Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 26, 2008

Hitguj » My Experience » मला असे वाटले, तुमचं काय? » चित्रपट - अचाट आणि अतर्क्य » यादें » Archive through March 26, 2008 « Previous Next »

Shraddhak
Wednesday, March 26, 2008 - 7:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

' बातें भूल जाती है...
यादें याद आती है.... '

कित्ती खरं! यादें अजूनही बारीकसारीक तपशिलांसकट आठवतो ( दु:स्वप्नासारखा!) म्हणजे त्यांनी गाण्यातून सांगितलेय ते खरेच आहे तर!

तर लंडनमध्ये राहणारे जॅकी श्रॉफ नि रती अग्निहोत्री हे प्रेमळ, सद्वर्तनी, थोडे मध्यमवर्गीय ( वार्षिक उत्पन्न एखाद कोटीच्या घरात! हिंदी सिनेमात त्यांनाच मध्यमवर्गीय म्हणतात!) असले तरी त्याचे दुःख न मानता राहणारे जोडपे.
त्यांना तीन मुली असतात. जॅकी श्रॉफला कोका कोलाचे व्यसन असते. नाही, नाही... त्याला सिरॉसिस ऑफ लिव्हर होतो नि रती अग्निहोत्री तीन मुलींना कसे वाढवते नि त्यांची लग्ने लावून देते अशी कथा नाहीये सिनेमाची. सुभाष घई वास्तववादी सिनेमे बनवत नाही. ( नाहीतर किस्नामध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या धामधुमीत, सतत जिम्नॅस्टिक्सचा आधुनिक पद्धतीने सराव करणारी नायिका कशी दाखवता आली असती? किंवा अख्खा
सौदागर कसा बनवता आला असता?) आणि तसंही कोका कोलाच्या व्यसनाने माणूस मरत नाही. पण कुणीतरी मरायला हवे, म्हणून एका शांत दुपारी जॅकी रती मॉलमधून आठवड्याचा किराणा ( नि कोकच्या बाटल्या) घेऊन निघत असताना दैव दावा साधते. रस्त्यावर शांत दुपारी सहसा कुणीच नसते हे गृहीत धरून, ' सद् रक्षणाय खलनिर्दालनाय ' वगैरे लंडन पोलिस दलाने तुंबलेली एन्काऊंटरची कामे काढलेली असतात. तेव्हाच दुपारी कमी गर्दीच्या वेळात चटकन खरेदी उरकून जायला आलेल्या जॅकी रती जोडप्यातली रती पोलिसांच्या कामामध्येच कडमडते. आणि तिचे देहावसान होण्याची वेळ येते.
हॉस्पिटलमध्ये शेवटचा मेक अप करून झाल्यावर तिच्या डोक्याभोवती पांढरे बॅंडेज गुंडाळतात. ( याचे कारण त्यादिवशी तिची हेअर स्टायलिस्ट आली नव्हती, हे आहे म्हणे!)
' आता लग्ने होईपर्यंत ( तिन्ही मुलींची, जॅकीची पुनर्लग्ने नाही!) तुला मुलींचा मित्र बनून राहिले पाहिजे. ' अशी अवघड कामगिरी जॅकीच्या डोक्यावर टाकून ती मस्कारा, आयशॅडो आणि काजळ लावलेले डोळे मिटते.

जॅकीचे कोकचे व्यसन एका फटक्यात सुटते. ( पुढे पिऊन दुःख विसरण्याची निकड भासल्यावर तो थेट बारमध्ये बसून योग्य ती मादक पेये पिताना दाखवला आहे.) त्याची मधली मुलगी जरा जादाच असते. रात्रीबेरात्री घरी येण्याचे तिचे प्रमाण वाढते. त्यामुळे जॅकी ताबडतोब त्या तिघी मुलींना घेऊन भारतात परत येतो. ( येडाच आहे! इथेही रात्रीबेरात्री पार्ट्या, वगैरे चालतात म्हटलं.)

आता त्याच्या लंडनमधल्या वास्तव्याला एक हळवी (:-P) किनार आहे. ( असली वाक्यं लै भारी वाटतात परीक्षणामध्ये!) त्याचा एक मित्र आहे. कोटींमध्ये कमावणारा. त्याची केस सोनेरी केलेली बायको आहे. एवढा मोठा कारोबार सांभाळताना त्यांची दमछाक होत असते म्हणून आपल्या एकुलत्या एका पोराला चांगले वळण लावायची जबाबदारी त्यांनी जॅकी रती वर सोपवलेली असते. वर म्हटल्याप्रमाणे सद्वर्तनी, मध्यमवर्गीय असल्याने ते त्याला नीट वाढवतात. आता त्यांची सगळ्यात धाकटी मुलगी नि यांचा मुलगा यांच्या वयातले अंतर अगदी योग्य असेच असते त्यामुळे ही दोन्ही मुले लहानपणीच एकमेकांच्या प्रेमात पडून ठेवतात. एकदा कायदेशीर वय गाठले की लग्न करायचा त्यांचा बेत असतो. ( सुदैवाने त्यांनाही ' माणूस ' भेटत नाही. टीप: माणसा, दिवे घेशीलच!)
आता तिन्ही मुलींसकट जॅकी भारतात आल्यामुळे हृतिकचे धाबे दणाणते आणि जॅकीच्या आधीच्या दोन्ही पोरींना उजवायला मदत करण्याच्या मिषाने तोही भारतात येतो. तसेही त्याला स्वतःच्या ऑनलाईन मॅरेज पोर्टलचा धंदाही वाढवायचा असतोच!
पहिल्या मुलीसाठी शेराला सव्वाशेर तसे अगदी सद्गुणी कुटुंबातील स्थळ सांगून येते.
आपल्याला पडद्यावर एकदम सकाळ झालेली दिसते. तिन्ही मुली एकदम उठतात, ब्रश करतात, आंघोळ करतात, परफ्यूम अंगावर उडवतात, काजळ लावतात नि एकाच ताग्यातून शिवलेले कपडे घालून ( मध्यमवर्गीय ना ते! नुकतेच जॅकीने भारतात बस्तान हलवलेले असल्याने पोरींना वेगवेगळे कपडे द्यायची ऐपत नसते त्याची!) बागेत नाचत नाचत येतात. इथे गाण्यात एकदमच ' ओवे आवा ओ, वी वी वी वी वी.... टिंग टिंग... टिंग टिंग लला लालाला ' अशा अगम्य, गूढ ओळी आहेत हृतिक रोशनच्या तोंडी. ( बहुधा त्याने धाकटीला प्रपोज करून पाहिले असावे. पण मधलीचेही लग्न राहिले असल्याने ती काहीच बोलत नाही वाटतं.) या गाण्याच्या शेवटी थोरली थेट सासरीच जाते.
मधलीचा नंबर आल्यावर ती सुकांत नावाच्या मुलावर आपले लंडनमधे असल्यापासूनच प्रेम आहे हे सांगून टाकते. आता सुकांतच्या घरी गेल्यावर त्याची ' पूर्वाश्रमीची मोलकरीण पण एकदम लॉटरी लागून श्रीमंत झाली असावी ' अशी डाऊनमार्केट वागणारी आई दिसते. जॅकी परोपरीने मधलीला सांगतो, नको करू असल्या पोराशी लग्न! पण ऐकेल तर ती जॅकीची पोरगी कसली. तीही लग्न करून मोकळी होते. लग्नाचा सूत्रधार म्हणून हृतिक इथेही हजर असतोच.
आता दोन्ही पोरींच्या लग्नातून उरलेले पैसे असतात त्यातून जॅकी हृतिकसाठी एक घड्याळ घेतो. लग्नाच्या कामांमुळे तो दमलेला असल्याने तो ते घड्याळ धाकटीकडे देतो नि तिला ते हृतिकला द्यायला सांगतो. धाकटीने दोन्ही लग्नांत दाबून गोड खाल्लेले असते त्यामुळे बेसुमार वाढलेले वजन घटवायला ती सायकल हाणत निघते. करीना तशी मूळचीच ताकदवान आणि चतुरही! ती अर्धा तास आधी कारमधून निघालेल्या हृतिक रोशनला निर्जन जागी गाठते नि घड्याळ देते. कसा कोण जाणे, हे सुभाष घई बघत असतो. ' जो न देखे कोई, वो देखे सुभाष घई ' . करीना आयुष्यात प्रेम बिम नकोच म्हणते. हृतिक हिरमुसतो. ते दोन अनभिज्ञ जीव आपापल्या मार्गाला लागतात तेव्हा घईकाका कॅमेर्‍यासमोर येऊन ' ये तो होगा जी... ये तो होगा... ' असा आशीर्वाद देतो. ' डायरेक्टराच्या हाती सूत्रे सारी... ' असे असल्याने जर घई काका म्हणतायत तर त्यांचेच प्रेम जमून लग्न होणार, हे पक्के झाले.
आता करीना उर्फ धाकटी काय फक्त वजन कमी करायलाच सायकल चालवत असते असे नाही. ती तर रेस चॅम्पियन असते. आधीही मधली बहीण आगाऊपणा करते तेव्हा तिने सायकलची रपेट मारून, घरी येऊन तिला थेट थोबाडीत मारलेले असते. तर अशी सायकलपटू करीना जागतिक सायकल रेसमध्ये भाग घ्यायला ( का आशियाई कोण जाणे! मुकुंद यांना विचारायला हवे. त्यांना खेळांची खूपच माहिती आहे. करीनाबद्दल आणि तिच्या सायकलपटुत्वाबद्दल खरेतर लिहायला हवे त्यांनी. मुकुंद, दिवा घ्या प्लीज. :-) ) मलेशियाला जाते.

तिथे लोचटासारखा मागे मागे हृतिक आलेलाच असतो. तरी करीना ' जान के अन्जान ' बनत राहते. हृतिक दुसर्‍या मुलीभोवती रुंजी घालून करीनाच्या मनात द्वेषाचे बीज पेरू बघतो. पण त्या मुलीलाही ' पास पास ' चे व्यसन! पुढे हृतिक ' व्यसनमुक्ती केंद्रात ' मार्गदर्शक म्हणून नोकरी पत्करतो असे दाखवले असते तर भलताच वास्तववादी सिनेमा झाला असता. असो. तर त्या व्यसनी मुलीला हरवून निर्व्यसनी करीना रेस जिंकते आणि जवळच्याच एका बेटावर मगरी बघायला जाते. मगरींना एकदम त्यांचा ' खून भरी मांग ' मध्ये केलेला अपमान आठवतो ( त्यांना त्यात कबीर बेदी खायला दिला होता शेवटी!) नि त्या चवताळून माणसांवर हल्ला करतात. सगळे पळून जातात आणि करीना झाडावर अडकते. हृतिक लगोलग जातो नि बेशुद्ध करीनाला बोटीत घालून, बोट स्वतः ओढत आणतो. त्या प्रवासात डीजेने म्हटल्याप्रमाणे त्याला समुद्रात विषारी किडा चावतो. ( आता तिथे देऊळ नसते, त्यामुळे करीनाने देवाला न आळवताही तो खडखडीत बरा होतो.)
इकडे जॅकीला भारतातला उन्हाळा सहन होत नाही म्हणून तो लंडनमध्ये जायचे ठरवतो. तेवढ्यात पूर्वाश्रमीच्या मोलकरणीची सून झालेली मधली रोजच्या छळाला कंटाळून ( तिची सासू रोज तिला शिव्या देते म्हणे! हिला आपल्या पोतडीतून फ... ने सुरु होणार्‍या शिव्या काढायला काय झाले? परत त्या मोलकरणीला त्या कळणारही नाहीत!) घरी येते नि स्वतःवर रॉकेल ओतून पेटवून घ्यायचा प्रयत्न करते. ( मोलकरणीच्यात राहून तिची आत्महत्या करायची पद्धतही काय डाऊनमार्केट झाली पहा. नाहीतर एखादीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या असत्या. घर कशाला केरोसीन ओतून घाण करायचं?)
तिला समजावून आणि तिच्या नवर्‍याला थेट दुबईला लंडनच्या मित्रामार्फत ( इथे थेट ' हम साथ साथ है ' ची आठवण येते!) नोकरी लावून, तिची पुनर्पाठवणी करून तो ' हुश्श... ' करायला म्हणून लंडनला येतो. तसाही लंडनमधल्या मित्राच्या लग्नाचा वाढदिवस आलेला असतो. सगळे तो साजरा करायला भारतात येतात. तिथे मोनिश्का अशा रशियन नावाची, भारतीय आईबापांची, लंडन रहिवासी मुलगी आईबापांसकट आलेली असते. तिला हृतिक आवडतो. जॅकी श्रॉफ मध्यस्थ म्हणून हौसेने बोलणी करायला जातो. त्याच्या सद्वर्तनाने प्रभावित झालेले रशियन नावाच्या मुलीचे भारतीय आईवडील खूप खूश होतात नि खंजीर देऊन लग्न पक्के झाले म्हणून सांगतात.
करीना हृतिकच्या लग्नातली अडथळ्यांची शर्यत सुरू होते. तरी ते त्याला सांगायचा प्रयत्न करतात. तेव्हा जॅकी एकदमच डोक्यात राख घालून कोक ऐवजी जास्त कडक द्रव्ये पिऊन गाडीचा अपघात करतो. आई गेली, व्यसनी का असेना बाप राहू दे म्हणून कोमलहृदयी करीना हृतिकपासून दूर जायला सुरुवात करते. आणि बडजात्यापट असल्यासारखी त्या मोनिश्काला हृतिककडे ढकलते.
हृतिक आपला होणारा सासरा उर्फ रशियन नावाच्या पोरीचा बाप हा कसा लूज कॅरॅक्टरचा आहे हे जॅकीला पुराव्यानिशी दाखवतो. जॅकी मध्यमवर्गीय सद्वर्तनी त्यामुळे त्याला ते दृश्य एकदम revolting वाटते. तो ' हे लग्न मोडा ' असे सांगत येतो, तेव्हा हृतिकचे ' प्रचंड यशस्वी बिझनेसमन ' काका ( त्यांना पैशाचे व्यसन! आणि एवढे यशस्वी असून दाढीला नि केसांना स्वस्त मेंदी लावतात वाटतं. कारण त्यांचे केस सदैव फ़िक्के लालसर आणि विचित्र दिसत राहतात.) त्याचा अपमान करून घालवून देतात. नंतर हृतिकला घरात कोंडून ठेवतात. ( आयला, असं आधी हिरॉईनीला कोंडायचे... आता काळ बदलला. समानता आली.) तो पळून जातो नि करीनालाही पळवून नेतो. मग ते बोटीवर प्रवास करतात आणि रडून वगैरे झाल्यावर परत येतात. जॅकीला मोठ्या कष्टाने बारमधून त्यांची समजूत घालायला उचलून आणलेले असते. तो हृतिकला घरी जा म्हणून सांगतो.
दुसर्‍या दिवशी रशियन नावाच्या मुलीच्या वडिलांच्या कंपनीचे हृतिकच्या खानदानी कंपनीसोबत मर्जर आणि हृतिक नि मोनिश्का यांच्या साखरपुड्याची घोषणा असे होणार असते. हृतिक रडवेला होऊन बसलेला असतो. अचानक त्याच्या खर्‍या आईच्या हृदयातला मायेचा झरा प्रकट होतो.
दुसर्‍या दिवशी ते थेट मर्जरसाठी आलेल्या लोकांना कौल लावतात आणि यशस्वी बिझनेसमन काकांना पश्चात्ताप होतो.
तोवर जीन्स, टॉप वर टिकली लावलेली करीना तिथून निघून गेलेली असते. मग हृतिकचे सगळे खानदान ( यशस्वी बिझनेसमन काकांसकट!) तिला शोधत निघते. ती सापडते. आनंदीआनंद होतो. रशियन नावाच्या मुलीचे पुढे काय होते कळत नाही. ( कदाचित तिलाही कसलेतरी व्यसन लागत असणार. सिनेमाच तसा!)

शेवटी जॅकीला पुन्हा कोकचे व्यसन लागलेले दिसते. आणि त्याच्यावर नातींची जबाबदारी टाकून तिन्ही मुली नवर्‍यांसोबत उंडारायला गेल्यात, असे कळते. नात आजोबांना ' माझे मित्र व्हाल का? ' असे विचारते आणि आजोबा होकार भरतो. न होऊन काय करेल बिचारा! ' रती म्हणे, उरलो मैत्रीपुरता... ' अशी त्याची अवस्था झालेली असते ना!

तर अशा या आठवणी. ही कहाणी घईकाकांच्या कृपेने सुफळ संपूर्ण. ( आणि फ़्लॉप!)

तळटीप: यात मोलकरणींचा, त्यांच्या जीवनशैलीचा, महाराष्ट्र राज्य लॉटरीचा किंवा विन सुपर लोटो यांचा, लॉटरी जिंकणार्‍या मोलकरणींचा, लॉटरी जिंकणार्‍या इतर लोकांचा, स्वस्त मेंदी बनवणार्‍यांचा, ती विकणार्‍यांचा, ती विकत घेऊन वा न घेता शेजारून मागून आणून लावणार्‍यांचा, डाऊनमार्केट वर्तनाचा अपमान करायचा हेतू नाही. हे केवळ लेखनास पूरक विनोदनिर्मितीकरता वापरण्यात आले आहे. जर वरीलपैकी कुठल्याही प्रकारचा अपमान जाणवला तर ' आ बु दो स ' आहेच!

अजून एक तळटीप: मेंदीच्या राहून गेलेल्या उल्लेखाची आठवण करून देऊन मला आगामी मानहानीच्या दाव्यांपासून वाचवल्याबद्दल मंजूडी ( इंग्रजी: Manjud ) यांचे आभार.



Itgirl
Wednesday, March 26, 2008 - 7:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

..कित्ती खरं! यादें अजूनही बारीकसारीक तपशिलांसकट आठवतो ( दु:स्वप्नासारखा!) ....
....ही दोन्ही मुले लहानपणीच एकमेकांच्या प्रेमात पडून ठेवतात.....

श्र, परिक्षण धमाल लिहिले आहेस गं!!!


Manjud
Wednesday, March 26, 2008 - 8:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र

'आ बु दो स' तळटिपेपुरता मर्यदित ठेवला आहेस. आणि तुझ्या तळटिपेत तू स्वस्त मेंदिचा उल्लेख करायला विसरली आहेस. आता काय करायचं???


Ankyno1
Wednesday, March 26, 2008 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जो न देखे कोई, वो देखे सुभाष घई

त्यांना त्यात कबीर बेदी खायला दिला होता शेवटी

रशियन नावाची, भारतीय आईबापांची, लंडन रहिवासी मुलगी >>>>

श्र...

हा हा ग ब लो....


Shyamli
Wednesday, March 26, 2008 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किती जणांना फाडायचा विचार आहे अजून :D
.

Psg
Wednesday, March 26, 2008 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाऽऽऽऽऽऽपरे श्र! हे सगळं तुला लिहायला आठवतं याचंच मला जास्त कौतुक वाट्टं

यातलं ते विनोदी गाणं 'मिले मिले मिले मिले दिल मिले' - त्याला फाडलं नाहीस? ८० एक वेळा 'मिले मिले मिले' म्हणलाय म्हणे तो :P अँकी सांग बरं :-)

आणि ते 'एली ते एली क्या है ये पहेली????' हॉरिबल!!!!

अफ़लातून जोडे हाणलेस घईला.. आधी सौदागर आणि आता यादे.. बिचारा.. :-) आता कोणी त्रिमूर्तीवर किंवा किस्नावर लिहू नका रे.. जगायचा नाही तो


Ashbaby
Wednesday, March 26, 2008 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चच्च्च... काय हे.. ते लोक बिचारे कोट्यावधी रुपये खर्चुन पिक्चर काढायचे मनावर घेतात, आजचे आघाडीचे म्हणवणारे तारेतारका आपला अमुल्य वेळ खर्च करुन त्यात कामे करतात, गाणी लिहिणारे लिहीतात, संगीत देणारे देतात, गाणारे गातात... आपले थेटरवाले इमानेईतबारे हे सगळे दाखवतात आणि ज्यांच्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात येतो ते प्रेक्षक काय करतात??

निमुटपणे पाहायचे आणि गप्प बसायचे सोडुन, इथे त्यांची परिक्षणे छापतात, वर आणखी ज्यानी अजुन पिक्चर पाहीले नाही त्याना आधीच सावध करतात...

मी ह्यातले पिक्चर पाहिले नाहीत अजुन पण आता सीड्या आणून पाहण्याची खुप इच्छा होतेय, पुनर्प्रत्ययाचा आनंद घेण्यासाठी.. सोबत हे सगळे परिक्षण आणि प्रतिक्रिया पण छापुन घेऊन बाजुला ठेवणार आहे.

साधना


Ajjuka
Wednesday, March 26, 2008 - 10:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हिंदितले मध्यमवर्गीय, मगरींचा अपमान इत्यादी इत्यादी...
ह ह गब लो!
मेले मी हसून हसून.
टिव्हीवर पाह्यलेले तुरळक सीन्स या सगळ्यात कुठे असतील असा विचार करत होते पण ते कुठेच बसेनात. म्हणजे संपूर्ण सिनेमा बघितल्याशिवाय ते कळायचं नाही. हुश्शार तो घई! :-)


Tanyabedekar
Wednesday, March 26, 2008 - 11:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्यातल्याच एका गाण्यात एक सरदार पार गडाबडा लोळुन गातो.. तो एव्हडा लोळतो का गाताना ते मला अजुनही कळाले नाहिये.

Ankyno1
Wednesday, March 26, 2008 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंपल आहे टण्या....
शूटिंग च्या आदल्या दिवशी हावरटासारखं खाल्लं असेल.... आणि पुदीन हरा घ्यायला विसरला असेल....

अथवा....
एकूणच चित्रपट अचाट अतर्क्य आणि अचरट बनणारे अशी पूर्वकल्पना त्याला आल्यामुळे तो अचरटपणाला आपल्यापरीनं हातभार लावतोय....

अथवा...
हा सीन सर्वात शेवटी शूट केलाय... आणि शूटिंग च्या आधी त्या सरदाराला बाकी आख्खा सिनेमा पहायला लावलाय.... त्यामुळे तो सिनेमा पाहिल्याच्या दुःखात आणि संपला एकदाचा या आनंदात वेडा झालाय....

....
अजूनही काहीही मनात येतय...
पण लिहित नाही....
नाहितर सुभाष घई पुढच्या सिनेमात ते पण दाखवायचा


Ramani
Wednesday, March 26, 2008 - 12:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>मोलकरणीच्यात राहून तिची आत्महत्या करायची पद्धतही काय डाऊनमार्केट झाली पहा. नाहीतर एखादीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या असत्या. घर कशाला केरोसीन ओतून घाण करायचं?)

' रती म्हणे, उरलो मैत्रीपुरता... '
जो न देखे कोई, वो देखे सुभाष घई
>>>

श्र!! एकदम खल्लास लिहिले आहेस!! ह. ह. पु. वा.

Prajaktad
Wednesday, March 26, 2008 - 2:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाऽऽऽऽऽऽपरे श्र! हे सगळं तुला लिहायला आठवतं याचंच मला जास्त कौतुक वाट्टं >>>

अगदी अगदी! मी पण,हेच म्हणनार होते ... श्र ! तुझी निरिक्षण शक्ति आणी लेखन दोन्ही अफ़ाट आहे..
' जो न देखे कोई, वो देखे सुभाष घई ' .
नंतर हृतिकला घरात कोंडून ठेवतात. ( आयला, असं आधी हिरॉईनीला कोंडायचे... आता काळ बदलला. समानता आली.)
मगरींना एकदम त्यांचा ' खून भरी मांग ' मध्ये केलेला अपमान आठवतो ( त्यांना त्यात कबीर बेदी खायला दिला होता शेवटी!)>>>



Chinnu
Wednesday, March 26, 2008 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र! एकदम भन्नाट लिवलसं
नी, प्राज तुमचे परिक्षण पण सॉल्लिड बर्का!


Ashbaby
Wednesday, March 26, 2008 - 4:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कभी खुशी कभी गम चा ही नंबर येऊदे लौकर. मी तोही पाहीलेला नाहिये. त्यामुळे आता वाचण्याची उत्सुकता लागलीय.

साधना


Kedarjoshi
Wednesday, March 26, 2008 - 4:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

HHPV .. .. ..

Sashal
Wednesday, March 26, 2008 - 4:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्र, जोरदार एकदम .. ROFL

' रती म्हणे, उरलो मैत्रीपुरता... ' >>>

'मुझसे दोस्ती करोगे' वर लिहायला घे नेक्स्ट ..

Amruta
Wednesday, March 26, 2008 - 4:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसल भन्नाट लिहिलयस श्र, कायच्याकाय अचाट गोष्ट आहे हि. मी पाहिलेला नाहिये हा यादे पण आता मात्र पहायलाच हवा. :-)

Sayonara
Wednesday, March 26, 2008 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सॉलिड लिहिलं आहेस श्र. तुझं लिखाण बघुन मला एक प्रश्न पडतो. तो म्हणजे तू लिहिण्यापूर्वी परत एकदा पिक्चर बघतेस कां? कसे काय लक्षात रहातात एवढे डिटेल्स?

Mrinmayee
Wednesday, March 26, 2008 - 5:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रध्दा, जबरजस्त!!! इथे एक डिस्क्लेमर लावा "हसून पोट दुखल्यास ले(खक / खिका) जबाबदार नाही!" मुकुंदाला आणि माणसाला घाउक दिवे लेखाच्या शेवटी दिले असते तरी चाललं असतं. (कामेडीरसाचां भंग होतो नं मध्येच असं काही आलं की!)

Maitreyee
Wednesday, March 26, 2008 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबरा!! सायो, डिट्टो गं :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


.
हितगुज दिवाळी अंक २००७






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators