयला पकडवून दिलं नसतं तर... तर कदाचित प्रितम आणि जयचं लग्न कधीच झालं नसतं....

क्रमशः


अग आईग. कसली जबरदस्त ट्विस्ट टाकली आहेस. आता पुढचा भाग येइतोवर जीव जाणार! अरेरे



एकदम खर चिनू!! चिनूला अनुमोदन



ह्म्म! कहानी में ट्विस्ट! आता पुढचा भाग लवकर टाका! प्लीज!!!



सुसाट वेग कथेला!! असाच पुढचा भागही येऊ द्या सुसाट!!
स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अत्तराची कुपी संपतानाच जास्त जपायची असते...



सॉलीड ! मजा येतीये वाचायला, लवकर लिही गं, मस्त लिहीतेस तू. स्मित



कहानी मे ट्वीस्ट.. हो ना मायबोलीची एकता कपूर नंन्दीनीचा अशा कथांमधे हातखंडाच आहे मुळी.. जा बसा तुम्ही विचार करत की प्रितम आणि जय मधे काय झाल ते.. पुढचा भाग येइपर्यंत स्मित



खुपच छान आहे उत्कठा वाढ्ली. एकदम मस्त. पुढ्चा भाग लवकर येवु दे.



सुन्दर ! बरयाच दिवसानि ए़क छान मराठि सहित्य वाचायला मिळाले. पुढच्या भागाची आतुरतेने प्रतिक्षा करीत आहे.



ए़क छान मराठि सहित्य????



"जय आणि प्रितम चं लग्न?" म्हणजे रेहान आणि -----
नंदिनी शॉल्लेड धमाल येतेय्----उत्सुकता ताणतेय. पण जास्त ताणु नकोस, तुटेल. वाट पहातेय. लवकर येऊ देत.
तुझी शैली मस्तच आहे पण.
अनघा



मस्त मजा येतीए ! लवकर टाका पोस्ट !!



नंदू आधीच्या भागाच्या / पुढच्या भागाच्या लिंक टाकत जा गं सगळ्या पोस्ट मधे...म्हणजे शोधत नको बसायला...
~~~~~~~~~
~~~~~~~~~
स्मित



आयला नंदु तु कादंबरी सुरू केलीस आणि मला पत्ताच नाय ?????????? अरेरे या वेळी जोरदार धम्माल वाचायला मिळणारस दिसतय स्मित
मीनु ला अनुमोदन मी पण उलटी एकदा आणि सुलटी एकदा वाचली मोरपिसे स्मित

.................................................................................................................................
** आयुष्य म्हणजे एक फार मोठी गुंतागुंत आहे, ती सोडवत बसण्यापेक्षा त्यात गुंतुन मनमुराद जगावे **



आईशप्पथ... मी पण मिसलं! नंदिनी, काय बाई का काय तू... आणि मी पण! इथे कायतरी ट्रिगर पाहिजे, म्हणजे नंदिनीने लिहिलं की, मला कळलच पाहिजे.. असा. ती लिन्क बघून पुढे काही नाही म्हणून हिरमुसून हिरमुसून माझं काय झालं ते झालं... वर आणखी ही इथे मधल्यामधे लिहून पार... म्हणजे आमचं हिरमुसणं (आणि हिरमुसणं) कुठे गेलं? काय उपेग?
लिही बाई... आता मुहुर्त लागलाय मस्तं.... लिहीच तू. काय होईल ते होईल....



नंदिनी अगं पुढे कधी सरकणार आहे कादंबरी? वाट पहातेय..



नंदिनी ... आतुरतेनी वाट पाहतोय !